My Followers

Tuesday 10 July 2012

रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड...!!

 रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड...!!

११ जुलै 1997 ला  जातीवादी हरामखोर  राज्य राखीव दलाचा पोलीस फौजदार मनोहर कदम  याने भ्याडपणे गोळीबार केला. या गोळीबरात सुखदेव कापडणे ,संजय निकम ,बबलू वर्मा, अनिल गरुड, किशोर कटारनवर, संजय कांबळे, विलास दोडके, मंगेश शिवसरने, अमन धनावडे, कौसल्या पाठारे असे 10 जण ठार झाले होते तर 23 जण जखमी झाले. या भ्याड  हाल्यात शहीद झालेल्या भीमसैनिकांना विनम्र अभिवादन.

आज (११ जुलै) रमाबाई नगर, मुंबई हत्त्याकांडाचा स्मृतिदिन आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात रमाबाई नगर हत्त्याकांडात भिमसैनिकांवरील जातीवाद्यांचा व पोलिसी बळाचा वापर करून झालेला हल्ला भिमसैनिकांवरील मोठ्या अत्याचाराच्या घटनेत अतिशय निंदनीय आहे. स्वतंत्र भारतात वावरणा-या जातीयवादी षंड प्रवृतींचा आंबेडकरी समूहावरील द्वेष जगासमोर आणणारी हि घटना होती. या हत्त्याकांडत अनेक भीमसैनिकांना, आबाल माया बहिणींना, वृद्धांना आणि लहान लहान भीमसैनिकांना पोलिसाच्या अत्याचाराचे शिकार होऊन शहीद व्हावे लागले होते. त्यामुळे भिमसैनिकांसाठी हा काळा दिवस आहे. इथल्या लोकांशी बोलताना ‘ती’ घटना घडल्यानंतचं सर्व काही डोळ्यांसमोर पुन्हा एकदा उभं राहतं-

११ जुलै १९९७ची सकाळ घाटकोपरच्या रमाबाई नगरासाठी दुर्दैवी सकाळ ठरली. कुणीतरी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची बातमी वस्तीत वणव्यासारखी पसरली आणि हा हा म्हणता हजारो लोक रस्तावर उतरले. घाटकोपरचा हाय वे या संतप्त लोकांनी बंद पाडला. 
या वेळी लोकांना आवरण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या तुकडीने मात्र माणूसकीला काळीमा फासला. या दलाचे नेतृत्व करणाऱ्या सब-इन्स्पेक्टर मनोहर कदम याने पोलिसांना संतप्त जमावावर फायर करण्याचे आदेश दिले. या फायरिंगमध्ये १० जणांचा बळी गेला, तर २६जण जखमी झाले. गंभीर गोष्ट म्हणजे, पुतळा विटंबना झाली ते ठिकाण तसंच संतप्त जमाव जिथे रास्ता रोको करत होता ते ठिकाण आणि कदमच्या आदेशामुळे फायरिंग करण्यात आलेली जागा यांच्यात सुमारे २००मीटरचं अंतर होतं. म्हणजे संतप्त जमावाला आवरण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला नव्हता, हे स्पष्टच आहे. 

दरम्यानच्या काळात रमाबाई नगराला भेट द्यायला आलेल्या रामदास आठवलेंनाही त्यांच्याच समाजाच्या लोकांनी पिटाळून लावलं होतं!
संतप्त लोक कुणाचंच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांची एकच मागणी होती- निरपराधांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या मनोहर कदमला फाशी देण्यात यावी. 
त्यासाठी कदमवर कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदवणं आवश्यक होतं. पण राज्य सरकारने त्याच्याविरोधात कलम ३०४ अन्वये गुन्हा नोंदवला. आता न्यायालयाने कदमला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा ही कलम ३०४अन्वये देण्यात येणारी सर्वात मोठी शिक्षा आहे..

या सर्व घटनेला एक राजकीय पाश्र्वभूमी देखील आहे. ती सुद्धा समजून घेणं खूप महत्वाचं ठरेल. ही घटना घडली तेव्हा राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं. कदमने केलेला गोळीबार योग्य होता, हे दाखवणसाठी टँकर स्टोरी रचण्यात आली, असं इथला प्रत्येकजण सांगतो. पुढे ही टँकर स्टोरी युती सरकारला महागात पडली, हे वेगळं सांगायला नकोच.

रमाबाई नगरातल्या या हत्याकांडानंतरच राज्यातल्या दलित समाजाने युती सरकारला जातीयवादी ठरवलं आणि पुढच्याच विधानसभा निवडणुकीत घरचा रस्ता दाखवला. पण युतीच्या पाठोपाठ सत्तेवर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारनेही दलितांच्या तोंडाला पानंच पुसली. मनोहर कदमसाररखा अधिकारी पोलीस दलात ठेवणं धोकादायक असल्याचा अभिप्राय आपल्या चौकशी अहवालात देणाऱ्या गुंडेवार आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन काँग्रेस आघाडीने तेव्हाच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी दिलं होतं. शिवाय, कदम याच्यामुळे रमाबाई नगरीत झालेला गोळीबार आणि पोलिसांच्या बळाचा अतिरेकी वापर अनाठायी होता, असा ठपकाही आयोगाने ठेवला होता. असं असतानाही राज्य सरकारने त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यास तब्बल चार र्वष लावली. या संपूर्ण काळात विविध दलित संघटना आणि दलित कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीमुळे अखेर २० डिसेंबर २००२ रोजी कदम याला अटक करण्यात आली. पण कदमने मात्र कोठडी टाळण्यासाठी आजारी असल्याचं सांगत रूग्णालयात अटकेचे दिवस काढले. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी कदम पोलीस गणवेषात न्यायालयात हजर होत असे. त्याच्या या कृतीमुळे साक्षीदारांवर दडपण येत असल्याचा आरोप करत त्याच्या निलंबनासाठी गजानन लासूरे आणि अनिकेत देशकर या दोघा वकिलांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. ती न्यायालयाने मंजूर केली. गंभीर गुन्ह्यचा खटला सुरु असलेला पोलीस अधिकारी गणवेषात आणि सेवेत असल्यास लोकांचा फौजदारी न्याय प्रक्रियेवरील विश्वास उडेल, हे याचिकाकर्त्यांचं म्हणणं न्यायालयाने मान्य केलं. पण खटल्याला होत असलेल्या विलंबामुळे रमाबाई नगरवासीयांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला होता. 

सुरुवातीला याखटल्याच्या सुनावणीच्या वेळी दलित कार्यकर्ते मोठय़ा संख्येने न्यायालयात जमत होते. पण जसजशी वर्ष गेली तसतशी नियमितपणे न्यायालयात येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही कमी कमी होत गेली..

नंतर दलितांच्या रेटय़ामुळे अखेर सरकारने जलदगती न्यायालयाची स्थापना केली खरी, पण त्यातही सरकारचा पुढाकार दिसलाच नाही. अखेर शिवडीच्या जलदगती सत्र न्यायालयाने हा खटला १६ मार्च २००९ रोजी संपवला आणि एकदाचा याचा निकाल जाहीर केला. पण निकाल जाहीर करण्यासाठीही त्याचा दिवस दोनवेळा पुढे ढकलला. 
        अखेर ९ एप्रिल रोजी निकाल लागला. न्यायालयाने हरामखोर मनोहर कदमला रमाबाई नगर गोळीबारप्रकरणी दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली!

.....निकाल लागला खरा पण लढाई मात्र संपलेली नाही. ज्या लोकांवर मनोहर कदमने गोळीबार करण्याचे आदेश दिले, त्या साक्षीदारांनाच ‘दंगलखोर’ ठरवण्यासाठी त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले होते. त्यामुळे रमाबाई नगरातले सामान्य लोक ’आम्ही गुन्हेगार नाही’ हे सिध्द करण्यासाठी अजूनही धडपडताहेत, कोणतीही चूक नसताना न्यायालयात चकरा मारताहेत. कदमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. पण एका सराईत राजकीय गुन्हेगाराप्रमाणे तो ही शिक्षा टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करणार हे स्पष्टच आहे. त्यासाठी त्याला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयही आहेच. कदाचित त्याला जामीन मिळेल किंवा त्याच्या शिक्षेवर पुन्हा शिक्कामोर्तबही होईल. पण..

पण एक प्रश्न रमाबाई नगरातल्या प्रत्येकाच्या मानगुटीवर भूतासारखा बसलेला आहे.

प्रत्येकाला तो सतावतोय- 

   ११ जुलै १९९७ रोजी रमाबाई नगरातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना कुणी केली? रमाबाई नगरातल्या प्रत्येकाच्या मनात खदखदणारी गोष्ट ती हिच. का केली कुणी आमच्या दैवताची विटंबना?
       रमाबाई नगरातला प्रत्येक ‘मास्तर’ हाच प्रश्न सरकार नावाच्या ‘हिंदुरावां’ना विचारतोय. या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तो पर्यंत मास्तर आणि हिंदुरावांमधला हा ‘सामना’ असाच सुरु राहणार आहे. कदाचित हा ‘सामना’ संपत नाही तोपर्यंत तरी रमाबाई नगरातल्या लोकांना आपल्याला न्याय मिळालाय असं वाटणार नाही.
      तुम्हाला तरी माहितीए का;  का आणि कुणी केली  आपल्या  दैवताची विटंबना ?


(संदर्भ - या घटनेवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेख )

5 comments:

  1. रमाबाई नगर ही घाटकोपरला इस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या शेजारी असलेली एक वस्ती. १० जुलै १९९७ ला सकाळी वस्तीतल्या आंबेडकरांच्या पुतळ्याला कुणीतरी चपलांचा हार घातल्याचं दिसलं. याच्या निषेधार्थ ११ जुलैला निघालेल्या मोर्चावर पोलीस (एस. आर. पी.) गोळीबार झाला. त्यात दहाजण मारले गेले. मारले गेलेले फक्त मोर्च्यातले नव्हते तर बोळातल्या आपल्या घराच्या उंबरठ्यावर उभं राहून काय चाललंय ते बघणारेही होते. एक शाळकरी मुलगासुद्धा मारला गेला.

    ReplyDelete
  2. राज जाधव साहेब आपले लेख आपण मला ई मेल केलात तर आह्मी आमच्या दैनिकात छापू आपली लेखीने दलित जेन्ताला मार्ग दर्शक आहे ..
    dalyyutichakra@gmail.com

    ReplyDelete
  3. दीपरत्न साहेब तुमच्या प्रोह्त्सानाबद्दल खूप खूप आभार... मी नक्कीच या पुढे आणखी चांगले लिहण्याचा प्रयत्न करेन, आणि तुम्हास नक्की इमेल पाठवेन, जय भीम, जय भारत...!!!

    ReplyDelete
  4. very bad....feel very bad when our people just dont care about it!!!!!

    ReplyDelete