My Followers

Monday 23 July 2012

श्रीधर बळवंत टिळक हेच खरे ’लोकमान्य’!

श्रीधर बळवंत टिळक हेच खरे ’लोकमान्य’...!!!


डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,  म टा वरुन साभार

श्रीधरपंतांच्या आत्महत्येनंतर ’दुनिया ’ या मामा वरेरकर यांच्या साप्ताहिकाने खास ’ टिळक अंक ’प्रसिद्ध केला होता. त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एक अप्रतीम लेख लिहिला होता. दोन असामान्य व्यक्तिमत्त्वांतील अकृत्रिक स्नेहाचा धागा येथे दिसतो....! 
मी , ता. २६ मेला जळगाव येथे बहिष्कृत वर्गाच्या सभेला गेलो होतो. आदल्या दिवशी जेव्हा मुंबईहून निघालो त्याच दिवशी रा. श्रीधर बळवंत टिळक यांचे एक पत्र मला आले होते. त्यात आपल्याला दापोलीच्या सभेला येता आले नाही याबद्दल वाईट वाटते वगैरे मजकूर होता. त्या आत्महत्या करण्यासारखा प्रसंग ओढवला आहे असा ध्वनी. उमटण्यासारखा काहीच मजकूर नव्हता.
दुपारी फार उन्हं असल्यामुळे रा. लखाचंद यांच्या अध्यक्षतेखाली सभा संध्याकाळी सहा वाजता सुरू झाली. या सभेस पाच हजार लोक आले असल्यामुळे सभेचे कामकाज फार उत्साहाने चालले होते. हिंदुमहासभेच्या कामापेक्षा समाज समता संघाचा कार्यक्रम कसा परिणामकारक आहे , या आशयाचे थोडेसे कडाक्याचे भाषण संपवून नुकताच मी खाली बसलो होतो. इतक्यात एक तार आली. तार येण्याचे काही कारण नसताना तार आली यामुळे मला थोडा धक्का बसला.
वाचून पाहातो तो ज्या समता संघाच्या कार्याची महती गाऊन मी खाली बसलो होतो त्याच समता संघाच्या पुणे येथील शाखेचे उपाध्यक्ष माझे मित्र रा. श्रीधर बळवंत टिळक वारले म्हणून बातमी! मी अगदी गांगरून गेलो , आधी हे खरेच वाटेना. परंतु तार संघाच्या सेक्रेटरीने केली असल्यामुळे ती खोटी म्हणता येईना. अशा परिस्थितीत एक दुखवट्याचा ठराव मांडून मी सभा सोडून तसाच तडक मुंबईस आलो.
गाडीत श्रीधरपंतांच्या मरणासंबंधी अनेक तर्क माझ्या मनात आले व आपणआरंभिलेल्या कार्यातील धडाडीचा एक मोठा जोडीदार नाहीसा झाला हे जाणून माझे मन फार उद्विग्न झाले. श्रीधरपंताला कोणीतरी दुष्टाने विषप्रयोग केला असावा असा माझा प्रबळ तर्क झाला. तारेत मरणाचे कारण काहीच दिलेले नव्हते. तेव्हा मरणाचे हेच कारण हेच की दुसरे कोणते , हे जाणण्यासाठी गाडी मुंबईस केव्हा पोहोचेल असे मला झाले होते. गाडी दादरला पोहोचल्याबरोबर मी माझ्या ऑफिसात गेलो. ’ टाइम्स’ हातात धरतो तोच श्रीधरपंतांचे हातचे मरणापूवीर् तीन तास अगोदर मला लिहिलेले एक पत्र टेबलावर पडलेले दिसले. तेव्हा ’ टाईम्स ’ टाकून ते हाती घेतले. वाचतो तो आत्महत्त्या हेच मरणाचे कारण होय , हे अगदी स्पष्ट झाले.
मग तर अगदीच कष्टी झालो. श्रीधरपंताला मी थोडासा दोषही दिला. आत्महत्त्या हा मरणाचा भेसूर प्रकार आहे. परंतु ज्या कारणामुळे ही आत्महत्त्या घडली जी कारणे ध्यानात घेतली म्हणजे श्रीधरपंताची आत्महत्त्या मोठी हृदयदावक होती असे म्हणणे भाग पडते. आपले आयुष्य ’ केसरी ’ कंपूशी भांडण्यात जाणार , आपल्यालाविधायक काम करण्यास अवसर रहाणार नाही , यास्तव जगण्यात हशील नसून आत्महत्त्या करणे बरे , असे म्हणण्याची पाळी श्रीधरपंतांवर यावी यासारखी दुसरी अनिष्ट गोष्ट ती कोणती ?
माझ्या मते श्रीधरपंतांना ’ केसरी ’ त जागा मिळाली असती तर तो घोर प्रसंग आलाच नसता. ’ केसरी ’ पत्रात आपणास जागा मिळावी ही एक त्यांची मोठी महत्त्वाकांक्षा होती. टिळकांच्या मरणानंतर त्यांच्या हाती ’ केसरी ’ गेला त्यांनी केवळ टिळकांचा मुलगा म्हणून श्रीधरपंतांना त्यांच्या वडिलांनी केलेल्या उपकाराची फेड या दृष्टीने ’केसरी ’ च्या चालकांत जागा द्यावयास पाहिजे होती. परंतु टिळकांचा मुलगा म्हणून नव्हे , तर भारदस्त लेखक या दृष्टीने ’ केसरी ’ च्या संपादक वर्गात श्रीधरपंतांचा समावेश व्हावयास पाहिजे होता.
राजकीयदृष्ट्या ते काही मवाळ नव्हते. जहाल , सुताळ आणि बेताल या सर्वांच्यापेक्षा ते फारच पुढे गेलेले होते. तेव्हा त्यांच्या लिखाणाने ’ केसरी ’ ला काही धोका नव्हता ,असे असताना त्यांना ’ केसरी ’ त जागा मिळाली नाही. यांचे मला राहून राहून आश्चर्य वाटते. ’ केसरी ’ त जागा मिळाली असती तरीही ’ केसरी ’ कंपूचा भंड लागून जे व्हावयाचे ते झालेच असते असे काही लोक म्हणतील. कसेही असो एवढी गोष्ट खास की निदान पैशापायी काही भांडण झाले नसते. कारण श्रीधरपंत यांची मनोवृत्ती त्या दृष्टीने अनुदार नव्हती. तसे ते असते तर वडिलांची इच्छा पुरी पाडण्याच्या हेतूने त्यांनी ट्रस्टडीडवर बिनतक्रार सह्या केल्या नसत्या व आज ’ केसरी ’ कंपूवर हा त्यांनी केवढा उपकार केला आहे याची आठवण ’ केसरी ’ कंपूला असती तर बरे झाले असते.
मला त्यांच्यासंबंधी काय वाटते हे मी त्यांच्या निधनासंबंधीचा लेख लिहिण्यास उद्युक्त झालो आहे यावरून सर्वांना जाणता येण्यासारखे आहे. कै. श्रीधरपंत टिळक हे एका ब्राह्माण्याभिमानी गृहस्थाचे चिरंजीव. त्यांचे वडील लो. टिळक यांना १६१६ साली जेव्हा मी ’ मूकनायक ’ पत्र चालवीत असे त्यावेळी दर अंकात जरी नसले , तरी अंकाआड शिव्याशापांची लाखोली वाहात असे. ब्राह्माण्याशी अहनिर्श लढणाऱ्या माझ्यासारख्या अस्पृश्य ज्ञातीतील एका व्यक्तीने ब्राह्माण्याभिमानी व्यक्तीच्या पोटी जन्मास आलेल्या श्रीधरपंतांचे मरणाने दु:खित व्हावे हा योगायोग तर त्यांच्याही पेक्षा विलक्षण आहे हे कोणीही कबूल करील. परंतु हा योगायोगच मोठेपणाची एक मोठी साक्ष आहे.
कोणी काहीही म्हणो , श्रीधरपंतांच्या वडिलांना लोकमान्य ही पदवी अयथार्थ होती. तेली , तांबोळी म्हणून बहुजनसमाजाचा उपहास करणाऱ्या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे म्हणजे लोकमान्य या शब्दाचा विपर्यास करणे , असे आमचे मत आहे. लोकमान्य ही पदवी जर टिळक घराण्यापैकी कोणा एकास साजली असती तर ती श्रीधरपंतासच होय . टिळकांच्या हातून लोकसंग्रह झाला नाही. खरा लोकसंग्रह श्रीधरपंतच करू शकले असते. तो करण्यास ते उरले नाहीत , ही महाराष्ट्रावरील नव्हे हिंदुस्तानावरील मोठीच आपत्ती आहे , असे भिक्षुकशाहीच्या कच्छपी नसलेल्याकोणत्याही लोककल्याणेच्छू माणसास कबूल करणे भाग आहे.


पुनर्संपादन - राज जाधव....! 

4 comments:

  1. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95

    ReplyDelete
  2. श्रीधर बळवंत टिळक ( मार्च १, १८९६ - मे २५, १९२८) मराठी लेखक, आणि सामाजिक कार्यकर्ते होते. ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे धाकटे पुत्र होते. श्रीधरपंतांचा जन्म १८९६ साली झाला असावा, असे अनुमान केले जाते. आतापर्यंत त्यांची जन्मतारीख निश्चित स्वरूपात कळलेली नाही. १९२८ साली त्यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-खाली आत्महत्या केली.

    श्रीधरपंतांचा लोकमान्यांशी पहिला खटका त्यांच्या लग्नात उडाला. ब्राम्हणांच्या आग्रहावरून टिळकांनी प्रायश्चित्त म्हणून पंचगव्यप्राशनाची तयारी केली. श्रीधरपंतांनी त्याला विरोध केला. 'माझ्या लग्नासाठी जर प्रायश्चित्त घेणे, तर ते लग्नच न झालेले बरे.’ हा विरोध फार काळ चालला नाही. पण पुढे टिळकवाड्यात अस्पृश्यांसोबत सहभोजन घडवून त्याचेही प्रायश्चित्त त्यांनी घेतले.

    टिळकवाड्यातले सहभोजन , समतासंघाची स्थापना तसेच गणेशोत्सवात बहुजनमेळाव्याचा कार्यक्रम घेणे ही पुण्यासाठी क्रांतीच होती. पण सामाजिक चळवळी करणाऱ्यांनी राजकीय चळवळींत अडथळे बनू नये, असा परखड सल्लाही ते सुधारणावाद्यांना देण्यास कचरत नसत. त्यांची भूमिका कायम सुधारणांसाठी आग्रही पण समन्वयवादी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, केशवराव जेधे, जवळकर असे ब्राह्मणेतर चळवळीचे अनेक अध्वर्यू त्यांचे जवळचे मित्र होते.

    समता संघाची स्थापना[संपादन]
    १९२५ नंतर श्रीधरपंत आंबेडकरांकडे ओढले गेले. त्यांच्या अनेक कार्यक्रमात श्रीधरपंत हजर असल्याचे उल्लेख बहिष्कृतमध्ये आहेत. महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहातही श्रीधरपंतांची शुभेच्छांची तार सर्वांत आधी वाचून दाखवण्यात आली होती. लो. टिळक यांचे पुत्र रामचंद्र आणि श्रीधर हे दोघे बंधू मुंबईस आले तर साहेबांना ( आंबेडकरांना ) भेटल्याशिवाय पुण्यास जात नसत. साहेब पुण्यास गेले तर साहेबांना गायकवाडवाड्यातील आपल्या राहात्या घरी घेऊन जाण्याचे ते प्रयत्न करीत. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल, असे त्यांना समजावून सांगून साहेब त्यांना परत पाठवीत.

    १९२५ साली प्रबोधनकार ठाकऱ्यांच्या पुण्यातील वास्तव्यात श्रीधरपंत टिळकांनी त्यांची पहिल्याच दिवशी भेट घेतली. त्या भेटीत मागास बहुजनसमाज आणि प्रामुख्याने अस्पृश्य समाज यांच्या उत्कर्षाविषयी आपली कळकळ त्यांनी मनमोकळी व्यक्त केली होती.

    श्रीधरपंत टिळकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्यावर सत्याग्रहात सहभाग घेतला होता. ८ एप्रिल १९२८ रोजी समता संघाची पुण्याची शाखा त्यांनी स्वतःच्या गायकवाड वाड्यात सुरू केली. उद्‌घाटनाकरिता स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजर होते.

    समतासंघाच्या स्थापनेच्या वेळच्या त्या सहभोजनाच्या वेळी ग्रंथालयाच्या सभागृहात जेवणाच्या पंक्ती मांडल्या होत्या. दलित नेते पां. ना. राजभोज तेथे होते. श्रीधरपंतांनी टिळकवाड्यात समाजसमता संघाची स्थापना केल्यामुळे आणि सहभोजनाच्या कार्यक्रमामुळे पुराणमतवादी मंडळींना राग आला व त्यांनी अनेक तर्‍हेने श्रीधरपंतांना त्रास देण्यास सुरुवात केली. सहभोजनाच्या वेळी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. खोट्या अफवा उठवल्या गेल्या, पण गोड्या तेलाचे दिवे पेटवून डॉ. आंबेडकरांसह सहभोजन आनंदाने पार पडले.

    टिळकांच्या वाड्यात अस्पृश्यांचा मेळा[संपादन]
    टिळक बंधू यंदा अस्पृश्यांचा मेळा गायकवाड वाड्यात घेऊन येणार अशी भुमका पुण्यात पसरली होती. आणि ती खरीही होती. एकीकडे दंगलबाज छत्रपती मेळ्याची दहशत आणि त्यातच टिळक बंधूंचा हा उपद्व्याप! ट्रस्टी मंडळी भेदरून गेली. ब्राम्हणेतर मंडळींच्या पाठिंब्याने रामभाऊ आणि बापू मनात आणतील ते करतील ही त्यांची खात्री असल्यामुळे, त्यांनी दोन मार्ग पत्करले. पहिला अस्पृश्य मेळा वाड्यात आणू नये असा मनाई हुकूम बजावून घेतला. पण टिळक बंधूंनी असे हुकूम बेधडक झुगारून फेटाळण्याचा आणि परिणामांना तोंड देण्याचा धीटपणा अनेक वेळा दाखविला होता. तो अनुभव लक्षात घेऊन ट्रस्टींनी दुसरी एक शक्कल काढली. फौजदारी प्रतिबंधाला ठोकरून त्या पोरांनी मेळा आत घुसवलाच, तर निदान गणपतीबाप्पाला अस्पृश्यांच्या स्पर्श तरी होऊ नये, एवढ्यासाठी वाड्यातल्या गणपतीच्या मखराभोवती लोखंडी पिंजरा उभारुन त्याला भलेभक्कम टाळे ठोकले. पण हे टाळेही फोडले तर? त्याचाही एक मनाई हुकूम ट्रस्टींनी मिळवून तो टिळक बंधूंवर बजावण्यासाठी बेलिफाला वाड्याच्या दरवाजावर आणून बसवला.

    ReplyDelete
  3. लोकमान्यांचा गणपती ट्रस्टींच्या तुरुंगात.

    सकाळी एकदोन वेळा वाड्यात येऊन बेलिफाने रामभाऊ नि बापू यांना नोटीस घेण्याबद्दल विनंती केली. दोघांनीही बाहेर बस, आत वाड्यात पाऊल टाकलेस तर याद राखून ठेव, असे धमकावून त्याला बाहेर घालवला. एकदा तर रामभाऊ त्याच्या अंगावर धावून गेले. सामोपचाराने बेलिफाला नोटीस लागू करता येणार नाही, असे दिसतातच, ट्रस्टींपैकी एकाने कोर्टाकडे धाव घेऊन खुद्द नाझरलाच वाड्यात आणले. त्यांनी टिळकबंधूंशी शक्य तितक्या सभ्यतेने आणि शांततेने चर्चा केली. हा प्रकार गणपतीच्या पिंजऱ्याजवळच चालला होता. रामभाऊंनी एक मोठा हातोडा सदऱ्याखाली लपवून आणला होता. नाझर साहेबांचा कायदेबाजीचा सगळा वेदान्त ऐकल्यावर रामभाऊ ठासून म्हणाला, अहो नाझर साहेब, आमच्या थोर वडिलांची सारी हयात तुमच्या सरकारने तुरुंगातच खतम केलीत ना? आता सहन होणार नाही, तुमची नोटीस ठेवा तुमच्या खिशात. आमचे काम हेच. असे म्हणून रामभाऊने ताडकन हातोड्याचा प्रहार करून पिंजऱ्याचे टाळे फोडले आणि सगळा पिंजरा उखडून दूर भिरकावून दिला. बिचारा नाझर काय करणार ? आला तसा निमूट परत गेला.

    याच दिवशी संध्याकाळी पांडोबा राजभोज यांचा अस्पृश्यांचा श्रीकृष्ण मेळा गायकवाड वाड्यात जाणार होता. वरील प्रकार झाल्यानंतर मेळा बरोबर आणल्याशिवाय पुन्हा इकडे फिरकू नकोस. मी आहे येथे खबरदार, असे बजावून रामभाऊने श्रीधरपंतांना प्रबोधनकार ठाकऱ्यांकडे जाऊन बसण्यास सांगितले. वाड्यात काय चालले आहे याची माहिती श्रीधरपंतांनी प्रबोधनकारांना दिली. श्रीधरपंत सबंध दिवस ठाकऱ्यांकडे बसलेले होते.

    संध्याकाळी दिवेलागणी होताच श्रीधरपंत पुणे कँपात भोकरवाडीला गेला. रात्री ८ वाजता मेळ्याला घेऊन ते प्रबोधन कचेरीवर आले. तेथे सडकेवरच मेळ्याच्या गायनाचा कार्यक्रम झाला. कचेरी असलेल्या सदाशिव पेठेसारख्या ब्राम्हणी अड्डयात अस्पृश्यांच्या मेळ्याचा कार्यक्रम एक चमत्कारिक आकर्षणाची बाब होती. आजूबाजूला बघ्यांची खूप गर्दी जमली होती. मेळा तेथून गायकवाड वाड्यात जाणार असा सगळीकडे बोभाटा झालाच होता.

    इकडे गायकवाड वाड्याच्या दरवाजावर दोन गोऱ्या सार्जंटांच्या अधिपत्याखाली एक पोलिसपार्टी अडसरासारखी उभी होती. रामभाऊ वाड्याबाहेर दरवाजासमोर एकटाच शतपावली घालीत फिरत होता. आमच्याकडून एक सायकलस्वार ५-५ , १०-१० मिनिटांनी तिकडे फेऱ्या घालून रामभाऊंच्या सूचना आणीत होता. खुशाल या , असा रामभाऊचा सिग्नल मिळताच मेळा गाणी गात वाड्याकडे निघाला. रस्त्यात बघ्यांची गर्दी होतीच. छत्रपती मेळ्याची मंडळीही वाड्यासमोर चंग बांधून तयार होती.

    मेळा गात गर्जत वाड्याजवळ येताच बापू(श्रीधपंत टिळक) आणि रामभाऊ आघाडीला उभे राहिले. दरवाजाजवळ येताच पोलीसपार्टीने दरवाजाला आपले कूस घातले. एका सार्जंटाने दोन्ही हात पसरून 'यू कॅनॉट एंटर द वाडा' असा दम भरला. रामभाऊने एक मुसंडी मारून त्याला बाजूला सारले आणि पोलिसांची फळी फोडून तो आत घुसताच बरीच मंडळीही घुसली. त्या प्रचंड जनप्रवाहाला पाहून पोलिस नि सार्जंट बाजूला झाले. मेळा गणपतीसमोर जाऊन थांबताच पद्य-गायनाला जोरात सुरूवात झाली. सुमारे अर्धा तास कार्यक्रम झाल्यावर, गुलाल प्रसाद वगैरे शिष्टाचार झाले आणि मेळा शांतपणे आला तसा बाहेर गेला. कार्यक्रम चालू असतानाही बिचारा कोर्टाचा बेलीफ दोन तीन वेळा नोटिशीचा कागद हालवीत बापूजवळ आला. त्याने त्याला हुसकावून बाजूला बसायला सांगितले गेले. मेळा निघून गेल्यावर तो पुन्हा बापूजवळ आला. वास्तविक ज्या कामाची मनाई करण्यात आली होती ते काम तर झालेच होते. बापूने नोटिशीचा कागद हातात घेतला आणि टरटर फाडून टाकला.

    मेळा गेल्यावर बापू आणि इतर ५-६ मंडळी प्रबोधन कचेरीत आली. हा शुक्रवारचा दिवस होता. प्रबोधनकारांनी केलेल्या लोकहितवादी साप्ताहिकाचा अंक दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी बाहेर पडायचा होता. मेळ्याची सविस्तर माहिती देण्यासाठी शेवटचे ८ वे पान राखून ठेवण्याचे बापूने सांगितले होते. मंडळी छापखान्यात येताच बापूने झाल्या हकीकतीचा वृत्तान्त सांगितला आणि तो श्रीपतराव शिंद्यांच्या चिरंजीवाने (माधवरावने) लिहून काढला. कंपोझिटर्स तयार होतेच. मजकूर कंपोझ होऊन, 'गायकवाड वाड्यावर अस्पृश्यांच्या मेळ्याची स्वारी', या मथळ्याखाली लोकहितवादी साप्ताहिकात सबंध पानभर हकीकत छापून वक्तशीर बाहेर पडली.

    १९२७ मध्ये महात्मा फुलेजयंतीचे शताब्दीवर्ष होते. त्यानिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत होते. अशाप्रकारच्या कार्यक्रमांत श्रीधरपंतांचा सहभाग होता. मुंबईत गिरगाव व परळ या भागांमध्ये सभा झाल्या. त्यामध्ये श्रीधरपंतांची उपस्थिती लोकांचे लक्ष वेधून गेत होती. या भाषणात त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांमुळे त्यांची जनमानसातील प्रतिमा अधिकच उजळून निघाली.

    ReplyDelete
  4. श्रीधरपंतांनी २५ मे १९२८ रोजी भांबुर्डा येथे मुंबई-पुणे एक्स्प्रेसखाली जीव दिला. त्यांनी आत्महत्येआधी तीन पत्र लिहिली; एक पुण्याच्या कलेक्टरला , दुसरे विविधवृत्त साप्ताहिकाला आणि तिसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना. कलेक्टरला लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपल्या मृत्यूचे कारण सांगितले आहे. '... मला असे नेहमी वाटे की माझा जन्म माझ्या देशाची, माझ्या समाजाची व माझ्या भाषेची सेवा करण्याकरिता आहे. माझ्या माता पितरांचीही याहून भिन्न कल्पना नव्हती. माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांचे असहाय खेळणे बनण्याकरिता नव्हता... एखाद्या गरीब अपरिचित शेतकऱ्याच्या झोपडीत माझे जीवितकार्य पुरे करण्याकरिता माझा पुनर्जन्म होवो, अशी मी आशा बाळगतो.'

    त्यावेळी ट्रस्टी आणि टिळक बंधू यांच्यात तीव्र स्वरूपाची वादावादी, बाचाबाची आणि प्रसंगी धक्काबुक्कीपर्यंत प्रकरणे चालली होती. अरसपरस फिर्यादींचे सत्र चालू होते. वाड्यातल्या राजकारणामुळे श्रीधरपंत नेहमी वैतागलेले असत. 'केसरी माझ्या हातात आला तर पुन्हा महाराष्ट्राला आगरकरांचा अवतार दखवीन' असे त्यांचे म्हणणे असल्याचा उल्लेख प्रबोधनकार ठाकरे करतात. श्रीधरपंतांचा(बापूचा) स्वभाव त्रासिक असला तरी फार सोशिक होता.

    मनातली खळबळ, संताप आणि चीड सगळे गाठोडे विश्वासाने आणि मनमोकळेपणाने आणून ओतण्याचे, श्रीधरपंतांना अवघ्या पुण्यात प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे बिर्‍हाड हे एकच ठिकाण होते. वाड्यात ट्रस्टी लोकांशी काही गरमागरम बोलाचाली, तंटाभांडण किंवा रामभाऊंबरोबर हातघाईचे प्रकरण झाले का बापू तडाड उठून प्रबोधनकार ठाकरेंकडे यायचे. अगदी मध्यरात्रीसुद्धा. पुणेरी राजकारणाच्या कंकासाला कंटाळून पुण्याला रामराम ठोकून ठाकरे दादरला आले नसते, तर कदाचित बापूने आत्महत्या केलीच नसती.

    असत्य, अन्याय, अप्रामाणिकपणा त्याला बिलकूल सहन होत नसे. तो एकदम उखडायचा. त्याच्या कित्येक तक्रारी गंभीर असल्या, तरी पुष्कळशा अगदी क्षुल्लक असत. त्यांचा पाढा तावातावाने त्याने ठाकऱ्यांपुढे ओकला का धीराच्या नि विवेकाच्या चार उपदेशाच्या गोष्टींची मात्रा चाटवून ते त्याला शांत करीत असत. हरएक बऱ्यावाईट घटनेचे चक्र त्याच्या डोक्यात सारखे गरगरत असायचे. मनस्वी विचार करणाऱ्या मंडळीना मनातले विचार आणि भावना मोकळ्या करण्यासाठी एखादा स्नेहीसोबती आप्त जवळपास नसला , म्हणजे ते लोक मनांतल्या मनांत कूढू लागतात. असल्या कुढण्याच्या अतिरेकानेच श्रीधरपंत टिळकांची आत्महत्या ही दुदैवी घटना घडली!

    ReplyDelete