My Followers

Thursday 29 January 2015

रेषांचा जादुगार....आर.के.लक्ष्मण.....!

         रेषांचा जादुगार....आर. के. लक्ष्मण..!  


इस्पितळातल्या खोलीतील
सारी यंत्रे एकाक्षणी झाली
नि:शब्द...आणि नि:रेघ.
तेव्हाही तो तिथे होताच...एकटा.
टाचा उंचावत अधूनमधून
खोलीत डोकावणारा.
छत्रीच्या वाकड्या दांडक्‍यावर
रेलून कसलीतरी वाट बघणारा.
बिटबिट्या डोळ्यांनी सतत
काहीतरी शोधणारा.
डोईला टक्‍कल, कानावर केस...
जाडभिंगी चष्मा, बावळा वेश
मळखाऊ सदऱ्यावर चौकड्यांचा कोट
धुवट धोतर, नि खपाटीला पोट
हातात छत्री नि पायात चपला...
ओळखले पटकन, मनात म्हटले,
...अरे, हा तर ‘कॉमन मॅन’ आपला!
किती ठिकाणी भेटायचा...
भर गर्दीत किंवा आरामखुर्चीत.
जिवंतांच्या कोल्हाळात.
प्रज्ञावंतांच्या कोंडाळ्यात.
पुढाऱ्यांच्या गोतावळ्यात.
भरगच्च न्यायालयात.
आळसावलेल्या पोलिसठाण्यात.
खमंग राजकीय बैठकांत...
जाहीर सभांमध्ये कोपऱ्यात
किंवा कधी कधी...
चक्‍क पार्लमेंटातही!
जाऊन बसलो शेजारी,
ठेवला खांद्यावर हात
थोपटल्यासारखे केले सांत्वनार्थ :
‘‘जन्मदात्याचं छत्र जाणं
आहे क्‍लेशदायक कबूल,
पण आपण सगळी सटवाईची लेकरे,
भाळावरची रेघ थांबेल -तिथे संपणारे.
पण तुलाच आता सावरायला हवं.
उरलेलं सारं आवरायला हवं.
नमस्कारासाठी उभं राहायला हवं.’’
खिशातून रुमाल काढत
त्याने नाक शिंकरले, म्हणाला,
‘‘बाप होता...गेला! आता काय?’’
धीराचे चार शब्द सांगून
म्हटले त्याला शेवटी :
‘‘वर्षानुवर्षं पाहातोय तुला,
तू असा जन्मादारभ्य म्हातारा!
तुलाही आता जपायला हवं!’’
नेहमीप्रमाणे तो बसला गप्प
मग हातातल्या छत्रीची
चाळवाचाळव करीत म्हणाला :
आता उरलो मीच...
आणि नुसता नाही उरणार,
...पुरुन उरीन!’’
गुढघे चोळत अस्वस्थपणे बसला उठून,
म्हणाला, रुमालाची घडी कॉलरीत टाकून
‘‘चला, इथलं सगळं संपलंय...निघतो!’’
थोडेसे रागावून म्हणालो त्याला :
‘‘इतकं काय अडलंय? जन्मदाता गेला,
आणि तू बाहेर जातोस?’’
त्यावर हसत म्हणाला कॉमन मॅन :
‘‘अरे, बाबा रे, तुझं जगणं म्हंजे
भाळावरची रेघ, पण माझं?
माझं आख्खं अस्तित्वच रेघेचं!
जाऊ दे मला!’’
एवढे बोलून त्यानं जोड्यात
सरकवले पाय, छत्री घेतली, निघाला...
त्याच्या पाठमोऱ्या अस्तित्वाकडे
पाहून का कुणास ठाऊक,
भडभडून आले...
डोळे पुसून म्हणालो हसत-
‘‘हे कॉमन मॅन!,
गड्या, तुला मरण नाही!’’
पाठमोरा कॉमन मॅन थबकला, वळला, छत्री रोखत मिस्किलपणे म्हणाला, ‘‘यू सेड इट!’’

(दै.सकाळमधील आर.के.लक्ष्मण यांना ब्रिटीश नंदी यांनी वाहिलेली श्रध्दांजली)
संपादन - अॅड.राज जाधव.....! 

Friday 23 January 2015

"पँथर"

"पँथर"

रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याना हाकारत अंधारयात्रिक होण्याचं ठामपणे नाकारणारा बंडखोर कवी, म्हणजे नामदेव ढसाळ......ढसाळ म्हणजे जातीयवादाचे लचके तोडण्यासाठी सर्वशक्तीनिशी झेपावलेला..."पँथर"…अश्या या पँथरला चित्रात चितारण्याचा, "मी"... केलेला हा छोटासा प्रयत्न....!


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बोट धरून व्यवस्थेचा डोंगर हलवायला निघालेल्या आणि सूर्याचे सात घोडे मारायला निघालेल्या मराठी साहित्यातील एका महाविद्रोहाचे, एका महाप्रलयाचे आणि झालेच तर वर्गव्यवस्थेला दात लावायला निघालेल्या एका पॅंथरचे नाव म्हणजे नामदेव ढसाळ...!

चित्रकार - अॅड. राज जाधव

Thursday 22 January 2015

- चित्रबद्ध आशा -

- चित्रबद्ध आशा -

सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असं कुठलंच गाणं नाही; तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही,  त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही. असा अद्वितीय आवाज म्हणजेच अर्थात आशाताई भोसलेंचा आवाज. महाराष्ट्राला लाभलेलं हे सुरांचं देणं. जुन्यांसाठी तितकंच जुनं, मुरलेलं आणि नव्यांसाठीही तितकंच नवं, ताजं...

"त्याच आवाजाला "चित्रबद्ध" करण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न" 


चित्रकार - अॅड. राज जाधव

Wednesday 21 January 2015

बाबासाहेबांचा इशारा मानला असता तर...

बाबासाहेबांचा इशारा मानला असता तर...

ब्रिटिश राजवटीने या देशाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच प्रशासकीय क्षेत्रात जे योगदान दिले, त्या सर्वांचाच घटनानिर्मितीत वाटा आहे. इथल्या संघराज्य रचनेचा आराखडा 1935 च्या कायद्यात व्यक्त झालेला प्रथम दिसला असला तरी त्याची वाटचाल 1861 सालापासूनच सुरू झालेली होती. कुणाला आवडो न आवडो; परंतु आपल्याकडील संसदीय पद्धती इंग्रजी राजवटीची अपरिहार्य फलश्रुती होती. स्वातंत्र्यलढ्याच्या रेट्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातच संसदीय संस्थांचे कामकाज देशात सुरू होऊन विस्तारत गेले. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, नियतकालीन निवडणुका, प्रातिनिधिक विधिमंडळ, या मंडळांचे विधिमंडळाप्रती असलेले उत्तरदायित्व, सर्वांगीण चर्चेतून निर्णय घेण्याची रीत, व्यक्तीच्या हक्कांना संरक्षण, स्वतंत्र न्यायव्यवस्था याची कल्पना आपल्या प्राचीन परंपरेला इतकी स्पष्ट नव्हती. 

आपल्या देशात जगातले प्रमुख चार धर्म, शेकडो-हजारो जाती, त्यांची भाषा, संस्कृती, रीतिरिवाज, परंपरा यांचे सामाजिक पर्यावरण संमिश्र होते. अशा विराट आणि संमिश्र समाजासाठी-देशासाठी संविधान घटना निर्माण करणे तसे महद्‌प्रयासाचेच काम होते. अपार कष्ट घेऊन आपल्या शासन संस्थेची संकल्पना, रूपरेषा प्रत्यक्ष व्यवहारात आली. ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य आंदोलनाच्या क्रमानेच घटनेची उद्दिष्टे साकार झाली होती. आंदोलकांच्याच हाती संविधाननिर्मितीचे अधिकार आल्यामुळे त्यांना आपली उद्दिष्टे प्रत्यक्ष आणण्यासाठी संधी मिळाली. किमान या अर्थाने एकवाक्‍यता असल्यामुळे, मूलभूत बाबीविषयी मतभिन्नता असूनही तीन वर्षांत घटना परिषद "घटना संविधान' निर्माण करू शकली. संविधान परिषदेवर पहिल्यांदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त बंगालमधून निवडून गेले होते. फाळणीमुळे हा भाग पाकिस्तानात गेला आणि बाबासाहेबांचे सदस्यत्व रद्द झाले. घटना समितीतील पहिल्या सत्रातील बाबासाहेबांची कामगिरी संविधान परिषदेच्या मातब्बर सदस्यांनी पाहिली होती आणि ते प्रभावितही झाले होते. म्हणूनच घटना समितीचे अध्यक्ष- स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी, मुंबई प्रांताचे प्रधानमंत्री बी. जे. खेर यांना 30 जून 1947 रोजी पत्र लिहून कळविले, की कुठल्याही परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई प्रांताच्या विधिमंडळातून निवडून घटना समितीवर पाठवावे.

घटना समितीचे दुसरे अधिवेशन 14 ऑगस्ट 1947 रोजी सुरू होऊन 25 फेब्रुवारी 1948 पर्यंत चालले. उपस्थित सदस्यांत एम. आर. जयकर, तेजबहादूर सप्रू, अल्लादी कृष्णास्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, बी. एल. मित्तल, डी. पी. खेतान इत्यादी मंडळी होती. या समितीच्या पहिल्याच बैठकीत सर्वानुमते घटनेच्या लेखनमसुद्याचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांची निवड करण्यात आली. तेव्हापासून ते देशाला घटना प्रदान करण्याच्या क्षणापर्यंत घटना समितीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक, तसेच कायदेविषयक व वैयक्तिक योगदान एवढे होते, की घटना निर्माण करण्यात ते अग्रभागी राहिले. 

लोकशाहीची पायाभूत चौकट
घटना समितीच्या दुसऱ्या अधिवेशनापासून 26 जानेवारी 1950 रोजी घटनेचा अंमल सुरू होईपर्यंतची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कामगिरी एवढी जगङ्‌व्याळ होती, की ती वर्णन करायला शब्दही अपुरे पडावेत! घटना समितीतले वाद-प्रतिवाद, त्यातून आकार घेणारी घटना या सर्वाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा परीसस्पर्श झाला आहे. त्यामुळेच घटनेच्या शिल्पकारांत इतरांपेक्षा त्यांना अधिक मान राहिला. या मानाने आणि आदरानेच आज त्यांना घटनेचे एकमेव शिल्पकार असल्याचे म्हटले जाते. देशातील दलित-कष्टकरी जनतेने शिल्पकार म्हणून त्यांना पद बहाल केलेले मिथक समस्त भारतीय जनतेला अभिमान वाटावा असेच आहे. घटनेच्या निर्मितीचे श्रेय इतरांहून अधिक दिले गेल्यानंतरही डॉ. बाबासाहेबांनी कधीही घटनेचा कोणताही भाग बिनचूक, परिपूर्ण म्हणून अपरिवर्तनीय असल्याचा दावा केला नव्हता. त्यांनी घटनेप्रती दूरदष्टीचा विचार केला होता आणि म्हणूनच घटनेच्या 368 च्या अनुच्छेदाप्रमाणे घटनादुरुस्ती करण्याचे अधिकार संसदेला आहेत. बाबासाहेबांच्या हयातीतच काही घटनादुरुस्त्या झाल्या. संसदेला सांविधानिक सत्ता मिळाली आणि तिचा वापरही केला आहे. 123/2 अनुच्छेदाचा संदर्भ संसदेच्या वैधानिक सत्तेपुरताच मर्यादित असतो. संसदेला निरंकुश सांविधानिक सत्ता मिळाली, तर नवे प्रश्‍न आणि अडचणी निर्माण होतील आणि घटनेचा डोलाराच कोसळून जाईल, असे त्यांचे म्हणणे होते. आपली संसद ब्रिटनप्रमाणे अमर्याद सार्वभौम असून चालणार नाही. तिथे खोल रुजलेले स्वातंत्र्याचे संस्कार आहेत. आपल्याकडे ब्रिटनप्रमाणे सुशिक्षित, राजकीय शिक्षण झालेले जागृत लोकमत नाही. त्यातच अस्थिर स्वरूपाची बहुपक्ष पद्धती आहे. आपल्या संसदेला फक्त वैधानिक सत्ता आहे. सांविधानिक सत्ता दिलेलीच नाही. सांविधानिक सत्ता फक्त संविधान परिषदेलाच होती. संविधाननिर्मितीचे कार्य संपल्यानंतर तिचे अस्तित्वकार्य संपुष्टात आले. संसद ही घटनेची निर्मिती असल्यामुळे घटनेपेक्षा ती श्रेष्ठ होऊ शकत नाही. सर्वसाधारण पद्धतीने ती संविधानाचे इतर अनुच्छेद बदलत असली तरी मूलभूत हक्क बदलण्यास ती असमर्थ आहे, असे सांगणारा दुसरा पक्ष आहे. आपल्या देशात अनेक प्रकारचे अल्पसंख्याक आहेत. त्यांना आपल्या अधिकारांसाठी बहुमतवाल्या पक्षाच्या मर्जीवर अवलंबून राहावे लागते. त्यांनाही हमी मिळण्यासाठी न्यायालयाकडे धाव घ्यावी लागते. संसदेने केलेल्या 24 ते 25 व्या घटनादुरुस्तीला सर्वोच्च न्यायालयासमोर आव्हान देण्यात आले होते. मूलभूत अधिकारांविषयीचा हा 1973 चा खटला फार गाजला होता. सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत अधिकारांविषयीच्या या खटल्यात संसदेच्या बाजूने निर्णय दिला होता. परंतु संसदेचा हक्क मान्य करून या फेरफारामुळे घटनेच्या मूलभूत संरचनेत फरक पडू नये अशी अट घातली होती. स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता ही तत्त्वे लोकशाहीची पायाभूत चौकट मानून, त्यांच्याशी संबंधित मूलभूत अधिकारांमध्ये त्याचा गाभा न मोडता फेरबदल करण्याचा अधिकार संसदेला मिळाला. या सर्व गोष्टींची माहिती घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर श्रद्धा ठेवणाऱ्या दलित, शोषित समाजाला आज असणे आवश्‍यक झाले आहे. बऱ्याचशा लोकांचा हा समज आहे, की घटना ही अपरिवर्तनीयच आहे. ती बदलताच येऊ शकत नाही. घटना, संसद यांच्या अधिकारांविषयी ज्यांना पारदर्शक माहिती नाही अथवा ज्ञान नाही, त्यांनी घटना समितीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे, वाद-प्रतिवादात त्यांनी केलेली वक्तव्ये आवर्जून वाचायला हवीत.

घटनेच्या प्रास्ताविकेत समाजवादी हे राज्यव्यवस्थेचे विशेषण मुळीच नव्हते. बेचाळिसावी घटनादुरुस्ती संसदेने केल्यामुळे ते प्रास्ताविकतेत अनुस्युत करण्यात आले. याच घटनादुरुस्तीत धर्मनिरपेक्ष हेही विशेषण जोडण्यात आले. तत्पूर्वी ही संकल्पना मूलभूत हक्कांच्या प्रकरणातून संदिग्ध रूपात व्यक्त झालेली होती. 1978 मध्ये चव्वेचाळिसावी घटनादुरुस्ती करून संपत्तीचा अधिकार देणारा घटनेतील 31 वा अनुच्छेद संविधानातून वगळला. खुद्द नेहरूंना समाजवादी संकल्पनेप्रमाणे भारताची घटना निर्माण व्हावी असे वाटत होते; परंतु ते संसदेतील कॉंग्रेसी "आहे रे' वर्गाच्या सदस्यांमुळे शक्‍य झाले नाही. घटनेच्या निर्मितीतच काही अभाव राहिले, हे नेहरूंनी आणि बाबासाहेबांनीही मान्य केले होते. घटनेचे पुनरावलोकन आज आवश्‍यक होऊन बसले आहे. घटनेविषयी आंधळी श्रद्धा ठेवली, तर घटनेत लोकहिताच्या दृष्टीने काहीच परिवर्तन होऊ शकणार नाही. घटना देशाला प्रदान करताना डॉ. आंबेडकर यांनी संसदेत जे वक्तव्य केले, त्याचा विसर त्यांच्या अनुयायांसह सगळ्यांनाच पडलेला दिसतो. "ही घटना माझ्या पिढीची अभिव्यक्ती आहे. कालानुरूप तीत येणाऱ्या पिढीला तिच्यातले अभाव दूर करता येतील आणि घटना अधिक समाजहितदर्शी करता येईल, असे सांगणारे बाबासाहेब. त्यांच्या वक्तव्याचा मात्र आम्हाला विसर पडतो. 

जवळजवळ साठ वर्षे होऊन गेली घटनेचा अंमल सुरू होऊन. आपली संसदीय लोकशाही घटनेची निर्मिती आहे. थोडक्‍यात साठ वर्षे इथे संसदीय लोकशाहीचा अंमल चालत आला; परंतु राज्यकर्त्या वर्गाने ही संसदीय लोकशाही यशस्वी होण्याच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला इशारा मानला नाही. "जोपर्यंत एका बाजूला पीडित- शोषितांचा सत्तावंचित वर्ग आहे; दुसऱ्या बाजूला सर्व सत्तांचे केंद्रीकरण ज्यांच्या हातात आहे, तोपर्यंत समाजाची विभागणी होत राहणार. पीडित-शोषित समाजावर अन्याय होत राहणार, त्याचे शोषण होत राहणार- अशा ठिकाणी लोकशाही मूळ धरू शकणार नाही.' हेच घडत आले ना आपल्या देशात? जर बाबासाहेबांचा इशारा मानला असता तर संसदीय लोकशाही येथे निर्माण करण्यामागचे स्वप्न साकार झाले असते. समाजाचे सर्व ऐहिक प्रश्‍न सोडवून सुखी, समृद्ध आणि प्रगत जीवन येथे साकारणे आणि हे उद्दिष्ट साकार करण्यासाठी शासन संस्थेत रक्तपाताविरहित मार्गाने परिवर्तन घडवून आणणे, हा लोकशाहीचा बाबासाहेबांनी सांगितलेला अर्थ प्रत्यक्षात आलेला दिसला असता. हिंसा आणि सर्वंकष वर्चस्व यातून परिवर्तन घडेल, असे त्यांना वाटत नव्हते. संविधानाच्या मार्गाने सामाजिक लोकशाही प्रस्थापित होईल, आणि त्याच मार्गाने समाजातील वंचितता दूर होईल, असा त्यांना विश्‍वास वाटत होता. गेल्या सहा दशकांत राज्यकर्त्यांनी या दिशेने पावले टाकली नाहीत. बाबासाहेबांच्या विचारांचा गाभा लक्षात घेऊन आपण आतातरी वाटचाल करणार का, हा खरा प्रश्‍न आहे.

- नामदेव ढसाळ, (06/12/2010)....!

बाबासाहेबांचा राज्यसभा प्रवेश....!

बाबासाहेबांचा राज्यसभा प्रवेश....!

अलीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खरा इतिहास नव्याने खोटा लिहिण्याचा आणि सांगण्याचा खटाटोप मोठ्या अहमहमिकेने अनधिकारी नेते करीत आहेत. कुणी त्यांना 'फॉल्स गॉड' ठरवतो तर कुणी त्यांना निझामाकडून मदत घेतल्याचे सांगतो. यावर कळस असा की, त्यांना बंगालमधून डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी राज्यसभेत निवडून पाठविल्याचे ठोकून देतो. त्यांच्या पुतळ्यांची विटंबना करून त्यांचा अपमान केल्याने समाधान न झाल्यामुळे, ऐतिहासिक असल्याच्या माध्यमातून त्यांचा इतिहासही डागाळण्याचा अश्लाघ्य उपद्व्याप करण्यापर्यंत बिचाऱ्यांनी मजल मारली. वास्तविक पहाता ऐतिहासिक सत्य वेगळेच आहे. परंतु ते अज्ञातही नाही. 


बाबासाहेब आंबेडकरांचा घटना समितीवर जाण्याचा पक्का इरादा होता. परंतु प्रांतिक विधिमंडळाने घटना समितीवर जाणाऱ्या प्रतिनिधींची निवड करावयाची होती. मुंबई विधिमंडळात डॉ. आंबेडकरांचे पक्षाचे सभासद नव्हते. दलित वर्गास मंत्रिमंडळ व विधिमंडळात पुरेसे प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी ते जीवापाड प्रयत्न करीत होते. हंगामी मं​त्रिमंडळात जोगेंद्रनाथ मंडल आणि जगजीवनराम हे दोन प्रतिनिधी दलित वर्गाचे होते. हंगामी मंत्रिमंडळातील विधिमंत्री जोगेंद्रनाथ मंडल यांनी मुंबईस भेट दिली. डॉ. आंबेडकरांनी लंडनमध्ये केलेल्या धडपडीबद्दल समाधान व्यक्त केले. आपल्या मंत्रिमंडळातील प्रवेशाला डॉ. आंबेडकरांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे पत्रकारांना सांगितले आणि बॅ. मंडल यांनी डॉ. आंबेडकरांनी बंगाल विधिमंडळातील दलित वर्गाच्या प्रतिनिधींच्या समर्थनावर घटना समितीसाठी डॉ. आंबेडकरांना नामांकन भरावयाचे सुचविले. परिणामी महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल war instrumental in getting Dr. Ambedkar elected to constituent assembly of undevided India 1946 from bengal securing political rights and representation in the demoeratie governance of India for the backword classes. ह्या निवडणुकीचा प्रसंग मोठा रोमहर्षक आहे. कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार संविधाननिर्माणी सभेच्या सदस्य निवडीसाठी प्रक्रिया सुरू झाली. बाबासाहेबांनी बंगाल विधान परिषदेतून आपले नामांकनपत्र भरले. बंगाल विधानपरिषदेच्या एकूण साठ (२७ जनरल हिंदू आणि ३३ मुस्लीम) प्रतिनिधींची निवड करायची होती. कॅबिनेट मिशनने अनुसूचित जातींना हिंदूंबरोबर जोडले होते. १७ जुलै १९४६ ला बंगाल विधान परिषद संविधान सभेसाठी आपले प्रतिनिधी निवडणार होती. डॉ. आंबेडकर खूप आधी कलकत्याला पोहोचले होते. तेथे हजारोंच्या संख्येत पंजाब प्रांतातील दलित चर्मोद्योग करीत होते. ते बंगाली दलितांबरोबर खांद्याला खांदा लावून संघर्षात सहभागी झाले होते. दलितांच्या या संयुक्त मोर्च्याने डॉ. आंबेडकरांना संविधान सभेत निवडून पाठविण्याची प्रतीक्षा केली होती. ते विधायकांच्या घरांपुढे निदर्शने करून बाबासाहेबांना मत देण्याचे वचन घेत असत. राजकीय जीवन आणि मृत्यूचा हा संघर्ष मतदानाच्या दिवसापर्यंत चालू होता. बाबासाहेबांना बंगाल विधान परिषदेतील अँग्लो इंडियन सदस्यांच्या समर्थनाची अपेक्षा होती. परंतु त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यामुळे त्यांच्या समर्थनापासून बाबांना वंचित राहावे लागले.

निवडणुकीच्या दिवशी हजारो दलित बंगाल विधान भवनाच्या परिसरात पोहोचले. पोलिसांचा वेढा तोडून लाठी व गोळीची पर्वा न करता भवनाच्या अंगणात घुसले. दलितांच्या नग्न तलवारी विधानभवनाच्या अंगणात चमकत होत्या. तेथे बाबासाहेब आंबेडकर जिंदाबादचे नारे आकाशात घुमत होते. या निदर्शकात जालंधर जिल्ह्यातील ढिलवा गावचा रहिवासी बुद्धसिंह नावाचा एक दलित तरूण गर्दीतून वेगाने पुढे आला आणि आपले कृपाण (तलवार) आकाशात घुमवीत गर्जना करू लागला, "मी प्रतीक्षा (प्रण) करतो की, जर 'डाकदार उम्मेदगार' (पंजाबी उच्चारण डॉ. आंबेडकरांसाठी) यांना निवडणुकीत पराभूत केले गेले तर ही माझी तलवार त्या गद्दारांच्या रक्ताने लथपथ होऊन जाईल आणि मी आपल्या प्राणाची आहुती दिल्याशिवाय राहणार नाही." बुद्धसिंहाच्या बरोबरच इतर अन्य दलितांनी अशीच प्रतीज्ञा केली. 

दलितांच्या या मोर्चाबंदीचा उल्लेख कलकत्याहून प्रकाशित होणाऱ्या दैनिकात करण्यात आला. दैनिक 'स्टेटस् मॅन'मध्ये उपरोक्त ऐतिहासिक प्रसंगाचा वृत्तांत फोटोसहित १८ जुलै १९४६ च्या अंकात अशाप्रकारे प्रसिद्ध करण्यात आला, "ज्यावेळी मतदान चालू होते त्यावेळी ऑल इंडिया शेड्युल्ड कास्टस् फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी परिषदेच्या आवारात प्रवेश करून डॉ. भीमराव आंबेडकरांच्या जयजयकाराचे नारे लावून निदर्शने केले. या संपूर्ण निवडणूक अभियानात जोगेंद्रनाथ मंडल यांनी दलित निदर्शकांचे नेतृत्व केले. कारण त्यांच्याच विनंतीवरून बाबासाहेबांनी बंगाल विधान परिषदेतून निवडणूक लढण्याची स्वीकृती दिली होती. २० जुलै १९४६ ला निवडणुकीच्या निकालाची घोषणा झाली. बाबासाहेब आंबेडकर नुसते विजयीच झाले नाही तर काँग्रेसी नेते शरदचंद्र बोस यांच्यापेक्षाही सर्वात जास्त मतांनी ते निवडून आले. सहा काँग्रेसी आमदारांनी आपल्या पक्षाच्या सचेतकाची पर्वा न करता बाबासाहेबांना मतदान केले. बाबासाहेबांच्या विजयामुळे देशातील दलितांमध्ये आनंदाची लहर पसरली. कलकत्यात प्रचंड जुलूस निघाला." लोकांनी भांगडा नाच केला. ढोलताशे वाजविले, फटाके उडविले. बाबासाहेबांच्या या नेत्रदीपक विजयामुळे संविधान सभेत दलितांचे प्रतिनिधित्व करणारा अत्यंत योग्य समर्थ, निर्भय आणि चरित्रवान महामानव पोहोचल्याने सर्वांना आनंद आणि गर्व वाटू लागला. 

सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते, "मी संविधान सभेचे दरवाजे आणि खिडक्याच नव्हे तर तावदानदेखील बंद केली आहेत, पाहतो तेथे डॉ. आंबेडकर कसा प्रवेश करतात ते, बाबासाहेबांच्या या विजयाने लोहपुरुषांची ही भीष्म प्रतिज्ञा पराभूत झाली आणि जेव्हा बाबासाहेबांना ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्षपद प्रदान करण्यात आले तेव्हा एका काँग्रेसी नेत्याने सरदार पटेलांजवळ नाराजी व्यक्त करीत म्हटले, 'तुम्ही गांधीविरोधी आणि काँग्रेसविरोधी डॉ. आंबेडकरांना घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद कसे काय प्रदान केले ?" तेव्हा सरदार पटेल म्हणाले, "तुम्हाला संविधानाचे काय कळते ? आम्हाला डॉ. आंबेडकरांशिवाय या कामासाठी अधिक योग्यतेचा कोणीच मिळाला नाही. म्हणून आम्हाला त्यांना अध्यक्षपद देण्याशिवाय गत्यंतरच नव्हते." ३ ऑगस्ट १९४७ ला मंत्रिमंडळाची घोषणा झाली. त्यात बाबासाहेबांचे नाव होते. बाबासाहेबांनी १५ ऑगस्ट १९४७ ला नवीन मंत्रिमंडळाबरोबर कायदेमंत्री म्हणून शपथ घेतली. ३० ऑगस्ट १९४७ ला बाबासाहेबांना घटनेच्या मसुदा समिती (ड्राफ्टिंग कमिटी) चे अध्यक्ष पदावर निवडण्यात आले. 


येथपर्यंत डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांचा बाबासाहेबांशी दुरान्वयाने ही संबंध आला नाही. मग त्यांनी बाबासाहेबांना बंगालमधून निवडून पाठविल्याची कथा ही दंतकथाच वा फोकनाडच नव्हे काय ? 

ब्रिटिश लोकसभेने भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव १५ जुलै १९४७ रोजी स्वीकृत केला. आता घटना समिती सार्वभौम झाली. आरंभी ती अखंड भारताची होती. आता ती खंडित भारताची झाली. बंगालच्या फाळणीमुळे घटना समितीवरील काही सभासदांच्या जागा कमी झाल्या त्यात बाबासाहेबांचा समावेश होता. परंतु डॉ. जयकरांच्या राजीनाम्यामुळे रिकाम्या झालेल्या जागी मुंबई विधिमंडळातील काँग्रेस पक्षाने डॉ. आंबेडकरांची घटना समितीवर निवड केली. कारण बाबासाहेबांनी घटना समितीत केलेल्या कार्य आणि वक्तृत्वाने त्यांची योग्यता काँग्रेसला कळली होती. संविधाननिर्मिताच्या कार्यात डॉ. आंबेडकरांची योग्यता त्यांना अपरिहार्य व अटळ वाटली. या कामी डॉ. आंबेडकरांशिवाय दुसरा पर्यायच नाही याची खात्री त्यांना पटली होती. यासंबंधीचे वास्तव 

चां. भ. खैरमोडे लिखित ८ व्या खंडातील...

पृ. क्र. १९८ ते २०० वरील उतारे अणि दुर्गावास यांनी संपादित केलेल्या सरदार वल्लभभाई पटेल पत्रव्यवहाराच्या ५ व्या खंडातील घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना ३० जून १९४७ ला लिहिलेले पत्र, त्याचा पुरावा म्हणता येईल - ते पत्र असे. "Apart from any other consideration, we have found Dr. Ambedkar's work both in the Constituent Assembly and in the varrious committees, to which he was appointed to such an order As to require that we Should not be deprived of his services. as you know, he was elected from Bengal and after the diversion of the provinee he has ceased to be a Member of the Constituent Assembly. I am ancious that he should attend the next session of the constituent Assembly from 14th July and it is thearefore necessary that he should be elected immediately." 

यातून बाबासाहेब घटना समितीच्या कार्यासाठी कसे 'इन्डिस्पेशिबल' होते ते स्पष्ट होते. याच मुद्दयावर सरदार पटेलांनी मावळकरांना लिहिलेले पत्रही उल्लेखनीय आहे. 

Dr. Ambedkar's election require earlier action and as there is only one vacancy at present, we have arked him to send his form today. He has not been elected from Bengal and all people here felt that his attitude has changed and he has been a useful member in the committee. परत सरदार पटेलांनी मावळणकरांना पाठविलेले दि. ०३/०७/१९४७ चे पत्र, स. का. पाटील यांना वल्लभभाई पटेलांनी पाठविलेले ३/७/१९४७ चे पत्र. 

Dr. Ambedkar's nomination has been sent to P.M. I hope, there would be no contest and he would be returned unopposed, so that he could come here on 14th. याशिवाय स. पटेलांनी सी. पी. रामस्वामी यांना ६/५/४८ ला पाठविलेले पत्र पहा, 

"Dr. Ambedkar assure you, we shall try to keep with us, as long as possible. He may say things in order to depend his position. But I fully realise that he is, and can be use to this country." 

यावरून बाबासाहेब राष्ट्रसेवेसाठी काँग्रेसला कसे अत्यावश्यक ठरले होते ते स्पष्ट होते. इथे कुठेही शामाप्रसाद मुखर्जींचे नामोनिशान नाही. काँग्रेस श्रेष्ठींच्यामध्ये डॉ. आंबेडकरांच्या नियुक्तीविषयी दूरध्वनीवर बोलणी झाली. त्या बोलणीत प्राथमिक निर्णय घेण्यात आल्यावर पं. नेहरूंनी आपल्या सचिवालयात डॉ. आंबेडकरांना पाचारण करून 'स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री पद स्वीकारण्यास आपण आपली संमती द्याल काय ?' अशी विचारणा केली. नेहरूंनी त्यांना नियोजन आणि विकास खाते देण्याचेही आश्वासन दिले. बाबासाहेबांनी आपली संमती दर्शविली. पं. नेहरूंनी नियोजित मंत्र्यांची यादी घेऊन दिल्लीत भंगी कॉलनीमध्ये गांधीजींची भेट घेतली. गांधीजींनी त्यांना मान्यता दिली. काँग्रेस नेत्यांनी डॉ. आंबेडकरांशी जुळते-मिळते घेण्याची इच्छा प्रकट केली. ते डॉ. आंबेडकरांच्या योग्यतेचे व गुणांची कदर करण्याच्या मनःस्थितीत होते. आता स्वातंत्र्याच्या स्थैर्यासाठी व वृद्धीसाठी डॉ. आंबेडकरांच्या भीमशक्तीचा सदुपयोग करण्याचा त्यांचा निर्धार होता. आतापर्यंत त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्षच केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरदेखील स्वतः काँग्रेसबद्दलचे कटू अनुभव विसरून राष्ट्रकार्यात सहभागी झाले. काँग्रेसचा नव्हे तर देशाने पुढे केलेला मैत्रीचा हात त्यांनी स्वीकारला. याच मंत्रिमंडळात प. नेहरूंनी हिंदू महासभेचे नेते डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनाही काँग्रेस नेत्यांच्या संमतीने सामील करून घेतले. पहिल्यांदा बाबासाहेबांचा बाइज्जत मंत्रिमंडळात समावेश झाला आणि नंतर डॉ. शामाप्रसाद मुखर्जींचा अंतर्भाव झाला. हिंदू महासभेच्या डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांना खुद्द काँग्रेस नेत्यांनी मंत्रिमंडळात घेतले हे अंडरलाईन करण्यासारखे वास्तव आहे. 


घटना समितीची बैठक ९ डिसेंबरला भरली. 

डॉ. राजेंद्रप्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षस्थानी निवड झाली. पं. नेहरूंनी घटना समितीचे उद्देश व ध्येय साध्य करणारा ठराव १३ डिसेंबरला प्रभावी भाषणातून मांडला. त्यांनी भारत स्वतंत्र आणि सार्वभौम प्रजासत्ताक झाल्याची घोषणा केली. राजर्षी टंडन यांनी नेहरूंच्या ठरावास पाठिंबा दिला. मुस्लीम लीग नेत्यांनी घटना समितीवर बहिष्कार टाकला होता. थोर वि​धिज्ञ डॉ. जयकरांनी नेहरूंच्या ठरावाला दुरुस्ती सुचवली. 'मुस्लीम लीग व हिंदी संस्थानिकांचे प्रतिनिधी घटना समितीत येईपर्यंत हा ठराव संमत करू नये' अशी त्यांनी सूचना मांडली. सरदार पटेलांनी डॉ. जयकरांच्या सूचनेवर कडाडून हल्ला केला. एम. आर. मसानी व फ्रँक अँटानी यांनी ठरावाला पाठिंबा दिला. हिंदू महासभेचे डॉ. शामाप्रसाद मुखर्जी म्हणाले की, ठराव पुढे ढकलण्यात काही अर्थ नाही. 

तसे केल्याने लीगला बाहेर राहून प्रगतीला अडथळा करण्यास उत्तेजन दिल्यासारखे होईल. इतक्यात घटना समितीच्या अध्यक्षांनी अचानकपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव बोलण्यासाठी पुकारले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर धीरगंभीर आवाजात म्हणाले, "आज आपण राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुभंगले आहोत याची मला जाणीव आहे. आपण विरोधी छावण्या करून आहोत आणि मी स्वतः ही कदाचित युद्धाची छावणी उभारलेल्या एका जमातीचा नेता आहे." असे असले तरी माझी पूर्ण खात्री आहे की, परिस्थिती आणि समय काळ येताच आपण एक झाल्याशिवाय राहणार नाही. जरी जाती नी पंथ अनेक असले तरी आपण एक राष्ट्र होऊ याविषयी माझ्या मनात शंका नाही. मुस्लीम जरी भारताच्या फाळणीसाठी चळवळ करीत आहेत, तरी एकदा त्यांच्या मनावर परिणाम होऊन अखंड भारत सर्वांसाठी जास्त हितकर असल्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. सत्ता ही गोष्ट वेगळी आणि शहाणपणा नी दूरदर्शीता ही गोष्ट वेगळी. बर्फने म्हटल्याप्रमाणे 'सत्ता देणे एकवेळ सोपे आहे परंतु शहाणपण देणे कठीण आहे.' राष्ट्राचे भवितव्य ठरवतांना व्यक्ती किंवा राजकीय पक्ष यांच्या प्रतिष्ठेला महत्व देण्यात येऊ नये. "देशातील सर्व लोकांना एकत्र नेण्याची आणि शेवटी एकी होईल असे मार्ग स्वीकारण्याची आपल्या अंगी ताकद आणि शहाणपणा आहे हे आपल्या वर्तनाने प्रत्ययास आणू या." बाबासाहेबांच्या भाषणाने घटना समिती मंत्रमुग्ध झाली. बाबासाहेबांच्या वक्तृत्वामुळे सभासदांच्या मनात सहकार्याची भावना निर्माण झाली आणि जे हात त्यांना मारण्यासाठी उगारले गेले होते, तेच हात टाळ्यांचा कडकडाट करून डॉ. आंबेडकरांचे अभिनंदन करू लागले. डॉ. आंबेडकर आता घटना समितीचे सल्लागार बनले. त्यांचा उपहास करणारे त्यांचे मित्र बनले. नेहरू ठरावावरील चर्चा पुढे ढकलण्यात आली. शेवटी २० जानेवारी १९४७ ला तो ठराव संमत करण्यात आला. 

राज्यघटनेबद्दल बोलतांना डॉ. आंबेडकर म्हणालेत, 'राज्यघटना कितीही चांगली किंवा वाईट असली तरी शेवटी ती चांगली वाईट ठरणे हे जे राज्यकर्ते तिचा वापर कसा करतील यावरच अवलंबून आहे.' हिंदूच्या जातीभेद आणि पंथभेद या जुन्या शत्रूंमध्ये परस्परविरोधी असलेल्या नवीन पक्षांची भर पडली आहे. या जाणिवेमुळे माझी चिंता दुणावली आहे. जर पक्षांनी आपले पक्षमत राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ मानले तर भारताचे स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि कदाचित कायमचे नष्ट होईल. म्हणून शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत स्वातंत्र्यासाठी लढण्याचा निर्धार केला पाहिजे. हे वचन ऐकून सभागृहाने बाबासाहेबांचा जयजयकार केला. लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण सामाजिक व आर्थिक हेतू साध्य करताना घटनात्मक साधनांचा मार्ग अवलंबिला पाहिजे. असहकार, कायदेभंग, आणि सत्याग्रहाचे मार्ग वर्ज्य केले पाहिजेत. 


हे घटनाबाह्य मार्ग म्हणजे केवळ अराजकतेची बाराखडी होय. लोकशाहीला दुसरा धोका विभूतीपूजेचा आहे. जॉन स्टुअर्ट मिल लोकशाहीच्या संरक्षकास इशारा देताना म्हणतो, "एखादा माणूस कितीही थोर महान असला तरी त्याच्या चरणावर आपले स्वातंत्र्य अर्पण करू नये. ज्या थोर लोकांनी आयुष्यभर राष्ट्रसेवा केली, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगावी परंतु कृतज्ञेस मर्यादा असावी. आयरिश देशभक्त आकोनेल म्हणतो," आपल्या अब्रुचा बळी देऊन कोणतीही स्त्री कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. स्वाभिमानाचा बळी देऊन कोणीही मनुष्य कृतज्ञ राहू शकत नाही आणि स्वातंत्र्याचा बळी देऊन कोणतेही राष्ट्र कृतज्ञ राहू शकत नाही. केवळ राजकीय लोकशाहीत समाधान मानू नये. राजकीय लोकशाहीला सामाजिक व आर्थिक लोकशाहीत परिवर्तीत केले पाहिजे. सामाजिक लोकशाही समता, स्वातंत्र्य व बंधुता या जीवनमूल्यांना ओळखते. सामाजिक समता नसेल तर मूठभर लोकांचे राज्य जनतेवर असल्यासारखे होईल. बाबासाहेबांचे ४० मिनिटांचे भाषण ऐकण्यात घटना समिती तल्लीन आणि मंत्रमुग्ध झाली होती. भगवान बुद्धानंतर भिक्षूसंघाने विनयपिटकाचे संगायन महास्थवीर उपालींनी केले होते. उपाली हे जन्माने न्हावी व कर्माने ज्ञानसूर्य होते. काहींनी बाबांची तुलना उपालीबरोबर केली. १० ऑगस्ट १९५१ ला बाबासाहेबांनी पं. नेहरूंना पत्र लिहिले की हिंदू कोड बिल १६ ऑगस्टला सादर करण्यात यावे जेणेकरून त्यावरील चर्चा सप्टेंबरपर्यंत समाप्त होईल. परंतु काँग्रेस पार्टीत मतभेद असल्यामुळे बिल १७ सप्टेंबरला सादर करण्याचे ठरले. 

संसदेच्या जवळपास पोलिस पहाऱ्यात बिलावर १७ सप्टेंबरला चर्चा सुरू झाली. हिंदू नेते डॉ. शामाप्रसाद मुखर्जी व पं. मालवीयांनी बिलाचा विरोध केला. पं. कुंझरू व एन. व्ही. गाडगिळांनी मात्र समर्थन केले. डॉ. आंबेडकरांनी म्हटले, "डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांचा आक्षेप अनाठायी आहे आणि त्यावर गंभीरपणे लक्ष देऊ नये. कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीस त्यांनी कोडबिलाचा विरोध केला नव्हता." सरदार पटेलांनी उघडउघड बिलाचा विरोध केला. डॉ. राजेंद्रप्रसादांनी राजीनाम्याची धमकी दिली. बिल अशाप्रकारे पास झाले नाही तेव्हा बाबासाहेब म्हणालेत, "हिंदू कोड बिलाचे चार वाक्यांश (clauses) पास केल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली आणि त्यावर दोन अश्रू न ढाळता त्याला दफन करण्यात आले." १९ सप्टेंबर १९५१ ला पं. नेहरूंनी रूढीवादी हिंदू नेत्यांपुढे गुडधे टेकले. काँग्रेस आणि मंत्रिमंडळाच्या वर्तनाने त्रस्त होऊन कायदेमंत्री बाबासाहेबांनी २८ सप्टेंबर १९५१ ला मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बाबासाहेब जवळपास दहा वर्षे लेबर मेंबर आणि कायदेमंत्री राहिल्यामुळे फेडरेशन संघ​टित करण्यास त्यांना सवड मिळाली नाही. जानेवारी १९५२ मध्ये संसद लोकसभा निवडणूक झाली. काँग्रेसने काजरोळकराला बाबासाहेबांच्या विरोधात उभे केले. बाबासाहेबांना १,२३,५७६ आणि काजरोळकराला १,३७,९५० मते मिळाली. कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी एस. एम. जोशी यांच्या मते पन्नास हजार मते कुजवून फाडून टाकली. परंतु ती बाबासाहेबांना मिळू दिली नाहीत. बाबासाहेब १४३७४ मतांनी पराजित झालेत. बाबा म्हणालेत, "माझ्या पराजयासाठी एस. ए. डांगे यांनी पूर्ण ताकद लावली. पराजयानंतर बाबासाहेब निराश झाले नाहीत. लोकसभेत जाण्याच्या प्रयत्नात राहिले १९५२ ला मुंबई प्रांताला मिळालेल्या राज्यसभेच्या १७ जागांपैकी एका जागेकरिता बाबासाहेबांनी नामांकन पत्र भरले. १५ जागांवर काँग्रेसचे उमेदवार होते. उरलेल्या दोनपैकी एका जागेवर बाबासाहेब विरोधी पक्षनेते म्हणून राज्यसभेवर निवडून आले. मुंबई प्रांताला अलॉट झालेल्या १७ जागांपैकी एका जागेवर निवडून आल्यामुळे बंगालमधून डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी बाबासाहेबांना राज्यसभेवर निवडून पाठवले हे विधान धडधडीत ऐतिहासिक झूट आहे. बंगालमधून नव्हे मुंबई प्रांत विधानमंडळातून बाबासाहेब राज्यसभेवर निवडून गेले हे ऐतिहासिक सत्य आहे. १९५२ च्या निवडणुकीत फेडरेशनचे पी. एक. राजभोज लोकसभेवर आणि बी. सी. कांबळे विधानसभेवर निवडून गेले होते. अशाप्रकारे बाबासाहेबांच्या राज्यसभेच्या विजयात बंगाल आणि डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांचा दुरान्वयानेही संबंध नाही हे सिद्ध होते." उलट बाबासाहेबांनीच डॉ. मुखर्जींना मदत केल्याचा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध आहे. महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर दिल्लीत भयंकर स्फोटक परिस्थिती होती. तेव्हा बाबासाहेबांनी डॉ. मुखर्जींना आपल्या घरी आश्रय दिला होता. संघप्रमुख गोळवलकर गुरूजींनी बाबांना मदत मागितली होती. 


"The atmosphere was tense after Gandhi's assassination. The congress workers were searching for the leaders of outfits who were responsible for Gandhi's death. Dr. Shyamaprasad Mukharji leader of Hindu Mahasabha, sought help from Babasaheb to save his life from the violent mob which doubted his role in the assassination of Mahatma Gandhi. Babasaheb asked him to visit his house and Mukharji stayed there till the allegation was cleared. A few days latter Golwalkar, the chief of RSS come to meet Babasaheb to seek his help in after math of Gandhi's assassination and the persecution of Brahmins of Maharashtra there in. Babasaheb told him not to sow the seeds of hatned and expressed his view that such like Golwalkar can not benefit the Society. The RSS was later banned by the Congress Government. Mr. Golawalkar again met Dr. Ambedkar and requuested him to help for lifting the ban on RSS. Babasaheb in turn advised him to convince Vallabhabhai Patel, the home minister, about the honesty of RSS" 


उपरोक्त पुराव्यावरून हे सत्य निःसंदिग्धपणे सिद्ध होते की डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी बाबासाहेबांना कवडीचीही मदत केली नाही. उलट डॉ. मुखर्जीच्या प्राणावर संकट आले असता बाबासाहेबांनीच त्यांना संरक्षण देऊन त्यांच्यावर उपकाराचा डोंगर रचून महानता दाखविली.

- प्रा. डॉ. भाऊ लोखंडे, संदर्भ - म.टा.

Friday 9 January 2015

तुम्ही देव मानता का हो?

तुम्ही "देव" मानता का हो?


"ताकाला जाऊन गाडगं लपविणे‘ अशी एक म्हण आपण ऐकत आलो आहोत. माझा संबंध खेड्याशी आला असल्याने अशा प्रकारच्या म्हणींचा साठाच मेंदूत झाला आहे. ताकाला जाऊन गाडगं (म्हणजे भांडे) लपविणे, याचा अर्थ जो विषय बोलायचा आहे, मांडायचा आहे, तो न बोलता भलताच विषय काढून टाइमपास करणे. ताक घ्यायला गेल्यावर उगाच भांडे मागे लपवत बसला तर ते किती काळ लपून राहील? 


काही म्हणी मानवी स्वभावाचे दर्शन घडविणाऱ्या प्रातिनिधिक म्हणी असतात. ताकाला जाण्याबाबतची ही म्हणसुद्धा मानवी स्वभागाचा उत्तम परिचय करून देणारी आहे. पोटातलं ओठात आणणारी... थेट बोलणारी माणसं फार कमी असतात. 90 टक्के व्यक्ती आपल्या भावना, विचार दाबणाऱ्याच दिसून येतात. लोक काय म्हणतील? या काळजीत. अशी माणसं मूळ विषयाला कधीच हात घालत नाहीत. "आता जातो नि एकदाचा सोक्षमोक्षच लावून टाकतो‘ अशा तोऱ्यात बॉसच्या केबिनमध्ये जाणारी माणसं आत गेल्यावर ताकाला जाऊन गाडगं लपवून ठेवतात. दुसराच विषय बोलत बसतात. काही केल्या मूळ विषय त्यांच्या जिभेवर येत नाही. 


अशी दुहेरी व्यक्तिमत्त्वं घेऊन जगणारी माणसं सध्या सर्वत्र वाढली आहेत. दिसतं तसं नसतं, हे अशांच्या बाबतीत तंतोतंत लागू होणारं तत्त्व आहे. बरीच माणसं अशा दुहेरी व्यक्तिमत्त्वाच्या स्वप्नरंजनात पूर्ण आयुष्य काढतात. काहींना मात्र ते शक्‍य होत नाही. जे आहे ते प्रामाणिकपणे सांगून टाकावं, त्याचे परिणाम काय होतील त्याची पर्वा करू नये, या पंक्तीत मी स्वतःला ठेवत आलो आहे. 

अंधश्रद्धा निर्मूलन किंवा महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या कामानिमित्त मी राज्यभर फिरत असतो. मला सातत्याने एक प्रश्‍न विचारला जातो, तो म्हणजे "तुम्ही देव मानता का हो?‘ या प्रश्‍नावर खरंतर ताकाला जाऊन गाडगं लपवून ठेवण्याची उत्तम संधी वारंवार मला मिळते. पण मी गाडगं साऱ्या जगाला दाखवत "देव मानत नाही,‘ असं जाहीर करीत असतो. 

असं जाहीर करताना आस्तिक-नास्तिक वादात मी पडत नाही. कारण आपल्या समाजात शब्दांना वेगवेगळे अर्थ चिकटले असतात. त्यावरून काही अर्थ काढून समोरच्या व्यक्तीबाबत आकलन केले जाते. त्यामुळे त्याचे फायदे-तोटे दोन्ही मी सहन केले आहेत. फायदा असा, की देव मानत नाही म्हटले, की बुद्धिस्ट... आणि मूठभर डावे... विवेकवादी आपले मित्र बनतात, पण 80 टक्के लोक आपल्याबाबत पूर्वग्रहदूषित होऊन जातात. 

देव न मानणारा म्हणजे राक्षस, असूर, अनैतिक, भोगवादी, कशाचीही भीती, बंधन नसणारा स्वैराचारी, अशी प्रतिमा लोकांच्या मनात तयार झालेली असते. लोक त्याच नजरेने पाहतात. व्यवहार करतात. अर्थात, जे दीर्घकाळ आपल्या सहवासात असतात त्यांचे पूर्वग्रह हळूहळू गळून पडतात. पण त्यांची संख्या फार कमी असते. 

माणसाच्या जीवनात देवाची गरज आहे काय?, असा बुद्धिवादी थाटाचा प्रश्‍न विचारण्याची मला गरज वाटत नाही. त्यासाठी स्वतःच्या जीवनाचे सिंहावलोकन केले, की या प्रश्‍नाचे उत्तर मिळते. साधारणतः वयाच्या विसाव्या वर्षापासून मी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या संपर्कात आलो. आज चव्वेचाळिशीच्या उंबरठ्यावर उभा आहे. या 23 वर्षांच्या मधल्या काळात माझ्यावर संकटे आली नाहीत असे नाही. हल्ला, जीवघेणा अपघात... नैराश्‍य, ताणतणाव... आर्थिक ओढाताण असे सगळे मित्र माझ्या सहवासात राहून गेले, पण मला अशा संकटकाळात देवाची आठवण झाली नाही. आपल्या जीवनात देवाचा काही रोल आहे, हे मला कधीच जाणवले नाही. 

बरं, मी काही देवविरोधी वातावरणात अगदी कम्युनिस्ट घरातही वाढलेलो नाही. याउलट माझ्या दहा पिढ्यांत धार्मिक संस्कार अन्‌ वारकरी संप्रदायाचं प्रस्थ आहे. लहानपणी उन्हाळ्याच्या सुटीत पोरगं रानावनात उनाडक्‍या करीत फिरेल म्हणून माझी बोळवण लागोपाठ तीन वर्षे एकेक महिन्यासाठी अध्यात्म प्रशिक्षण शिबिरात करण्यात आली होती. त्याकाळात तोंडपाठ केलेला हरिपाठ, ज्ञानेश्‍वरीतल्या ओव्या, अभंग, भगवद्‌गीतेचा बारावा नि चौदावा अध्याय आजही जिभेवर आहे. असं असतानाही मला माझ्या जीवनात देवाचा रोल कुठेच सापडला नाही. 

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत काम करणाऱ्या एकाही कार्यकर्त्याला "तुम्ही देव मानता का?‘, असा प्रश्‍न विचारला जात नाही. तुमच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीतील कारणमीमांसा शोधण्याची विवेकी शिकवण फक्त दिली जाते. जगातल्या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं शोधण्याची बुद्धिप्रामाण्यवादी विचारप्रक्रिया एकदा हातात आली, की तुमच्या जगण्यातून "देव‘ रिटायर्ड होतो, हे नक्की! 

मला अनेकदा असेही प्रश्‍न विचारले जातात, की कोट्यवधी लोक, शास्त्रज्ञ, डॉक्‍टर देव मानतात. ते मूर्ख अन्‌ तुम्हीच तेवढे शहाणे आहात का?, या प्रश्‍नाचे उत्तर मी नेहमी टाळतो. कारण हो किंवा नाही या शब्दात ते देता येऊ शकत नाही. ज्यांनी कुणी माणसाच्या जगण्याची आचारसंहिता तयार केली असेल त्यांनी माणूस नावाच्या बिथरलेल्या घोड्याला वठणीवर आणण्यासाठी देवाची भीती घातली असेल. त्याच्या ज्ञानकक्षा रुंदावल्या, की भीती गळून पडेल असे त्यांना वाटले असेल, पण ज्ञानकक्षा रुंदावल्या, की असुरक्षितता आत शिरेल हे त्यांना माहीत नसावं. मर्यादित आकलन, परिस्थितीला शरण जाणं आणि डोकं खाजवूनसुद्धा काही प्रश्‍न अनुत्तरित राहिले, की मला वाटतं देवाला उचक्‍या लागायला लागतात. कारण एकावेळी कोट्यवधी लोक आठवण करतात. 
श्रद्धा, भावना, अध्यात्म यांचं एक विराट मार्केट आपल्याकडे तयार झालं हा भाग वेगळा, पण आपल्या मेंदूवर जळमटांचे थर चढायला लागले आहेत, हे कबूल केले पाहिजे. कडू गोळ्यांना साखरेचे आवरण लावले की लोकांना पचतात. त्या आवरणाचे काम देव नावाची संकल्पना समाजाच्या जीवनात करते, असे स्वामी विवेकानंद सांगायचे. त्यावर विश्‍वास ठेवता येतो. "देव त्याचीच मदत करतो, जो स्वतःची मदत करतो,‘ असं प्रसिद्ध विधान स्वामी विवेकानंद करतात याचा अर्थ खूप व्यापक आहे. 

"प्रयत्नांती परमेश्‍वर‘ ही हाच आशय सांगणारी म्हण आहे. प्रयत्न करा, देव आपोआप यश देतो, हा प्रेरक अर्थ देणारे महापुरुष मोजता येणार नाहीत एवढ्या संख्येनं आपल्यात होऊन गेले. पण व्यक्ती आणि परमेश्‍वर यांच्यात डायरेक्‍ट व्यवहार झाला तर माझं काय?, असा विचार करणाऱ्या व्यवस्थेनं पुढचा हा सारा अनर्थ आपल्या प्रत्येकाच्या जीवनात करून ठेवला आहे. 

मी देव मानत नाही म्हणून कुुणाचंही लक्ष नसताना चोरी करण्याची इच्छा होत नाही. पाप-पुण्य सगळं झूट आहे म्हणून अनैतिक कार्याकडे झेपावत नाही. उलट जे अहोरात्र देव-देव करतात त्यांनी नीतीशी फारकत घेतल्याचे, पुजाऱ्यांनी भक्ताला लुटल्याचे, बलात्कार केल्याचे मी पाहतो त्या वेळी माझ्या जीवनात देवाला स्थान नसल्याबद्दल समाधान वाटते. 

अनामिक, दै. सकाळ, दिनांक - गुरुवार, ८ जानेवारी २०१५ 

संदर्भ - http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?

Saturday 3 January 2015

संभाजी महाराज - एक उपेक्षित लढवय्या...!

संभाजी महाराज - एक उपेक्षित लढवय्या...!



त्या दिवशी असाच बोलता बोलता शिवाजी महाराजांचा विषय निघाला आणि कुणीतरी म्हणाले कि, 'शिवाजीने जितके केले, ते सगळे संभाजीने फुकट घालवले. आज हि भरपूर जणांना इतकीच माहिती आहे की, संभाजी महाराज म्हणजे विलासी आणि गाण्या बजावण्यात मश्गुल राहणारे होते. आणि त्यांना जेव्हा औरंगजेबाने पकडले तेव्हा त्यांचा अमानुष छळ केला. 

पण कुणी हा विचार करतो का की , ज्या शिवाजी महाराजांना औरंगजेबाने पकडल्यावर फक्त कैद करून ठेवले,तिकडे संभाजी महाराजांचे इतके हाल करायचे कारण काय ? असे काय घडले होते, की औरंगजेब इतका 

दुखावला होता ? महाराजांनी औरंगजेबाची सुरत दोन वेळा लुटली, 

( ह्या गोष्टीमुळे औरंगजेबाने केला नसेल इतका राग आजही काही गुजराती माणसे महाराजांचा करतात) त्याच्या मामाची म्हणजे शाहिस्तेखानाची बोटे कापली. पण त्याचा बदला म्हणून देखील औरंगजेब महाराजांचे बोट वाकडे करू शकला नाही , मग नेमके संभाजी महाराजांनी असे काय केले होते की , त्यांच्याबद्दल औरंगजेबाच्या मनात इतका राग होता ? 


काही गोष्टी आपण विसरतो त्या म्हणजे महाराजांचे बालपण हे जिजाऊंच्या देखरेखी खाली गेले तर संभाजी 

महाराजांची आई, सईबाई ह्या संभाजीच्या लहानपणीच वारल्या होत्या. जिजाऊ होत्या तो काळ संभाजी महाराजांच्या आयुष्यातला चांगला कालावधी आहे. 
पण तरी शिवाजी महाराजांना जेव्हढा जिजाऊंचा सहवास लाभला तेव्हढा संभाजीमहाराजांना लाभला नाही. शिवाय वेळ प्रसंगी आई जेवढी कठोर होवू शकते तेवढी आजीहोत नाही , हे उदाहरण आपण आपल्या घरात देखील बघू शकतो. 


शिवाजी महाराज हे सरदार पुत्र होते तर संभाजी महाराज हे युवराज होते , त्यामुळे त्यांच्या वृत्तीत फरक हा असणारच. दिसायला ते राजबिंडे होते. उंची ६ फुट ३ इंच होती. धाडसी आणि हजरजबाबी होते. त्यांच्या

हजरजबाबी आणि रोखठोक बोलण्यामुळेच त्यांना स्वराज्यात देखील बरेच शत्रू निर्माण झाले होते. त्यांच्या हजरजबाबीपणाचा एक किस्सा म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग सोबत तह केला तेव्हा ,तहाची पूर्तता होत नाही तोवर मिर्झाराज्यांनी शंभूबाळाला वज्रगडावर ओलीस ठेवले होते. तहाची पूर्तता झाल्यावर जेव्हा शंभूराजे परत निघाले तेव्हा दिलेलखानाने त्यांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि विचारले कि, "इतका मोठा हत्ती तुम्ही दक्खनला कसा काय घेवून जाणार ?तेव्हा शंभूराजे म्हणाले की, हत्ती तर आम्ही कसा ही घेऊन जाऊ, पण आमच्या आबासाहेबांनी जे किल्ले दिले आहेत, ते परत कसे नेता येतील ह्याचा आम्ही विचार करतो आहोत. दिलेरखान तर सोडा पण हे असले फटके संभाजी महाराजांनी वेळोवेळी औरंजेबाला सुद्धालगावलेले आहेत. 

औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर ह्याने जेव्हा औरंगजेबा विरुद्ध बंड केले तेव्हा त्याला संभाजी महाराजांनी आसरा दिला होता. आणि त्या दरम्यान त्यांनी अकबराची बहिण झीनत हिला एक पत्र लिहिले होते , जे औरंगजेबाच्या माणसांच्या हाती लागले आणि ते भर दरबारात औरंगजेबाला वाचून दाखवले गेले होते. ते पत्र असे होते, 


तुमचे बंधू शहजादे अकबर यांनी हिंदुस्तान सोडण्यापूर्वी आम्हाला तुमच्या बद्दल सांगितलं . तुम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं . त्याचा जबाब त्यांनी तुम्हाला परत पाठवला नव्हता . तो निरोप त्यांनी जाताना आमच्याकडे देवून ठेवला आहे तो असा : बादशहा सलामत हे नुसते मुसलमानांचे बादशहा नाहीत . हिंदुस्तान रयत वेगवेगळ्या धर्माची आहे . त्या साऱ्यांचेच हजरत बादशहा आहेत . जी गोष्ट मनात ठेवून ते या दक्खनच्या पठारावर आले ती आता साध्य झाली आहे . त्यात समाधान मानून त्यांनी आता हिंदुस्तानांत परत कूच करावं .एकदा त्यांच्या तावडीतून आम्ही आणि आमचे तीर्थरूप सुखरूप सुटून आलो आहोत . पण बादशहा अशीच आपली जिद्द चालवणार असतील तर आमच्या पकडीतून मात्र ते सुटून परत हिंदुस्तानात जाणार नाहीत . त्यांची तशीच इच्छा असेल तर त्यांनी आपल्या कबरीसाठी या दक्खनमध्ये  लवकरच जागा शोधलेली बरी. (संदर्भ:शहेनशहा, ना.स.इनामदार)


युवराज असून देखील दुर्दैवाने त्यांना योग्य तो मानमरातब मिळाला नाही. घरातील बेबनावांमुळे शिवाजी 
महाराजांनी त्यांना स्वतःसोबत कर्नाटकच्या मोहिमेवर न घेता, श्रीरंगपुरला सुभेदार म्हणून धाडले. 
श्रीरंगपुर संभाजी महाराजांची सासुरवाडी होती. कर्नाटकच्या मोहिमेवरून परतत असताना महाराजांच्या स्वागतासाठी संभाजी महाराज श्रीरंगपुरच्या वेशीवर उभे होते,पण शिवाजी महाराज पन्हाळा, सातारा, महाबळेश्वर मार्गे रायगडावर परतले. 


सगळ्या प्रजे समोर संभाजी महाराजांचा केव्हढा मोठा अपमान झाला असेल ?मानसिंगाच्या पाठीमागे उभं केल्यावर ज्या राजाला अपमानित वाटलं आणि भर दरबारात महाराजांचा आवाज चढला. बापाचा स्वाभिमान जवळून पाहिलेल्या त्यांच्या मुलाने असा अपमान झाल्यावर बंड केले नसते तरच नवल. 

मराठेशाहीचे दुर्दैव हे कि संभाजी महाराज (वय वर्ष ३२), फारच अल्पायुषी होते. वयाच्या ३२व्या वर्षी औरंगजेबा समोर गुडघे न टेकता मातृभूमीसाठी मरणाला बहाद्दुरीने मिठी मारणार्‍या राजा बद्दल जेव्हा सकाळच्या ८:२० ची लोकल पकडण्याची काळजी करणारा आम आदमी, "शिवाजीने जितके केले , ते सगळे......'' बोलून अक्कल पाजळतो तेव्हा चीड येते...! 

(इतिहासाचे अभ्यासक मिलिंद कारेकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर लिहलेला हा लेख. )

संकलन - राज जाधव...!

Friday 2 January 2015

सावित्रीबाई फुले : जीवन आणि कार्य

                  - सावित्रीमाई फुले : जीवन आणि कार्य -






३ जानेवारी १८३१ - सातारा जिल्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी जन्म
१८४० - ज्योतिराव फूले यांच्याबरोबर विवाह

१८४१ - शिक्षणास प्रारंभ.

१८४७ - शिक्षक प्रशिक्षण.

१ जानेवारी १८४८ - पुणे येथे भिडे वाड्यात मुलींच्या पाहिल्या शाळेची स्थापना, सावित्रीबाई शिक्षिका झाल्या.

१ मे १८४९ - पुणे येथील उस्मानशेख यांच्या वाड्यात प्रौढाच्या शाळेची स्थापना आणि सावित्रीबाईंचे अध्यापन कार्य.

१८४९-५० - पुणे-सातारा-नगर या जिल्यांत शाळेची स्थापना आणि त्यातील काही शाळात शिक्षिका म्हणून  कार्य.

१८४९ - वंचितांच्या शिक्षणासाठी पती ज्योतिरावांबरोबर गृहत्याग.

१८५२ - शाळाची तपासणी व आदर्श शिक्षिका म्हणून अभिप्राय.

१२.२.१८५३  - मेजर क्यंडी यांच्या हस्ते फुले दाम्पत्याचा विश्रामबाग वाड्यात गौरव आणि सर्व शाळान्चा एकत्र पार पाडलेला बक्षिस समारंभ.

१८५३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आणि सावित्रीबाईंचे यासाठी कार्य.

१८५४ - काव्यफुले या कविता संग्रहाचे प्रकाशन.

१८५५ - रात्रशाळेची स्थापना.

२५.१२.१८५६ - ज्योतिबांची भाषणे हे पुस्तक प्रकाशित केले.

१८६० - विधवा पुनर्विवाहास सहाय्य.

१८६४ - अनाथ बालकाश्रम चालविला.

१८६८ - घरचा हौद अस्पृशांसाठी खुला.

२४.९..१८७३ - सत्यशोधक समाजाची स्थापना.

१८७५ ते १८७७ - पुणे परिसरात ५२ अन्नछत्रे उघडून सत्यशोधक समाजातर्फे चाललेल्या दुष्काळ निवारण कार्याचे नेतृत्व.

२८.११.१८९० - पती महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन.

१०.३.१८९७ - प्लेगने क्रांतिज्योतीचे महानिर्वाण.

- ज्ञानज्योति सावित्री माई फुले जयंती निमित्त त्यांच्या स्मृतिस त्रिवार अभिवादन -

आभार : लोकसत्ता वर्तमानपत्र
संकलन - राज जाधव 

Thursday 1 January 2015

शौर्य...धैर्य...कर्तुत्वाला सलाम...!


- शौर्य...धैर्य...कर्तुत्वाला सलाम - 

"पोलादी मुठीत आजही हत्तीचे बळ आहे, रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे, डोळ्यातला निखारा आजही लाल आहे, आडवे येवू नका,कोणीच अन्यायी पेशवाईला संपविणारा "मर्द महार" आजही तसाच आहे"...!


आपल्या लोकांच्या मुक्तीचा संघर्ष अजून संपलेला नाही. १८१८ रोजीची लढाई जिंकून आपल्या पराक्रमी लोकांनी पेशवाई सत्ता संपवली. परंतु १९४७ नंतर संपूर्ण भारतावर जातीवाद्यांची सत्ता निर्माण झाली आहे. आता एखाद्या ठिकाणी युद्ध करून ती सत्ता संपवता येणार नाही. त्यासाठी आपल्याला देशभर तयारी करावी लागेल. निरनिराळ्या जातीमध्ये विभाजित झालेल्या लोकांना जागृत करून एकत्र जोडावे लागेल.... "शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा" हा बाबासाहेबांचा कानमंत्र खर्या अर्थाने आत्मसात करावा लागेल...!
अॅड. राज जाधव...!