My Followers

Wednesday 30 January 2013

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तेजस्वी पत्रकारिता......!


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तेजस्वी पत्रकारिता......!


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रामुख्याने घटनेचे शिल्पकार आणि दलित समाजाचे उध्दारक म्ह्णून आपण सारे ओळखतो. पण एक तेजस्वी आणि महान पत्रकार अशी त्यांची ओळख सहसा कोणाला नाही. 1920 पासून पत्रकारितेचे व्रत अंगीकारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता तसेच प्रबुध्द भारत ही चार वृत्तपत्रे सुरु केली, अनेक अडचणींचा सामना करीत ही वृत्तपत्रे हिरीरिने चालविली. समता आणि इतर वृत्तपत्रात सातत्याने लेखन केले, असे असूनही वृत्तपत्रांचा इतिहास लिहिणार्‍यांनी त्यांच्या या कार्याची हवी तेवढी दखल घेतली नाही. डॉ. गंगाधर पानतावणे, वसंत मून  आणि इतर काही अभ्यासकांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेबाबत स्वतंत्रपणे ग्रंथलेखन केले तेव्हा महाराष्ट्राला त्यांच्या पत्रकारितेची थोरवी लक्षात आली.

हजारो वर्षे आपले प्राक्तन समजून सवर्णांचा अन्याय निमूटपणे सहन करणार्‍या दीनदलित समाजाला जागे करण्यासाठी 'मूकनायक' हे वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर 31 जानेवारी 1920 रोजी सुरु केले. तेव्हा डॉ. आंबेडकर इंग्लंडमधून उच्चशिक्षण आर्थिक अडचणींमुळे अर्धवट सोडून नुकतेच परतले होते. या वृत्तपत्राच्या पहिल्या अंकात भूमिका विषद करताना त्यांनी म्ह्टले होते "आमच्या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणार्‍या अन्यायावर चर्चा होण्यास तसेच त्यांच्या भावी उन्नतीच्या मार्गांची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी भूमी नाही.पण अशा वर्तमानपत्राची उणीव असल्याने ती भरुन काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे". डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे वृत्तपत्र तीन वर्षे अखंडपणे चालविले  दलित समाजाला जागे करण्यास व आपल्या हक्कांची जाणीव करुन देऊन संघर्षासाठी सिध्द करण्यास प्रारंभ केला .पण त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उच्चशिक्षण पूर्ण करण्यास पुन्हा इंग्लंडला जावे लागले. त्यांच्या अनुपस्थितीत अनुयायांना मूकनायक चालविण्याचे आव्हान पेलले नाही त्यामुळे 8 एप्रिल 1923 ला ते वृत्तपत्र बंद पडले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 एप्रिल 1927  रोजी 'बहिष्कृत भारत' हे वृत्तपत्र सुरु केले. या वर्तमानपत्रासाठी त्यांनी आपले रक्त आटवले, इंग्रजांनी देऊ केलेली मोठ्या पगाराची नोकरी नाकारली.अनेकदा हे वृत्तपत्र बंद पड्ले , पण पुन्हा हिरीरिने सुरु केले. मात्र अगदीच नाईलाज झाल्याने 15 नोव्हेंबर 1928 ला हे वृत्तपत्र बंद करावे लागले.वसंत मून यांनी आपल्या ग्रंथात लिहिले आहे "बहिष्कृत भारत वृत्तपत्राने अस्पृश्य समाजात मोठी क्रांती घडवून आणली आहे. हे पत्र म्ह्णजे धार्मिक किल्ल्याच्या जातीभेदररुपी तटास भगदाड पाडणारी मशीनगणच आहे". या विधानावरुन त्या काळात बहिष्कृत भारत ची कामगिरी किती महत्वाची होती हे जाणवते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 24 नोव्हेंबर 1930 रोजी 'जनता' हे पाक्षिक सुरु केले, ते पुढे साप्ताहिक झाले व 1956 पर्यंत सुरु राह्रिले. अस्पृश्य समाजाचे प्रश्न इतर समाजालाही कळावेत यासाटी त्यांनी 'जनता' ची सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौध्द धम्माची  दीक्षा घेतल्यानंतर 'जनता' साप्ताहिकाचे नामांतर 'प्रबुध्द भारत' असे करण्यात आले. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे महानिर्वाण झाल्यावरही अनुयायांनी ते अनेक वर्षे चालविले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आणि त्यांच्या वृत्तपत्रांव्रर त्या काळात अनेक सवर्ण नेत्यांनी व त्यांच्या वृत्तपत्रांनी जहरी टीका केली. पण आंबेडक्ररांनी सतत विचारांनीच त्या टीकेला उत्तर दिले, यात त्यांचे मोठेपण जाणवते.लको अनुयायी असतानाही त्यांनी कधी मारा,झोडाची भाषा केली नाही. सतत 36 वर्ष भारताच्या उन्नतीसाठी आपल्या तेजस्वी लेखणीने माग्रदर्शन करणार्‍या या महान पत्रकाराने जातीपाती तोडण्यापासून देशाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत सर्व विषयांवर नेमके लेखन केले आहे. त्यांची पत्रकारिता म्ह्णजे भारताच्या इतिहासाचा उलगडा करुन भविष्यातील बलशाली भारताचे चित्र रेखाटणारी पत्रकारिता आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या वृत्तपत्रांची शीर्षके निवडतानाही अतिशय समर्पक निवड केली होती.अनेक वर्षे ही वृत्तपत्रे चालविणे सर्वच संदर्भाने अतिशय कठीण होते.ज्या समाजापर्यंत शिक्षण फारसे पोहोचलेच नव्हते व ज्यांचे सातत्याने आर्थिक व सामाजिक शोषण झाले अशा दीनदलित समाजातील लोक मोठया प्रमाणात वृत्तपत्राचे वर्गणीदार होतील अशी अपेक्षा करणे शक्य्‍ा नव्हते, हे ठाऊक असूनही बाबासाहेब आपल्या ध्येयापासून तसूभरही ढळले नाहीत.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषा प्रवाही व धारदार होती. 'बहिष्कृत भारत' च्या एका अग्रलेखात भारतीय समाजाच्या टिकून राहण्याची कारणमीमांसा करताना त्यांनी लिहिले आहे "जेव्हा जेते लोक शहाणे झाले व जीत लोकांना मारुन टाकण्यापेक्षा शेतकी वगैरे कामाकडे त्यांचा उपयोग करुन घेता येईल असे त्यांना दिसून आले तेव्हा जीत लोकांचा संहार करण्याची पध्दती नाहीशी होऊन त्यांना गुलाम करण्याची पध्दत अमलात आली". यात पुढे त्यांनी लिहिले आहे की, "आम्ही जगलो याचे कारण आम्ही शास्त्राप्रमाणे वागलो हे नसून शत्रूंनी ठार मारले नाही हेच होय.शास्त्राप्रमाणे वाघून जर काही झाले असेल तर ते हेच की,इतर राष्ट्रांपेक्षा आम्ही अधिक हतबल झालो व कोणाविरुध्द दोन हात करुन जय संपादन करण्याइतकी कुवत आमच्याजवळ राहिली नाही".
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश आपल्या अनुयायांना देणार्‍या बाबासाहेब आंबेडकरांनी कितीही अडचणी आल्या तरी आपली लेखणी कुठे गहाण ठेवली नाही आणि जाहिरातींच्या मलिदयाची अपेक्षा बाळगली नाही. स्वतंत्र प्रज्ञेने त्यांची लेखणी सतत धारदार तलवारीच्या पात्यासारखी झळाळत राहिली. त्यांच्या पत्रकारितेचा विचार एका चौकटीत करण्याचे प्रकार थांबायला हवेत.त्यांची पत्रकारिता बलशाली भारताचे चित्र रेखाटणारी परिपूर्ण पत्रकारिता आहे.हृी पत्रकारिता यापुढ्च्या काळातही योग्य दिशा दाखविण्याचे कार्य करीत राहणार आहे, याची खात्री आहे.

- दैनिक दिव्य मराठी.......!

संपादन अँड. राज जाधव...!!! 

Friday 11 January 2013

“गड आला पण सिह गेला”......!

“गड आला पण सिंह गेला”......!

गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य नवमी) रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. समोर असलेल्या ध्येयाकडेच सर्व मावळ्यांची नजर होती..
कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा.
भयाण रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता चढणे दिवसासुध्दा अशक्य होते. तानाजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले.
एकच ध्यास होता तानाजींच्या मनात “कोंढाणा” आणि त्यासाठी ते देहभान विसरून लढत होते, झटक्यासरशी शत्रूंची तुकडी कापून काढत होते.. शत्रूशी बेभान होऊन लढत होते आणि अशातच तानाजींच्या हातातील दहाल निखळून खाली पडली, अशा बिकट परिस्थितीतही त्यांनी  डाव्या हातावर तलवारीचे वार घेत लढू लागले.. हातावर वार बसत होते पण याची भ्रांत स्वराज्याच्या आणि शिवरायांच्या मावळ्याला थोडीच होणार.. हात रक्तबंबाळ झाला होता तरीही वाकत नव्हता..  शेवटी समोर उदयभान येऊन उभा टाकला.. मग काय हर हर महादेव अशी सिंहगर्जना करत अक्षरशः वीर तानाजी उदयभानावर तुटून पडले..
दोघामध्ये तुंबळ युद्ध सुरु झाले, आधीच घायाळ झालेल्या वाघावर असंख्य वार होऊ लागले.. अंगावर होत असलेल्या बचावासाठी होते काय तर रक्ताने माखलेला हात.. तरीही तानाजी मागे हटले नाहीतच…. गर्जना करत होते, वार घालत होते.. मनामध्ये शिवराय, एकाच ध्येय एकाच ध्यास “कोंढाणा”
खूप काम होते अजून करायचे, उदयभानाला आसमंत दाखवायचा…. कोंढाणा काबीज करायचा…. शिवरायांना गड जिंकल्याचा निरोप धाडायचं…. मोहीम फत्ते करायची…. जबाबदारी संपवून घरी जायचे…. घरी पाव्हन-रावळ थांबलेली…. रायबाचे लगीन…. रायबाला शिवरायांच्या सेवेत स्वराज्याच्या सेवेत रुजू करायचं…. खूप खूप काम होती….  पण कोंढाण्याला पाहिजे होते तानाजी…. 
उदयभानावर शेवटचा वार करून शेवटी उदयभानाला निपचित पाडूनच या वाघाने शिवरायांच्या मावळ्याने स्वत:चे प्राण सोडले.
गड अजून यायचा बाकी होता.. मात्र त्यांच्यामागुन ‘सूर्याजी मालुसरे’ आणि ‘शेलारमामा’ यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला.
गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना आजच्याच दिवशी म्हणजेच ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली.
तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसऱ्या दिवशी राजे सिंहगडावर पोचले तेंव्हा त्यांना ही बातमी समजल्यावर महाराजांना खूप दुःख झाले.
महाराज म्हणाले, “गड आला पण सिंह  गेला”.
अत्यंत दुःखी अश्या राजांनी आपल्या तानाजीचे शव त्यांच्या ‘उमरठ’ (पोलादपुरजवळ) या गावी पाठवले. ज्यामार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता ‘मढेघाट’ या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा ‘विरगळ’ स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारक सुद्धा उभे केले गेले आहे....!

नकळत छातीकडे हात जात आपण म्हणतो, "मुजरा सुभेदार".....!  

संदर्भ - शिवसंकल्प...दिनेश सूर्यवंशी, आणि मराठा इतिहासाची दैनिदिनी.....!   

संपादन अँड. राज जाधव...!!! 

Thursday 10 January 2013

बाबासाहेबांची सावली....!

बाबासाहेबांची सावली....!

नागपूरच्या दीक्षाभूमी मैदानावर हजारोंच्या जमावासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धं शरणं गच्छामि चा उच्चार केला आणि भारतीय समाजरचनेत एक अभूतपूर्व क्रांती झाली. 

या वेळी डॉ. बाबासाहेबांसमवेत शुभ्र पांढरी साडी नेसलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. सविता आंबेडकरही होत्या. उच्च जातीत जन्माला आलेल्या माईसुद्धा आपल्या पतीसमवेत बौद्ध धर्मात आल्या आणि या चळवळीला नवे परिमाण प्राप्त झाले. 14 ऑक्टोबर 1956 रोजी घडलेला हा प्रसंग ही माईंच्या आयुष्यात घडलेली सर्वात महत्त्वपूर्ण घटना. त्यानंतर अडीच महिन्यांतच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि त्यानंतर माईंना बहुतांश काळ विजनवास व उपेक्षेचे जिणेच सहन करावे लागले. बाबासाहेबांशी विवाह केल्यानंतर त्यांनी ज्या समाजाला आपले मानले त्या समाजाच्या नेत्यांनी माईंना दूरच ठेवले. 

बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर माईंविषयी उलटसुलट बातम्या येत होत्या. त्यामुळे दलित समाजही त्यांच्यापासून अंतर ठेवून राहिला. परिणाम हाच की , ' बाबासाहेबांची पत्नी म्हणून त्यांना मिळालेला मरणोत्तर भारतरत्न किताब स्वीकारणाऱ्या माईंच्या आयुष्याची अखेरची वषेर् त्यांना दादरला दहा बाय दहाच्या चाळीतील खोलीत नातेवाईकांच्या आश्ायाने व्यतित करावी लागली. दलित चळवळीतील अनेक नेते बाबासाहेबांच्या नावावर राजकारण करून चैनीचे जीवन जगत असताना त्यांच्या विधवा पत्नीची आयुष्याच्या संध्याकाळी अशी परवड व्हावी हे दुदैर्व. परंतु स्वत: माईंना त्याची फारशी फिकीर नव्हती. 

गेली सात-आठ वर्षे त्या अंथरुणाला खिळून होत्या व त्यांचे समाजात वावरणे जवळपास बंदच झाले होते. पण त्याआधी माई बऱ्याच वेळा पूर्वस्मृतींतच रमलेल्या असत. बाबासाहेबांच्या उतरत्या वयात त्यांची शुश्रुषा करण्याच्या निमित्ताने डॉ. सविता कबीर त्यांच्या सान्निध्यात आल्या व पुढे विवाहबद्ध झाल्या. त्या वेळी बाबासाहेब राष्ट्रीय राजकारणातील मोठे नेते होते. पं. नेहरू आणि अन्य राष्ट्रीय नेत्यांबरोबर त्यांची ऊठबस होती. त्यांच्या समवेत माईसुद्धा सर्वांच्या परिचयाच्या झाल्या होत्या. परंतु बाबासाहेब गेल्यानंतर या ओळखीचा लाभ करून स्वत:च्या आयुष्यात स्थैर्य आणण्याचा प्रयत्न माईंनी कधी केला नाही. 

बाबासाहेबांनंतर रिपब्लिकन पक्षाचे वारंवार तुकडे होत राहिले. त्या राजकारणातही माईंची डाळ शिजली नाही. कधी या कधी त्या गटाने त्यांचा वापरच करून घेतला. अर्थात बाबासाहेबांची त्यांच्या अखेरच्या काळात केलेली शुश्रुषा विवाह आणि नंतर त्यांच्यासमवेत बौद्ध धर्माची दीक्षा हेच माईंचे हयातभरचे भांडवल होते. त्यांच्या स्मृती त्यांनी स्वत:पाशीच जपून ठेवल्या व त्याचे जाहीर प्रदर्शन करण्याचे टाळले त्यामुळेच त्यांच्या वाट्याला उपहास व तिरस्कार आला. बाबासाहेबांचा निकट सहवास लाभूनही त्या त्यांच्या राजकीय वारस बनू शकल्या नाहीत याचे त्यांची पूर्वाश्ामीची जात हेच एकमेव कारण नव्हे. बाबासाहेबांचे राजकीय व सामाजिक तत्त्वज्ञान आणि त्यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता व जाणिवा यांचे फारसे भान माईंना नव्हते. 

याचे कारण बाबासाहेबांच्या पत्नी म्हणून त्यांचा संसार सांभाळणारी गृहिणी व शुश्रुषा करणारी नर्स या भूमिका पार पाडण्यातच माईंनी धन्यता मानली. म्हणूनच त्यांचे अस्तित्व सावलीसारखे राहिले. बाबासाहेबांची सावली म्हणून राहिलेल्या माईंचे सार्वजनिक अस्तित्व त्यामुळेच बाबासाहेबांनंतर संपुष्टात आले पण त्यांनी राजकारणात हातपाय मारण्याचा प्रयत्न केलाच नाहीअसे नव्हे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर लगेचच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या रायबरेली मतदारसंघातून अरुण नेहरू यांच्या विरोधात उभ्याही राहिल्या होत्या. त्यामुळे काही काळ त्यांच्यावर प्रसिद्धीचा प्रकाशझोत राहिला इतकेच. अखेरच्या आजारपणात त्या मुंबईतील सरकारी रुग्णालयात होत्या. केवळ उपचार म्हणून काही राजकीय मंडळींनी रुग्णालयात हजेरी लावलीया पलीकडे नव्वदी ओलांडलेल्या माईंची फारशी दखल घेण्याची फुरसद कुणाला नव्हती. माईंच्या निधनामुळे बाबासाहेबांसारख्या उत्तुंग युगपुरुषाच्या निकट सान्निध्यात राहिलेला अखेरचा दुवा निखळला....!

अग्रलेख - 
महाराष्ट्र टाईम्स 

Thursday 3 January 2013

एक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....!

एक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....!    

1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना.... हा काळ पाहिला तर स्वातंत्र्याच्या संघर्षाचा काळ. त्याचबरोबर महामानवाच्या मानवमुक्तीच्या संघर्षाचा काळसुद्धा होता.

खरे पाहता अ‍ॅड. गडकरी आणि डॉ. आंबेडकर मुंबईहून पुण्याला निघतात. चवदार भजी पनवेलच्या नाक्यावर मिळतात. त्या भज्यांची खासियत गडकरी बाबासाहेबांना मोटारीत सांगतात. भजी खाणे हा  बाबासाहेबांचा वीकपॉइंट.

या नेमक्या पनवेलच्या नाक्यावर सगळ्या हॉटेल मालकांना लागणारी लाकडे फोडून देणारा सोनबा. निरक्षर, मेहनती. त्याचे स्वप्न होते, एकदा तरी बाबासाहेबांचे दर्शन होईल? त्यांचे भाषण ऐकता येईल? माझ्या हातात कुºहाड असताना आपल्या लेकराच्या हाती लेखणी येईल? बारा वर्षांपूर्वीचा पाण्यासाठीचा महाडचा संघर्ष त्याच्या लक्षात असतो.

गडकरी आणि बाबासाहेबांच्या मोटारगाडीत विविध विषयांवर गप्पा रंगत असताना पनवेलचा नाका येतो. धुरळा उडवत मोटारगाडी पनवेलच्या नाक्यावर उभी राहते आणि गडकरी गाडीतून उतरून समोरच्या हॉटेलातून पाण्याचा एक ग्लास बाबासाहेबांच्या हाती देतात. भजी आणि चहाची ऑर्डर देतात. माझ्या संगाती डॉ. आंबेडकर आहेत. आपल्या भज्यांची तारीफ त्यांना ऐकवली आहे. तेव्हा लागलीच समोरच्या गाडीत त्यांना ती पाठवा.

‘भजी काय, गटारातले पाणीसुद्धा मिळणार नाही. माझे हॉटेल बाटवता आहात? चालते व्हा.’ हे शब्द बाबासाहेबांच्या कानावर पडतात. गडकरी हॉटेलमालकाची कॉलर पकडतात. वातावरण गंभीर होते. पाण्याचा ग्लास बाबासाहेबांच्या हातून खाली पडतो त्याचबरोबर बाबासाहेबांच्या डोळ्यांतून अश्रू घळाघळा वाहू लागतात. उगाच या स्पृश्य मालकाच्या हॉटेलात आणले, याची जाणीव गडकरींना होते. अशी एक विलक्षण कथा.

बाबासाहेबांना कधी एकदा बघेन, या आशेवर जगणारा सोनबा तिथे नाक्यावर उभा असतो. मोटारगाडीजवळ जातो तर अपमानित झालेले बाबासाहेब त्याला बघवत नाहीत. मोटारीजवळ जाऊन बाबासाहेबांना विनंती करतो. ‘बाबासायब मी माझ्या घरातनं मडक्यात पानी आनतो... थांबा वाईच...’ पळत जाऊन धावत येतो, पण तेवढ्या अवधीत बाबासाहेबांची गाडी निघून जाते. अनाडी सोनबा पाण्याचा घडा घेऊन येतो. त्याला कळत नाही बाबासाहेब पुण्याला गेले की मुंबईला गेले आणि निष्ठावंत सोनबा पाण्याचा घडा घेऊन पनवेलच्या नाक्यावर बाबासाहेबांना पाणी देण्यासाठी थांबतो. किती वर्षे? सतत सात वर्षे. उद्या... परवा... पनवेलच्या नाक्यावर येतील, अशी भाबडी आशा नव्हे तर स्वप्न बघतो. पण स्वप्ने कधी साकार होतात का? अशाच या विलक्षण कहाणीचा शेवट जो व्हायचा तोच होतो. 1946च्या काळात उपाशी, आजारी सोनबा घड्याप्रमाणे कलंडतो. आणि या जगातून निघून जातो.

विश्वामध्ये असे अनेक महापुरुष जन्माला आले, त्यांचे कार्य संपल्यावर या जगातून गेले. त्यांच्या जाण्यानंतर त्यांचे अनुयायी, कार्यकर्ते किती हळहळले? किती रडले ? किती उपाशी राहिले ?

संदर्भ - दिव्य मराठी......! 

संपादन अँड. राज जाधव...!!!