My Followers

Tuesday 30 October 2012

दलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी ? - पु.ल.


दलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी ? - पु.ल.


चंद्रपूर येथील अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ४ मार्च १९८९ ला पुलंनी केलल्या भाषणातला अंश... 


आयुष्यात माणसाला निखळ माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देणारा मंत्र मला केशवसुतांच्या ' मळ्यास माझ्या कुंपण पडणें अगदी न मला साहे ' या ओळीत सापडला. शाळकरी वयापासून आजतागायत केशवसुतांना मी अनेक वेळा भेटत आलो. माझ्याप्रमाणे तुमच्यापैकी अनेकांसाठी केशवसूत आजही गातचि बसले आहेत. वाढत्या वयाबरोबर आसपास पाहायला लागल्यावर वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाच्या मळ्याला जात, धर्म, राष्ट्रीयत्त्वाच्या भ्रामक कल्पना, देव, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म, पूर्वजन्म, कर्मविपाक अशा नाना प्रकारची नाना कारणांनी उभारलेली असंख्य कुंपणं दिसायला लागली.


ऐहिक आणि पारलौकिक दहशतीच्या दगडांच्या भिंतीची ती कुंपणं होती. अशा या अंधा-या वातावरणात जगणा-यांच्या जीवनात वीज चमकावी, गडगडाट व्हावा, मुसळधार पाऊस कोसळून नांगरल्याविण पडलेल्या भूमीवर नवं पीक येण्याची चिन्हं दिसावी अशी अवस्था झाली. बाबासाहेबांनी एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुनं जग उलथवण्याची शक्ती असलेलं साहित्य उभं राहिलं. तो शब्द म्हणजे ' धम्म ' . ' धम्म ' या शब्दानं समाजात माणसाचं श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी धम्म म्हटलं. बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला, असं झालं नाही. तर, निखळ प्रज्ञा आणि करुणेचं त्यांना जिथे अपूर्व मिश्रण आढळलं, त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला. अंधश्रद्धांवर आधारलेल्या जीवनपद्धतीकडून प्रेम आणि निर्मळ बुद्धीच्या बळावर चालणा-या जीवनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केला. या बुद्धिनिष्ठ जीवनपद्धतीचं नाव 'धम्म' असं आहे. 


बाबासाहेब हे सामाजिक शोषणाच्या पाळामुळाशी जाऊन कुदळ चालवणारे पहिले क्रांतिकारक म्हणायला हवेत. उन्मत्ताच्या टाचेखाली रगडल्या जाणा-या माणसाला माणुसकीच्या प्राथमिक हक्कांसाठी लढणारा सैनिक म्हणून उभं करणं हे एक दिव्य होतं. बाबासाहेबांनी ते करून दाखवलं. चवदार तळ्याचं पाणी सर्वांना वापरायला द्यायची घोषणा म्हणजे बाबासाहेबांनी आंधळ्या रुढी पाळणा-या अमानुषांना निखळ सुंदर माणसं बनवण्याची दिलेली एक सुवर्णसंधी होती.


दलित साहित्याचं जे सूर्यकूल आपण मानतो त्याची पहाट महाडच्या क्षितीजावर फुटली होती, असं म्हणायला पाहिजे. शरसंधानासारखं हे शब्दसंधान होतं. एका नव्या त्वेषाने पेटलेल्या कवींना आणि कथा-आत्मकथा-कादंबरीकारांनी या प्रतिमासृष्टीतून वास्तवाचं जे दर्शन घडवलं, ते साहित्यात अभूतपूर्व असं होतं. जिथे धर्म, वर्ण, वर्ग या शक्ती माणसाच्या छळासाठी अन्याय्य रीतीने वापरल्या जातात, तिथे त्या प्रवृत्तींचा नाश करायला शस्त्र म्हणून जेव्हा शब्द वापरले जातात त्या क्षणी दलित साहित्याचा जन्म होतो. त्या साहित्यिकाचा जन्म कुठल्या जातीत आणि कुठल्या धर्मात झाला याचा इथे काहीही संबंध नाही. शोषण, उपेक्षा, जन्मावरून उच्चनीच भेद ठरवणा-या रुढी यांचा बीमोड करायला उठलेलं हे साहित्य फक्त माणुसकीला मानतं. ' बहुजन हिताय बहुजन सुखाय ' हीच मुळी या साहित्याची मूळ प्रतिज्ञा आहे. वास्तवाशी इमान राखून तिथे पदोपदी जाणवणा-या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, या ध्येयाने प्रेरित झालेले हे साहित्य जन्मजातच दुय्यम दर्जाचे, असा साहित्यिक हिशेब मांडणा-यांना दलित साहित्य हा शब्द खटकणारच.


दलित शब्दाची व्याप्ती लक्षात न घेणा-यांना दलित संमेलन हा सवतासुभा वाटतो. पण ही विचारसरणी नवी नाही. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हा विश्वव्यापी विचार घेऊन लढलेल्या आंबेडकरांना हिंदू समाजातल्या अस्पृश्यांचे पुढारी म्हणून एका कुंपणात टाकून देण्यात आले होते. त्यांच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या साहित्यालाही अशाच प्रकारचं लेबल लावून त्यामागील व्यापकता आकुंचित करण्यात आली तर त्यात नवल नाही. बाबासाहेबांसारखा ग्रंथप्रेमी आजच्या काळात लाखात एखादा झाला असेल. पण जीवनातला त्यांचा प्रवास मात्र ग्रंथाकडून ग्रंथाकडे असा झाला नाही. ग्रंथाकडून जीवनाकडे आणि जीवनाकडून ग्रंथाकडे अशी त्यांची परिक्रमा चालली होती. अशी जीवनातून प्रेरणा घेऊन पुन्हा जीवनालाच सार्थ करणारे साहित्य निर्माण करायची प्रेरणा लाभावी या साहित्य संमेलनाचा प्रपंच आहे, असं मी मानतो.


पुनर्संपादन - अँड. राज जाधव...!!!  
संदर्भ - म.टा. १२ जून २००८ 

Monday 29 October 2012

प्रतित्यसमुत्पादाच्या बारा कड्यांचे विवरण...!


प्रतित्यसमुत्पादाच्या बारा कड्यांचे विवरण...!


१) अविद्या

      प्रतित्यसमुत्पादाची पहिली कडी म्हणजे अविद्या.

            अविद्या म्हणजे चार आर्यसत्याचे अज्ञान. या चार आर्यसत्याचे यथार्थ ज्ञान नसणे. अशा अविद्य लोकांना त्यांच्या मनाविषयी व शरीराविषयी तीन प्रकाराचे भ्रम निर्माण होत असतात.

      आपले शरीर आणि मन म्हणजे मी, माझे व माझा आत्मा’ हे भ्रम वाढत गेल्यावर हव्यास निर्माण होतो. हा हव्यास वाढल्यानंतर वर्तमानातील आणि भविष्यातील जीवनक्रम घडविणारी कृत्ये घडत असतात.

२) संस्कार

      प्रतित्यसमुत्पादाची दुसरी कडी म्हणजे संस्कार. अविद्येमुळे संस्कार उत्पन्न होतात.

      ज्यांना चार आर्यसत्याचे यथार्थ ज्ञान झाले त्यांची प्रज्ञा विकसित होत असते. ते जग जसे आहेत तसे पाहतात. अज्ञान नष्ट होते. अविद्या नष्ट होऊन त्यांचे संस्कारही नष्ट होतात. ते असंस्कारीत होतात. त्यांना निर्वाण प्राप्‍त होते.

      संस्कार म्हणजे कृत्य करणे, योजना करणे, काम करण्यासाठी हालचाल करणे की ज्यामुळे त्या  कृत्याचा, योजनेचा कामाचा परिणाम नैतिक दृष्ट्या चांगला किंवा वाईट, कुशल किंवा अकुशल, पुण्यमय किंवा पापमय होत असतो. चांगल्या अथवा वाईट कृत्याचा झालेला परिणाम म्हणजेच संस्कार. संस्कार आपल्या वर्तमान आणि भविष्यातला शारीरिक, वाचिक आणि मानसिक सर्व कृत्याचा जीवनक्रम ठरवीत असतात.

      अविद्येचा निरोध केला असता संस्काराचा निरोध होतो..

३) विज्ञान

      प्रतित्यसमुत्पादाची तिसरी कडी म्हणजे विज्ञान. संस्कारामुळे विज्ञान उत्पन्न होतात.   

       विज्ञान म्हणजे जाणणे, निरनिराळ्या प्रकारे अनुभूती घेणे. आपण आपल्या पांच ईंद्रियाद्वारे आणि मनाद्वारे निरनिराळ्या प्रकारची अनुभूती घेत असतो. जसे आपण आपल्या डोळ्याद्वारे बाह्य वस्तूमात्र जाणत असतो. कानाद्वारे आवाज जाणत असतो. नाकाद्वारे वास जाणत असतो. जिभेद्वारे चव जाणत असतो. त्वचेद्वारे स्पर्श जाणत असतो. आणि मनाद्वारे कल्पन्ना आणि विचार जाणत असतो. अशा तर्‍हेने विज्ञान सहा प्रकारचे आहेत. चक्षू विज्ञान, कर्ण विज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान, स्पर्श विज्ञान आणि मनो विज्ञान. तसेच ज्याचा परिणाम कुशल कर्मात होतो व ज्याचा परिणाम अकुशल कर्मात होतो अशा प्रकारचे दोन विज्ञान आहेत. दृश्य आकृती आणि रंग, आवाज इत्यादी इंद्रिय विषय असले आणि त्याचा संबंध अनुक्रमे डोळे, कान इत्यादी इंद्रियांशी आला तरच विज्ञान जागृत होते, इतर वेळी नाही. त्याचप्रमाने कल्पना आणि विचार हे इंद्रिय विषय मनात आले तरच मनिंद्रिय विज्ञान जागृत होते, ह्यावरुन असे स्पष्ट होते की इंद्रिय आणि विषयाचा एकमेकांशी संबंध आलाच तर विज्ञान जागृत होते. जसे आपण पुस्तक वाचत असतांना आपले मन जर दुसरीकडे गुंतले असेल तर उघड्या डोळ्यांनी आपण केवळ पुस्तकाकडे पाहत असतो. परंतु त्यात काय लिहिले आहे ते आपल्या लक्षात येत नाही. कारण त्यावेळी आपले च्क्षुंद्रियविषय विज्ञान जागृत नसते. म्हणून इंद्रिय आणि त्या त्या इंद्रियाच्या विषयाचा एकमेकांशी संबंध असतो. ते एकमेकावर अवलंबून असतात. म्हणूनच विज्ञान सुध्दा शाश्वत नाही तर ते क्षणाक्षणाला बदलत असतात.

      संस्काराचा निरोध केला असता विज्ञानाचा निरोध होतो.  

४) नाम-रुप

      प्रतित्यसमुत्पादाची चवथी कडी म्हणजे नामरुप. विज्ञानामुळे नामरुप उत्पन्न होतात.         

      नाम म्हणजे मन व रुप म्हणजे शरीर. नाम (मन)  हे चार खंडाचे बनलेले आहे. ते म्हणजे १) विज्ञान (CONSCIOUSNESS जाणीव), २) संज्ञा (PERCEPTION आकलन), ३) वेदना (SENSATION संवेदना, अनुभूती) व ४) संस्कार (REACTION प्रतिक्रिया).

      मनाच्या माध्यमातून एखाद्यी प्रक्रिया कशी घडत असते याचे उदाहरण म्हणजे- समजा रस्त्यात एखादी वस्तु दिसली तर ते पाहण्याची क्रिया डोळ्यांनी करताच काहितरी आहे याची  याची जाणिव (विज्ञान) होते. त्यापाठोपाठ लगेच दुसरी क्रिया घडते ती म्हणजे  नक्किच भयावह साप आहे याचे आकलन (संज्ञा) होते. ते पाहून भितीदायक संवेदना (वेदना) निर्माण होते. लगेच प्रतिक्रिया (संस्कार) उत्पन्न होते की आपण तेथून दुर जायला पाहिजे अन्यथा तो साप जर चावला तर आपला मृत्यू ओढवेल.

            रुप (शरीर) हे पांच ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने क्रियाशील राहत असून त्यांच्यामुळेच बाह्य जगाशी संबंध प्रस्थापित होत असते. ते पांच इंद्रिय म्हणजे १) डोळा, २) नाक, ३) कान, ४) जीभ, व ५) त्वचा ही होत. या पांच इंद्रियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पांच बाबीचे ज्ञान मानवास होते. डोळ्याद्वारे बाह्य वस्तूमात्र जाणणे, नाकाद्वारे गंध जाणणे, कानाद्वारे आवाज जाणणे, जिभेद्वारे चव जाणणे, व त्वचेद्वारे स्पर्श जाणणे.

       तसेच रुप (शरीर) हे १) पृथ्वी, २) पाणी, ३) अग्नी आणि ४) वायू या चार घटकांचे बनलेले आहेत  आणि हे चार घटक सृष्टीमध्ये निसर्गत:च विद्यमान असतात.

       भगवान बुध्दांनी रुप आणी नाम या घटकांवर लक्ष केंद्रित करुन चिंतन केले आणि सत्याचा शोध घेतला. त्यांनी या नामरुपाच्या जडण-घडणीची सूक्ष्म पातळीवर अंतर्मुख होऊन चिकित्सा केली. वरकरणी जड घटकांचे बनलेले हे शरीर (रुप) भरीव भासत असले आणि त्या आधारावर क्रिया करणारे हे मन (नाम) वरवर स्थूल भासत असले तरी ते शरीर अगदी सूक्ष्म सुक्ष्म परमाणूचे बनलेले आहे. याचा शोध सर्वप्रथम भगवान बुध्दांनी लावला. एवढेच नव्हे तर हे सारे मन आणी शरीर क्षणाक्षणाला अतिसूक्ष्म प्रमाणात अत्यंत शिघ्रगतीने सतत बदलत आहे; उत्पन्न होत आहे; नष्ट होत आहे. हे भगवान बुध्दांना दिसले. यालाच त्यांनी अनित्य म्हटले आहे.

      आधुनिक शास्त्रज्ञांनी हे अंतिम सत्य मान्य केले आहे. एवढेच नव्हे तर इसवी सन सहाव्या शतकापूर्वी भगवान बुध्दांनी मांडलेले बरेच सिध्दांत आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे असे मत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात मांडले आहे.

            या नामरुप प्रवृती मानवामध्ये दु:निर्मितीसाठी सहाय्यभूत ठरत असतात.  आपल्या मनावर बालपणापासून निसर्गात आणि आजुबाजूला घडणार्‍या अनंत घटनाच्या संग्रहाचा स्तर चढलेला असतो.  बाह्य जगात  घडणारी घटना आपले मन त्यामध्ये संग्रहीत जुन्या संस्काराशी  ताडुन पाहत  असते व त्यानूसार प्रतिक्रिया व्यक्‍त करीत असते. या मनात अनेक प्रकारचे विकार संग्रहीत झालेले असतात. अर्थात प्रत्येकाचे मन अशुध्द व मळलेले असतात. जोपर्यंत कोणत्याही व्यक्‍तीला स्वत:च्या मनातील मळ व अशुध्दता दिसणार नाही,  तो पर्यंत तो ते मळ व अशुध्दता शुध्द करण्याच्या फंदात पडणार नाही. जेव्हा मन नितांत निर्मळ  होइल,  परिशुध्द होईल तेव्हाच त्या मनावर नविन संस्कार रुजल्या जातील.

      विज्ञान हे  परिवर्तनशील आहे. त्या परिवर्तनशीलतेच्या तत्वामुळेच नामरुप  हे नेहमी बदलणारे तत्व ठरते. 

      विज्ञानाचा निरोध केला असता नामरुपाचा निरोध होतो.  

५)  षडायतन

            प्रतित्यसमुत्पादाची पांचवी कडी म्हणजे षडायतन. नामरुपामुळे षडायतन उत्पन्न होतात.

      षडायतन म्हणजे सहा आयतने. ते म्हणजे डोळा, कान, नाक, जिभ,  त्वचा आणि मन.

      येथे डोळ्याचे आयतन म्हणजे पाहण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता.  कानाचे आयतन म्हणजे ऎकण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता.  नाकाचे आयतन म्हणजे वास घेण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता.  जिभेचे आयतन म्हणजे चव घेण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता.  त्वचेचे आयतन म्हणजे स्पर्श जाणण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता.  मनाचे आयतन म्हणजे कल्पना, विचार जाणण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता. 

      नामरुपाचा निरोध केला असता षडायतनचा निरोध होतो.  

६) स्पर्श

      प्रतित्यसमुत्पादाची सहावी कडी म्हणजे स्पर्श. षडायतनामुळे स्पर्श उत्पन्न होतात.

      जेव्हा चक्षूरुप आणि चक्षूविज्ञान यांचा संबंध येतो तेव्हा त्या संबंधाला

स्पर्श असे म्हणतात. स्पर्श म्हणजे ज्ञानेंद्रिय, ज्ञानेंद्रिय विषय आणि ज्ञानेंद्रिय  विज्ञान यांचा समन्वय होणे.

      पांच इंद्रियांच्या क्रियेला मनाने दिलेले आदेश यांच्या परस्पर संबंधातून आपण बाह्यजगाशी संपर्क प्रस्थापित करीत असतो. जसे आपण जर पुस्तकातील अक्षरांकडे पाहिले तर नेत्रस्पर्श, कानाला  कुणाचा आवाज ऎकू आला तर कर्णस्पर्श,  नाकाला कसलातरी गंध आला तर घ्राणस्पर्श, काही खात असतांना  जिभेला चव कळली तर जिव्हास्पर्श,  त्वचेला कसलातरी संपर्क आला तर त्वचास्पर्श असे या पांचही इंद्रियाला त्या त्या विषयाचा स्पर्ष होत असतो.  या सर्व क्रियावर मनाचे अधिराज्य असते. मन जर नसेल तर कोणताही स्पर्श जाणवणार नाही.

      षडायतनचा निरोध केला असता स्पर्शाचा निरोध होतो.  

७) वेदना

      प्रतित्यसमुत्पादाची सांतवी कडी म्हणजे वेदना. स्पर्शामुळे वेदना उत्पन्न होतात.

       वेदना म्हणजे इंद्रियांचा इंद्रिय विषयांशी  संपर्क आला असता जाणवणारी अनुभूती. एखाद्या बाह्यस्थितीचा आपल्या ज्ञानेंद्रियाला स्पर्श होताच जे तरंग शरीरात निर्माण होतात ते म्हणजेच वेदना. वेदना कशी निर्माण होते ते मनाच्या अवस्थेवर अवलंबून आहे.

      वेदना तीन प्रकारच्या आहेत.  सुखमय वेदना, दु:खमय वेदना व  सुखमय व दु:खमय वेदना.

      एखादे रुप पाहिल्याने, आवाज ऎकल्याने, वास घेतल्याने, चव घेतल्याने, स्पर्श केल्याने व मनांत कल्पना किंवा विचार आल्याने संवेदना निर्माण होत असतात. त्या सहा प्रकारच्या  संवेदना डोळा, कान, नाक, जिभ,  त्वचा आणि मन अनुभवत असतो.  जेव्हा ज्ञानेंद्रिय, ज्ञानेंद्रिय विषय आणि ज्ञानेंद्रिय  विज्ञान यांचा समन्वय झाल्याने स्पर्श होतो,तेव्हाच संवेदना निर्माण होत असतात. म्हणून  स्पर्शामुळे वेदना निर्माण होत असतात.

      स्पर्शाचा निरोध केला असता वेदनेचा निरोध होतो.  

८) तृष्णा

      प्रतित्यसमुत्पादाची आठवी कडी म्हणजे तृष्णा . वेदनेमुळे तृष्णा उत्पन्न होते.

      रुप, काम, मैथून, शब्द, गंध,रस, स्पर्श इत्यादी लोभ, द्वेष आणि मोह या विकारांनी युक्‍त असलेली भावना म्हणजे . तृष्णा होय.  तृष्णेमुळे दु:खाची निर्मिती होत असते.  मोह किंवा अविद्येमुळे आपण कोणत्याही वेदनेवर लोभाची किवा द्वेशाची प्रतिक्रिया व्यक्‍त करित असतो. यालाच तृष्णा म्हणता येईल.

      एखादी न आवडणारी व्यक्‍ती, वस्तू किंवा स्थिती आपल्यासमोर आली तर ती नकोशी वाटून आपण त्याचा द्वेष करायला लागतो. मनातील संस्कार  नकाराची भावना व्यक्‍त करतात. याच भावनेने आपण दु:खी होत असतो.

      किंवा याच्या उलट एखादी आवडणारी व्यक्‍ती, वस्तू किंवा स्थिती आपल्यासमोर आली तर ती आपल्याला हवी-हवीशी वाटून आपण त्याचा लोभ करायला लागतो. मनातील संस्कार  आवडल्याची भावना व्यक्‍त करतात. याच लोभाच्या, आसक्‍तीच्या भावनेने क्षणीक सुख मिळते. परंतु ती दुर गेली की आपण दु:खी होत असतो. अशा तर्‍हेने एखादा तिरस्कार, घृणा किंवा आसक्‍ती यांच्या हव्यासामुळे दु:खाचे कारण बनते.  मोह म्हणजे अज्ञान किंवा अविद्या यमुळेच हे लोभ,द्वेशाचे चक्र सुरु राहते.

      वेदनेचा निरोध केला असता तृष्णेचा निरोध होतो.  

९) उपादान

      प्रतित्यसमुत्पादाची नववी कडी म्हणजे उपादान. तृष्णेमुळे उपादान उत्पन्न होते.

      उपादान म्हणजे घट्ट पकडून ठेवणे. जरी एखाद्या घट्ट पकडून ठेवलेल्या गोष्टीपासून त्रास, कष्ट, दु:ख होत असले तरी ती गोष्ट न सोडणे.

            तृष्णेचा हळूहळू आपल्या मनात संचय वाढत जातो. त्यामुळे त्याची मनावर घट्ट पकड बसते. तृष्णेच्या याच संचयाला उपादान म्हणतात. तृष्णेच्या संग्रहाने अर्तात उपादानाने प्रभावित होऊन मनुष्य पुढिल कर्म करीत असतो. उपादान चार प्रकाराचे आहेत.      पहिले कामउपादान म्हणजे सर्व प्रकारच्या आनंद देणार्‍या, सुख देणार्‍या, आवडणार्‍या आणि लैंगिक समाधान देणार्‍या गोष्टीसंबंधी अत्यंत पराकोटीचे आकर्षण असणारी विचारसरणी.

      दुसरे दृष्टीउपादन म्हणजे असा विश्वास की, ‘हे एकच बरोबर आहे व बाकीचे चुकीचे आहे’ असा एकांगीपणाची विचारसरणी.

      तिसरे उपादान म्हणजे कर्मकांडाने मनुष्य पवित्र होतो, त्याच्यावर कोणतेही संकट येणार नाहीत किंवा आलेल्या संकटाचे निवारण होईल, त्याला भौतिक लाभ होईल, त्याला सुख मिळेल अशा प्रकारची विचारसरणी.

      चवथे सत्कायदृष्टी उपादान म्हणजे ‘मी’, ‘माझे’, ‘माझा आत्मा’ अशी आत्मभावाचे दृष्टी व नेहमी बदलत  असणार्‍या जगाला न बदलणारे आहे, आत्मा कायम टिकणारा आहे अशी धारणा बाळगणारी विचारसरणी. 

      तृष्णेचा निरोध केला असता उपादानाचा निरोध होतो.

१०) भव

      प्रतित्यसमुत्पादाची दहावी कडी म्हणजे भव. उपादानमुळे भव उत्पन्न होते.

      भव म्हणजे अस्तित्वात येणे. तृष्णेच्या संग्रहाने अर्थात उपादानाने प्रभावित हॊवून मानव पुढील कर्म करीत असतात. त्या कर्माचा परिपाक म्हणजेच ‘भव’ होय. भव म्हणजे चित्ताचे असे कर्म की ज्यामुळे फळाची उत्पत्ती होते. अर्थात हे भव म्हणजे कर्म पुन्हा उत्पन्न होण्याची, जन्म घेण्याची ईच्छा निर्माण करते.

      कम्म आणि विपाक असे भवाचे दोन पैलू आहेत. कम्म म्हणजे कर्म जी मनुष्याकडून कायेने, वाचेने व मनाने कुशल-अकुशल, पापमय-पुण्यमय, अध्यात्मिक आणि वैचारिक कृत्ये केली जातात ती. अशी कृत्ये की, ज्यामुळे त्याचेवर संस्कार घडत असतात किंवा त्याचा भविष्यातील जीवनक्रम घ्डवीत असतात. विपाक म्हणजे त्या कर्माचा परिणाम.

      कम्माबाबत भगवान बुध्द म्हणतात की, ‘समाजामध्ये नैतिक व्यवस्था सांभाळण्याचे काम कम्म नियम करीत असतात. समजामध्ये नैतिक व्यवस्था चांगली आहे याचा अर्थ मनुष्य कुशल कर्म करीत आहे. जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर याचा अर्थ मनुष्य अकुशल कर्म करीत आहे. भगवान बुध्द कर्म सिध्दांतावर इतका जोर देत असत की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्म सिध्दांताच्या दृढ पालनाशिवाय नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे कम्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे. कम्म नियमात जसे दिवसामागून रात्र येते तसे कर्मामागून त्याचा परिणाम येत असतो. म्हणून ‘कराल तसे भराल’ असे सांगणारे भगवान बुध्द पहिलेच आहेत. 

      कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करण्याला मिळत असतो आणि अकुशल कर्माचा दुष्परिणाम कुणालाही टाळता येत नाही. म्हणून भगवान बुध्दाचा उपदेश असा की, ‘असे कुशल कर्म करा म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. कारण कुशल कर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कर्म करु नका. कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवता दु:खी होते.’ कर्माचा विपाक म्हणजे परिणाम कर्त्याला भोगावे लागतात. कधी कधी एकाच्या कर्माचा परिणाम दुसर्‍यालाही भोगावे लागतात. त्यामुळे नैतिक व्यवस्थेत बाधा निर्माण होते.

      आपल्या मनात ईच्छा निर्माण होणे हे मनाची एक वृती आहे. इच्छा निर्माण झाली की त्याच्या पूर्ततेसाठी मनूष्य मनाने, वाणीने व कायेने कर्म करीत असतो. बुध्द धम्मानूसार मनूष्याची इच्छा ही अगदी स्वतंत्र असून ती पूर्वी केलेल्या कर्मावर अवलंबून नसते. कर्म हे बीज आहे तर त्याचे फळ म्हणजे कर्मविपाक आहे. इच्छा ही कर्माप्रमाणे कुशल किंवा अकुशल असू शकते. इच्छा, त्यानंतर कर्म आणि कर्मानंतर कर्मविपाक असा कार्यकारणाचा खेळ अव्याहतपणे चालू असते. यालाच जीवन किंवा संसार म्हटले जाते.

      जरी आपल्या हातून अपघाताने, चूकीने, अज्ञानाने, गैरसमजुतीने किंवा अन्य कोणत्याही कारणाने अकुशल कर्मे घडली असेल तर ह्या क्षणापासून जागृत राहून कुशल कर्मे करण्यास सुरुवात करावी. राहिलेल्या आयुष्यात आपण जेवढे जास्त कुशल कर्मे करु तेवढ्‍यामुळे अकुशल कर्माचा जोर कमी अथवा अगदी नष्ट होण्याची शक्यता असते. म्हणून मागे केलेल्या अकुशल कर्मांनी हताश व निराश न होता मनूष्याने ध्येर्याने जास्तीत जास्त कुशल कर्मे करावीत म्हणजे त्याचे जीवन मंगलदायी होऊन समाजालाही फायदा होईल. मनूष्याने सतत जागृत राहून कुशल कर्मे करीत राहावीत अशी भगवान बुध्दांची शिकवण आहे.

      म्हणूनच भगवान बुध्दाच्या धम्मामध्ये अन्य धर्मात ईश्वराला जे  स्थान आहे ते नीतीला दिले आहे.

      उपादानाचा निरोध केला असता भवाचा निरोध होतो.

११) जाति

      प्रतित्यसमुत्पादाची अकरावी कडी म्हणजे जाति. भवामुळे जाति उत्पन्न होते.

      जातिचा अर्थ म्हणजे पंचस्कंधाचे प्रगट होणे. पंचस्कंध म्हणजे रुप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान यांचे प्रगटीकरण म्हणजेच जाति होय.

            भवाचा निरोध केला असता जातिचा निरोध होतो.

१२) जरा-मरण

      प्रतित्यसमुत्पादाची बारावी कडी म्हणजे जरा-मरण. जरा (म्हातारपण), व्याधी (आजारपण), मरण (मृत्यु), शोक (शोक व्यक्त करणे), परिदेव (रडणे, ओरडणे), दु:ख (शारिरीक दु:ख), दौर्मनस्य (मानसिक दु:ख), उपायास (हैराण होणे, परेशान होणे इत्यादी जातिमुळे म्हणजे जन्मामुळे उत्पन्न होते.

            मनूष्य जन्माला आल्यानंतर त्याला बालपणापासून ते म्हातारपणापर्यंत जीवन प्रवास करावा लागतो. आयूष्याच्या शेवटी-शेवटी त्याला म्हातारपणाच्या अवस्थेत जावेच लागते. उदय होणे आणि लय होणे ही प्रक्रिया शरीराच्या अणु-रेणूत अव्यातपणे चाललेला असतो. क्षणैक परिवर्तनामुळेच दिर्घकालीन परिवर्तन घडून येत असते. मनाचे परिवर्तन तर फार तिव्रतेने घडत जात असते. म्हणूनच भगवान बुध्द म्हणतात की, ‘ भिक्खुंनो मनाइतके बदलणारे, परिवर्तनशील दुसरी कोणतीच गोष्ट मला दिसत नाही. शरीरातील बदल आपल्याला दृश्य स्वरुपात दिसून येते.

      ‘जन्म, जरा, मरण हे जीवनातील सर्वात महत्वाचे घटक आहेत. ते जर नसते तर बुध्दांचा जन्मच झाला नसता. जन्म, जरा, मरण आहेत म्हणून बुध्दांचा जन्म झाला आहे,’ असे भगवान बुध्दांनी म्हटले आहे.

      ज्यांना जन्म, जरा, मरण माहिती नाही, त्यांना जरा, मरणाचा निरोध कसा करावा ते कळणार नाही.

      प्रतित्यसमुत्पादाच्या निरनिराळ्या हेतूचा, निदानांचा व प्रत्ययांचा मूळ उद्देश म्हणजे जन्म, जरा मरणाला जाणने, प्रज्ञेद्वारे त्याचा वेध घेणे, अविद्या असल्यामुळे कर्माची निर्मिती होत असते. जर अविद्या नष्ट झाली तर कर्माची निर्मिती होणार नाही. जर कर्म नसेल तर जन्माची निर्मिती होणार नाही. जर जन्म नसेल तर जरा-मरणाची निर्मिती होणार नाही. अशा प्रकारे प्रतित्यसमुत्पाद निर्वाणाच्या मार्गाने घेऊन जातो.

      जातिचा निरोध केला असता जरा-मरण, शोक, दु:खाचा निरोध होतो.

      अशा प्रकारे प्रतित्यसमुत्पादाचे यथार्थ ज्ञान झाल्यावर जग जसे आहे तसे पाहता येते. त्यामुळे चार आर्यसत्याचा अर्थ निट कळून येते.

      भगवान बुध्दांच्या प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतामुळे समाजाची होणारी अधोगती थांबली. त्यामुळे समाज हळूहळू सुसंस्कृत बनत चालला. भगवान बुध्दांच्या काळी मिथ्या दृष्टीमुळे नरबळी, पशुबळी, स्त्री हत्या, बालहत्या, सतीप्रथा असे चालत असलेले रानटी प्रकार बंद होत गेले. स्वत:च्या फायद्यासाठी दुसर्‍याची हत्या करणे, यज्ञामध्ये पशुंचा बळी घेणे, देवदासीप्रथेद्वारे स्त्रियांचे लैगिंक शोषण करणे, जातीभेद करणे, अमानूष अश्पृष्यता पाळणे      इत्यादी प्रकार मिथ्यादृष्टीमुळे, अज्ञानामुळे सर्रासपणे पाळल्या जात होते. त्यात वावगे काहीच नाही, कारण ते देव निर्मित-धर्म निर्मित आहे असे त्यांची मिथ्यादृष्टी होती. मात्र भगवान बुध्दांच्या शिकवणूकीमुळे नैतिकतेच्या शिकवणूकीचे महत्व लोकांना कळू लागले. चांगले कर्म केले तर त्याचे चांगले परिणाम होतात. वाईट कर्म केले तर त्याचे वाईट परिणाम होतात हे लोकांच्या लक्षांत आले. म्हणून भगवान बुध्दांनी ईश्वराऎवजी नैतिकतेला आपल्या शिकवणूकीत महत्वाचे स्थान दिले आहे.

      प्रतित्यसमुत्पादाची साखळी तिन काळांमध्ये विभाजीत केल्या जातात. अविद्या आणि संस्कार हे भूतकाळाशी संबंधीत आहे.  विज्ञान हे वर्तमान काळ आणि भूतकाळ यांना जोडते. नामरुप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान आणि भव हे वर्तमान काळाशी संबंधीत आहेत. जाती (जन्म), जरामरण (दु:ख समूह) हे भविष्य काळात उद्‍भवत असतात.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात दुसर्‍या प्रकारची प्रतित्यसमुत्पादाची प्रक्रिया सांगितली आहे. ते म्हणतात, ‘तृष्णेमुळे लोभाची ओढ लागते. लोभाची ओढ काम व लालसा उत्पन्न करते.. काम व लालसेमुळे दृढता निर्माण होते. दृढतेमुळे स्वामित्वाची निर्मिती होते. स्वामित्वामुळे लोभ आणि अधिक स्वामित्व निर्माण होते. स्वामित्वामुळे मालमत्तेवर पहारा ठेवणे, त्याची सुरक्षा करणे आवश्यक होते. मालमत्तेच्या रक्षण करण्याच्या वृतीमुळे अनेक वाईट व दुष्ट प्रसंग निर्माण होतात, जसे मारामारी, जखम, संघर्ष, भांडण, निंदा व असत्य.कथन ही प्रतित्यसमुत्पादाची अनुलोम साखळी होय.

      प्रतित्यसमुत्पादाची प्रतिलोम साखळीप्रमाणे जर तृष्णाच नसेल तर लोभाची ओढ लागणार नाही. लोभाची ओढ नसेल तर विकार निर्माण होणार नाही. विकार नसतील तर दृढता निर्माण होणार नाही. दृढता नसेल तर स्वामित्वाचा लोभ निर्माण होणार नाही. स्वामित्व नसेल तर अधिक स्वामित्वाची हाव निर्माण नाही. स्वामित्वाची भावना नसेल तर तेथे शांती निर्माण होईल. अशा तर्‍हेने संग्राहकवृतीचे दुष्परिणाम भगवान बुध्द स्थवीर आंनदाला समजावून सांगतात.

आर. के.जुमळे यांच्या ब्लॉगवरून साभार....!  

Friday 26 October 2012

माझा छंद....!

माझा छंद....!

चित्रकला आणि वकिली या दोन्ही विसंगत बाजू, त्यांचा एकमेकांचा दूर पर्यंत संबंध नाही, लहानपणापासून केवळ आवड म्हणून मी चित्रे काढत होतो, आवड म्हणून थोडी सवड काढतो आणि एखादे चित्र काढण्याचा प्रयत्न करतो, त्यातील काही निवडक चित्रे इथे पोस्ट करत आहे, आवडली तर नक्की प्रतिक्रिया द्या, नाही आवडली तर मार्गदर्शन करा...मी नक्कीच आणखी चांगली काढण्याचा प्रयत्न करेन...धन्यवाद...!          

राज जाधव यांनी रेखाटलेले तथागताचे चित्र...! 
__________________________________________________________________ 

राज जाधव यांनी रेखाटलेले बाबासाहेबांचे चित्र...! 
 __________________________________________________________________ 

राज जाधव यांनी रेखाटलेले माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे  चित्र...! 
__________________________________________________________________ 
                                   
राज जाधव यांनी रेखाटलेले कर्मवीर भाऊराव पाटील यांचे  चित्र...! 
__________________________________________________________________ 


                                  
राज जाधव यांनी रेखाटलेले लेखक वसंत बापट यांचे चित्र...! 
__________________________________________________________________ 







राज जाधव यांनी रेखाटलेले छ.शिवाजी महाराज यांचे चित्र...! 
__________________________________________________________________ 



राज जाधव यांनी रेखाटलेले अभेनेते अनुपम खेर यांचे चित्र (प्रयत्न )...! 
                                     _________________________________________________________________

_________________________________________________________________



_________________________________________________________________

चित्रकार - अँड. राज जाधव...!!!       
__________________________________________________________________ 

Thursday 25 October 2012

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा.....!

                                            
  महात्मा ज्योतीराव फुलेंचा छत्रपती  शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा             




कुळवाडी - भुषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||
लंगोट्यास देई जानवी पोषींदा कूणब्यांचा |
काळ तो असे यवनांचा ||
शिवाजीचा पिता शाहाजी पुत्र मालोजीचा |
असे तो डौल जाहागिरीचा ||
पंधराशे एकूणपन्नास साल फळले |
जुन्नर तें उदयास आले ||
शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले |
जिजाबाईस रत्न सापडले ||
हातापायांची नख़े बोट शुभ्र प्याजी रंगीले |
ज्यांनी कमळा लाजविले ||
वर ख़ाली टिर्‍या पोटर्‍या गांठी गोळे बांधले |
स्पटिकापरी भासले ||
सानकटी सिंहापरी छाती मांस दुनावले |
नांव शिवाजी शोभले ||
राजहौंसी उंच मान माघे मांदे दोंदीले |
जसा का फणीवर डोले ||
एकसारखे शुभ्र दांत चमकू लागले |
मोती लडी गुंतविले ||
रक्‍तवर्ण नाजूक होटी हासू छपविले |
म्हणोन बोबडे बोल ||
सरळ नीट नाक विशाळ डोळ्यां शोभले |
विषादें म्रुग वनी गेले ||
नेत्र तिखे बाणी भवया कामठे ताणिले |
ज्यांनी चंद्रा हाटविले ||
सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबले |
कुरळे केस मोघीले ||
आजानबाहू पायांपेक्षा हात लांबलेले |
चिन्ह गादिचे दिसले ||
जडावाची कडी तोडे सर्व अलंकार केले |
धाकट्या बाळा लेविवले ||
किनखांबी ठंकोचे मोती घोसाने जडले |
कलाबतुचे गोंडे शोभले ||
लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले |
डाग लाळीचे पडलेले ||
हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे |
पायी घुंगरू खुळखुळे ||
मारी लागोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले |
ख़ेळण्यावर डोळे फिरविले ||
मजवर हा कसा ख़ेळणा नाही आवडले |
चिन्ह पाळणी दिसले ||
टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले |
पाळण्या हालवू लागले ||
धन्य जिजाबाई जिने जो जो जो जो जो केले |
गातों गीत तिने केले ||
||चाल ||
जो जो जो जो जो जो गाऊं, जी जी जी जी जी जी गाऊं |
चला वेरूळांस जाऊ, दौलताबादा पाहू ||
मूळ बाबाजींस ध्याऊ, किर्ती आनंदाने गाऊ |
सरदारांत उमराऊ, सोबतीस जाधराऊ ||
पाटिल होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ |
थोर विठाजी नाव घेऊ, सान मालोजी त्याचा भाऊ |
दिपाबाई त्यास देऊ, छंदाजोगा गिती गाऊं ||
|| चाल ||
मालोजी राजा | तुझा बा आजा ||
यवनी काजा | पाळिल्या फौजा ||
लाविल्या ध्वजा | मारिल्या मौजा ||
वेळेस मुक्का | साधल्या बुक्का ||
विचारी पक्का | जाधवा धक्का ||
शेशाप्पा नायका | ठेविचा पैका ||
द्रव्याची गर्दी | चांभारगोंदी ||
देवळे बांधी | तळी ती खांदी ||
आगळी बुध्दी | गुणाने निधि ||
लिहीले विधि | लोकांस बोधी ||
संधान साधी | जसा पारधी ||
भविषी भला | कळले त्याला ||
सांगोनी गेला | गादी बा तुला ||
उपाय नाही जाणोन चाकर झाला यवनाचा |
शिपाई होता बाणीचा ||
खोट्या दैवा कोण खोडी बेत देवाजीचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भुषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा || १||

वडील बंधु संभाजीने लळे पुरविले |
धाकट्यासवे ख़ेळले ||
उभयतांचे एकचित तालमीत गेले |
फरीगदग्या शिकले ||
आवडीने खमठोकी कुस्ती पेचाने खेळे |
पवित्र दस्तिचे केले ||
द्वादशवर्षी उमर आली नाही मन धाले |
घोडी फिरवू लागले ||
अट्टल घोडेस्वार भाला बोथाटी शिकले |
गोळी निशाण साधले ||
कन्या वीर जाधवाची जिने भारथ लावले |
पुत्रा नीट ऐकविले ||
अल्पवयांचे असता शिकार करू लागले |
माते कौतुक वाटले ||
नित्य पतीचा आठव डोंगर दुखाःचे झाले |
घर सक्‍तिने घेतले |
छाती कोट करून सर्व होते साठविले|
मुखमुद्रेने फसविले ||
चतुर शिवाजीने आईचे दुःख ताडिले |
पित्यास मनी त्यागिले ||
पुत्राचे डोळे फिरले माते भय पडले |
हीत उपदेशा योजिले ||
मनी पतिभक्‍ती पुता बागेमधी नेले |
वृक्षाछायी बसविले ||
पुर्वजांचे स्मरण करून त्यास न्याहाळिले |
नेत्री पाणी टपटपले ||
या क्षेत्राचे धनी कोण कोणी बुडविले |
सांगते मुळी कसे झाले ||
क्षेत्रवासी म्हणोन नाव क्षत्रिय धरले |
क्षेत्री सुखी राहीले ||
अन्य देशिंचे दंगेखोर हिमालयी आले |
होते लपुन राहीले ||
पाठी शत्रुभौती झाडी किती उपासी मेले |
गोमांसा भाजून धाले ||
पाला फळे खात आखेर ताडपत्रा नेसले |
झाडी उल्लघून आले ||
लेखणीचा धड शीपाया सेनापती केले |
मुख्य ब्रम्हा नेमले ||
बेफाम क्षेत्रिय होते अचूक टोळ उतरले |
कैदी सर्वास केले ||
सर्व देशी चाल त्याचे गुलाम बनविले |
डौलाने क्षुद्र म्हणाले ||
मुख्य राजा झाला ज्याने कायदे केले |
त्याचे पुढे भेद केले ||
ब्रम्हा मेल्यावर परशराम पुंड माजले |
उरल्या क्षत्रिया पिडीले ||
माहारमांग झाले किती देशोधडी केले |
ब्राम्हण चिरंजीव झाले ||
देश निक्षत्रीय झाल्यामुळे यवना फावले |
सर्वास त्याही पिडीले ||
शुद्र म्हणती तुम्हा ह्रुदयी बाण टोचले |
आज बोधाया फावले ||
गाणे गाते ऐक बाळा तुझ्या आजोळी शिकले |
बोली नही मन धाले ||
||चाल ||
क्षेत्र क्षत्रियांचे घर,तुझे पित्रु महावीर |
सुखा नसे त्यांच्या पार, आल्यागेल्याचे माहेर||
शीखराकार डोंगर, नानावल्ली तरूवर ||
दरी खोरी वाहे नीर खळखळे निरंतर |
झाडा फुले झाला भार, सुगंधी वाहे लहर |
पक्षी गाती सोळा स्वर, मंजूळ वाणी मनोहर ||
नदी नाले सरोवर, शोभे कमळांचा भार |
भूमी अती काळसर, क्षेत्र देई पीक फार ||
धाव घेती दंगेखोर, दिला क्षेत्रियांस मार |
दास केले निरंतर, ब्रम्हा झाला मनी गार ||
लोभी मेले येथे फार, विधवा झाल्या घरोघर |
उपाय नाही लाचार, स्त्रिया बंदी पाटावर ||
दुसरा झाला शिरजोर, परशा तोबा कठोर ||
मार त्याचा अनिवार, केला क्षत्रिया संव्हार ||
क्षत्रिय केले जरजर, भये कांपे थरथर |
दुःखा नाही त्यांच्या पार, ठाव नाही निराधार ||
बहू केले देशापार, बाकी राही मांगमाहार |
निक्षेत्री झाल्यावर, म्लेच्छे केले डोके वर ||
आले सिंधू नदीवर, स्वार्‍या केल्या वारोंवार |
गाते काटांवात सार, लक्ष देई अर्थावर ||
||चाल ||
काबुला सोडी | नदांत उडी ||
ठेवितो दाढी | हिंदूस पिडी ||
बामना बोडी | इंद्रिये तोडी ||
पीडिस फोडी | देऊळे पाडी ||
चित्रास तोडी | लेण्यास छेडी ||
गौमांसी गोडी | डुकरांसोडी ||
खंड्यास ताडी || जेजुरी गडी ||
भुंग्यास सोडी | खोडीस मोडी ||
मुर्तीस काढी | काबूला धाडी||
झादीस तोडी | लुटली खेडी ||
गडांस वेढी | लावली शिडी ||
हिंदूस झोडी | धर्मास खोडी ||
राज्यास बेडी | कातडी काढी ||
गर्दना मोडी | कैलासा धाडी ||
देऊळे फोडी | बांधीतो माडी ||
उडवी घोडी | कपाळा आढी ||
मीजास बडी | ताजीम खडी ||
बुरखा सोडी || पत्नीस पीडी ||
गायनी गोडी || थैलिते सोडी ||
माताबोध मनी ठसतां राग आला यवनांचा |
बेत मग केला लढण्याचा ||
तान्हाजी मालुसरे बाजी पासलकराचा |
स्नेह यशाजी कंकाचा ||
मित्रा आधी ठेवी जमाव केला मावळ्याचा |
पूर करी हत्यारांचा ||
मोठ्या युक्‍तीने सर केला किल्ला तोरण्याचा |
रोविला झेंडा हिदूंचा ||
राजगड नवा बांधिला उंच डोंगराचा |
भ्याला मनी विजापूराचा ||
दुसरा भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीचा |
दादोजी कोंडदेवाचा ||
मासा पाणी खेळे गुरू कोण असे त्याचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी- भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||२||

जाहागिरचा पैसा सारा लावी खर्चात |
चाकरी ठेवी लोकांस ||
थाप देऊन घेई चाकण किल्ल्यास |
मुख्य केले फिर्डोजीस ||
थोड्या लोकांसहीत छापा घाली सुप्यास |
कैद पाहा केले मामांस ||
सुप्या सोबत हाती घेतले तीनशे घोड्यास |
करामत केली रात्रीस ||
मुसलमानां लांच देई घेई कोडाण्यास |
सिंहगड नाव दिले त्यास ||
पुरंधरी जाई जसा भला माणूस न्यायास |
कैद पाहा केले सर्वांस ||
गांव इनाम देऊन सर्वां ठेवी चाकरीस |
मारले नाही कोणास ||
वाटेमधी छापा घालून लूटी खजिन्यास |
साठवी राजगडांस||
राजमाची लोहगडी लढे घेई तिकोण्यास ||
बाकी चारा किल्ल्यास ||
मावळ्यांस धाढी कोकणी गाव लुटायांस |
धूर्त योजी फितुरास ||
सन्मान कैद्या देई पाठवी वीजापूरास |
मुलान्या सुभेदारांस ||
विजापूरी मुसलमाना झाला बहू त्रास |
योजना केली कपटांस ||
कर्नाटकी पत्र पाठवी बाजी घोरपड्यास |
कैद तुम्ही करां शहाजीस ||
भोजनांचे निमित्त केले नेले भोसल्यास |
दग्याने कैद केले त्यास ||
थेट शहाजी कैदी आणिला विजापूरास |
खुशी मग झाली यवनांस ||
चिरेबंदी कोठडीमध्ये बंद केले त्यास |
ठेविले भोक वार्‍यास ||
शाहाजीला पिडा दीली कळाले शिवाजीस |
ऐकून भ्याला बातमीस ||
पिताभक्‍ती मनी लागला शरण जायास |
विचारी आपल्या स्त्रियेस ||
साजे नाव सईबाई स्त्री सुचवी पतीस |
ताडा दंडी दुसमनास ||
स्त्रीची सुचना सत्य आसली लिहीले पत्रास |
पाठवी दिल्ली मोगलांस ||
चाकर झालो तुमचा आता येतो चाकरीस |
सोडवा माझ्या पित्यास ||
मोगल थैली गेली थेट मुसलमानास |
ठेविले किल्ल्यावर त्यास ||
बाजी शामराज का लाजला जात सांगायास |
धरू पाही शिवाजीस ||
धेड म्हणावा नाक नाही द्यावा कोणांस |
आडचण झाली बखरीस ||
सिध्दीस बेत गेला नाही अंती भ्याला जिवास |
काळे केले महाडास ||
शाहाजीचा बाजी आखेर घेईल बक्षीस |
हा पाजी मुकला जातीस ||
करनाटकी आज्ञा झाली शाहाजीस |
यवन भ्याला सिंहास ||
वर्षे चार झाली शिवला नाही कबजास |
पिताभक्‍ती पुत्रास ||
चंद्रराव मोर्‍यास मारी घेई जावळीस |
दुसरे वासोट्या किल्ल्यास ||
प्रतापगड बांधी पेशवा केला एकास |
नवे योजी हुद्यास ||
आपली बाकी काढी धाढी पत्र तगाद्यास |
चलाखी दावी मोगलांस ||
रात्री जाऊनी लुटी जुन्नरास |
पाठवी गडी लुटीस ||
आडमार्ग करी हळूच गेला नगरांस |
लुटी हत्तिघोड्यांस ||
उंच वस्त्रे, रत्ने होन कामती नाही द्रव्यास |
चाकरी ठेवी बारगिरास ||
समुद्रतिरी किल्ले घेई पाळी गलबतास |
चाकरी ठेवि पठाणास ||
सिद्दि पेशव्या आपेश देई घेई यशास |
उदासी लाभ शिवाजीस ||
आबजूलखान शूर पठाण आला वाईस |
शोभला मोठा फौजेस ||
हत्ती बारा हजार घोडा त्याचे दिमतीस |
कमी नाही दारूगोळिस ||
कारकुनाला वचनी दिले हिवरे बक्षिस |
फितवीले लोभी ब्राम्हणास ||
गोपीनाथ फसवी पठाणा आणी एकांतास |
चुकला नाही संकेतास ||
माते पायी डोई ठेवी, लपवी हत्यारास |
बरोबर आला बेतास ||
समीप येता शिवाजी जसा भ्याला व्याघ्रास |
कमी करी आपल्या चालीस ||
गोपीनाथ सुचना देई भोळ्या यवनांस |
भ्याला तुमच्या शिपायांस ||
त्या अधमांचे एकून शिपाई केला बाजूस |
लागला भेटू शिवाजीस ||
वर भेटभाव वाघनख मारी पोटास |
भयभित केले पठाणास ||
पोटी जखम सोसी केला वार शिवाजीस |
झोंबती एकमेकांत ||
हातचलाखी केली विंचवा मारी शत्रूस |
पठाण मुकला प्राणास ||
स्वामीभक्‍ती धाव घेई कळले शिपायास |
राहिला उभा लढण्यास ||
त्याची धोप घेई शिवाजी बचवी आपल्यास |
तान्हाजी भिडे बाजूस ||
दांती दाढी चावी तोडी घेई धनी सूडास |
घाबरे केले दोघांस ||
नाव सय्यद बंडू साजे शोभा आणी बखरीस |
लाथाळी जीवदानास ||
तान्हाजीला हूल देई मारी हात शिवाजीस |
न्याहाळी प्रेती धन्यास ||
उभयतांसी लढता मुकला आपल्या प्राणास |
गेला जन्नत स्वर्गास ||
छापा घाली मारी करी कैद बाकी फौजेस |
पठाणपुत्र खाशा स्त्रियेस ||
चार हजार घोडा लूट कमी नाही द्रव्यास |
दुसर्‍या सरंजामास ||
अलंकार वस्त्रे देई सर्व कैदी जखम्यास |
पाठवि विजापूरास ||
वचनी साचा शिवाजी देई हिवरे बक्षीस |
फितुर्‍या गोपीनाथास ||
नाचत गात सर्व गेले प्रतापगडास|
उपमा नाही आनंदास || ||चाल ||
|| शिवाचा गजर जयनामाच झेंडा रोविला ||
||क्षेत्र्याचा मेळा मावळ्यांचा शिकार ख़ेळला ||
माते पायी ठेवी डोई गर्व नाही काडीचा |
आर्शिवाद घेई आईचा ||
आलाबला घेई आवडता होता जिजीचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||३||

लढे रांगणी विशाळगडी घेई पन्हाळ्यास |
केले मग सुरू खंडणीस ||
रुस्तुल जमाना आज्ञा झाली विजापूरास |
नेमिला कोल्हापुरास |
स्वार तिन हजार घेई थोड्या पायदळास |
आला थेट पन्हाळ्यास ||
मार देत शिवाजी पिटी कृष्णा पैलतडीस |
अति जेर केले त्यास |
खंडणी घेत गेला भिडला विजापुरास |
परत मग आला गडास ||
राजापुर दाभोळ लूटी भरी खजिन्यास |
मात गेली विजापुरास ||
सिध्दीजोहरा नेमी मोठी फौज दिमतीस |
सावंत सिद्दी कुमकेस ||
बंदोबस्त करी शिवाजी राही पन्हाळ्यास |
करी मग जमा बेगमीस ||
वारंवार छापे घाली लुटी भौती मुलखास |
केले महाग दाण्यास ||
त्रासाने खवळून वेढा घाली शिवाजीस |
कोंडिले गडी फौजेस ||
चार मास लोटले शिवाजी भ्याला वेढ्यास |
योजनां करी उपायास ||
कोकणांमधी सिध्दी झोडी रघुनाथास|
उपद्रव झाला रयतेस ||
पासलकर बाजीराव पडाले वाडीस |
दुःख मग झाले शिवाजीस ||
सिध्दी जोहरा निरोपाने गोवीं वचनास |
खुशाल गेला भेटीस||
वेळ करून गेला उरला नाही आवकास |
कच्चा मग ठेवी तहास ||
सिद्दिस लाडी गोडी मधी मान डुकलीस |
गेला थाप देऊन गडास ||
सिद्द्या पोटी खुष्याली जाई झोपी सावकाश |
हयगय झाली जप्तीस ||
तो शिवाजी पळून गेला घेई पाथी रात्रीस |
सविले मुसलमानांस ||
सिद्दि सकाळी खाई मनी लाडू चुरमुर्‍यास |
स्वारदळ लावी पाठीस ||
चढत होता खिंड शिवाजी गांठले त्यांस |
बंदुका लावी छातीस |
बाजीप्रभु मुख्य केला ठेवि मावळ्यास |
एकटा गेला रांगण्यास ||
स्वस्वामीला वेळ दिला बाजी भिडला शत्रुस |
हरवी नित्य मोगलास ||
दोन प्रहर लढे वाट दिली नाही त्यास|
धन्य त्याच्या जातीस ||
मोठी मोगल फौज दाखल झाली साह्यास |
खवळला बाजी युध्दास ||
अर्धे लोक उरले सरला नाही पाउलास |
पडला प्रभू भूमीस ||
तो शिवाजी सुखी पोहचला कान सुचनेस |
अंती मनी हाच ध्यास ||
बार गडी ऐकून सुखी म्हणे आपल्यास |
निघून गेला स्वर्गास ||
सय्यद मागे सरे जागा देई बाजीरावास |
पाहून स्वामीभक्‍तीस ||
विजापुरी मुसलमान करी तयारीस |
खासा आला लढण्यास ||
कराडास डेरे दिले घेई बहू किल्ल्यांस |
वश करी चाचे लोकांस ||
दळव्यासी लढून घेई श्रुंगारपुरास |
मारले पाळेगारांस ||
लोकप्रितीकरीता करी गुरू रामदासास |
राजगडी स्थापी देवीस ||
मिष्ट अन्नभोजन दिले सर्वा बक्षिस |
केली मग मोठी मजलस ||
तानसैनी भले गवय्या बसवी गायास |
कमी नाही तालस्वरास ||
||चाल ||
जीधर उधर मुसलमानी | बीसमिलाहि हिमानी ||
सचा हरामी शैतान आया | औरंगजीब नाम लिया ||
छोटे भाईकू हूल दिया | बडे भाईकी जान लिया ||
छोटे कूंबी कैद किया | लोक उसके फितालीया ||
मजला भाई भगादिया | आराकानमे मारा गया ||
सगे बापकूं कैद किया | हुकमत सारी छिनलीया ||
भाईबंदकू कैद किया | रयत सब ताराज किया ||
मार देके जेर किया | खाया पिया रंग उडाया ||
आपण होके बेलगामी | शिवाजीकू कहे गुलामी ||
आपण होके ऐषारामी | शिवाजीकू कहे हरामी ||
बेर हुवा करो सलामी | हिंदवाणी गाव नाभी ||
||चाल ||
आदी आंतन | सर्वा कारण ||
जन्ममरण | घाली वैरण ||
तोच तारण | तोच मारण ||
सर्व जपून | करी चाळण ||
नित्य पाळण | लावी वळण ||
भूती पाहून | मनी ध्याईन ||
नाव देऊन | जगज्जीवन ||
सम होऊन | करा शोधन ||
सार घेऊन | तोडा बंधन ||
सरनौबती डंका हुकूम पालेकराचा | घेई मुजरा शाई(रा)चा ||
सुखसोहळे होता तरफडे सावंत वाडीचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भुषण गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा || ४||

सावंत पत्र लिही पाठवी विजापुरास |
मागे फौज कुमकेस ||
बाजी घोरपडा बल्लोळखान येती सहाय्यास |
शिवाजी करी तयारीस ||
खरा करून गेला छापा घाली मुधोळास |
मारिले बाजी घोरपड्यास ||
भाऊबंद मारिले बाकी शिपाई लोकांस |
घेतले बापसूडास ||
सावंताची खोड मोडून ठेवी चाकरीस |
धमकी देई पोर्तुगीस ||
नवे किल्ले बांधी डागडुजी केली सर्वांस ||
बांधिले नव्या जहाजास |
जळी सैनापती केले ज्यास भिती पोर्तुगीस |
शोभला हुद्दा भंडार्‍यास ||
विजापुरचा वजीर गुप्त लिही शिवाजीस |
उभयता आणिले एकीस ||
व्यंकोजी पुत्रा घेई शाहाजी आला भेटीस |
शिवाजी लागे चरणास ||
शाहाजीचे सदगुण गाया नाही आवाकाश |
थोडेसे गाऊ अखेरीस ||
सुखसोहळे झाले उपमा लाजे मनास |
उणे स्वर्गी सुखास ||
अपूर्व वस्तू घेऊन जाई विजापूरास |
भेट मग देई यवनास ||
पराक्रमी शिवाजी पाळी पाऊन लक्षास |
साजे यवनी स्नेहास ||
विजापुरचा स्नेह होता लढे मोगलास |
घेतले बहूता किल्ल्यास ||
सर्व प्रांती लूट धूमाळी आणिले जेरीस |
घाबरे केले सर्वांस ||
संतापाने मोगल नेमी शाइस्तेखानेस |
जलदि केली घेई पुण्यास ||
चाकणास जाऊन दावी भय फिर्डोजीस |
फुकट मागे किल्ल्यास ||
मास दोन लढला घेऊन सर्व फौजेस |
खान खाई मनास ||
आखेर दारू घालून उडवी एका हुकूमास |
भीति आंतल्या मर्दास ||
लागोपाठ मार देत हटवि पठाणास |
खचला खान हिंमतीस ||
प्रातःकाळी संतोषाने खाली केले किल्ल्यास |
देई मुसलमानास ||
फिर्डोजीला भेट देता खुषी झाली यवनास |
देऊन मान सोडी सर्वास ||
शिवाजीची भेट देता खुषी झाली यवनास |
वाढवी मोठ्या पदवीस ||
फिर्डोजीचे नाव घेता मनी होतो उल्हास |
पीढिजाद चाकरीस ||
येशवंतसिंग आले घेऊन मोठ्या फौजेस |
मदत शाईस्तेखानेस ||
सरनौबत भौती लुटी नगरी मुलखास |
जाळून पाडिला ओस ||
पाठी लागून मोंगल मारी त्याच्या स्वारांस |
जखमा केल्या नेताजीस ||
राजगड सोडून राहीला सिंव्हगडास |
पाहून मोगलसेनेस ||
जिजीबाईचे मुळचे घर होते पुण्यास |
खान राही तेथे वस्तीस ||
मराठ्यास चौकी बंदी गावात शिरण्यास |
होता, भित शिवाजीस ||
लग्नवर्‍हाडी घुसे केला पुण्यात प्रवेश |
मावळे सोबत पंचवीस ||
माडिवर जाऊन फोडी एका खिडकीस |
कळाले घरांत स्त्रीयांस ||
शाइस्त्यास कळता दोर लावी कठड्यास |
लागला खाली जायास ||
शिवाजीने जलदी गाठून वार केला त्यास |
तोडिले एका बोटास ||
स्त्रिपुत्रा सोडून पळे पाठ दिली शत्रूस |
भित्रा जपला जिवास ||
आपल्या पाठिस देणे उणे शिपायगिरीस |
उपमा नाही हिजड्यास ||
सर्व लोकांसहीत मारीले खानपुत्रास |
परतला सिंहगडास |
डौलाने मोगल भौती फिरवी तरवारीस |
दावी भय शिवाजीस ||
समीप येऊ दिले हुकूम सरबत्तीस |
शत्रू पळाला भिऊन मारास ||
करनाटकी बदली धाडी शाइस्तेखानास |
मुख्य केले माजमास ||
राजापुरी जाई शिवाजी जमवी फौजेस |
दावी भय पोर्तुगास ||
सर्व तयारी केली निघाला नाशिक तिर्थास |
हुल कसी दिली सर्वास ||
मध्यरात्री घेई बरोबर थोड्या स्वारांस |
दाखल झालो सुर्तेस ||
यथासांग सहा दिवस लुटी शहरास |
सुखी मग गेला गडास ||
बेदनूराहून पत्र आले देई वाचायास |
आपण बसे ऐकायास ||
शिपायाचे बच्चे शाहाजी गेले शिकारीस |
लागले हरणापाठीस ||
घोड्या ठेंच लागे उभयता आले जमीनीस |
शाहाजी मुकला प्राणास ||
पती कैलासा गेले कळाले जिजीबाईस |
पार मग नाही दुःखास ||
भुमी धडपडे बैसे रडून गाई गुणांस |
घेई पुढे शिवाजीस ||
||चाल ||
अतिरूपवान बहु आगळा | जैसा रेखला चित्री पूतळा ||
सवतीवर लोटती बाळा |
डाग लाविला कुणबी कुळा ||
सवतीला कसे तरी टाळा |
कज्जा काढला पती मोकळा ||
खर्‍या केसाने कापि का गळा |
नादी लागला शब्द कोकीळा || मुख दुर्बळ राही वेगळा |
अती पिकला चिंतेचा मळा ||
झाला शाहाजी होता सोहळा |
मनी भूलला पाहूनी चाळा ||
बहुचका घेती जपमाळा |
जाती देऊळा दाविती मोळा ||
थाट चकपाक नाटक शाळा | होती कोमळा जशा निर्मळा ||
खर्‍या डंखिणी घाली वेटोळा |
विषचुंबनी देती गरळा ||
झाला संसारी अती घोटाळा |
करी कंटाळा आठी कपाळा ||
मनी भिऊन पित्याच्या कुळा |
पळ काढला गेले मुताळा ||
छातीवरी ठेवल्या शिळा |
नाही रुचला सवत सोहळा ||
कमानीवर | लावले तीर ||
नेत्रकटार | मारी कठोर ||
सवदागर | प्रीत व्यापार ||
लावला घोर | सांगते सार ||
शिपाई शूर | जुना चाकर ||
मोडक्या धीर | राखी नगर ||
आमदानगर | विजापूरकर ||
मंत्रि मुरार | घेई विचार ||
वेळनुसार | देई उत्तर ||
धूर्त चतुर | लढला फार ||
छाती करार | करी फीतूर ||
गुणगंभीर | लाविला नीर ||
होता लायक | पुंडनायक ||
स्वामीसेवक | खरा भाविक ||
सिंहगडावर गेला बेत केला क्रियेचा |
बजावला धर्म पुत्राचा ||
रायगडी जाई राही शोक करी पित्याचा |
शत्रु होता आळसाचा ||
दुःखामधी सुख बंदोबस्त करी राज्याचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||५||

सर्व तयारी केली राजपद जोडी नावास |
शिक्का सुरू मोर्तबास ||
अमदानगरी नटून फस्त केले पेठेस |
भौती औरंगाबादेस ||
विजापूरची फौज करी बहुत आयास |
घेई कोकणपटीस ||
सावध शिवाजी राजे आले घेऊन फौजेस |
ठोकून घेई सर्वास ||
जळी फौज लढे भौती मारी गलबतास |
दरारा धाडी मक्केस ||
मालवणी घेऊन गेला अवचित फौजेस |
पुकारा घेतो मोगलास ||
जहाजावर चढवी फौज गेला गोव्यास |
लुटले बारशिलोरास ||
जलदी जाऊन गोकर्णी घेई दर्शनास |
लुटले मोगल पेठांस ||
पायवाटेने फौज पाठवी बाकी लुटिस |
आज्ञा जावे रायगडास ||
स्वतां खासी स्वारी आज्ञा लोटा जहाजास |
निघाला मुलखी जायास ||
मोठा वारा सुटला भ्याला नाही तुफानास |
लागले अखेर कडेस ||
औरंगजेब पाठवी राजा जयशिंगास |
दुसरे दिलीरखानास ||
ठेवले मोगल अमीर येऊन पुण्यास |
वेढिले बहुता किल्ल्यास ||
मानकरी शिवाजी घेई बसे मसलतीस |
सुचेना काही कोणास ||
बाजी प्रभू भ्याला नाही दिलीरखानास |
सोडिले नाही धैर्यास ||
हेटकरी मावळे शिपाई होते दिमतीस |
संभाळी पुरंधरास ||
चार्तुयाने लढे गुंतवी मोगल फौजेस |
फु्रसत दिली शिवाजीस ||
फार दिवस लोटले पेटला खान इर्षेस |
भिडला किल्ला माचीस ||
बुर्जाखाली गेला लागे सुरंग पाडण्यास |
योजी अखेर उपायास ||
हेटकरी मावळे जाती छापे घालण्यास |
पिडीले फार मोगलास ||
मोगलाने श्रम केले बेत नेला सिध्दिस |
काबीज केले माचीस ||
यशस्वी भासले लागले निर्भय लुटीस |
चुकले सावधपणास ||
हेटकर्‍यांचा थाट नीट मारी लुटार्‍यास |
मोगल हटले नेटास ||
बाजी मावळ्या जमवी हाती घेई खांड्यास |
भिडून मारी मोगलांस ||
पळ काढी पाठ दिली मावळ्यास |
मर्द पाहा भ्याले उंदरास ||
लाजे मनी दिलीरखान जमवी फौजेस |
धीर काय देई पठाणास ||
सर्व तयारी पुन्हा केली परत हल्ल्यास |
जाऊन भिडला मावळ्यास ||
बाजी मार देई पठाण खचले हिंमतीस |
हटती पाहून मर्दास ||
पराक्रम बाजीचा पाही खान खोच मनास |
लावीला तीर कमानीस ||
नेमाने तीर मारी मुख्य बाजी प्रभुस |
पाडिला गबरू धरणीस ||
सय्यद बाजी ताजीम देती घेती बाजूस |
सरले बालेकिल्ल्यास ||
मोगल चढ करती पुन्हा घेती माचीस |
धमकी देती मावळ्यास ||
हेटकरी मारी गोळी फेर हटवि शत्रूस |
पळवी इशानी कोणास ||
वज्रगडाला शिडी लावली आहे बाजूस |
वरती चढवी तोफांस ||
वरती मोगल मारी गोळे बालेकिल्ल्यास |
आणले बहु खराबीस ||
हेटकरी मारी गोळे बालेकिल्ल्यास |
आणले बहु खराबीस ||
हेटकरी मावळे भ्याले नाही भडिमारास |
मोगल भ्याला पाऊसाअ ||
मोगल सल्ल करी शिवाजी नेती मदतनीस |
घेती यवनी मुलखास ||
कुलद्रोही औरंगजेब योजी कपटास |
पाठवी थैली शिवाजीस ||
शिवाजीला वचन देऊन नेई दिल्लीस |
नजरकैद करी त्यास ||
धाडी परत सर्व मावळे घोडेस्वारांस |
ठेविले जवळ पुत्रास ||
दरबार्‍या घरी जाई देई रत्न भेटीस |
जोडीला स्नेह सर्वास ||
दुखणे बहाणा करी पैसा भरी हाकीमास |
गूल पाहा औरंगजेबास ||
आराम करून दावी सुरू दानधर्मास | देई खाने फकीरास ||
मोठे टोकरे रोट भरी धाडी मशीदिस |
जसा का मुकला जगास ||
दानशूर बनला हटवी हातिमताईस |
चुकेना नित्यनेमास ||
औरंगजेबा भूल पडली पाहून वृत्तीस | विसरला नीट जप्तीस ||
निरास कैदी झाला शिवाजी भास मोगलास | चढला मोठ्या दिमाखास ||
पितापुत्र निजती टोकरी बदली रोटांस |
बाकी सोपी चाकरास ||
जलदी करीती चाकर नेती टोकरांस | करामत केली रात्रीस ||
दिल्ली बाहेर गेले खुले केले शिवाजीस |
नेली युक्‍ती सिध्दीस ||
मोगल सकाळी विचकरी दांत खाई होटांस |
लावि पाठी माजमास ||
|| चाल ||
औरंगजेबीचा धूर दीला | पुत्रासवे घोडा चढला ||
मधीच ठेवी पुत्राला | स्वताः गोसावी नटला ||
रात्रीचा दिवस केला | गाठले रायगडाला ||
माते चरणी लागला | हळूच फोडी शत्रूला ||
स्नेह मोगलांचा केला | दरारा देई सर्वाला ||
||चाल ||
हैद्राबादकर | विजापूरकर ||
कापे थरथर | देती कारभार ||
भरी कचेरी | बसे विचारी ||
कायदे करी | नीट लष्करी ||
शिवाजीचा बेत पाहून जागा झाला गोव्याचा |
बंदोबस्त केला किल्ल्याचा ||
वेढा घालून जेर केला सिद्दी जंजिर्‍याचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||६||

शिवाजी तो मसलत देई मित्र तान्हाजीला |
बेत छाप्याचा सुचवीला ||
तान्हाजीने भाऊ धाकटा सोबत घेतला |
मावळी हजार फौजेला ||
सुन्या रात्री सिंहगड पायी जाऊन ठेपला |
योजिले दोर शिडिला ||
दोरीची शिडी बांधली शिपाई कमरेला |
हळूच वर चढवीला ||
थोडी चाहूल कळली सावध उदेबानाला |
करी तयार लोकाला ||
थोड्या लोकांसवे तान्हाजी त्यावर पडला |
घाबरा गढकरी केला ||
रणी तान्हाजी पडे मावळे पळती बाजूला |
सुर्याजी येऊन ठेपला |
धीर मोडक्या देई परत नेई सर्वाला |
उगवी बंधु सुडाला ||
उदेबान मारिला बाकिच्या रजपुताला |
घेतले सिंहगडाला ||
गढ हाती लागला तान्हाजी बळी घेतला |
झाले दुःख शिवाजीला ||
संहगडी मुख्य केले धाकट्या सुर्याजीला |
रुप्याची कडी मावळ्याला ||
पुरंधर माहूली घेई वरकड किल्ल्याला |
पिडा जंजिरी सिद्द्याला ||
सुरत पुन्हा लुटी मार्गी झाडी मोगलाला |
मोगल जेरदस्त केला ||
कैद करी शिवाजी बाकी उरल्या फौजेला |
त्यामधी अनेक स्त्रियांला ||
सुंदर स्त्रिया परत पाठवी ख़ानदेशाला |
सुरू केले चौथाईला ||
जलदी मोगल धाडी मोहबतखानाला |
देई मोठ्या फौजेला ||
औंढापट्टा घेऊन वेढी साल्हेर किल्ल्याला |
धिंगाणा दक्षिणेत केला ||
गुजर उडी घाली सामना शत्रुचा केला |
मोरोबा पठाण पंक्‍तीला ||
लढता पळ काढी दावी भ्याला मोगलाला |
जसा खरा मोड झाला ||
तो मराठे पळती मोगल गर्वाने फुगला |
आळसाने ढिला पडला ||
गुजर संधी पाहून परत मुरडला |
चुराडा मोगलाचा केला ||
बेवीस उमराव पाडले रणभूमीला |
नाही गणती शिपायाला ||
लहान मोठे कैदी बाकी सर्व जखम्याला |
पाठवी रायगडाला ||
मोगल वेढा झोडून मार देत पिटीला |
खिदाडी औरंगाबादेला ||
रायगडी नित्य शिवाजी घेई खबरीला |
गोडबोल्या गोवी ममतेला ||
एकसारखे औषध पाणी देई सर्वाला |
निवडले नाही शत्रूला ||
जखमा बर्‍या होता खुलासा सर्वांचा केला |
राहिले ठेवी चाकरीला ||
शिवाजीचू किर्ती चौमुलखी डंका वाजला |

शिवाजी धनी आवडला ||
मोगल यवनी शिपायी सोडी चाकरीला |
हाजरी देती शिवाजीला ||
पोर्तुग्यास धमकीही देई मागे खंडणीला |
बंदरी किल्ला वेढीला ||
मधीच इंग्रज भ्याला जपे मुंबै किल्ल्याला |
बनया धर्मा आड झाला ||
दिल्लीस परत नेले सुलतान माजूमाला |
दुजे मोहबतखानाला ||
उभयतांचा बदली खानजहान आला |

मुख्य दक्षीणेचा केला ||
मोगलाला धूर देऊन लुटले मुलखाला |
गोवळकुंडी उगवला ||
मोठी खंडणी घेई धाकरी धरी निजामाला |
सुखे मग रायगडी गेला ||
मोगलाचे मुलखी धाडी स्वार लुटायाला |
लुटले हुबळी शहराला ||
समुद्रकाठी गावे घेई जाहाजाला |
केले खुले देसाईला ||
परळी सातारा किल्ले घेई पांडवगडला |
आणिक चार किल्ल्यांला ||
|| चाल ||
हुकूम विजापुरी झाला | सोडिले बहुत फौजेला ||
द्यावा त्रास शिवाजीला | घ्यावे त्याचे मुलखाला ||
शिवाजी सोडी गुजराला | कोंडी आबदुल करीमाला ||
केला महाग दाण्याला | शत्रू अती जेर केला ||
आर्जव करणे शिकला | भोंदिले सैनापतीला ||
निघून विजापुरी गेला | क्रोध शिवाजीस आला ||
रागाऊन लिहीले पत्राला | निषेधी प्रतापरावाला ||
गुजर मनात लाजला | निघून वर्‍हाडात गेला ||
||चाल ||
आबदुल्याने | बेशर्म्याने ||
फौज घेऊन | आला निघून ||
राव प्रताप | झाला संताप ||
आला घाईने | गाथी बेताने ||
घुसे स्वताने | लढे त्वेषाने ||
घेई घालून | गेला मरून ||
प्रतापराव पडता मोड फौजेचा झाला |
पाठलाग मराठ्यांचा केला ||
तोफ गोळ्या पोटी पोटी दडती भिडती पन्हाळ्याला |
गेले नाही शरण शत्रूला ||
अकस्मात हंसाजी मोहीता प्रसंगी आला |
हल्ला शत्रूवर केला ||
गुजर दळ मागे फिरून मारी यवनाला |
पळिवले विजापुरला ||
शिवाजीने हंसाजीला सरनौबत केला |
शिवाजी मनी सुखी झाला ||
सेनापतीचे गुण मागे नाही विसरला |
पोशी सर्व कुटूंबाला ||
प्रतापराव – कन्या सून केली आपल्याला |
व्याही केले गुजराला ||
काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा |
केला खेळ गारूड्याचा ||
लुटारू शिवाजी लुटला धाक गृहफौजेचा |
खर्च नको दारूगोळीचा ||
बहुरूपी सोंग तूलदान सोने घेण्याचा |
पवाडा गातो भोसल्याचा ||
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||७||

विश्वासू चाकर नेमी मुलखी लुटायाला |
शिवाजी कोकणांत ||
छोटे मोठे गड घेई बांधी नव्या किल्ल्याला |
जमाव फौजेचा केला ||
गोवळकुंडी जाई मागून घेई तोफाला |
फितीवले कसे निजामाला ||
करनाटकी गेला भेटे सावत्रभावाला |
वाटणी मागे व्यंकोजीला ||
लोभी व्यंकोजी हिस्सा देईन बळासी आला |
आशेने फिरवी पगडीला ||
बंधू आज्ञा मोडून गर्वाने हट्टी पेटला |
बिर्‍हाडी रागाऊन गेला ||
शिवाजीला राग आला कोट छातीचा केला |
कैदी नाही केले भावाला ||
तंजोर बाकी ठेवी घेई सर्व मुलखाला |
खडा कानाला लावला ||
दासीपुत्र संताजी बंधू होता शिवाजीला |
करनाटकी मुख्य केला ||
हंबीरराव सेनापती हाताखाली दिला |
निघाला परत मुलखाला ||
वाटेमध्ये लधून घेई बिलरी किल्ल्याला |
तेथे ठेवी सुमंताला ||
शिवाजीचे मागे व्यंकोजीने छापा घातला |
घेतले स्वःता अपेशाला ||
जेर झाला व्यंकोजी देई उरल्या हिश्याला |
शिवाजी रायगडी गेला ||
विजापूराचा साह्य नेई राजे शिवाजीला |
मोगल मुलखी सोडला ||
मुलखी धिंगाणा धुळीस डेश मिळवीला |
सोडिला नाही पिराला ||
वाटेमधी मोगल गाठी शिवाजीला |
ग़्हाबरा अतिशय केला ||
भिडला शिवाजी मोगल मागे हाटीवला |
वाट पुढे चालू लागला ||
दुसरी फौज आडवी माहारज राजाला |
थोडेसे तोंड दिले तिजला ||
काळ्या रात्री हळूच सुधरी आडमार्गाला |
धूळ नाही दिसली शत्रूला ||
फौजसुध्दा पोहचला पटा किल्ल्याला |
फसविले आयदी मोगलाला ||
विजापुरचा आर्जव करी धडी थैलीला |
आश्रय मागे शिवाजीला ||
हांबीरराव मदत पाठवी विजापुरला |
बरोबर देई फौजेला ||
नऊ हजार मोगलांचा पराभव केला |
ज्यानी मार्ग अडीवला ||
विजापुरी जाऊन जेर केले मोगलाला |
केला महाग दाण्याला ||
शत्रुला पिडा होता त्रासून वेढा काढला |
मोगल भिऊन पळाला ||
दिल्लीचा परत बोलवी दिलीरखानाला |
पाठवी शाहजहानाला ||
जलदी करून शिवाजी वळवी पुत्राला |
लाविला नीट मार्गाला ||
तह करून शिवाजी नेती विजापुरला |
यवन घेती मसलतीला ||
शिवाजीचे सोवळे रुचले नाही भावाला |
व्यंकोजी मनी दचकला ||
निरस मनी होऊन त्यागी सर्व कामाला |
निरा संन्यासी बनला ||
शिवाजीने पत्र लिहीले बंधु व्यंकोजीला |
लिहीतो पत्र अर्थाला ||
वीरपुत्र म्हणविता गोसावी कसे बनला |
हिरा का भ्याला कसाला ||
आपल्या पित्याचा ठसा कसा जलदी वीटला |
मळावाचून काटला ||
कनिष्ठ बंधु माझ्या लाडकी पाठी साह्याला |
तुम्ही का मजवर रुसला ||
बोध घ्या तुम्ही माझा लागा प्रजापालनाला |
त्यागा ढोंगतोर्‍याला ||
मन उत्तम कामी जपा आपल्या फौजेला |
संभाळा मुळ आब्रुला ||
किर्ती तुझी ऐकू यावी ध्यास माझ्या मनाला |
नित्य जपतो या जपाला ||
कमी पडता तुम्ही कळवा माझ्या लोकांला |
सोड मनच्या आधीला ||
सुबोधाचे पत्र ऐकता शुध्दीवर आला |
व्यंकोजी लागे कामाला ||
शिवाजीला रायगडी गुडघी रोग झाला |
रोगाने अती जेर केल ||
त्याचे योगे नष्ट ज्वर फारच खवळला |
शिवाजी सिसी दुःखाला ||
यवनी विरास भिडता नाही कुचमला |
शिवाजी रोगाला भ्याला ||
सतत सहा दिवस सोसी तापदहाला |
नाही जरा बरळला ||
सातव्या दिवशी शिवाजी करी तयारीला |
एकटा पुढे आपण झाला ||
काळाला हूल देऊन स्वःता गेला स्वर्गाला |
पडले सुख यवनाला ||
कुळवाडी मनी खचले करती शोकाला |
रडून गाती गुणाला ||
||चाल ||
महाराज आम्हांसी बोला | धरल का तुम्ही आबोला ||
मावळे गडी सोबतीला | शिपाई केले उघड्याला ||
सोसिले उन्हातान्हाला | भ्याला नाही पावसाला ||
दोंगर कंगर फिरला | यवन जेरीस आणला ||
लुटले बहूत देशांला | वाढवी आपुल्या जातीला ||
लढवी अचाट बुध्दीला | आचंबा भुमीवर केला ||
बाळगी जरी संपत्तीला | तरी बेताने खर्च केला ||
वाटणी देई शिपायाला | लोभ द्रव्याचा नाही केला ||
चतुर सावधपणाला | सोडिले सोडिले आधी आळसाला ||
लहान मोठ्या पागेला | नाही कधी विसरला ||
राजा क्षेत्र्यांमध्ये पहिला | नाही दुसरा उपमेला ||
कमी नाही कारस्तानीला | हळूच वळवी लोकांला ||
युक्‍तीने बचवी जीवाला | कधी भिईना संकटाला ||
चोरघर्ती घेई किल्ल्याला | तसेच बाकी मुलखाला ||
पहिला झटे फितुराला | आखेर करी लाढाईला ||
युध्दी नाही विसरला | लावी जीव रयतेला ||
टळेना रयत सुखाला | बनवी नव्या कायद्याला ||
दाद घेई लहानसानाची | हयगय नव्हती कोणाची ||
आकृती वामनमुर्तीची | वळापेक्षा चपळाईची ||
सुरेख ठेवण चेहर्‍याची | कोंदिली मुद्रा गुणरत्नाची ||
||चाल ||
भिडस्त भारी | साबडा घरी ||
प्रिय मधुरी | भाषण करी ||
मोठा विचारी | वर्चड करी ||
आस सोयरी | ठेवी पदरी ||
लाडावरी | रागाचे भारी ||
इंग्लीश ज्ञान होता म्हणे मी पुत्र क्षेत्र्याचा |
उडवी फट्टा ब्रम्हाचा ||
जोतिराव फु्ल्याने गाईला पुत क्षुद्राचा |
मुख्य धनी पेशव्याचा ||
जिजीबाईचा बाळ काळ झाला यवनाचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||८||

अँड. राज जाधव...!!!