My Followers

Saturday 4 August 2012

उमलू द्या कळ्यांना.....!!!

उमलू द्या कळ्यांना.....!!!

डॉ. सुरेखा मुळे  यांनी 'महान्यूज' ह्या शासकीय संकेतस्थळावर प्रकाशित केलेला लेख आमच्या वाचकांसाठी पुन:प्रकाशित करीत आहोत. आपणही भीषण वास्तवाला सामोरे जात, त्याविषयी इतरांचे प्रबोधन करावे, त्यासाठी त्यांच्या परवानगी शिवाय इथे पोस्ट करत आहे. 

बाप म्हणे लेकी तु गं साखरेचं पोतं. . . परि तुझ्या नशिबाला जामीन कोण होतं ? असं समजून मुलीच्या जन्माचा जामीन नाकारण्याच्या वृत्तीमुळे आज सामाजिक विषमतेची दरी रुंदावतांना दिसत आहे.

जनगणना २०११ मधून स्पष्ट झालेलं वास्तव समजून घ्यायचे असेल तर यातील सांख्यिकीय माहितीकडे केवळ आकडेवारी म्हणून आपल्याला आता दुर्लक्ष करता येणार नाही. यातून स्पष्ट होणारी सामाजिक विषयमतेची दरी आणि त्यातून भविष्यात निर्माण होणारा गंभीर सामाजिक प्रश्न याकडे आपल्याला आत्ताच लक्ष द्यावे लागेल.

काय आहे वास्तव जाणून घेऊया !

जनगणना २०११ प्रमाणे भारताची लोकसंख्या १,२१०,१९३,४२२ इतकी आहे. त्यात पुरुषांची लोकसंख्या ६२३,७२४,२४८ तर स्त्रियांची लोकसंख्या ५८६,४६९,१७४ इतकी आहे. यामध्ये १ हजार पुरुषांमागे महिलांचे प्रमाण ९४० आहे. यातील ग्रामीण महिलांचे प्रमाण ९४७ तर शहरी भागातील महिलांचे प्रमाण ९२६ इतके आहे.

देशामध्ये केरळ राज्य हे लिंग गुणोत्तर सर्वात वरच्या स्थानावर असून तिथे १ हजार पुरुषांमागे १०८४ महिला आहेत. येथे ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण १०७७ आणि शहरी भागात १०९१ इतके आहे.

चंदीगढ च्या ग्रामीण भागात हे प्रमाण ६९१ इतके कमी आहे तर दमण आणि दीव मध्ये नागरी भागात लिंग गुणोत्तराचे प्रमाण देशात सर्वात कमी असून ते १ हजार पुरुषांमागे ५५० स्त्रिया इतके आहे.

देशातील आठ राज्यांनी ग्रामीण भागात लिंग गुणोत्तराच्या प्रमाणात घट दर्शविली असून यामध्ये जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, छत्तीसगढ, महाराष्ट्र कर्नाटक, आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे तर दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांने ही नागरी भागात स्त्रियांच्या प्रमाणात घट दर्शविली आहे.

२०११ च्या जनगणनेमध्ये शून्य ते सहा या वयोगटातील बालकांच्या लिंग गुणोत्तरात लक्षवेधी घट झाल्याचे दिसून आले आहे.२००१ च्या जनगणनेनुसार देशात या वयोगटात १ हजार मुलांमागे ९२७ मुली होत्या. त्यामध्ये ग्रामीण भागातील मुलींचे प्रमाण ९३४ इतके होते तर शहरी भागातील मुलींचे प्रमाण ९०६ इतके होते. २०११ मध्ये १ हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण कमी होऊन ९१४ इतके झाले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील प्रमाण ९१९ तर शहरी भागातील प्रमाण ९०२ इतके आहे.

म्हणजेच ग्रामीण भागात या वयोगटातील मुलींची घट ही १५ पॉईंटची आहे तर शहरी भागात ही घट ४ पॉईंटची आहे. मागील दशकात म्हणजे २००१ ते २०११ मध्ये १ हजार बालकांमागे दिल्ली राज्यात ग्रामीण भागात मुलींची संख्या सर्वात कमी झाली असून ती ८०९ इतकी आहे तर नागालँडमध्ये नागरी क्षेत्रात या वयोगटात लिंग गुणोत्तराचे सर्वात अधिक प्रमाण नोंदविण्यात आले असून ते १ हजार मुलांमागे ९७९ इतके आहे.

महाराष्ट्राची ग्रामीण आणि शहरी भागातील स्थिती समजून घ्यायची असेल तर आपल्याला २०११ च्या जनगणनेनुसार समोर आलेली आकडेवारी अभ्यासावी लागेल.

या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या एकूण ११,२३,७२,९७२ इतकी आहे. यामध्ये ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण ६,१५,४५,४४१ तर शहरी भागाची लोकसंख्या ५,०८,२७,५३१ इतकी आहे. यामध्ये पुरुषांची लोकसंख्या ५,८३,६१,३७९ इतके आहे. ती ग्रामीण भागात ३,१५,९३,५८० इतकी आहे तर शहरी भागात २,६७,६७,८१७ इतकी आहे. राज्यात महिलांची एकूण लोकसंख्या ५,४०, ११,५७५ इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांची लोकसंख्या २,९९,५१,८६१ तर शहरी भागातील महिलांची लोकसंख्या २,४०,५९,७१४ इतकी आहे.

दशकामध्ये राज्याच्या लोकसंख्येत १५.९९ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागाची टक्केवारी १०.३४ तर शहरी भागाची २३.६७ टक्के इतकी आहे.या वाढीत पुरुषांची टक्केवारी १५.८० तर महिलांची टक्केवारी १६.२१ टक्क्यांची आहे.

राज्यात शून्य ते सहा वयोगटात एकूण लोकसंख्या १,२८,४८,३७५ इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागातील लोकसंख्या ७४,४५,८५३ तर शहरी भागातील लोकसंख्या ५४,०२,५२२ इतकी आहे.

यामध्ये मुलांची एकूण लोकसंख्या ६८,२२,२६२ इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागातील लोकसंख्या ३९,६१,४२० तर शहरी भागातील लोकसंख्या २८,६०,८४२ इतकी आहे.

यामध्ये मुलींची एकूण लोकसंख्या ६०,२६,११३ इतकी आहे. ग्रामीण भागातील या वयोगटातील मुलींची लोकसंख्या ३४,८४,४३३ तर शहरी भागातील लोकसंख्या २५,४१,६८० इतकी आहे.

महाराष्ट्राची एकूण साक्षरतेची टक्केवारी ८२.९१ टक्के इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागाचे प्रमाण ७७.०९ तर शहरी भागाचे प्रमाण ८९.८४ टक्के इतके आहे.

एकूण साक्षरतेत पुरुषांची साक्षरतेची टक्केवारी ८९.८२ टक्के इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागातील पुरुषांची साक्षरतेची टक्केवारी ८६.३९ तर शहरी भागातील साक्षरतेची टक्केवारी ९३.७९ टक्के इतकी आहे.

एकूण साक्षरतेत महिलांची साक्षरतेची टक्केवारी ७५.४८ टक्के इतकी असून यामध्ये ग्रामीण भागाचे प्रमाण ६७.३८ टक्के तर शहरी भागाचे प्रमाण ८५.४४ टक्के इतके आहे.

बाप म्हणे लेकी तु गं साखरेचं पोतं. . .

परि तुझ्या नशिबाला जामीन कोण होतं ? असं समजून मुलीच्या जन्माचा जामीन नाकारण्याच्या वृत्तीमुळे आज सामाजिक विषमतेची दरी रुंदावतंना दिसत आहे. 

राज्यातील १९९१ ते २०११ लिंग गुणोत्तराचे प्रमाण

(एक हजार पुरुषांमागे महिला )

१९९१- २००१ - २०११

एकूण ९३४ - ९२२ - ९२५

ग्रामीण ९७२ - ९६० - ९४८

शहरी ८७५ - ८७३ - ८९९

राज्यातील १९९१ ते २०११ लिंग गुणोत्तराचे प्रमाण (शून्य ते सहा वयोगट एक हजार मुलांमागे मुली )

१९९१ - २००१ - २०११

एकूण ९४६ - ९१३ - ८८३

ग्रामीण ९५३ - ९१६ - ८८०

शहरी ९३४ - ९०८ - ८८८

या आकडेवारीचा अभ्यास केला तर असे दिसून येते की, १९९१ ते २०११ या कालावधीत महिलांच्या प्रमाणात दर हजार पुरुषांमागे ९३४ वरून ९२५ इतकी घट झाली आहे तर शून्य ते सहा या वयोगटात याच कालावधीत १ हजार मुलांमागे ९४६ वरून ८८३ इतकी मुलींची लक्षणीय घट झाली आहे.

महाराष्ट्र : लिंग गुणोत्तरात टॉपचे पाच जिल्हे

अ.क्र जिल्हा एकूण महिलांचे प्रमाण ग्रामीण भाग शहरी भाग

१ रत्नागिरी १,१२३ - १,१४६ - १,०१३

२ सिंधुदूर्ग १,०३७ - १,०४६ - ९८१

३ गोंदिया ९९६ - ९९८ - ९८४

४ सातारा ९८६ - ९९३ - ९५५

५ भंडारा ९८४ - ९८४ - ९८२

महाराष्ट्र : लिंग गुणोत्तरात सर्वात खालचे पाच जिल्हे

अ.क्र जिल्हा एकूण महिलांचे प्रमाण ग्रामीण भाग शहरी भाग

१ मुंबई ८३८- - ८३८

२ मुंबई उपनगर ८५७ - - ८५७

३ ठाणे ८८० - ९५४ - ८५९

४ पुणे ९१० - ९२७ - ८९९

५ बीड ९१२ - ९०९ - ९२६

महाराष्ट्र : लिंग गुणोत्तरात टॉपचे पाच जिल्हे (शून्य ते सहा वयोगट )

अ.क्र जिल्हा एकूण महिलांचे प्रमाण ग्रामीण भाग शहरी भाग

१ गडचिरोली ९५६ - ९६१ - ९१८

२ चंद्रपूर ९४५ - ९५८ - ९१९

३ गोंदिया ९४४ - ९४७ - ९२७

४ रत्नागिरी ९४० - ९४२ - ९२८

५ भंडारा ९३९ - ९४४ - ९१५

महाराष्ट्र : लिंग गुणोत्तरात सर्वात खालचे पाच जिल्हे शून्य ते सहा वयोगट )

अ.क्र जिल्हा एकूण महिलांचे प्रमाण ग्रामीण भाग शहरी भाग

१ बीड ८०१ - ७८९ - ८४८

२ जळगाव ८२९ - ८३० - ८२७

३ अहमदनगर ८३९ - ८३७ - ८४८

४ बुलढाणा ८४२ - ८४१ - ८४७

५ कोल्हापूर ८४५ - ८४२ - ८५२

ही आकडेवारी पाहिली तर देश आणि राज्यातील लिंग गुणोत्तराचे प्रमाण लक्षात येते. याचा समिक्षात्मक अभ्यास केला तर पुरुषांच्या तुलनते महिलांचे आणि शून्य ते सहा वयोगटात मुलांच्या तुलनेत मुलींचे दर हजारी प्रमाण कमी होत असून ती चिंतेची बाब आहे.सामाजिक विषमतेची दरी आणखी वाढू द्यायची नसेल तर सावधान ! आत्ताच या गोष्टीला गांभीर्याने घेऊन पाऊले उचलण्याची गरज आहे.

असं का? याचं उत्तर शोधण्याची आता खरी वेळ आलीय. खरचं मुला-मुलीत फरक असतो? कुठल्या क्षेत्रात मुली, मुलांच्या तुलनेत मागे आहेत? आज किती आई-वडिल मुलांपेक्षा मुलींकडे जास्त राहातात किंवा किती मुली आई वडिलांचा म्हतारपणचा आधार झाल्या आहेत हे जर पाहिलं तर अनेक लोकांकडे, कुटुंबाकडे याची उत्तरं आपल्याला नक्कीच मिळतील. 

बचतगटातील महिलांपासून अवकाशात भरारी घेणाऱ्या अंतराळवीरांपर्यंत मुलींनी विविध क्षेत्रात मिळवलेलं यश पाहिले तर मुला-मुलीत करण्यात येत असलेला भेदभाव किती तकलादू आहे हे लक्षात येतं. सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही, हे आता सगळ्यांना पटु लागलं आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला स्त्री शिक्षण आणि स्त्री समानतेची फार मोठी परंपरा लाभली आहे. क्रांतीज्योति सावित्रीबाई फुलेंपासून अलिकडच्या काळात मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा यांच्यापर्यंत महिलांचे काम पाहिले तर महिलांनी कौटुंबिक विकासाबरोबर सामाजिक विकास आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी दिलेलं योगदान लक्षवेधी ठरतं.

अलिकडच्या काळात शासनासमवेत अनेक स्वंयसेवी संस्था सक्रीयपणे स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी योगदान देताना दिसत आहेत. यामध्ये पहिलं ताट तिला, चला मुलींचे स्वागत करू या, नकोशी होतेय हवीशी, राखीसाठी बहिण हवी यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक कायद्याचीही राज्यात अंमलबजावणी सुरु आहे. परंतु सर्व प्रश्न कायद्याने सुटतात असं अजिबात नाही. त्यासाठी गरज आहे ती मानसिकता बदलाची. 

गावात नदी आणि घरात मुलगी असायलाच हवी अशी जुनी जाणती माणसं नेहमी म्हणायची. नदी हे जीवनाचं, समृद्धीचं प्रतिक तर घरात मुलगी असणं हे हासू-आसू, फॅशन,कला-साहित्य-संस्कृती, नाविन्य, नात्यातल्या जिव्हाळ्याचा रेशीमबंध जिवंत असल्याचं प्रतीक. म्हणूनच तर घरात मुलगी झाली तर लई झाल्या लेकी नको म्हणू बापा, उडूनिया जाईल तुझ्या चिमण्यांचा ताफा. . . असं सांगून ही माणसं मुलीच्या जन्माचं स्वागत करायला लावायची. आज पुन्हा हीच संस्कृती, हाच विचार समाजमनात रुजवायचा असून मुलीच्या जन्माचं स्वागत करायचंय. . . कळ्यांना अवेळी खुडण्याआधी पूर्ण उमलू द्यायचंय. राष्ट्रीय बालिकादिनाच्या निमित्ताने आपण ही शपथ घेऊया !




  • डॉ. सुरेखा मुळे  
  • No comments:

    Post a Comment