My Followers

Monday 20 April 2015

कोर्टची समीक्षा न्हवे...माझे..."मत"...!

कोर्टची समीक्षा न्हवे...माझे..."मत"...!

कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर "कोर्ट" सिनेमा पाहून आलो... कोर्ट नावाशी माझी जवळीक असल्यामुळे, थोडी जास्तच उत्सुकता लागली होती, सिनेमागृहात गेलो तो संभादादांचा खर्डा आवाज कानी पडत होता, फिल्म मध्ये मध्ये आडकत होती, त्यामुळे वैतागून आम्ही सर्व प्रेक्षकांनी जागेवरच उभे राहून चित्रपट बंद करून पुन्हा पहिल्यापासून लावण्याची विनंती (खरे तर दमदाटी) केली...आणि त्यांनी तसे केले देखील...(हा देखील एक नवीन अनुभव अनुभवला)

चित्रपट पुन्हा सुरु झाला...प्रेक्षकांनी..."बाबासाहेबांचा विजय असो" अश्या घोषणा दिल्या.. म्हटले आज चित्रपट व्यवस्थित पाहायला मिळेल... "फ्यानड्री" च्या वेळेस वाईट अनुभव आला होता...

चित्रपट सुरु होतो...अगदी सहज...सुलभ...आपल्यासारखाच...सामान्य अगदीच सामान्यपणे... सुरुवातीलाच वाटू लागते... "राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमे खरेच बोर असतात"... त्यामुळेच चित्रपटगृहात जेमतेम गर्दी होती... 

तसा विषय अगदी सोपा आणि सरळ....एका कुचकामी प्रशासनाचा दोष, दुसर्या कोणावर तरी लादण्यासाठी आणखी एका प्रशासनाची केविलवाणी धडपड.... 

चित्रपट चालत राहतो...शांत...अगदी शांत...पण प्रशासनाच्या थोबाडीत एक एक चपराक देत राहतो...

आरोपीचा वकील आणि सरकारी वकील यांची कोर्टातली जुगलबंदी कदाचित पहिल्यांदाच कोणीतरी खरीखुरी मांडलेली दिसली...आणि त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील अगदी खरे खुरे... त्यामागे लेखकाची, कदाचित चित्रपट अगदी खराखुरा करण्याची कल्पना असावी... 

दोन्ही वकील बहुदा इंग्लिश मध्ये बोलत होते, तरीही प्रेक्षक कांमधून येणारी दाद मनाला सुखावह करीत होती, जयंतीचा अनुभवामुळे दुखी झालेला मी, इथल्या सुसुक्षित आंबेडकरी तरुणांमुळे थोडा जास्तच आनंदी झालो... असो...

१८० वर्षापूर्वीच्या बंदी असलेल्या पुस्तकाचा साधा उल्लेख देखील "त्याज्ज" असल्याची धमकीच आरोपीच्या वकिलावर हल्ल्याच्या सीनमधून हल्ला करणारांकडून आज हि तुम्हास दिली जातेय... (कोणाची भावना कधी, कुठे, कशी दुखेल याचा नेमच नाही )

चित्रपटातील एन.जी.ओ.च्या चर्चासत्राचा तो सीन देखील बरेच काही सांगून जातो... 

चित्रपटात मध्ये मध्ये गुजराती भाषा वापरून एक कॉमिक पणा छान जमलाय...

यात एक प्रसंग येतो "सुबोध" जेव्हा गुजराती वकिलाच्या घरी त्यास भेटावयास जातो, तेव्हा सुबोधला त्यांच्यासोबत जेवायला बसायला सांगतात...नाही हो करत तो आग्रहाखातर बसतो...बाजूलाच बसलेला वकिलाचा गुजराती वडील सुबोधची चौकशी करतो, नाव काय ? याचा मित्र कि क्लायंट वगैरे... त्या चौकशी दरम्यान प्रेक्षकांना धाकधूक वाटत होती, कि तो त्या सुबोध ची जात विचारेल आणि जात एकूण त्यान धक्का बसेल, ते उठून जातील, त्याला उठवतील... पण तसे काही होत नाही...कारण चित्रपट वास्तवदर्शी आहे... उगीच जातिवाद कोंबायचा म्हणून काही सीन घडवला नाही...हे हि कौतुकास्पद... पण...अशी धाकधूक का होते..? कदाचित जातीभेद करणाऱ्या पेक्षा आमच्याच मनात जात घट्ट घर करून बसलीय का ? आमचा पूर्वगृह एवढा दुषित झालाय का ? कि आम्हाला आमच्या जातीची एवढी भीती वाटतेय कि... जातीभेद कोणीही...कुठेही आमच्यावर लादू शकतो... सीन एकदम सोपा आहे पण त्यामागे एवढी मोठी कहाणी हि...असू शकते... 

यातील कलाकार अक्टिंग करतायेत हे कोणत्याच अंगाने वाटत नाही... अगदी रियालिटी... वास्तवदर्शी.... मयत वाघमारेची बायको..आणि तिचे कोर्टातले घाबरणे...तिचे भाव... अगदी सामान्य... पण खरे खुरे संभादादांचा आवाज आणखी एक दोन गाण्यात ऐकायला मज्जा आली असती पण... शाहिरच वारंवार "उचलले" जातात...त्यामुळे जे आहे त्यातच समाधान मानावे....

सध्या लोकशाहीर, विद्रोही कलाकार, आंदोलनकर्त्या आंबेडकरी समाजास... उठसुठ नक्सलवादी "कोणत्या तपासाने" आणि कसे ठरविले जाते याची "पोलखोल" अगदी मार्मिक आणि कमालीची वाटते... 

चित्रपटाचा शेवट हाच चित्रपटाचा मुख्य "गाभा" आहे, कोर्टाला एक महिना सुट्ट्या पडतात (तश्या सेशन कोर्टाला नसतात म्हणा, पण ते चावून घेवू )... सुट्टीच आनंद लुटण्यासाठी "न्यायाधीश" देखील फिरायला जातात... त्यांच्या मित्रांशी चालू असलेल्या गप्पा... अधोरेखित करतात कि, शिक्षणाचा, हुद्द्याचा आणि "सद्सदविवेकबुद्धीचा" काही संबंध नाही... कितीही शिकलो तरी अंधश्रधा आणि कर्मकांड डोक्यातून जात नाही...

ट्रिपवर असताना एका बागेत न्यायाधीश मोहोदयाना डुलकी लागली असता. काही आगावू पोरे त्यांच्या अवतीभवती आरडा ओरडा करून त्यांची झोप घालवतात... रागावलेले न्यायाधीश महाराज "दंड" म्हणून, "एका पोराच्या कानाखाली आवाज काढतात"... 

गम्मत बघा... आयुष्यभर लोकांना हे "जज" करतात... पण खरे जजमेंट कदचीत कधी केले नसावे त्यामुळे हा घोळ... 

"गोंधळ केला"...दंड म्हणून एकाला कानफाडतात... ते देखील एका "मुक्या" मुलाला...ज्याला बोलता येत नाही... तो विनाकारण दंड भोगतो... या सिस्टीमचा बळी ठरतो... 

त्या सीन मध्येच सारे मर्म दडलेय... हि सिस्टीम आज शिक्षा देते, ती खर्या गुन्हेगारांना कि निरपराध लोकांना...? उत्तर सर्वांनी शोधायचेय...!

कोर्ट सिनेमा तिथेच बोट ठेवतो, "न्यायालयात फक्त "निकाल" मिळतो..."न्याय"...नाही"....आणि मला "वकील" म्हणून  याचा चांगलाच अनुभव आहे.

या चित्रपटाला एक "दर्जा" आहे, आणि त्याला लाभणारा प्रेक्षकहि दर्जेदार हवा... तरच या चित्रपटाला न्याय मिळेल...! 

चित्रपट अवश्य पहा...पण तुमच्यात तो चित्रपट पाहण्याचा "दर्जा" असला तरच...

अन्यथा... सनी लीयोनीचा "लीला" सिनेमा पहा... किंवा नेटवर तिच्याच लीला पहा...तुमची मर्जी...! 

- राज जाधव....!

Thursday 2 April 2015

"नवरा वारल्यावर"...!

"नवरा वारल्यावर"...!
अकाली नवरा वारल्यावर
काय करावं त्याच्या वस्तूंचं,
सामाना-सुमानाचं ?
ठेवणीतले कपडे, शर्ट-प्यँट वगैरे
गरिबाला देऊन टाकावं
किंवा घ्यावी भांडी बोवारणीकडून
तरी उरतोच प्रश्न त्याच्या अंडरविअरचा

मोबाईल येईल वापरता
सिमकार्ड बदलून
पण काँटॅक्ट लिस्टमधले
कलीग्जचे, मित्र-मैत्रिणींचे नंबर्रस्
करावे डिलीट की असू द्यावेत ?

गेल्या सात-आठ वर्षांत
डबलबेडवर एकाच बाजूला
लागलेली झोपायची सवय मोडता येईल
त्याची उशी नजरेआड करून ?

वर्षानुवर्ष त्याने लिहिलेल्या डाय-यांना
त्यात नोंदवलेल्या स्वप्नांना,
इच्छांना, आकांक्षांना
रद्दीत असा कितीसा मिळेल भाव ?

तो गेल्या दिवसाच्या आदल्याच रात्री
बंद पडलेलं रिस्ट वॉच
सांभाळावं उराशी
गरज नसलेल्या सहाव्या बोटासारखं ?

त्याच्या चपला द्याव्यात फेकून
की वाट पहावी
मुलाला त्या येतील याची ?

अर्धवट वाचून झालेल्या
कांदबरीच्या कुठल्याशा पानावरून
माझ्याकडे पाहणारा त्याचा चष्मा
ठेवावा मिटून
की सतत अनुभवावी जाणिव
तो पाहत असल्याची ?

हे मंगळसूत्र ठेवावं काढून
की ढाल म्हणून बाळगावं
परपुरूषांविरोधात
ओशटलेल्या नजरांपासून बचावाकरता ?

त्याच्याऐवजी मी जर गेले असते
तर हे शिल्लक राहिलेले काँडम्स
त्यांने दिले असते फेकून ?

- गीतेश गजानन शिंदे -
"कविता मना-मनातली"
संपर्क - ९८२०२७२६४६