My Followers

Tuesday 2 December 2014

गुरु शिष्यानी वादळ निर्माण केले....!

गुरु शिष्यानी वादळ निर्माण केले.....! 

११ अप्रील ला क्रांतीबा ज्योतिराव फुले आणि १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या गुरु शिष्यानी या महाराष्टातच नव्हे तर संपुर्ण भारतात एक प्रकारचा झंझावात, वादळ  निर्माण केले होते. संपुर्ण समाजमन त्यांनी ढवळून काढले होते.

फुले-शाहु-आंबेडकर चळवळीचा १८४८ ते १९५६ पर्यंतचा १०८ वर्षाचा हा संघर्ष होता. ज्योतीबा फुले यांनी या समाज क्रांतीच्या इमारतीचा भक्कम असा पाया रोवला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावर कळस चढविला.

या देशात त्यांनी न भुतो न भविष्यती असा क्रांतीकारी इतिहास घडविला. त्यांच्याच संघर्षामुळे  आम्हाला आज गोड फळे चाखायला मीळत आहे.
एक शायर म्हणतो-
हजारो सालोसे नरगीस अपने बेनुरीपे रोती है।
बडे मुश्किल से होती है चमन मे दिदारे पैदा॥
याचा अर्थ, हजारो वर्षापासून  नरगीस आपल्या विद्रुप चेहर्‍याकडे पाहून रडत होती. परंतु जेव्हा बागेत फुलं उगवयला लागले तेव्हा ती हसली.

त्याच प्रमाणे हजारो वर्षापासून शुद्र अतिशुद्र, स्त्रिया, बहुजन समाज आपल्या विद्रुपतेकडे म्हणजे दयनीय परिस्थितीकडे पाहून रडत होते. परंतु जेव्हा याच खाणीत क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजश्री शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सारखे हिरे पैदा होऊन ते समाजाचे दु:ख दुर करण्याचा प्रयत्‍न करायला लागले. तेव्हा कुठे या समाजाला हायसे वाटले. आशेचा किरण दिसला.

कालची मुके आज बोलू लागले. कालपर्यंत आम्ही मूके होतो आज मात्र बोलू लागलो. ही किमया या दोन्ही गुरु शिष्यानी घडवून आणली आहे. एक काळ असा होता की प्रस्थापीत व्यवस्थेने येथील शुद्राती-शुद्र बहुजन समाजाला शिक्षणापासून दूर ठेवले होते. क्रांतीबा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हातात लेखणी दिली. त्यामुळे आज हा वर्ग मोठमोठ्या हुद्यावर जाऊन पोहचला आहे.

वामन दादा कर्डक आपल्या गाण्यात म्हणतात की, ‘शेणाचे हात लावले पेणाले‘ ज्यांचे हात नेहमी गाई-ढोराच्या शेणाने माखलेले असायचे, आता त्यांच्या हातात लेखणी आली आहे. ही लेखणी क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजश्री शाहु महाराज  व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच आपल्या हातात दिली ही गोष्ट आपण कधिही विसरता कामा नये..

निसर्गातील साध्या पाण्याला तहान भागवण्यासाठी हात लावता येत नव्हता. ज्योतिराव फुलेंनी आपल्या आवारातील हौद त्यावेळी अस्पृष्यांसाठी खुला केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ साली महाड येथील चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करण्यासाठी सत्याग्रह करावा लागला होता. जेथे कुत्रे, मांजरे, गाई-ढोरे पाणी पित होते परंतु माणसांना मात्र  पाण्याला शिवण्यास मनाई होती.  त्यांची सावली सुध्दा उ़च्चवर्णीय आपल्या अंगावर पडू देत नव्हते. निरनिराळ्या प्रकारे त्यांनी गुलामीत जखडून ठेवले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की ज्यांना इतिहास माहीत नाही ते इतिहास घडवू शकत नाही. एक इतिहास व्यक्तीला बदलवू शकतो तर व्यक्ती सुध्दा इतिहासाला बदलू शकतो असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. या दोन्ही गुरु-शिष्याने अस्पृष्यतेचा, विषमतेचा  हजारो वर्षापासून चालत आलेला अमानवी इतिहासाचा प्रवाह रोखून धरला. परिवर्तन करण्याची एवढी प्रचंड ताकद त्यांच्या चळवळीमध्ये होती ही बाब नाकारता येणार नाही.

जोसेफ मॅझनी नावांच्या एका विचारवंताने म्हटले होते की, माणूस जरी मर्त्य असला तरी त्याचे विचार मात्र जिवंत राहतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा मुद्दा खोडून काढतांना सांगितले की, असे समजणे घोडचुक होईल. कारण एखाद्या रोपट्याला जिवंत ठेवण्यासाठी खत व पाणी देण्याची आवश्यकता असते. नाहीतर ते मरुन जाईल.  त्याचप्रंमाणे विचाराला जिवंत ठेवण्यासाठी त्याचा प्रचार आणि प्रसार होणे तितकेच महत्वाचे आहे. नाहीतर ते विचार सुध्दा मरुन जाईल. क्रांतीबा ज्योतिराव फुलेंचे विचार सुध्दा असेच काळाच्या आड लपलेले होते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानले व त्यांचे मानव कल्याणाची चळवळ शुध्द स्वरुपात पुढे नेली.

कर्मवीर भाऊराव पाटील ज्यांनी बहुजन मुलांच्या शिक्षणासाठी अनेक शाळा, कॉलेज, वसतीगृह काढले, ते म्हणतात-
‘एक वर्षाची बिदागी हवी असल्यास धान्य पेरा..
शंभर वर्षाची बिदागी हवी असल्यास माणसे  पेरा..
व पांच हजार वर्षाची बिदागी हवी असल्यास विचार पेरा…’
म्हणून महापुरुषांचे विचार एका पिढीतून दुसर्‍या पिढीपर्यंत समर्थपणे पोहचविण्यासाठी विचार पेरणे आवश्यक आहे. नाहीतर  ते विचार खंडीत होवून जातील.

ज्योतिबा फुले हे भारतीय इतिहासातील पहिले भारतीय आहेत की ज्यांनी ब्राम्हणवादी समाज व्यवस्थेच्या विरोधात कठोर विद्रोह केला.  त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत जो अविरत संघर्ष केला तो ब्राम्हणी समाज व्यवस्थेच्या विरोधात होता. ते ब्राम्हणांचा विरोध करीत नव्हते. तर ब्राम्हणी समाज व्यवस्थेचा विरोध करीत होते.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्राम्हणांचा विरोध करीत नव्हते. तर ब्राम्हणवादाचा  विरोध करीत होते. त्यांनी १२ व १३ फ़ेब्रुवारी १९३८ ला जळगांव येथे झालेल्या कामगार परिषदेत सांगितले होते की, ‘ब्राम्हणवाद म्हणजे समता, स्वातंत्य, बंधुत्व व न्याय नाकारणारी प्रवृती होय. ही प्रवृती जशी ब्राम्हणांमध्ये असेल तशीच ती ब्राम्हणेतरांमध्ये पण असू शकते.’ म्हणून बाबासाहेबांच्या चळवळीत ब्राम्हणांनी सुध्दा सक्रिय योगदान दिले होते, ही गोष्ट नाकारता येऊ शकत नाही.

ज्योतिबा फुले यांच्या आगमनाच्या पुर्वीचा जो काळ होता तो पेशवाईचा काळ होता. हा पेशवाईचा काळ म्हणजे शुद्र-अतिशुद्र, बहुजन समाजासाठी अत्यंत अंधारमय काळरात्र  होती व ब्राम्हणांसाठी मात्र अत्यंत भरभराटीचा काळ होता.

ब्राम्हण भोजणे व दक्षीणा हा त्यांच्यासाठी पर्वणीचा उद्योग असायचा. सरकारी तिजोरीतला अमाप पैसा या ब्राम्हण भोजणांवर खर्च करायचे. खादाड वृती इतकी विकोपाला गेली होती की, जो  ब्राम्हण एकाच वेळेस चार शेराचा भात, दुध, तुप, साखर खात असेल त्याला पालकीचा मान मिळत असे. तसेच सरकारी तिजोरी खाली होईपर्यंत ब्राम्हणांना लाखो रुपयाची दक्षिणा वाटत असत. श्रावण मासात रुपये, सोणे-नाणे वाटण्यासाठी एक सण असायचा. लाखो ब्राम्हण दक्षिणेसाठी पुण्यात जमायचे. नानासाहेब पेशवे यांनी १७५३ साली ८०००० ब्राम्हणांना १६ लाख रुपये वाटली अशी नोंद आहे.

शिवाजी महाराजांची सत्ता गेल्यानंतर मनुस्मृतीच्या कायद्याचा अंमल याच काळात अत्यंत कठोरपणे करण्यात येत होता. हिंदु धर्मात ज्या सतीप्रथा, विधवा विवाहबंदी, बालविवाह, जरड विवाह, विधवांचे केशवपण, जातीभेद, अस्पृष्यत: यासारखे जे अनिष्ट चालिरिती आधिच चालु होत्या त्याला पेशवाईत आणखीनच बळ मिळाले होते.

शुद्र-अतिशुद्र असा हा भलामोठा समाज विषारी जातीयतेच्या दु:खाने, शोषणाने, भुकेने, निरक्षरतेने त्राही त्राही झाला होता. लुळापांगळा झाला होता. त्याकाळी शैक्षणीक, सामाजिक, नैतिक अवस्था इतकी किळसवानी थराला जाऊन पोहचली होती की पेशवाई म्हणजे मानवतेवर फार मोठा कलंक ठरावा.

शुद्र-अतिशुद्रांना शिक्षण घेण्यापासून बंदी होती. चांगली मोडी अक्षर लिहिणार्‍या सोनार, प्रभु वगैरे जातींच्या लोकांचे हात तोडून टाकण्यात आले होते. शिक्षण घेऊ पाहणार्‍या कित्येक लोकांना फासावर लटकवीले गेले होते.

अनेक प्रकारच्या जुलमी कर वसुलीसाठी शेतकर्‍यांना ओणवे करुन उघड्या पाठीवर फटके मारीत, नाजुक भागावर चटके देत असत. त्यांच्या स्त्रियांवर गूंडाकडून बलात्‍कार घडवून आणीत. 

स्त्रियांच्या दु:खाला तर पारावर राहिला नव्हता.
‘शुद्र पशु नारी ये है सब ताडण के अधिकारी’

या स्वामी तुलशीदासाच्या म्हणण्यानुसार नारी ती मग ब्राम्हणाची कां असेना त्या शुद्रच होत्या. त्यामुळे ब्राम्हणाची आई, बहिण, मुलगी यांचा सुध्दा ब्राम्हण पुरुष मनुस्मृतीच्या कायद्यानुसार छळ करायचे.

आपल्या मुलींचे लग्न वयाच्या नवव्या वर्षीच उरकून घ्यावे असे त्यांनी फर्मान काढले होते. त्यामुळे बालविवाह, अकाली वैधव्य, सतिची चाल, केशवपण अशा सारख्या अनिष्ट चालिरितीने स्त्रिया नाडल्या जाऊन त्यांना जनावरासारखी वागविले जात होते.

एकापेक्षा अनेक बायका करण्याची पध्दत त्यावेळी श्रिमंत, जमीनदार, राजघराणे यांच्यात रुढ झाली होती. नाना फडणीसाला नऊ बायका, दुसर्‍या बाजीरावाला अकरा बायका, महादजी शिंदेला सात बायका. याशिवाय अनेक रखेल राहायचा. त्याची मोजदाद नाही. त्यांचे कडे एक जनानखाणा असायचा.

एखाद्या ६०-७० वर्षाच्या वयस्कर पुरुषाच्या गळ्यात ८-९ वर्षाची कोवळी मुलगी बांधून द्यायचे… अशा नवर्‍याचे निधन झाले की त्यांना आयुष्यभर विधवेचे जीवन जगावे लागे. पुरुषांच्या वाईट नजरांना त्यांना बळी पडावे लागे. अशातच त्यांना मातृत्व आले की आत्महत्या करायच्या किवा जन्माला आलेल्या बालकांच्या हत्या करायच्या.

सतीमध्ये केवळ लग्नाच्या बायकांना जाळत असत असे नव्हे; तर त्यांच्या रखेल, नौकरानी, दासी यांना सुध्दा जाळत. जाळण्यापुर्वी त्यांच्या अंगावर दागदागिने घालायला लावायचे, तिच्या मृत नवर्‍याच्या चित्तेवर बसवून तिला जिवंतपणी जाळत. तिने जर चित्तेवरुन उडी घेण्याचा प्रयत्‍न केला तर तीला बांबूच्या काठीने ढकलून द्यायचे. तिचा आर्त आवाज आसमंतात घुमू नये म्हणून मोठमॊठे नगारे वाजवित. जळाल्यावर त्यांच्या राखेला हात लावण्याचा अधिकार फक्त ब्राम्हणांना! कारण त्यात सोने-नाणे असायचे. ‘मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारे’ म्हणतात ते हेच असावेत! किती ही क्रुर प्रथा! अंगावर काटे येतात…

तीला दुसरे लग्न करायला बंदी होती. त्यांच्या डोक्याचे केस काढुन त्यांना विद्रुप करायचे.
अहो अण्णा मी तुमची लाडकी।
मला कां करतां बोडकी॥’

अशा त्या टाहो फोडत असल्याचे सावित्रीमाईने आपल्या काव्यात म्हटले आहे.
पायात वहान घालण्याची त्यांना बंदी होती. एखाद्या कोपर्‍यात तीला बसून राहावे लागे. अशा प्रकारचे अनेक निर्बंध तिच्यावर असायचे.

पेशवाईत स्त्रियांचा बाजार भरायचा. दास-दासी विकत घेण्याची व विकण्याची उघड प्रथा होती. स्त्रियांचे शील व चरीत्र नेहमीच धोक्यात असायचे. 

न्यायाला व सत्याला कुठेही स्थान नव्हते. घाशीरामने आपली कोवळी मुलगी बाजीरावला भोगायला देउन कोतवालकी मिळवली होती हे सत्य आपण घाशीराम कोतवाल या नाटकात पाहिले असेल. प्रजेचा अतोनात छळ होत होता. भ्रष्टाचार बोकाळला होता. न्याय सुध्दा विकत मिळत होता.

कनिष्ट जातींना कठोर शिक्षा व वरिष्ट जातींना सौम्य शिक्षा व्हायच्या. धर्माविरुध्द बोलणे म्हणजे धर्मद्रोह व राजाविरुध्द बोलणे म्हणजे राजद्रोह. उकळत्या तेलातून नाणे किंवा अंगठी काढणे, तप्त लाल झालेली कुर्‍हाड हातात धरणे, आरोपीची जिभ कापणे, शरिराचे एक एक अवयव तोडणे, फटके मारणे, जखम झाली की त्यावर मिठ लावणे, तोफेच्या तोंडेत देणे, हत्तीच्या पायाने तुडविणे, डोके उडऊन गांवात फिरवीणे अशा प्रकारच्या कठोर शिक्षा शुद्र-अतिशुद्रांना भोगावे लागत असे.

ब्राम्हणांना सचैल स्नान करणे, तूप पिणे, दुधातील खिर खाणे असे हास्यास्पद शिक्षा करीत असे. ब्राम्हणांना दक्षिणा दिले की पापमुक्त होत असे.

सामाजिक अत्याचारात ब्राम्हण वर्गाने कहरच केला होता. काही सोनाराने कपाळावर आडवे गंध लावला म्हणून लोखंडी शिक्के तापऊन त्यांच्या कापाळावर उमटविल्या. सुताराने एकटांगी धोतर नेसले म्हणून त्याच्या ढुंगणाचा कुल्ला कापुन टाकला. शुद्रांमध्ये मोडणार्‍या व आता ओ.बी.सी मध्ये गणल्या जाणार्‍या सोनार, सुतारासारख्या जातींचा सुध्दा त्याकाळी छळ होत होता.

या काळात अस्पृश्यांच्या अत्याचाराला पारावर नव्हता. याच काळात रस्त्यावर उमटलेले पायाचे चिन्ह पुसून जावे म्हणून ढुंगणाला फडा बांधणे व थुंकण्यासाठी गळ्यात गाडगे अडकवीणे अस्पृश्यांना बंधनकारक केले होते. कित्येकांच्या तोंडात तेल व शेंदूर ओतून त्यांना इमारतीच्या पायात, गढी, किल्ले व बुरुजात ठार मारण्याची प्रथा होती.
अशा या अंधार युगाचा अंत १८१८ ला झाला. त्यानंतर ब्रिटीशांची राजवट आली.

फुले दांपत्याचे आगमन झाल्याचा काळ पेशवाई नंतरचा जरी असला तरी सामाजिक परिस्थीती पेशवाईकालीन परिस्थितीपेक्षा फारशी सुधारली होती असे म्हणता येत नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुध्द आणि संत कबीर यांचे सोबत ज्योतिबा फुले यांना सुध्दा गुरु मानले होते. ते एकदा म्हणाले होते की, ‘जर ज्योतिबा फुले या धरतीवर जन्माला आले नसते तर आंबेडकर सुध्दा निर्माण झाला नसता. म्हणून ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक चळवळीला  भारताच्या सामाजिक क्रांतीच्या इतिहासात विशेष स्थान आहे.

एका ब्राम्हण व्यक्तीच्या सांगण्यावरुन ज्योतीबांच्या वडिलांनी ज्योतीबांचे शिक्षण बंद केले होते. परंतु गफ्फार मुन्सी व लेजिट अशा मुस्लिम व ख्रिचन व्यक्तिने ज्योतीबांच्या वडिलांना समजावीले म्हणून ज्योतीबांना पुढील शिक्षण घेता आले.

याच काळात त्यांचेवर ख्रिचन मिशणमधील शिक्षणाचा, थॉमस पेन यांच्या ‘मानवाचे हक्क’ या ग्रंथाचा, जॉर्ज वाशिग्टन व शिवाजीराजे यांच्या चरीत्राचा प्रभाव पडला. 

ब्राम्हण मित्राच्या लग्नाच्या वरातीतून ज्योतीबांना हाकलून दिले होते. वडिल म्हणाले की, ‘बरे झाले तुला फक्त हाकलले. पेशवाई असती तर तुला हत्तीच्या पायाने तुडविले असते.’ ज्योतीबां वडिलांना म्हणाले की, ‘बाबा तुम्ही हे सर्व सहन केले असेल परंतु मी मात्र सहन करणार नाही.’ हा प्रसंग त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. त्यानंतर त्यांनी धर्मशास्त्र, वेद, पुराण याचा अभ्यास केला व जातीभेदाच्या नांवाने देण्यात येणार्‍या कारणांचा शोध घेतला.

सामाजीक क्रांतीच्या चळवळीचे नेतृत्व करु पाहणार्‍या सेनापतीला  दुरदृष्टी व धाडस या दोन  मौलीक गुणाची गरज असते. हे दोन्हिही गुण ज्योतिबा फुले यांच्याकडे निश्चितच होते.

ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी याविरोधात चळवळ चालविली. मातृत्व आलेल्या स्त्रियांना आत्महत्या न करण्याबाबत प्रवृत करीत. त्यांचे बाळंतपण व मुलांचे संगोपण त्यानी स्थापन केलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृह व बाल संगोपण गृहात करीत असत.

काशीबाई नांवाची एका ब्राम्हण स्त्रिला आत्महत्या न करु देता, तीचे बाळंतपण केले व तिच्या बाळाला-यशवंताला दत्तक घेतले. हेच फुले दांपत्याचे एकमेव मुल होते. कारण त्यांना स्वत:चे मुल नव्हते. या यशवंताला त्यानी वैद्यकीय शिक्षण दिले व त्याचे आंतरजातीय मुलीशी लग्न लाऊन दिले.

ज्योतिबा फुले यांनी विधवा मुलींचे नाव्ह्यांनी डोक्याचे केस कापू नयेत म्हणून त्याचे शिष्य नारायन मेघाजी लोखंडे यांच्या मार्फत त्यांचा संप घडवून आणला होता.    आजकाल पगारवाढीसाठी संप केला जातो. पण अशा सामाजिक प्रश्‍नासाठी संपाचे शस्त्र ज्योतिबा फुलेंनी उगारले हे जगातील त्यावेळचे पहिले उदाहरण असेल.

ज्योतीबा फुले शुद्र-अतिशुद्राच्या गुलामगिरीचे, दुखाचे  कारण अविद्या आहे असे म्हणत. म्हणून त्यांनी ‘शेतकर्‍याचा आसुड’ या ग्रंथात म्ह्टले आहे की-
विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥
निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।।
वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥

हा महात्मा फुले यांचा संदेश म्हणजे क्रांतीकारक तर आहेच पण एक नविन तत्वज्ञान मांडणारा आहे. पुष्यमित्र शृंगाच्या प्रतिक्रांतीपासून जवळपास २००० वर्षापासून एखाद्या मुक्या जनावराप्रमाणे राहणार्‍या शुद्र अतिशुद्र समुहाचा अडकलेला हुंकार मुक्त झाला या संदेशामुळेच! 

म्हणून त्यांनी शिक्षणावर जास्त भर दिला.  १ जानेवारी १८४८ ला मुलींसाठी भिडे वाड्यात पहिली ऎतिहासिक शाळा काढली. त्यानंतर त्यांनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढल्या. पुढे १८५२ पर्यंत अशा शाळांची संख्या १८ पर्यंत नेली.

इंग्रज लोकांची अशी धारणा होती की जर वरिष्ट जातींना उच्च शिक्षण दिले तर झिरपत खालच्या जातीपर्यंत येईल. फुलेंनी या त्यांच्या योजनेला विरोध केला. त्याऎवजी प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी मोफत आणि सक्तीचे करावे असे त्यांनी हंटर आयोगाला दिलेल्या निवेदनात मागणी केली.

याची अंमलबजावणी मात्र राजश्री शाहु महाराजांनी त्याच्या राज्यात केली होती. जे पालक मुलांना शाळेत टाकणार नाहीत त्यांना ते दंड करीत.

याचीच तरतुद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानात केली. परंतु खेदाची गोष्ट अशी की, ६० वर्षानंतर त्याचा कायदा होऊन १ अप्रिल २०१० पासून त्याची अंमलबजावणी झाली आहे. त्याची जर आधिच कायदा होऊन अंमलबजावणी झाली असती तर शिक्षणाच्या बाबतीत भारतामध्ये एक वेगळेच चित्र निर्माण झाले असते.

मुलींना शिकविण्यास शिक्षक मिळत नव्हते. म्हणून त्यांनी सावित्रीलाच शिक्षिका बनविले. सावित्री ही भारतातील पहिली शिक्षिका ठरली. त्यानंतर त्या मुख्याध्यापिका झाल्यात. तेव्हा  भारतामध्ये मुख्याध्यापिका झालेल्या त्या पहिल्या स्त्री होत्या.

त्या घरुन शाळेत जायच्या तेव्हा रस्त्यातील ब्राम्हण लोकं तिला शेण, माती,दगडं मारुन अर्वाच्च शिव्या देत असत. मुलींनी शिकणे पाप आहे. धर्माच्या विरोधात आहे. जेवणाच्या ताटात अळ्या पडतात. आज कोणाच्या स्त्रिया शिक्षणामध्ये व इतर अन्य क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. असे असून सुध्दा या स्त्रिया सावित्रीमाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करतात काय? की त्या फक्त  काल्पनीक सरस्वतीला जीला कोणताही इतिहास नाही. अशा सरस्वतीलाच  देवता माणतात? याचे आश्चर्य वाटते.      ज्योतीबांना व सावित्रीमाईंना वडिलाने ब्राम्हणाच्या तक्रारीवरुन घराबाहेर काढले. तरीही ते डगमगले नव्हते.

स्त्रि-पुरुष समानतेवर ताराबाई शिंदे यांनी लिहलेल्या पुस्तकाचा त्यांनी गौरव केला. त्यांनी स्वत:च्या जीवनात त्यांच्या विचाराचे अनुकरण केले. ज्योतीबांना अपत्य नव्हते. तेव्हा सगेसोयरे व प्रत्यक्ष पत्‍नी सावित्री हिने सुध्दा दुसरे लग्न करण्याची विनंती केली. तेव्हा ते सावित्रीना म्हणाले की, वैद्यकिय दृष्ट्या तुझ्यात जर ऊणीव असेल तर दुसरे लग्न करुन सवत आणण्यास  काही हरकत नाही. पण माझ्यात जर ऊणीव असेल तर तुला दुसरे लग्न करुन या घरात सवता आणावे लागेल, याला तुझी तयारी आहे कां? असा तिला प्रश्‍न केला. अशा प्रकारे समता कृतीत आणणारे ते युगपुरुष होते.

शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव साजरा करण्यासाठी ज्योतीबा फुले रायगडावर गेले. तेथे झाडाझुडपात व काट्यात लपलेला शिवाजीची समाधी शोधून काढली. व तो परिसर साफ केला. त्यावर फुले वाहिली. ग्रामभटाने हे पाहिले व त्यांनी ते फुले पायांनी उधळले. त्यांनी शेतकर्‍यांचा रक्षणकर्ता असे शिवाजीराजे यांचे चित्र रंगवून पोवाडा रचला.

जमीनदार व सावकारच्या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी त्यांनी शेतकर्‍यांची चळवळ चालविली. याच वेळेस त्यांनी शेतकर्‍यांचा आसुड हा ग्रंथ लिहीला.

नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये गिरणी कामगाराची  चळवळ सुरु केली होती.   १८७७ साली पडलेल्या दुष्काळात त्यांनी लहान मुलांसाठी अन्नछत्र उघडले होते. १८७७ साली चळवळीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ‘दीनबंधु’ नावाचे मुखपत्र सुरु केले. त्या मुखपत्राचे संपादक सुरुवातीला कृष्णराव भालेकर व नंतरच्या काळात नारायण मेघाजी लोखंडे होते.

ज्योतीबा फुले यांनी प्रंचड लेखन केले. त्यांनी शेतकर्‍यांचे आसुड, गुलामगिरी, ब्राम्हणाचे कसब, तृतीय रत्‍न, शिवाजींचा पोवाडा, सार्वजनिक सत्य धर्म, अखंड इत्यादी अनेक प्रकारचे ग्रंथ, नाटक व काव्यलेखन केले. आयुष्याच्या अखेरीस ते आजाराने ग्रस्त असल्यामुळे त्यांचा उजवा हात काम करीत नव्हते. म्हणून त्यांनी डाव्या हाताने सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ लिहिला.

पत्रकारिता, ग्रंथलेखन, साहित्यलेखन, काव्यलेखन, तत्वज्ञान, कामगार चळवळ, शेतकरी आंदोलन, स्त्री मुक्ती, अंधश्रध्दा निर्मुलन, जाती निर्मुलन, अनिष्ट प्रथा निर्मुलन आरोग्य, शिक्षण ईत्यादी अनेक स्तरावर महात्मा फुलेंची चळवळ प्रहार करत पुढे जात होती.

सतीप्रथेच्या बाबतीत ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी जागृती निर्माण केली. बायको मेल्यावर तीचा  नवरा सता कां जात नाही असा ते प्रश्‍न विचारीत.

ब्राम्हणांनी दोन मारेकर्‍यांना ज्योतिबा फुलेंना मारण्यासाठी सुपारी देऊन पाठविले होते. परंतू ज्योतिबा फुलेंच्या विनयशील वागणूकीमुळे ते दोघेही त्यांना शरण गेले. त्यातला एक धोंडीराम कुंभार याला काशीला पाठविले. तेथे त्यांनी ग्रंथाचा व  शास्त्राचा अभ्यास करुन पंडीत झाला. दुसरा रोडे रामोशी ज्योतिबाचा अंगरक्षक झाला.  राजेशाहीमध्ये सत्तेच्या सर्व किल्ल्या ब्राम्हणाकडेच होत्या. नांवाला क्षत्रिय राजे असले तरी त्यांची सत्ता ब्राम्हणाच्या सल्ल्याने चालत असायचे. राम आणि कृष्णा सारख्या देवांची सत्ता सुध्दा  ब्राम्हणाच्या सल्लामसलतीने चालत होता. 

ज्योतीबा फुलेंच्या काळात जरी सत्ता ब्रिटिशांची असली तरी त्यांच्या प्रशासनात  ब्राम्हणच होते. समाजातील उच्च स्थानामुळे सत्तेला आपल्या कलाप्रमाणे राबविण्यात ते यशस्वी झालेत. ऎनकेन प्रकारे सत्तेवर ब्राम्हणाचे वर्चस्व राहिल्यामुळे  सर्वसामान्य लोकं आणि शेतकरी नाडल्या जात होते. त्यांच्या अशिक्षितपणाचा, अडाणीपणाचा फायदा घेऊन कोर्ट कचेरीच्या कामात त्यांना कसे नागविल्या जात होते ते ज्योतीबांनी ‘ब्राम्हणाचे कसब’ आणि ‘शेतकर्‍यांचा आसूड’ या ग्रंथात लिहिले आहे.

ब्राम्हणांनी मनुस्मृती व वेद निर्मान करुन ते देवनिर्मित आहेत असे लोकांना सांगितले. त्यामाध्यमातून चातुर्वण्य व्यवस्था व जातीची उच्च-निच अशी उतरंड तयार केली. त्यामुळे बहुजन समाज एकत्र येऊ शकला नाही. पाप, पुण्य, नशीब, दैव अशा भोळसर कल्पना त्याच्यात बिंबवील्यात.  त्यामुळे  ब्राम्हणांकडून होणारे अन्याय अत्याचाराला ते निमुटपणे सहन करीत असत.

हिंदुधर्माच्या ग्रंथावर ते टिका करीत असे. रामायणाला लोकांची मने रिझविण्यासाठी त्यावेळच्या गप्पाड्या नाटक्यांनी कल्पून रचिलेला नितीहीन इतिहास होय. गोपीकांचे वस्त्र पळविणारा, गोपपत्‍नी राधेसोबत रममान होणार्‍या कृष्णाला महाभारतातील नितिभ्रष्ट पात्र समजत असत. 

विटलो खोट्या धर्मा। त्यागिले निच कर्मा॥ असे त्यांनी एका काव्यात म्हटले आहे. त्यांनी फक्त ब्राम्हणी समाज व्यवस्था किंवा हिंदु समाज व्यवस्था किंवा जाती व्यवस्था या विरोधात विद्रोह केला असे नसुन त्यांनी ज्या धर्म शास्त्रांचा आधार घेऊन  ही व्यवस्था निर्माण केली त्या धर्म शास्त्रांच्या सत्यतेच्या विरुध्द सुध्दा आव्हान दिले.

 ज्योतीबा फुले यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथात रामायण व ‘भागवत’ यातील गोष्टी खर्‍या व विश्वसनिय नाहीत असे लिहिले आहेत. ‘रामायणात परशुरामाचे धनुष्य सिता जर सहज उचलून खेळत असेल व तोच धनुष्य उचलतांना जर रावण पडत असेल तर रावणापेक्षा सिता ही शक्तीशाली असली पाहिजे. मग रावण सितेला कसा काय पळवून नेऊ शकतो? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. तसेच ब्राम्हण असलेल्या भृगु ॠषीने विष्णु-आदिनारायणाला लाथ मारतो तेव्हा  भृगु ॠषीच्या पायाला लागले असेल म्हणून विष्णु त्याचे पाय चोळतो. याचा अर्थ ब्राम्हणाने प्रत्य्क्ष देवाला जरी लाथ मारली तरी तो सहन करतो. मग आपण तर शुद्रच आहोत, मग आपल्याला ब्राम्हणाने लाथ मारल्यानंतर हु की चु करु नये, असा त्याचा भावार्थ आहे असे फुलेंनी ग्रंथात लिहिले आहे. ‘ब्राम्हण हे ईराणी आर्यभट असून परकीय आहेत. त्यानी आपली सत्ता टिकविण्यासाठी वेदापासून पुराणापर्यंत निर्मिती केली. आक्रमण करुन आलेल्या आर्यानी शक्ती, विश्वासघात व धार्मिक प्रचार या माध्यमातून स्थानिक जनतेवर त्यांनी विजय मिळविला. विष्णुचे नउ अवतार म्हणजे आर्यांनी प्राप्त केलेल्या विजयाच्या निरनिराळ्या अवस्था होत्या’ असे ज्योतीबा फुलेंनी ग्रंथात लिहिले आहे. इंग्रज आहेत तोपर्यंत शुद्राने जल्दी करुन भटाच्या दास्यत्यातून मुक्‍त व्हावे असे गुलामगिरी या ग्रंथामध्ये लिहिले आहे. मनुस्मृतीचे कोणीतरी एखादा शुद्र दहन करील असे भाकीत ज्योतीबा फुले यांनी व्यक्त केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुरुची आज्ञा मानून २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे महाड येथे दहन केले. शुद्र-अतिशुद्रास रसातळाला नेणारा त्यांचे जीवन, भावविश्व बेचिराख करणारा असा हिंदुधर्म असल्यामुळे त्यांनी ’सार्वजनिक सत्य धर्माची’ स्थापना केली. २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या स्थापनेमागे त्यांचे ३ उद्देश होते-  

१. शुद्र व अतीशुद्र यांची ब्राम्हण पुरोहिताकडून होणारी पिळवणूक बंद करणे. 
२. त्यांना त्यांच्या मानवी हक्काची व अधिकारांची शिकवणूक देणे. आणि 
३. ब्राम्हणी शास्त्रांच्या आणि धार्मिक गुलामगिरीतून त्यांना मुक्त करणे. 

हाच उद्देश समोर ठेउन ज्योतीबा फुलें यांनी आपल्या कार्याची दिशा आखली होती.सत्यशोधक समाजाची स्थापना करुन सनातन्याचे वाभाडे काढण्यास सुरुवात केली. तसेच सत्यशोधक समाजाचे संघटन करण्याचे कार्य हाती घेतले. या संघटनेचा पुणे, मुंबई व खेडोपाडी प्रचार व प्रसार करण्य़ात आला.. ब्राम्हणाच्या हातून लग्न व इतर कोणतेही विधी करण्याचे काम या संघटनेने थांबवून आपल्याच कार्यकर्त्याद्वारे ते सत्यशोधक पध्दतीने विधी करीत असत. संघटनेने अनेक सत्यशोधक विवाह अत्यंत कमी खर्चात व साधेपाणाने घडवून आणले. ८ मार्च १८६४ रोजी त्यांनी शेणवी जातीच्या विधुर-विधवांचा पुनर्विवाह घडवून आणलाख्रिचन,  मुस्लिम, मांग व  ब्राम्हण यांनी भावासारखे राहावेत असे फुले म्हणत असत. ख्रिस्त महमंद मांग ब्राम्हणासी।धरावे पोटाशी। बंधुपरी॥ यावरुन ते मानवतेवर किती प्रेम करायचेत ते दिसते. एकाच घरात एक भाऊ मुस्लिम एक ख्रिस्ती एक बौध्द असावा अशी त्यांची सर्व धर्म समभावाची व व्यक्ती स्वातंत्र्याची कल्पना होती.

 ज्योतीबा म्हणतात- 
‘थोडे दिन तरी मद्य वर्ज करा।
 तोच पैसा भरा। ग्रंथासाठी..!

 १८८० मध्ये त्यांनी दारु विक्रीला विरोध केला होता. प्रत्येक सरकारी खात्यात ब्राम्हणेत्तर लोकं असल्याशिवाय जनतेला खरे सुख मिळणार नाही. म्हणून ते प्रत्येक खात्यात सर्व जातीच्या लोकांचा भरणा असला पाहिजे असे ते प्रतिपादन करीत. विशेषत: शिक्षण खात्यात सर्व जातीच्या शिक्षकांची नेमणुक करावी असे ते सरकारकडे मागणी करीत असे. म्हणजेच प्रत्येक जातीला त्यांच्या लोकसंखेच्या प्रमाणात त्यांची भागिदारी असावी असा त्यांनी विचार मांडला होता. हाच विचार घेवून राजश्री शाहू महाराज यांनी त्याच्या संस्थानात ब्राम्हणेतरांना ५० टक्के आरक्षण दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गियांना आरक्षण मिळण्यासाठी कठोर संघर्ष केला व भारतीय घटनेमध्ये तशी तरतुद केली.२ मार्च १८८८ रोजी पुणे येथे ड्यूक ऑफ कॅनॉटच्या सत्कार प्रसंगी ज्योतीबाने शेतकर्‍याच्या पोषाखात  जाऊन म्हणाले की, ‘येथे जमलेले हिरेमोती व मौल्यवान कपडे घातलेले लोक हे हिंदुस्थानचे खरे प्रतिनिधी नाहीत. खरा हिंदुस्थान खेड्यात आहे. तो उपाशी, गरीब, बेघर व उघडा-नागडा आहे. त्याला शिक्षण देणे आवश्यक आहे. ही जाणीव आपण आपली माता महाराणी व्हिक्टोरिया यांना करुन द्यावी.’ ज्योतीबांनी  इंग्रज नोकरशाहीलाही धारेवर धरले होते. इंग्रज अधिकारी ऎषारामी बनला आहे. हाताखालील ब्राम्हण अधिकार्‍यावर विश्वास ठेऊन इंग्रज अधिकारी शेतकर्‍यांची पिळवणूक करीत असतो. इंग्रजी राजवटीत ब्राम्हण अधिकारी अधिकच जुलमी व भ्रष्टाचारी बनली आहे.
 ग्रामीण शेतकरी–कष्टकरी जनतेचे आता दुहेरी शोषण होत आहे. एकीकडे इंग्रज व दुसरीकडे ब्राम्हण यांच्याकडून त्यांची भयंकर नागवणूक होत आहे.
 म्हणून ज्योतीबा फुले म्हणतात, 
 ‘सत्ता तुझी राणीबाई। हिंदुस्तानी जागृत नाही॥ 
जिकडे तिकडे ब्राम्हणशाही। डोळे उघ्डुनी पाही.

मुंबईच्या सभेत त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली. 

संत कबीर म्हणतात-
 सुखीया सब संसार है। खाये और सोये॥दु:खीया दास कबीरहै। जागे और रोये॥ 

याचा अर्थ- 

सर्व लोकं खाण्यात व झोपण्यात सुख मानतात. कबीर मात्र यामुळे दु:खी होऊन जगत आहे व रडत आहे.  

संत कबीर पुढे म्हणतात- 
बडा हुआ तो क्या हुआ। जैसे पेड खजुर॥ पंछी को तो छाया नही। फल लागे अती दुर॥ 

याचा अर्थ- ‘खजुराच्या झाडाप्रमाणे मोठा झालास म्हणून काय झाले. पाखरांना तर तुझी सावली मिळत नाही आणि तुझी फळे दुर असल्यामुळे ते पण कोणाला खाता येत नाही.’

 म्हणून महात्मा ज्योतीबा फुले यांच्या त्यागमय जीवनाचा बोध घेऊन सामाजीक कार्यामध्ये तन, मन धनाने सहयोग दिला पाहिजे. फुले-शाहु-आंबेडकरांच्या चळवळीचा सैनिक बणण्याऎवजी प्रतिक्रांतीवाद्याचा सैनिक बनून मानवतेचा बळी तर घेत नाही ना यावर आपण लक्ष ठेवायला शिकले पाहिजे हा बोध ज्योतीबा फुलेंच्या जीवन आणि कार्यामधून घेता येईल.  

एक शेर असा आहे-
 मिला दे खाक मे हस्ती, गर कुछ मर्तबा चाहे।
कि दाना खाक मे मिल गुले, गुलझार होता है॥ 

याचा अर्थ आहे- 

जेव्हा धान्याचा एक दाना जमिनीत पुरतो. तेव्हा त्याचे झाड बनते. त्याला कणिस लागते. त्या कणसाला हजारो दाने लागतात. परंतु हे हजारो दाने निर्माण करण्यासाठी त्या एका दान्याला जमिनीमध्ये नष्ट व्हावे लागते. असं हे ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे जीवन होते.
—————————————————————————————————

सदर लेख लेखकांनी (आर. के. जुमळे) दिनांक ११.०४.२०१० रोजी भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन, विद्युत वसाहत दिपनगर येथे सार्वजनिक महात्मा ज्योतीबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून दिलेल्या भाषणावर आधारीत आहे.

मराठा आरक्षणाची वैधता...!

मराठा आरक्षणाची वैधता...!

अखेर आघाडी सरकारने निवडणुका डोळ्या समोर ठेऊन घाईघाईने देऊ केलेले 16 टक्के मराठा आरक्षणाचे गाजर मोडुन निघालेच, मुंबई उच्च न्यायालयाने आज दिनांक 14 नोव्हेंबर 2014 रोजी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ति मोहित शहा आणी न्यायमूर्ति सोनक यांच्या खंडपीठाने निकाल दिला आणी तत्कालीन आघाडी सरकारची आरक्षण टिकविण्याबाबतची ग्वाही या निकालाने फोल ठरली आणी सरकारचे पितळ उघडे पडले.

सदर निकाला विरोधात सध्याचे आरक्षण विरोधी सरकारच सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भाषा करु लागले आहे, परंतु उच्च न्यायालयाने निकालपञात मांडलेल्या बाबीनुसार सरकारला सर्वोच्च न्यायालयात देखील मराठा आरक्षण टिकवता येणार नाही. कारण तत्कालीन सरकार आणी राणे समीतीने कितीही अभ्यासपुर्ण अहवाल सादर केल्याच्या बाता मारल्या तरी, मुळात हे मराठा आरक्षण घटनाबाह्य होते आणी आहे.
उच्च न्यायालयाच्या निकालपञातील स्थगीती आदेशात कोर्टाने राणे समितिवर ताषेरे ओढलेले आहेत, निवडणुकीच्या तोंडावर मराठा वोटबँक समोर ठेवुन कसलेही तातडीचे कारण नसताना, मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढणे संविधानात्मक नव्हते, असे न्यायालयाने तत्कालीन सरकारला फटकारले आहे.

खरे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी 30 नोव्हेंबर 1948 रोजी आरक्षणाची मर्यादा 50 टक्के असायला हवी असे नमुद करतानाच सांगीतले की, आरक्षणाची 50 टक्केची मर्यादा ओलांडली तर घटनेतील समतेच्या मुल्यात समतोल राहणार नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाने बालाजी प्रकरणात आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये असा आदेश दिलेला आहे, तसेच अश्या अनेक खटल्यामध्ये याचा पुनरुच्चार सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काहि अतिअपवादात्मक परिस्थितित विशेष बाब म्हणुन आरक्षणाची मर्यादा 50 टक्केपेक्षा जास्त ठेवता येईल, माञ उच्च न्यायालयानुसार मराठा समाज हा प्रगत आणी सत्ताधारी समाज असल्याने व तो सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही, त्यासाठी ही मर्यादा ओलांडण्याचे कोणतेही कारण नाही, असे नमुद केले.

भारतीय संविधानाच्या कलम 15-4 व 16-4 नुसार आरक्षणासाठी असलेला "सामाजिक मागासलेपणा" हा निकष आहे, हे देखिल येथे अधोरेखीत करावेसे वाटते.

उच्च न्यायालयाच्या आदेशपञानुसार सन 1980 साली मंडल आयोगाने मराठा समाजाला उन्नत आणी आणी पुढारलेला समाज म्हणुन प्रमाणित केले व ओबीसी आरक्षणास अपाञ ठरविलेले आहे. तसेच भारत सरकारने नेमलेल्या "केंद्रीय मागासवर्ग आयोगाने" देखील 25 फेब्रुवारी 2000 रोजी मराठा समाजास आरक्षण देता येणार नाही, असे अहवालात नमुद केले आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने 2008 साली नेमलेल्या बापट आयोगाने देखील मराठा समाजाला आरक्षण देणे सामाजिक न्यायाच्या दृष्टिने अयोग्य असल्याचा अहवाल दिलेला असुन न्यायमूर्ति भाटिया यांनी अहवालाचा पुनर्विचार करण्यास नकार दिला. परिणामी केंद्रीय आयोग, राज्य आयोग व मंडल आयोगाने मराठा आरक्षण नाकारल्याने राज्य सरकारने तडकाफडकी काढलेल्या या अध्यादेशास स्थगिती मिळाली.

तत्कालीन सरकार नियुक्त राणे समीती, राज्य व केंद्रीय मागासवर्ग आयोगांचे अधिकार डावलुन घटनाबाह्यरितीने नेमली असुन समीतीच्या अहवालाला घटनात्मकदृष्या काहीही स्थान नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाने 16 नोव्हेंबर 1992 रोजी मंडल आयोगाच्या निकालात यापुढे आरक्षण देण्याची शिफारस "वैधानिक आयोगालाच" देता येईल असे स्पष्ट केलेले आहे.

मा.उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर तत्कालीन सरकार मध्ये असणारांनी सारवासारव करताना सांगीतले की, राणे समितिने अभ्यासपुर्ण अहवाल दिलेला आहे, परंतु न्यायालयात सध्याच्या सरकारने योग्य बाजु मांडली नाही, परंतु वास्तविकता हि आहे की, "राणेसमितीने मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला असल्याचा पुरावा अहवालात दिलेला नाही."

मराठा आरक्षणावर राजकारण करणार्या संघटनांनी, नुसती आरक्षणाची मागणी करण्याऐवजी घटनेचा आणी आजपर्यंतच्या आरक्षणाच्या वाटचालीचा देखील अभ्यास करणे गरजेचे आहे, आरक्षण रस्त्यावर नाही तर न्यायालयात टिकवावे लागते, सरकार आणी मराठा संघटनांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी "मराठा समाजास" आणखी धोक्यात न ठेवता, त्यांना सत्य सांगावे.

भारतीय संविधानात आरक्षणाविषयी जे आवश्यक असलेले निकष, सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निकाल तसेच केंद्रीय मागासवर्गीय आयोग, राज्य मागासवर्गीय आयोग, (बापट आयोग), मंडल आयोग या सर्व आयोगांची पायमल्ली करुन घाईघाईत निवडणुकांना लक्ष्य ठेवुन राणे समितिने अहवाल सादर केला, सरकारनेही त्यावर पुर्नविचार न करता मराठा आरक्षणाचा अध्यादेश लागु केला परंतु हा अध्यादेश काढण्यापुर्वी राणेसमितीने सादर केलेल्या अहवालाची वैधता तपासने गरजेचे होते, न्यायालयात अध्यादेश टिकणारा नव्हता व आजही नाही, परंतु सत्तेसाठी हपालेल्या सरकारने घाईघाईत आरक्षण तर लागु केले, पंरतु ते वैध ठरण्यासाठी कोणतीही तरतुद, उपाययोजना केली नाही, परिणामी आरक्षणास आज स्थगिती मिळाली, उद्या प्रकरण निकाली काढताना अध्यादेशाव्दारे तडकाफडकी लागु केलेले मराठा आरक्षण "अवैध" ठरविले गेले तर नवल करु नये.

लेखक - अँड. राज जाधव...!

(संदर्भ - सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांचे विविध न्यायनिवाडे, वर्तमानपञातील मान्यवरांचे लेख, सरकारी अध्यादेश)