My Followers

Friday 27 July 2012

"जयभीम" म्हणजे जोहार नव्हे....!!!

"जयभीम" म्हणजे जोहार नव्हे....!!!

     जय भीम म्हटले की, संपूर्ण शरीरात स्फुल्लींग चेतविले जाते. कारण जयभीम म्हणजे लाचारी नव्हे, जयभीम म्हणजे गुलामी नव्हे, जयभीम म्हणजे जोहार नव्हे तर जयभीम म्हणजे आत्मभान. जयभीम म्हणजे चैतन्य. जयभीम म्हणजे अन्यायाविरुद्धचा बंड. जयभीम म्हणजे ऊर्जा, जयभीम म्हणजे स्वाभीमान. जयभीम हा शब्द उच्चारताच धमण्यांमधील रक्तात एक विलक्षण बदल झाल्याची जाणिव होते. त्यामुळेच जयभीमवाल्यांनी जयभीम हा स्वाभीमानानेच उच्चारला पाहिजे. जयभीमचा उच्चार तेच करतात ज्यांच्या नसानसात जयभीम आहे. 

    परवाच तब्बल आठदिवसाच्या अडथळ्यानंतर महाराष्ट्रराज्याच्या नवीन मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला. त्या शपथविधीवेळी डॉ. नितीन राऊत आणि प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतांना "जयभीम' चा जयघोष केला त्यावेळी अक्षरश: अंगावर रोमांच उभारल्याचा अनुभव आम्ही घेतला. ते रोमांच शेजारी असणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांनीही पाहिले. जयभीम म्हणायला खूप मोठ धाडस असायला लागते. कारण जयभीम नुसत उच्चारुन चालत नाही. त्याची नाळ जयभीमशी जुळलेली असावी लागते. ती घट्ट असावी लागते. इकडंबी अर्धा आणि तिकडंबी अर्धा असून चालत नाही. तर मोठ्या अभिमानाने जयभीम हा शब्द आपोआपच बाहेर पडतो. ज्यांना शपथविधी पाहता आला नाही. त्यांचा  दै." वृत्तरत्न सम्राट'चा अंक पाहताच ऊर अक्षरश: आनंदाने भरून आला. 

    एरवी पुरोगामीत्वाचा डांगोरा पिटणारे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाचा जप करणारे मंत्रीपदाची शपथ घेतांना मात्र ईश्वराला साक्षी ठेवत होते. त्यावेळी फुले, शाहू, आंबेडकर बहुदा त्यांच्या ध्यानीमनीही नसावेत. तर खरे बहाद्दुर भीमसैनिक असणारे, धम्माचे अनुसरण  करणारे ना. नितीन राऊत यांनी मात्र गौतम बुद्धांना साक्ष ठेऊन शपथ घेतली. ते शपथ घ्यायला उभे राहताच, "डॉ. बाबासाहेबांचा विजय असो' अशा घोषणांनी जेंव्हा राजभवन दणाणून गेले तेंव्हा कुठे महाराष्ट्राची ओळख पुरोगामी वाटली. प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी मंत्रीपदाची गांभीर्यपुर्वक शपथ घेऊन समारोप जयभीमने केला हा झाला स्वाभीमान. ग्रामपंचायतपासून ते लोकसभेपर्यंत निवडणूक लढविणारेही जे जन्माने बौद्ध असणारे आंबेडकरी विचाराचे म्हणवून घेणारे आपण पाहिले आहेत. हे निवडून आले की, "माझा विजय हा अण्णांच्यामुळे, दादांच्यामुळे, भाऊंच्यामुळे' असे म्हणतात. विजय झाला की एखाद्या देवदर्शनाला जातात. कोण याचे श्रेय पक्षप्रमुखाला देतात. त्यावेळी ते जयभीमला विसरतात. ना. राऊत आणि ना. गायकवाड यांनी जयभीमचा जयघोष करून हा नुसता शब्द नव्हे तर जयभीम हाच आमच्या आयुष्यातील सर्वस्वाचा मानदंड असल्याचे दाखवून देऊन आपला भीमबाणा दाखविला.

एखाद्या फालतू विषयावर रकानेच्या रकाने लिहीणाऱ्या प्रस्थापीत वृत्तपत्रांना मात्र याची दखल घ्यावीशी वाटली नाही. कारण एखादी गोष्ट अनुल्लेखाने मारणे हे मनुवाद्यांचे षड्‌यंत्रच आहे. ही मनुवादी विकृत्ती आहे. पण "म्हातारीने कोंबडे झाकून ठेवले म्हणून पहाट व्हायची थांबत नाही. दै. "वृत्तरत्न सम्राट'ने ही घटना संपूर्ण राज्यात पोहोचवली. आपणही "जयभीम' हा शब्द परवलीचा बनविला पाहिजे. त्यासाठी आपण ना. डॉ. राऊत आणि ना. प्रा. वर्षाताई गायकवाड यांचे अनुकरण करायला हवे. या दोन्हीं मंत्र्यांच्या जाणिवेमागचे, भावनेमागचे तत्वज्ञान अगदी साधे सरळ आहे. ते करत असलेल्या जयभीच्या उच्चाराने एकदम परिवर्तन घडून भीमराज्य येईल असे नाही. त्यांच्यासारख्या जाणीवेने स्वत:ला आंबेडकरवादी म्हणविणाऱ्यांनी "जयभीम"चा उच्चार स्वाभीमानपूर्वक, मन:पुर्वक केल्यास मनुवादाविरुद्धची पायवाट मळली जाणार आहे. आणि एखादी वाट एकदा का मळली की तीचा राजमार्ग व्हायला वेळ लागणार नाही. 

    स्वत: जन्माने बौद्ध असणारे, आंबेडकरवादी म्हणवून घेणारे कांहीजण तर बौद्धाचार्य म्हणवून वावरणारे जयभीम म्हणायला लाजतात, दचकतात. जयभीम म्हटले की, मानेनेच अहंऽऽ असे करतात. अशी उदाहरणे पाहिली की, चळवळीवर, समाजावर, चिंतेचे ढग जमा झाल्यासारखे वाटते. ना. राऊत आणि प्रा. ना. गायकवाड यांनी हे ढग पळवून लावले आहेत. या निमित्ताने जयभीम "चा' जयघोष पुन्हा आसमंतात घुमू लागला आहे. आपणही त्याचे अनुकरण करायला हवे. फक्त आपल्याला आपल्या कार्यक्रमातच "जयभीम' बाकीकडे मात्र जयहिंद असे झाल्यास आपली वाटचाल "जयभीम बोलो  और किधरभी' चलो अशीच होत राहिल.

( विद्याधार कांबळे यांच्या ब्लॉग वरून साभार 

5 comments:

  1. wachun navi umed jagi zali..chetwalat..jay bhim madhil bhakti,shakti chi aaj garaj aahe karan jay bhim mhanje iman jay bhim mhanje swabhiman..jay bhim mhanje nishta aani tyag..mhanunach mhanto jay bhim amucha shwas aahe jay bhim amucha dhyas.. Jai bhim.

    ReplyDelete
  2. ‎'जय भिम' म्हणजे शक्ती ...
    'जय भिम' म्हणजे युक्ती... !!!
    'जय भिम' म्हणजे आसक्ती...
    'जय भिम' म्हणजे ३३ कोटी देवापासून मुक्ती... !!!

    ReplyDelete
  3. जय भीम म्हणजे स्वाभिमान
    जय भीम म्हणजे अन्यायाचा प्रतिकार
    जय भीम म्हणजे धगधगता ज्वालामुखी
    जय भीम म्हणजे कर्म कांडापासून मुक्ती

    ReplyDelete
  4. Khup Chan Mahiti ahe pratek lekhat, ani lekhnit ....

    ReplyDelete