My Followers

Saturday 20 January 2018

सोनई दलित हत्याकांड !

सोनई दलित हत्याकांड !

"माझ्या पोराचे तुकडे या डोळ्यांनी पहाव लागल,
मला म्हातारीला आता हे दुख सहन होत नाय.
मराठ्याच्या पोरीसंग प्रेम करून माझ्या पोरान गुन्हा केल्ता का?
ते दोघ बी लगीन करणार होते, पर त्या लोकांनी तेला मारून टाकल ,
ती माणस नायीत हैवान हायीत"

- कलाबाई घारू ( मृत सचिन घारू याची आई)

ही कलाबाई यांची वेदनामय आणि संतप्त प्रतिक्रिया, केवळ प्रतिक्रिया नाही. तर तो थेट सवाल आहे, भारतीय संस्कृतीच्या नावाखाली पोसलेल्या सरंजाम जातीय विकृतींना, हिंसक धर्मवादाचे विष पेरलेल्या ब्राह्मणी विचारांना, लोकशाहीचा डांगोरा पिटणाऱ्या बुद्धिमंतांना, 'फार वाईट झाले' म्हणत जातीय अहंकारात आंधळ्या होणार्या समाजाला. त्यांचा थेट सवाल आहे, माणसाचे माणूसपण नाकारणाऱ्या या सकल ब्राह्मणी व्यवस्थेला! कलाबाईच्या सवालाने इथल्या पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या समाजाचा खरा भयाण, अमानुष चेहरा समोर आला आहे, असंवेदनशीलतेच्या धुक्यात हरवलेल्या अहमदनगर मधील सोनई दलित हत्याकांडाचा हा सत्यशोधन रिपोर्ट.

जातीयवादाचे बळी-
नवीन वर्षाची सुरवात होत असताना अहमदनगर मधील सोनई येथे संदीप थनवर, सचिन घारू आणि राहुल कंधारे या तीन मेहतर ( वाल्मिकी) जातीच्या तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडात आरोपी असलेले रमेश,पोपट, प्रकाश, गणेश ( सर्व दरंदले ), अशोक नवगिरे, दरंदले यांचा भाचा संदीप कुऱ्हे आणि अशोक फलके यांना आजपर्यंत अटक करण्यात आली आहे. हत्येमागील कारण अगदी स्पष्ट आहे, सचिन घारू व दरंदले यांची मुलगी यांचे एकमेकांवर प्रेम होते, परंतु सचिन हा दलित ( मेहतर जातीचा ) आणि दरंदले यांची मुलगी ही मराठा जातीची( कथित उच्च) असल्याने दरंदले यांना हे प्रेमसंबंध मान्य नव्हते, त्यांच्या लग्नाच्या निर्णयाने दरंदले यांच्या खोट्या प्रतिष्ठेला यामुळे धक्का बसणार होता. (विशिष्ट व्यक्तीवर जाहीर आरोप करणारं एक वाक्य काढून टाकलेलं आहे. - संपादक)

संदीप, सचिन आणि राहुल-

संदीप, सचिन आणि राहुल हे तीनही युवक नेवासा फाटा येथे असलेल्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान च्या शाळा आणि महाविद्यालयात रोजी-रोटीसाठी सफाईचे काम करीत होते, त्यांच्या उत्पन्नाचे तेवढेच एकमेव साधन होते. संदीप हा अनेक वर्षापासून या संस्थेत सफाईचे काम करीत होता व त्याचा आंतरजातीय विवाह झाल्यानंतर आपल्या पत्नी व एक वर्षाच्या मुलासह कर्मचारी निवासात राहत होता. संदीपने दीड वर्षापूर्वीच सचिनला देखील याच संस्थेत कामाला लावले व त्याला देखील कर्मचारी निवासात घर मिळाले होते, त्याची आई व तो तिथे राहत होते. राहुल मात्र हत्येच्या ५ दिवसापूर्वीच नवीन कर्मचारी म्हणून संस्थेत आला होता व त्याला होस्टेलवर एक छोटी रूम मिळाली होती. संदीप सर्वांचा प्रमुख होता. याच महाविद्यालयात दरंदले यांची मुलगी शिकत होती व तेथेच सचिन आणि तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले, ते दोघेही एकमेकांना भेटत असल्याची त्याची माहिती दरंदले यांना मिळाली. तेव्हा दरंदले यांनी सचिनला तिचा विचार सोडून दे नाहीतर जीवानिशी जाशील अशी धमकी दिली होती . कलाबाई घारू सांगतात कि सचिनला धमकी दिल्याचे सचिननेच त्यांना सांगितले होते तेव्हा सचिन घाबरलेला होता, तरीही त्याने लग्न करण्याचे ठरवले होते. या धमक्यानंतरही ते दोघे भेटत होते हे लक्षात आल्यावर या प्रकरणावर चर्चा करायला दरंदले यांनी अशोक नवगिरे यांच्या कडून संदीपला सचिनसह येण्याचा निरोप पाठवला. दरंदले, संदीप आणि अशोक हे तिघेही मित्र होते, संदीप, सचिन आणि राहुल अशोकने दिलेल्या निरोपानुसार दरंदले यांना भेटायला गेले.

भारतीय सेनेत जवान असलेला संदीपचा भाऊ पंकज थनवर सांगतो कि " १ जानेवारी ला दुपारी ४ पर्यंत दोघांचे फोन लागत नव्हते, वहिनी पूर्ण घाबरलेली होती, त्याच वेळेस पोलिसांकडून तिघांची हत्या झाल्याची बातमी आम्हाला कळाली,याचा खूप मोठा धक्का आम्हाला बसला कारण संदीपचा स्वभाव खूप शांत होता, त्याचे कुणाशी भांडण पण नव्हते"

आरोपी रमेश आणि प्रकाश यांनी स्वताहून पोलीस स्टेशनला जाऊन सेफ्टी टंक साफ करताना संदीपचा बुडून मृत्यू झाल्याचा रिपोर्ट दिला . पोलिस तपासासाठी आले तेव्हा त्यात सेफ्टी टंक मधून त्यांनी ६ फुट उंची असलेल्या संदीपचा मृतदेह बाहेर काढला, २च फुट भरलेल्या सेफ्टी टंक मध्ये ६ फुट माणूस बुडून कसा मरेल? याचा संशय आल्याने पोलिसांनी रमेश दरंदले यांची चौकशी केली तेव्हा दरंदले यांनी संदीप बरोबर आलेल्या दोघांनी ( सचिन आणि राहुलने) त्याला मारून त्यात टाकून पळून गेल्याचे खोटे सांगितले पण पोलिसांनी आजूबाजूचा परिसर तपासला तेव्हा कोरड्या विहिरीचा त्यांना संशय आला त्यात पोलिसांना डोक, हात आणि पाय नसलेले मृत शरीर सापडले, बाजूलाच त्यांचे इतर अवयव देखील पुरले होते, प्रथम सचिन आणि राहुल यांचा मृतदेह ओळखण्यात अडचणी आल्या, कोणता मृतदेह कोणाचा आहे हे कळेना परंतु सचिनच्या छातीवर दरंदले यांच्या मुलीचे नाव गोंदलेले होते त्यामुळे सचिन आणि राहुल यांच्या मृतदेह ओळखता आले. कडबा कापण्याच्या विळ्याने दोघांचे तुकडे करण्यात आल्याचे लक्षात आले, त्या वेळेस रमेश, पोपट आणि प्रकाश (सर्व दरंदले) यांना अटक करण्यात आली. भा.द.वि.च्या ३०२ च्या कलमाखाली खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला पण त्याच वेळेस दलित अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गत कोणताही गुन्हा नोंद पोलिसांनी केला नाही. हा गुन्हा ५ दिवसांनी नोंदवण्यात आला.

पोलिसांच्या तपासावर संशय -

१) पोलिसांनी FIR मध्ये दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा हत्या झाल्यावर ५ दिवसांनी दाखल केला हा उशीर का झाला याचे उत्तर पोलिसांकडे नाही

२) हत्येचा गुन्हा नोंदवत असताना हत्येचा हेतू आणि कारणांचा उल्लेख मात्र पोलिसांनी त्यांच्या FIR मध्ये केलेला नाही.

३) हत्या करण्यासाठी आरोपींनी त्या तीन दलित तरुणांना बोलवून घेतले म्हणजे हा हत्येचा कट पूर्व नियोजित होता याचा ही उल्लेख आणि त्या अंतर्गत कलम पोलिसांनी लावले नाही.

४) सचिनच्या छातीवर दरंदले यांच्या मुलीचे नाव गोंदलेले होते पण मृतदेहाच्या पंचनाम्यात पोलिसांनी त्याचा उल्लेख करायला टाळाटाळ केली आहे.
५) दि.१ रोजी जेव्हा या प्रकरणाला वाचा फोडली गेली तेव्हा जिल्हा पोलिस प्रमुख रावसाहेब शिंदे हे मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना संरक्षण दिले गेले आहे असा दावा करीत होते, मात्र गावातील राजकीय दबाव व भीतीमुळे संदीपचे कुटुंबीय हे त्यांच्या नातेवाईकांकडे मालेगाव, नाशिक व सचिन ची आई त्यांच्या मुलीकडे एरंडोल, जळगाव येथे सुरक्षेच्या कारणाने निघून गेले होते.

६) मृत कुटुंबियांचे जवाब पोलिसांनी नोंदवून घेतले नाही.तशी गरजही त्यांना वाटली नाही.

७) जिल्हा पोलिस प्रमुखांनी १ महिना होऊ पर्यंत या हत्याकांडाची माहिती गृहमंत्र्यांना दिली नव्हती, आणि पालकमंत्र्यांनी देखील मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची माहिती पुरवली नव्हती.

८) जिल्हा पोलिस प्रमुख,जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री या सर्व दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महिनाभरानंतर देखील घटना स्थळाला आणि मृत कुटुंबियांच्या परिवाराची भेट घेतली नव्हती.

९) महिनाभर या प्रकरणातील तपासात कोणतीही प्रगती झाली नाही. दि.७ फेब्रुवारी रोजी गणेश दरंदले आणि अशोक फलके यांना अटक झाली मात्र या हत्याकांडात अनेक लोक असण्याची शक्यता आहे.
या सर्व तृटी नाहीत तर हे जाणून-बुजून झाले आहेत. स्थानिक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या राजकीय नेत्यांचे या प्रकरणात दबाव आहे. त्यामुळे मानव हक्क चळवळीच्या कार्यकर्त्या मनीषा टोकले यांनी कलम ४ नुसार कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलिसांवर कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे.

मीडियाची परिणामकारक व प्रभावी भूमिका -

पंकज थनवर (in military suit)

हत्याकांड झाल्यावर अहमदनगर जिल्ह्यात या प्रकरणाबाबत चर्चा झाली होती मात्र काही दिवसांनी त्याबाबत कोणत्याही बातम्या बाहेर आल्या नाही. पोलिस तपास चालू आहे असे सांगत होते जवळ जवळ दुर्लक्ष करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न राजकीय नेते, जातीय संघटनांचे नेते आणि पोलीस मिळून करत होते. परंतु मानवी हक्क चळवळीच्या कार्यकर्त्या मनीषा टोकले, प्रियदर्शनी तेलंग, सिद्धार्थ शिंदे, राजस्थान काळे, संदीप म्हस्के यांनी हे प्रकरण लावून धरले व आय.बी.एन.लोकमत या लोकप्रिय मराठी वृत्त वाहिनीतून त्यात घमासान चर्चा झाली.तसेच अनेक वृत्त वाहिन्यांनी या बातमीला प्रसिद्धी दिली त्यामुळे ते प्रकरण महाराष्ट्राला आणि देशाला कळू शकले. मिडीयाच्या या परिणामकारक आणि प्रभावी भूमिकेमुळे गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घातले तसेच निवृत्त न्यायाधीश व राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी.एल.थूल यांनी देखील येथे भेट देऊन हत्येच्या कारणाला केंद्र करून तपास करण्याचे आदेश दिले.

सी.आय.डी. तपासाचा सावळागोंधळ-
दि.५ फेब्रुवारी रोजी गृहमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास हा सी.आय.डी कडे सोपवला असल्याची घोषणा केली तर दि.१० रोजी पालकमंत्री बबनराव पाचपुते आणि मंत्री लक्ष्मनराव ढोबळे यांनी सी.आय.डी तपासावर मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाईल असे सांगितले त्यामुळे सरकार या प्रकरणात गंभीर तर नाहीच पण दिशाभूल करीत असल्याचे समोर आले आहे.

मराठा जात-संघटनांची प्रतिक्रिया -
हत्याकांडाची महिनाभरानंतर सगळीकडे चर्चा सुरु झाल्यावर आणि नागरिकांचा दबाव वाढायला लागल्यावर मराठा संघटनेचे नेते संभाजी दहातोंडे यांनी "मराठ्यांना बदनाम करू नका" अश्या प्रकारे उलटाच पाढा वाचला. इतर वेळी याच संघटना दलित अत्याचार विरोधी कायद्याला तीव्र विरोध करीत असतात. फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ कायम दलित-बहुजन यांना मित्र असल्याचे सांगत असतात पण या घटनेचा विरोध करण्यासाठी मात्र या संघटना रस्त्यावर का उतरल्या नाहीत? असा प्रश्न विचारला जात आहे. सोनई येथे गावात गेल्यावर काही मराठा जातीतील लोक दरंदले यांच्या मुलीवर ज्यांची हत्या झाली आहे ते दलित मुल बर्याच दिवसापासून लैंगिक अत्याचार करीत होते अश्या अफवा पसरवीत होते परंतु या हत्येच्या केवळ काही दिवस अगोदर राहुल कामावर नवीन कर्मचारी म्हणून रुजू झाला होता, तसेच दरंदले यांच्या मुलीने याबाबत कोणताही जबाब पोलिसांना दिला नाही, तसेच सचिन ने स्वताच्या छातीवर त्या मुलीचे नाव गोंदलेले होते आणि ते लग्न करणार होते, सचिनचे तिच्यावरील प्रेम आणि बाकीच्या घटना पाहता ही अफवा जाणीव पूर्वक पीडितांना सहानभूती मिळू नये आणि या अत्याचार विरोधी आंदोलनाचे नैतिक खच्चीकरण करता यावे यासाठी काही जातीयवाद्यांचे कारस्थान आहे.

"त्या"मुलीचे काय झाले?
दरंदले यांच्या मुलीला पोलिसांनी २ वेळा जबाब नोंदवायला बोलावले होते पण भीती आणि मानसिक दबावाखाली तीने कोणताही जबाब दिला नाही, संदीपचे कुटुंबीय जेव्हा घटना स्थळ पाहण्यासाठी गेले तेव्हा त्यांना पाहून ती बेशुद्ध पडली असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. जे लोक खोट्या जातीय प्रतिष्ठेसाठी तीन दलित युवकांचा खून करू शकतात ते आपल्याला ही मारून टाकू शकतात याची भीती असल्याने तीने काहीही बोलण्यास नकार दिला आहे. पण तीचे अश्रू बरेच काही सांगून जातात.

पंकज थनवर याच्या सरकारकडे मागण्या-

संदीपचा भाऊ पंकज याने सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत
१) राजकीय दबाव प्रचंड असल्याने या प्रकरणाचा तपास एक तर सी.आय.डी. कडे द्यावा किंवा संवेदनशील, निरपेक्ष आणि प्रामाणिक पोलिस उप-अधीक्षक या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमावेत.
२) या प्रकरणाचा खटला हा अहमदनगर जिल्ह्याबाहेर नाशिक किंवा जळगाव जिल्ह्यात चालवला जावा.
३) हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा.
४) या खटल्यात मृत व्यक्तींच्या बाजूने सरकारी वकील उज्ज्वल निकम नियुक्त व्हावेत.
५) कुटुंबियांना खटला पूर्ण होईपर्यंत जिल्ह्य बाहेरही संरक्षण द्यावे. पुनर्वसनाची मागणी
या दलित हत्याकांडात जे तरुण मारले गेले ते तीघेही घरातील कर्ते आणि कमावते होते, संपूर्ण कुटुंब त्यांच्यावर अवलंबून होत. त्यांच्या हत्येने त्यांच्या कुटुंबियांचा आधार गेलाय, समाज कल्याण खात्याकडून दिली गेलेली मदत पुरेशी नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निधीतून प्रत्येक कुटुंबाला किमान १० लाखाची मदत करावी, संदीपची पत्नी ही शिकलेली आहे आणि तिच्यावर त्यांच्या एक वर्षाच्या मुलाची जवाबदारी ही आहे त्यामुळे सरकारने तिला नौकरी द्यायला हवी. सचिन घारू याला कुणीही भाऊ नाही त्यामुळे तिची आई आता मुलीकडे एरंडोल जळगाव येथे राहते आहे तिलाही सरकारने उत्पादनाची साधने द्यावीत किंवा त्याच गावात जमीन द्यावी जेणे करून त्या मुलीच्या आधाराने जगू शकतील. आरोपींना शिक्षा आणि पुनर्वसनाशिवाय कुटुंबियांना आणि जातीयवादाला बळी पडलेल्या तीनही तरुणांना न्याय मिळणार नाही.

Honour killing (?)

Honour killing या शब्दाला माझा आक्षेप आहे, त्यामुळे या प्रकरणाला मी Honour killing म्हणणार नाही किंवा तसा शब्द वापरणार नाही. कारण प्रतिष्ठेसाठी बळी (?) म्हणजे कोणाची प्रतिष्ठा? आणि कशाच्या आधारावर? तर त्याचे उत्तर याच संकल्पना मधून सुचित होते कि उच्च जातीय लोकांची प्रतिष्ठा आणि ती देखील जातीच्या आधारावर. मग जे लोक दलित-बहुजन स्त्री-पुरुष आहेत आणि जात-उतरंडीत खालच्या स्तरावर आहे त्यांना माणूस म्हणून प्रतिष्ठा- आत्मसन्मान- अस्मिता नाही काय? हा शब्द जातीय उतरंडीमुळे होणार्या अत्याचारावर बोळा फिरवतो आणि स्त्रीला तिचा जोडीदार निवडीच्या स्वातंत्र्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे याला जातीयवादातून झालेली हत्याच म्हणावे लागेल.मनुस्मृती मधील ३/१२ चा श्लोक हा शूद्रांना उच्च वर्णातील स्त्रीशी विवाह करण्याला बंदी करतो हे लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे या शब्दाच्या वापरातून जात-पित्रुसत्तेने निर्माण केलेले संरचनात्मक दुय्यमत्व आणि शोषणाकडे दुर्लक्ष होते आणि धर्म-राजकीय-सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिक अश्या सर्व घटकांशी याचा संबंध नाही असे सुचित होते.परत्नू अश्या जातीय अत्याचाराची बीजे ही याच ब्राह्मणी व्यवस्थेत आहे हे लक्षात घ्यावे लागेल.

आपण काय करू शकतो?

१) आपण या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना याबाबत कायम विचारणा करू शकतो, न्याय मिळावा यासाठी आंदोलने, मोर्चे यातून नैतिक दबाव सरकारवर आणावा लागेल.
२) सरकारकडे कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी आग्रह धरावा लागेल.शक्य असल्यास आपण त्यांना मदत करू शकता.
३) सर्वात महत्वाचे अश्या प्रकारच्या कोणत्याही अत्याचाराबाबत कायम आवाज उठवावा लागेल, आंतरजातीय-धर्मीय विवाह करणाऱ्याना पाठींबा, संरक्षण आणि प्रतिष्ठा द्यायला हवी. संघटीतपणे अश्या जातीयवादाच्या हिंसाचाराविरोधात आणि ब्राह्मणी व्यवस्थेविरोधात एकजूट होऊन लढा उभारावा लागेल.
पंकजशी या विषयावर माहिती घेताना तो भावनाशील झाला आणि शेवटी म्हणाला "देशाचं संरक्षण करताना आम्ही जात-धर्म विसरून आपल कर्तव्य पार पाडीत असतो. पण जर याच जाती-धर्मांमुळे आमच्या कुटुंबियांच्या हत्या होत असतील तर मग आम्ही देशाचे रक्षण का करायचे? आम्ही शत्रूच्या सैनिकाला पकडल्यावर देखील त्याचे देखील हात,पाय आणि डोक तोडून टाकण्याइतकी अमानुष शिक्षा आम्ही त्याला देत नाही, माणूस म्हणून जर समाज जगूच देत नसेल तर काय करायचं? त्यांची ताकद खूप आहे, आम्हाला न्याय मिळाल का? पंकजच्या या प्रश्नच उत्तर माझ्याकडे नाही, तुम्ही देऊ शकता का त्याच्या प्रश्नाला उत्तर.
( हा रिपोर्ट लिहिताना मानवाधिकार चळवळीच्या मनीषा टोकले यांच्याशी झालेल्या चर्चेची मदत झाली)
-------------------------------------


लेखं- कुणाल शिरसाठे.

(अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा कार्यकर्ता.)

Thursday 11 January 2018

पंचनामा पुर्ण...?

पंचनामा पुर्ण...?

दंगलीत कोरेगाव - भीमा, सणसवाडीत 'साडे नऊ' कोटींचे नुकसान...?

चारचाकी - 116, दुचाकी - 95, तीनचाकी - 5, घरे - 18, दुकाने हाॅटेल - 82, गॅरेज - 14 या सर्वांचे मिळुन साडे नऊ कोटी नुकसान झाल्याचा 'नायब तहसिलदार' यांचेकडुन पंचनामा पूर्ण (?) झाला असुन अहवाल राज्यशासनाकडे पाठविणेत येत आहे.
यात अभिवादन करण्यास आलेल्या लोकांचे नुकसान सामील आहे का ? त्यांच्या उध्वस्त वाहनांचे पंचनामे केलेत का ? कोरेगाव - भीमा, सणसवाडीत हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांची यादी ?

यासाठी 'माहीती अधिकारा'चे अर्ज तयार ठेवा...

खरे तर... अभिवादनास आलेल्या पिडीत लोकांनी 'तक्रारी'च नाहीत नोंदवल्यात...? अभिवादन करण्यास आलेले लोक बाहेरगावचे होते, तेथुन बाहेर पडणे त्यावेळेस गरजेचे होते...

तरीही... बांधवांनो तक्रारी नोंदवा, तुमच्या स्थानिक पोलिस स्टेशनला नोंदवा... तुमच्या गाड्यांना विमा असला तरीही त्यांना एफआयआर लागतेच, नुकसान भरपाईसाठी तुमचे ही पंचनामे हवेत... तक्रार दाखल करण्यासाठी अडचण येत असेल तर माझ्याशी संपर्क साधा...

तुम्ही पिडीत असुन तक्रारी न नोंदवता, रस्त्यावर उतरुन निषेध नोंदवलात, परिणामी तीथे ही तुम्हीच दोषी झालात...

मोठ्या फुशारकीने म्हणता, "कायदा आमच्या बापाचा", पण वापरायचा कोणी ?

नुकसान दोन्ही बाजुचे झालेय ? पण केलेय कोणी ? याचे सुञधार कोण ? याचा पुराव्यानिशी शोध घेऊन दोषींना तुरुंगात डांबुन त्यांच्या मिळकतीमधुन नुकसान भरपाई वसुल करुन घ्यावी...

- अॅड. राज जाधव, पुणे...!

'असहकार्य' की 'बहीष्कार'...?

'असहकार्य' की 'बहीष्कार'...?

घटनेच्या दिवशी गावातील सर्व दुकाने बंद ठेवुन अभिवादन करण्यास आलेल्या समुदायास कसलीही मदत करावयाची नाही, असे वरिष्ठ पोलिस अधिकारयांच्या पाहणीतुन स्पष्ट झाले आहे.


तसेच... त्याला अनुसरुन कोरेगाव - भिमा येथील ग्रामपंचायतीने 'बंद' चा ठराव पास करुन घेतल्याचे प्रसिध्दी पञकावरुन दिसुन येतेय...
शेकडो मैलांवरुन आलेल्या गोर गरीब जनतेला पाणी ही न मिळु देणे, एवढ्या नीच मानसिकतेची नोंद जगात नाही...

दरवर्षी हाॅटेल्स, ढाबे, नाश्ता हाऊस, इतर दुकाने चालु असतात लोकांना कधीच अडचण आली नाही, यंदाच असे का घडावे...
नाशीकवरुन आलेल्या एका महीलेने घरातचं दुकान असलेल्या दुकानदाराला पाण्याच्या बाटलीला शंभर रुपये देऊ केले तरीही त्या महिलेला पाणी न देता, जयभिमवाल्यांना काहीही द्यायचे नाही, असा आदेश असल्याचे सांगण्यात आले, कोणी दिले हे आदेश ?
ग्रामस्थांचा हा असहकार मानवतेला काळीमा फासणारा आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, दंगलीची शक्यता होती, मग दंगलीची शक्यता तुम्हांस दोन दिवसापुर्वी कशी आली व तुम्ही दोन दिवस अगोदरचं 'बंद' चा ठराव पास करुन घेतलात. यापुर्वी अभिवादन करण्यास येणारे हेच लोक होते, तेव्हा का दंगलीची शक्यता भासली नाही ?
कारण, दंगल होणार हे पुर्व नियोजित होते, ग्रामस्थांना हे दोन दिवस अगोदरचं माहीत होते ?
तर हो... कारण पोलिस अधिकारयांच्या पाहणीनुसार 29 व 30 डिसेंबरला छ.संभाजी महारांच्या समाधीस्थळाला अभिवादन करायला आलेला जमाव दोन दिवस गावातचं होता, तो कशासाठी थांबला होता ? त्यांना ग्रामस्थांनी का शरण दिले ? कोणाच्या इशारयावरुन दिले ?
त्यामुळे वढु बु., कोरेगाव - भीमा, शिक्रापुर येथील ग्रामस्थ देखील या 'criminal conspiracy' चा एक भाग म्हणावे लागतील. त्यामुळे त्यांचेवर देखील गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे.
मुळ मुद्दा आहे 'असहकाराचा', असहकार, बंद कोणाविरुद्ध तर एका विशिष्ट जमावाविरुद्ध... अभिवादनास येणारया लोकांविरुद्ध....
ज्या लोकांवर हल्ले झाले, गाड्या जाळल्या त्या लोकांना तेथुन बाहेर पडण्यासाठी कोणतेही वाहन नव्हते, हाॅस्पीटल्स बंद होते, मदत सोडा साधे पिण्यासाठी पाणी नाही...
त्यामळे एका विशाष्ट समाजास सहकार्य न करणे, हा एक प्रकारे 'सामाजिक बहिष्कार'चं आहे...
त्यामुळे कोरेगाव - भिमा ग्रामपंचायत, शिक्रापुर, वढु बु. व इतर ग्रामस्थ यांचेवर सामाजिक बहिष्कार अधिनियमा अंतर्गत गुन्हा नोंदवावा.

जेणे करुन पुढील वर्षी असा 'माणुसघाणेपणा' करताना याचा पुन्हा पुन्हा विचार केला जाईल.

- अॅड. राज जाधव, पुणे...!

'अत्याचारग्रस्तांनो' त्वरित एफआयआर (FIR ) नोंदवा...

'अत्याचारग्रस्तांनो' त्वरित एफआयआर (FIR ) नोंदवा...

पीडितांनो जर इच्छितस्थळी सुखरूप पोहचला असला तर... पुढची स्टेप म्हणून तुमच्यावर झालेल्या हल्ल्याची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात त्वरित नोंदवा...
तुमच्यावर हल्ले जातियेतून झालेले आहेत, त्यामुळे ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे नोंदवा, तुम्हास जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेलाय भादंविच्या कलम ३०७ अंतर्गत गुन्हा रजिस्टर व्हायला हवा, दंगल घडविणे, खाजगी तसेच सरकारी मालमत्तेस बाधा पोहचवली आहे, जीवास धोका निर्माण केला आहे, दहशत माजवली आहे... त्यामुळे एन सी न नोंदवता एफआयआर नोंदवणे गरजेचे आहे...
लवकरात लवकर तक्रार दाखल करा... कोणत्याही कारणास्तव उशीर होता कामा नये, कारण 'एफआयआर' करण्यास उशीर झाला तर त्याचा अर्थ बनावट खबर दिली म्हणून आरोपीला फायदा देण्याबाबत उच्च न्यायालयाने अनेक निर्णय दिलेले आहेत, त्यामुळे उशिरा फिर्याद द्याल तर आरोपी सुटू शकतो.
एफआयआर देताना तुम्ही देत असलेली खबर व्यवस्थित आणि काळजीपूर्वक द्या, अत्याचारित व्यक्तीचे संपूर्ण नाव, वय पत्ता आणि जात नमूद करावी, गुन्ह्याची तारीख, वेळ, स्थळ अचूक हवे..
ज्या प्रमाणे काल जे हल्लेखोर हल्ले करत होते त्यांचे वर्णन व्यवस्थित द्या (कारण त्यांची नावे आपणांस ठाऊक नाहीत) तसेच अत्याचार करणारांची जात माहित नसली तरी त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून व्यक्त झाली असेल तर ती हि नमूद करा...
कारण ऍट्रॉसिटी प्रकरणात गुन्हा करताना आरोपी व्यक्तीस सदर व्यक्ती अनुसूचित जाती / जमातीची होती हे माहित असणे व जात बघूनच गुन्हा घडला" असे कोर्टास अपेक्षित असते.
परंतु अज्ञानामुळे फिर्यादी खबर व्यवस्थित देत नाही, परिणामी एफआयआर वीक होते, आणि या सर्व बाबींची पूर्तता न झाल्यामुळे अनेक प्रकरणात आरोपीला फायदा देऊन सोडून देणारे विशेष न्यायालयाचे, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आहेत.

म्हणून ऍट्रॉसिटी अंतर्गत खबर देताना / एफआयआर नोंदवताना त्यात खालील गोष्टी समाविष्ठ करण्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे, आणि या गोष्टी अत्याचारित व्यक्तीने एफआयर मध्ये नमूद कराव्यात -
1) आरोपीस "पीडित व्यक्ती" अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची आहे हे माहित होते.
2) आरोपीने "पीडित व्यक्तीवर तो अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची आहे म्हणून अत्याचार केला.
3)पीडित व्यक्ती अज्ञान असेल तर त्याच्या पालकाने किंवा नातेवाईकाने फिर्याद नोंदवावी.
4)घटना घडताना कोण साक्षीदार असतील तर त्यांची नावे द्यावीत, (पोलीस सांगतात, साक्षीदार सवर्ण किंवा एस्सी/एसटी व्यतिरिक्त हवा, असे कायद्यात कुठे हि नाही ) कोणीही साक्षीदार चालतील. (परंतु खोटे बाकदार देऊ नका, न्यायालयात आरोपीला त्याचा फायदा होईल.
5) फिर्याद देण्यास उशीर झाला असेल तर, योग्य खुलासा करून स्पष्टीकरण द्या, कोर्टात कारण योग्य असल्यास विलंब माफ करू शकते.
6) घटना जशी घडली असेल तशीच लिहावी, रंगवून लिहू नये, खोटे लिहू नये.
7) पोलीस फिर्याद नोंदवून घेण्यास टाळाटाळ करत असेल, धमकावत असतील तर जवळील एसीपी कार्यालयात पोलिसांविरुद्ध लेखी तक्रार द्या. फिर्यादीची / एफआयआरची एक प्रत पोलिसांकढुन घ्या, (विनामूल्य असते)
9) एफआयआरची प्रत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, एसपी, कलेक्टर,नोडल ऑफिसर यांनी देखील पाठवा.
10) राजकीय हेतूसाठी कोणी खोटी फिर्याद देण्यास सांगत असेल तर तसे करू नका कायद्याने गुन्हा आहे, आणि तसे केल्यास टी व्यक्ती चिडून तुमच्यावर खरोखर अत्याचार करू शकते.
11) खोटी तक्रार देणे म्हणजे अत्याचारास प्रोत्साहन देणे होय.
12) अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांनी जर एखाद्याचा "खोटी तक्रार करण्याचा उद्देश" निदर्शनास आल्यास त्यास मज्जाव करावा.
13) पीडित व्यक्ती रक्ताने माखला असेल तर त्याने ते कपडे पोलिसांत जमा करावे, जप्ती पंचनामा करून घ्यावा.
14) पीडित व्यक्तीवर / साक्षीदारांवर कोणी दबाव टाकत असेल, बहिष्कार करत असेल, दमदाटी करत असेल तर हि बाब जिल्हा समाज कल्याण अधिकारी, एसपी, कलेक्टर, नोडल ऑफिसर यांनी कळवा, संरक्षण अथवा पुनर्वसनाची मागणी करा.
15) सीआरपीसी सेक्शन 195 - अ साक्षीदारास धमकी दिली तर फिर्याद नोंदवत येते.
16) पीडित जखमी व्यक्तीने मेडिकल करताना सरकारी दवाखान्यात मेडिकल ऑफिसरला गुन्हा कास घडला, गुन्ह्यात कोणते हत्यार वापरले याची माहिती द्या. त्याची नोंद एमएलसी रजिस्टर करून घ्या.
17) पीडित व्यक्तीने फिर्याद दिल्यानंतर आरोपीने दरोडा/ खंडणीची खोटी क्रॉस कम्प्लेंट दिल्यास, तो देखील दुसरा अत्याचारच होय, म्हणून या अत्याचाराबाबत सुद्धा दुसरी फिर्याद सादर करावी, त्याची कल्पना एसपीला द्यावी.
जर वरील मुद्दे पीडित व्यक्तीने एफआयआर मध्ये घेतल्यास आरोपीस शिक्षा होण्यास नक्कीच मदत होईल, आरोपी सुटणार नाहीत...
बांधवांनो स्वतः कायदा हातात घेऊ नका, कायद्याने लढा देऊयात, अत्याचारित बाधित व्यक्तींनी लवकरात लवकर आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत स्थनीक पोलिस स्टेशन मध्ये 'एफआयआर' नोंदवावी... शकतो तक्रार लेखी द्या, पुढील कार्यवाहीसाठी त्याची पोच घ्या...
शांतता राखा... कायदा हातात घेऊ नका...

- अॅड.राज जाधव, पुणे...!