My Followers

Tuesday 7 August 2012

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद ...!!!

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी..... प्रश्नोत्तरातून सुसंवाद...!!!

लेखक प्रकाश घाटपांडे यांचे "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी....प्रश्नोत्तरातून सुसंवाद...!!!" या नावाचे पुस्तक बाजारात आले आहे. अतिशय अभ्यासपूर्ण आणि नावासारखेच  प्रश्नोत्तरातून सुसंवाद करत सगळी अनाकलनीय..(म्हणजे ज्यांना जोतिष्य हे नेमके काय हे माहित नाही म्हणजे त्यांना अनाकलनीयच ना ), गोष्टी आणि त्या जोतिष्य च्या मागचे कोडे अलगद उघडत जाते. आम्ही वकील मंडळी आम्हाला कायद्याच्या पुस्तकातून वेळ मिळाला तर इकडे तिकडे अवांतर वाचनात डोकावतो. मला तशी  जोतिष्य लहानपणापासूनच चीड पण कोणत्याही गोष्टीवर टीका करायची म्हटले कि त्याचा अगोदर अभ्यास करावा लागतो. म्हणून जोतिष्य या विषयाच्या मागे लागलो.  ते जाऊ द्या. लेखक प्रकाश घाटपांडे यांचे " ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी..... प्रश्नोत्तरातून सुसंवाद... हे पुस्तक नक्की घेऊन वाचा म्हणजे तुमचे जोतिष्य आणि त्यातील समाज गैर समाज कळतील.. तर ज्यांना पुस्तक घेवून वाचता येणार नाही, त्यांच्या साठी मी आपल्या  ब्लॉगवर त्यांचे पुस्तक लेखाच्या माध्यमातून आपल्यासमोर घेवून येत आहे....!!!       
१) फलज्योतिष म्हणजे काय? 
जन्मवेळची ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फलज्योतिष.
फार पूर्वी फलज्योतिष हा शब्द प्रचारात नव्हता. ज्योतिष किंवा ज्योति:शास्त्र हा शब्द प्रचारात होता, ज्योति म्हणजे आकाशातील दीप्तीमान गोल. ज्योतिष हा शब्द मुख्यत: खगोलशास्त्र या अर्थाने वापरीत असत. त्याचा उपयोग यज्ञयागादि धर्म-कृत्ये करण्यासाठी चांगला काल कोणता ते ठरवण्यासाठी केला जात असे. त्यात अर्थातच शुभाशुभत्वाचा भाग असे. कालांतराने ज्योति:शास्त्राचे तीन स्कंध होउन त्याना सिद्धांत-स्कंध, संहिता-स्कंध आणि होरा-स्कंध अशी नावे मिळाली. पहिला सिद्धांत-स्कंध पूर्णपणे खगोलगणिताशी संबंधित होता. दुसरा संहिता-स्कंध हा ऋतूमानानुसार नागरी जीवनातील कृत्ये व कर्तव्ये केव्हा म्हणजे कुठल्या नक्षत्रावर व मुहूर्तावर करावीत हे सांगणारा होता. तिसरा होरा-स्कंध हा व्यक्तीच्या आयुष्यातील घटना वर्तवणारा होता, तो म्हणजेच आजचे फलज्योतिष .
यूरोपमध्ये वेधशाळांच्या मदतीने ज्योतिषी लोक ग्रहगतीचा अभ्यास करीत असत व ग्रहणादिकांविषयी भाकिते वर्तवीत असत. वेधशाळांना राजाश्रय असायचा. जोहानीज केपलर (इ.स. १५७१ -१६३०) या खगोलशास्त्रज्ञाला तत्कालीन परिस्थितीत फलज्योतिषावर उदर निर्वाह चालवावा लागत असे. त्याला त्या परिस्थितीचा कमालीचा उबग आला होता. तो एके ठिकाणी म्हणतो, ''फलज्योतिष ही ज्योति:शास्त्राची ( म्हणजे खगोलशास्त्राची ) बदलौकिक कार्टी आहे, पण तिच्याविना तिची बिचारी आई (म्हणजे खगोलशास्त्र ) एका वेळच्या अन्नाला देखील महाग होते ! `` पुढे काही कालानंतर ज्योति:शास्त्राला खगोलशास्त्र असे नाव पडले आणि ज्योतिष हा शब्द फक्त फलज्योतिष या अर्थाने वापरला जाऊ लागला.
२) पंचांग म्हणजे काय? त्याचा उपयोग काय?
कालगणनेची पाच अंगे आहेत. ती म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग व करण. या पाच अंगांची माहिती ज्यात असते ते पंचांग. भारतीय कालगणनेसाठी ज्योतिर्गणित हे पृथ्वी हे स्थिर केन्द्रबिंदू मानून केलेलेे आहे. त्यामुळे सूर्य हा तारा असूनही त्याला ग्रहाचे स्थान देउन तो चल झालेला आहे. चंद्र व सूर्य यांच्यामध्ये बारा अंशांचे कोनात्मक अंतर पडण्यासाठी जो अवधी लागतो त्याला तिथी म्हणतात.
नक्षत्र म्हणजे अवकाशातील विशिष्ट पटटयातील ठळक तारका समूह. अवकाशगोलात ३६० अंशाचे बारा भाग पाडून जशा राशी झाल्या तसे २७ भाग पाडले तर २७ नक्षत्र होतात. म्हणजे एक भाग हा १३ अंश २० कलांचा झाला.
वार हे अंग उशीरा प्रचारात आले. वार हे मूळ भारतीयांचे नव्हेतच. ते खाल्डियन कदाचित इजिप्शियन वा ग्रीक संस्कृतीतून आपल्याकडे आले असावेत. कारण महाभारतात वारांचा उल्लेख नाही असे भारतीय ज्योतिषाचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास कर्ते शं. बा. दिक्षीत सांगतात.
योग व करण हे व्यवहारोपयोगी नसल्याने आता व्यवहारात योग व करण ही अंगे प्रचारात नाहीत. पंचांगात मात्र ती दिलेली असतात.
या व्यातिरिक्त पंचांगात नित्योपयोगी व उपयुक्त धार्मिक माहिती दिलेली असते. विवाह मुंज मुहूर्त वधूवरांचे गुणमेलन कोष्टक, अवकहडा चक्र, व्रते, धार्मिक सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी, ज्योतिषांना लागणारी पहाटे ५.३० रोजची ग्रहस्थिती, ग्रहणांची माहीती, धार्मिक कृत्याविषयीचे निर्णय वगैरे वगैरे. औषधाची जशी प्रथमोचाराची पेटी असते तसे हे धार्मिक प्रथमोचाराचे अंग म्हणून घरात टांगलेले असते.
३) जन्मकुंडली म्हणजे काय?तुमच्या जन्मवेळी तुमच्या जन्मस्थळावरून दिसलेली ग्रह-राशींची स्थिती दाखवणारा सांकेतिक पद्धतीचा आराखडा म्हणजे तुमची जन्मकुंडली. कुंडलीत जे आकडे असतात ते राशींचे अनुक्रमांक दाखवणारे आकडे असतात. स्थानांचे म्हणजे घरांचे अनुक्रमांक तिच्यात लिहीत नाहीत. आपल्याकडे ती चौकटीत मांडलेली असते पण वर्तुळाकार कुंडली मांडण्याची पद्धत पाश्चात्यात आहे.दक्षिण भारतात चौकटीतच परंतु थोडी वेगळया पद्धतीने मांडलेली असते. कुंडली ही खगोलशास्त्रावर आधारलेली असते पण तिच्यावरुन भाकीत सांगणे हा फलज्योतिषाचा भाग आहे.
४) जन्मरास म्हणजे काय? जन्मनक्षत्र म्हणजे काय?पृथ्वी सूर्याभोवती ज्या वर्तुळात फिरते ते वर्तुळ जर कल्पनेने मोठे-मोठे करीत नेले व तारांगणाच्या घुमटाला भिडवले तर तेथे जे काल्पनिक महा-वर्तुळ तयार होईल त्याला अयनवृत्त किंवा क्रांतीवृत्त म्हणतात. या महा-वर्तुळावर एक आरंभ-बिंदू ठरवायचा आणि तिथून सुरुवात करून महा-वर्तुळाचे १२ समान भाग मानायचे. दरएक भाग तीस अंशाचा होतो. त्यालाच रास म्हणतात. मेष ते मीन अशा बारा राशी आहेत.तुमच्या जन्माचे वेळी चंद्र ज्या राशीत असेल ती तुमची जन्मरास मानली जाते.
आता याच महा-वर्तुळाचे २७ समान भाग केले तर एकेक भाग १३ अंश व २० कलांचा होईल. एक भाग म्हणजे एक नक्षत्र. तुमच्या जन्माचे वेळी जर चंद्र मृग नक्षत्रात असेल तुमचे जन्मनक्षत्र मृग असे म्हणायचे. ही सत्तावीस नक्षत्रे बारा राशींमध्ये वाटलेली आहेत म्हणून एकेका राशीत सव्वादोन नक्षत्रे बसतात. प्रत्येक नक्षत्राचे चार भाग करतात त्या प्रत्येक भागाला चरण असे म्हणतात.
अंतरिक्षाच्या कल्पनातीत अफाट पार्श्वभूमीवर दिसणारे हे राशी-नक्षत्रांचे चित्र आपल्या तोकड्या कल्पनाशक्तीच्या आवाक्यात येईल अशा रितीने मांडता येईल का? येईल. अशी कल्पना करायची की, सूर्यापासून प्लूटोपर्यंत पसरलेली आपली संपूर्ण सूर्यमाला एका रुपयाएवढ्या लहानशा वर्तुळात मावेल एवढी लहान केली आहे. ही रुपयाच्या आकाराची सूर्यमाला एका विस्तीर्ण मैदानात मध्यभागी ठेवली आहे. आता या प्रमाणावर, म्हणजे स्केलवर, राशी-नक्षत्रांच्या ताऱ्यांची मांडणी मैदानात करायची आहे. त्यासाठी त्या रुपयाच्या भोवती ३०० फूट त्रिज्येचे एक वर्तुळ काढायचे. या वर्तुळाच्या आत एकही तारा नाही. त्याच्या बाहेर पसरलेल्या विस्तीर्ण मैदानात मैलभर अंतरापर्यंत डोळ्यांना दिसू शकणारे राशी-नक्षत्रांचे तारे विखुरलेले आहेत. मृग नक्षत्रातला व्याधाचा तारा ५५० फूट अंतरावर आहे. काही नक्षत्रांचे तारे दीड-दोन हजार फूट अंतरावर आहेत. आता जरा आपल्या रुपयाकडे पहा. त्यावर कुठेतरी आपली पृथ्वी व चंद्र एका तिळाएवढ्या लहानशा जागेत आहेत असे समजायचे. पृथ्वीवर उभे राहून चंद्राकडे पहाणारा म्हणत असतो की मला चंद्र आत्ता मृग नक्षत्रात दिसतो आहे, वास्तविक तो बापडा चंद्र कुठे असतो आणि ते मृग नक्षत्र कुठे असते! तरी पण फलज्योतिषात असे म्हणायचे असते की माझ्या जन्मवेळी चंद्र मृग नक्षत्रात दिसत होता म्हणून माझे जन्मनक्षत्र मृग. या नक्षत्राचा मालक कोण तर मंगळ, म्हणून मला जन्मत: मंगळाची महादशा चालू झाली! हे सगळे बघून विज्ञाननिष्ठ माणसाला असे वाटू लागते की ज्योतिष्यांची दुनिया म्हणजे वेड्यांचा बाजार आहे !
५) नावावरून जन्मरास व जन्मनक्षत्र कसे ओळखतात ?खेडेगावात मूल जन्माला आल्यावर गावच्या जोशाकडून त्याचे जन्म-नांव काढून घेतात. पूर्वी गावात भिक्षुकी करणाराच ज्योतिषीही असायचा. तो पंचांगातून त्या दिवशीचे नक्षत्र पाहून अवकहडा चक्रावरून नावाचे आद्याक्षर सांगायचा. चू, चे, चो, ला, ली, लू, डा, डी अशा अक्षरातून तो एखादे अक्षर सुचवायचा. मग त्या अक्षरावरून डामदेव, चोमदेव अशी निरर्थक नांवे किंवा साधी नावे सुद्धा जन्मनांव म्हणून ठेवली जायची. या पद्धतीमुळे जन्मतारीख किंवा जन्मवेळ कुठेही नोंदलेली नसली तरी जन्मनांव पक्के लक्षात रहात असल्यामुळे त्या नावावरून अवकहडा चक्रातून जन्मनक्षत्र व जन्मरास कोणती ते कळते.
६) प्रश्नकुंडली म्हणजे काय? ती मांडून उत्तरे कशी देतात?
जेव्हा जातकाच्या मनात काही प्रश्न असतात, उदाहरणार्थ, मला प्रमोशन कधी मिळेल? घर कधी बांधून होईल? हरवलेली वस्तू सापडेल का? मॅचमध्ये भारत जिंकेल का? जेव्हा असा एखादा प्रश्न कुणी ज्योतिष्याला विचारतो तेव्हा ज्योतिषी लगेच किती वाजले आहेत ते पाहून त्यावेळेची कुंडली मांडतो. तिला प्रश्न कुंडली म्हणतात. फलज्योतिषात कृष्णमूर्ती किंवा नाक्षत्रज्योतिष नावाची पद्धत आहे. या कृष्णमूर्तीचा तत्वज्ञ जे. कृष्णमूर्तीशी काही संबंध नाही. या पद्धतीत प्रश्नकुंडलीला विशेष महत्व आहे. असे समजा की एका निवडणुकीतले दोन प्रतिस्पर्धी उमेदवार एकाच वेळी एका ज्योतिष्याकडे गेले. दोघांनी ज्योतिष्याला विचारले की मी निवडणूक जिंकेन का ? आता पंचाईत आली! दोघांच्या प्रश्नाची वेळ एकच म्हणून दोघांची प्रश्नकुंडली एकसारखीच येणार. दोघांनाही एकच भविष्य कसे सांगायचे ? मग अशा वेळी ज्योतिषी काय युक्ती करतो तर त्या दोघांना १ ते २४९ पैकी कुठलाही एक आकडा मनात धरायला सांगतो. दोघेही एकच आकडा धरण्याची शक्यता फारच कमी असते. मग त्या आकडयाशी संबंधीत असलेली प्रश्नकुंडली मांडून ज्योतिषी त्याना भविष्य सांगतो ! या पद्धतीवर काही ज्योतिषी असा आक्षेप घेतात की तिच्यात जन्मकुंडलीचा विचारच होत नाही. पण धंदेवाईक ज्योतिष्यांना ही पद्धत सोयीची आहे कारण, अचूक जन्मवेळ तर राहोच पण जन्मवर्ष सुद्धा ज्यांना माहित नाही असे खूप लोक असतात. त्यांची जन्मकुंडली कुठून असणार ? मग तशा लोकांचे भविष्य कसे सांगायचे ? पण प्रश्नकुंडलीच्या पद्धतीमुळे अशा लोकांची - व ज्योतिष्यांचीही - सोय झाली आहे.
या पद्धतीबाबत पं महादेवशास्त्री जोशी यांनी त्यांच्या 'आत्मपुराण` पुस्तकात सांगितलेला एक मजेदार किस्सा विचार करायला लावणारा आहे. गुरु-शिष्य परंपरेतून शिकलेल्या महादेवशास्त्रींनी पणजीत दारावर पाटी लावून भविष्य सांगणे चालू केले. तिथल्या लोकांचे प्रश्न काय असणार तर आमची गाय हरवली आहे, ती केव्हा सापडेल ? बाहेरगावी गेलेला पाहुणा कधी परत येईल? असले प्रश्न. महादेवशास्त्री मारे प्रश्नकुंडली मांडून उत्तरे देत. पण गंमत काय व्हायची की गाय दोन दिवसांनी सापडेल असे सांगावे तर ती संध्याकाळीच गोठयात हजर व्हायची! पाहुणा पंधरा दिवसानी येईल असे सांगावे तर तो दुसऱ्याच दिवशी टपकायचा! त्यांची भविष्यवाणी खरी ठरेना. तेव्हा त्यांनी त्याच गावातील एका ज्येष्ठ ज्योतिषाचे शिष्यत्व पत्करले. मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे महाशय पृच्छकालाच बोलायला लावीत. त्याच्याच कडून इतिहास-वर्तमान वदवून घेत. 'आशां कालवती कुर्यात्।` व 'कालं विघ्नेन योजयेत्।` अशा द्विसूत्रीचा वापर करून जातकाला संदिग्ध भाषेत भविष्य सांगत. ही त्यांची पद्धत पाहून, तिच्यात जातकशास्त्र कुठ आलं अशी भाबडी शंका महादेवशास्त्रींनी विचारली. '' जातकशास्त्र? तुम्ही ग्रंथाचे आधारे भविष्य सांगायला गेलात की मेलात. इथं शब्दजंजाळ कामाला येतं. समोरच्या माणसाचं सूक्ष्म निरीक्षण करून भविष्य सांगायचं ते बरं असंच सांगायचं अन् त्याला आशेच्या घोडयावर बसवून पाठवून द्यायचं. तुमच वाक्चातुर्य जेवढं प्रभावी तेवढं तुमचं भविष्य बरोबर........`` शेवटी महादेवशास्त्रींनी विचार केला. किती दिवस मी स्वत:ला व लोकांना फसवत राहू? त्यांनी आपलं चंबू गबाळ आवरलं व पणजीहून आंबेडयाला परत आले.
७) अमावस्या अशुभ दिवस आहे काय?एखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल असेल तर अशुभ अशी ढोबळ संकल्पना आहे. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात एखाद्या दिवशी भारत हरला तर तो दिवस त्या अनुषंगाने भारताला अशुभ व पाकिस्तानला शुभ झाला. हीच गोष्ट उलट घडली तर तो दिवस भारताला शुभ व पाकिस्तानला अशुभ. सौद्यांमध्ये वा सट्टेबाजी मध्ये एखाद्याचा फायदा हा दुसऱ्याचा तोटाच असतो. त्यामुळे एखाद्याचे शुभ हे दुसऱ्याचे अशुभ असू शकते.
तुका म्हणे हरिच्या दासा । शुभकाळ दाही दिशा ।। अमावस्याच काय पण कुठलाही दिवस अशुभ नाही. दक्षिण भारतात अमावास्या शुभ मानली जाते. कारण अमावस्या म्हणजे सूर्य चंद्र युती. सूर्य चंद्र बरोबरच उगवतात व बरोबरच मावळतात. युतीत ग्रहांची फले वृद्धिंगत होतात. अशी ज्योतिषशास्त्रात संकल्पना आहे. आपल्याकडे मात्र अमावस्या अशुभ मानतात. अजून गमतीची गोष्ट अशी की दिवाळीत लक्ष्मीपूजन मात्र अमावस्येच्या दिवशी असते. म्हणजे एकच दिवस स्थलसापेक्षतेने, व्यक्तिसापेक्षेने शुभ किंवा अशुभ होतो.
८) अमावस्येला -पौर्णिमेला शस्त्रक्रिया केल्यास रक्तस्त्राव जास्त होतो हे कितपत सत्य आहे?ही समजूत खरी आहे की नाही या विषयावर शल्यविशारदांमध्येच मतभेद आहेत. डॉ. भा. नी. पुरंदरे यांनी १९८५ साली झालेल्या ज्योतिष अधिवेशनात स्पष्ट सांगितले की त्यांना असा काहीही अनुभव आलेला नाही. याच्या अगदी उलट काही डॉक्टरांचे मत आहे. त्यांच्या मते अमावास्येला रक्तस्त्राव जास्त होतो. ज्योतिष्यांना या मताचा मोठाच आधार मिळाला. ते म्हणू लागले की अमावास्येला समुद्राला मोठी भरती येते. माणसाच्या शरिरातील रक्तालाही तशीच भरती येत असल्यामुळे रक्तस्त्राव जास्त होत असावा. त्यांचा हा तर्क खुळचटपणाचा आहे. कसा ते पहा. समुद्राला जेव्हा एका ठिकाणी भरती येत असते तेव्हा त्या ठिकाणापासून ६००० मैल अंतरावर ओहोटी चालू असते. तिथले पाणी इकडे खेचले जात असते म्हणून इथे भरती येत असते. तळ्यात किंवा हौदात भरती-ओहोटी होत नसते! मग माणसाच्या एवढ्याशा शरीरातल्या रक्तात भरती-ओहोटी येणे तर दूरच. दुसरी गोष्ट अशी की अमावास्येला काय किंवा दुसऱ्या कोणत्याही दिवशी काय, ६ तास भरती असते तर ६ तास ओहोटी असते. अमावास्येला सकाळपासून मध्यान्हापर्यंतच भरती असते, दुपारी ओहोटी असते. आता प्रश्न असा की सदरहु डॉक्टरमहाशयांनी जो काय अनुभव घेतला तो कोणच्या वेळी घेतला ? हा प्रश्न त्यांना कुणी विचारीत नाही कारण कुणालाच धड काही माहिती नसते. ग्रहांचा मानवी जीवनावर काहीतरी परिणाम होत असावा या मताला दुजोरा म्हणून हे असले उदाहरण हमखास उगाळले जाते. डॉक्टर ज्योतिषाशी लगट करू लागले की काय गोंधळ करतात ते महाराष्ट्र विज्ञान परिषदेच्या २००१ दिवाळी अंकात डॉ. श्रीखंडे यांनी छान दाखवले आहे.
९) अमावस्या पौर्णिमेला वेडाचे झटके , अपघाताचे प्रमाण जास्त का असते?ही मुळातच चुकीची माहिती आहे. काही गूढवादाकडे झुकलेल्या नियतकालिकांत असली चुकीची माहिती काहीतरी सनसनाटी असावं म्हणून दिलेली असते. त्यासाठी दाखले म्हणून जे संदर्भ वा सर्व्हे दिलेले असतात ते मुळातच शास्त्रीय नसतात. पण मनोरंजनासाठी वाचणारे वाचक मात्र त्यावर विश्वास ठेवतात आणि चिकित्सक लोक त्या नियतकालिकाच्या प्रकृतीनुसार त्याकडे काणाडोळा करतात. त्यामुळे असे समज फोफावतात.
आपल्याकडे येरवडा मनोरुग्णालयात असा अभ्यास तेथील डॉ. देव यांनी केला असता या समजूतीत काडीमात्र तथ्य नसल्याचे त्यांना आढळले. अंगात येणाऱ्या लोकांच्यात धूप किंवा उद यांचा वास, घागरी फुंकणे, विशिष्ट वाद्ये हे वातावरण व आज मंगळवार आहे किंवा गुरुवार आहे या स्वयंसूचनेचा अंतर्भाव हा जसा महत्वाचा घटक असतो तसा काहीसा प्रकार म्हणून वर्तणूकीतील बदल हा भाग काही मनोरुग्णांचे बाबत असू शकतो. पण वेडाचा झटका, आत्महत्या वा तसा प्रयत्न, इपिलेप्सी या गोष्टीचा चंद्राच्या कलांशी काहीही संबंध नाही. अपघातांचे प्रमाण या वेळेस वाढते या दाव्यात तर काहीच तथ्य नाही. या साठी हवा असलेला सर्व्हे हा तुम्ही आम्ही केवळ वर्तमानपत्रातल्या बातम्यांवरुन संकलित केला तरी आपल्या सहज लक्षात येईल.
या बाबत श्री. रा.ज. गोखले यांनी मुंबई मुन्सिपाल्टी च्या १९२७ च्या रजिस्टर वरुन सर्वेक्षण केले होते. 'रत्नाकर` या नियतकालिकाच्या जानेवारी १९३१ च्या अंकात '' लौकिक समजूतींविषयी शास्त्रज्ञ साशंक का?`` या लेखात त्यांनी आकडेवारी दिली आहे. त्यांनी अमावस्या पौर्णिमा या तिथीच्या अलिकडे व पलिकडे दोन दिवस घेउन एकूण ११७ दिवसातील ८७४३ मृत्यूसंख्या विचारात घेतली. त्यात त्यांना या विशिष्ट तिथीतील रोजची सरासरी ही ७४.७२ आढळली. आणि एकूण वर्षातील रोजची सरासरी ही ७५.४८ आढळली. ( संदर्भ :- 'लोकभ्रम` लेखक रा. ज. गोखले, सन १९३५ )
१९६९ ते १९७३ या काळातील न्यूयॉर्क शहरातील आत्महत्येच्या एकूण ३११ केसेस चा अभ्यास मायकेल्सन, रसेल व इतर शास्त्रज्ञांनी केला. संगणकाच्या मदतीने १ लाख वेगवेगळे फलज्योतिषकीय घटक व ६२२ कुंडल्या, तीन गट, नियंत्रित घटक, मुक्त घटक यांच्या आधारे संख्याशास्त्रीय दृष्टया त्यांना आत्महत्या व कुंडलीतील फलज्योतिषकीय घटक यांचा कुठलाही परस्पर संबंध आढळला नाही. ( संदर्भ :- जर्नल ऑफ जिओकॉस्मिक रिसर्च, सन १९७८ )
१०) हिंदू धर्मात पावसाळयाची जी नक्षत्रे सांगितली आहेत त्याच्या गुणधर्माप्रमाणे पाउस पडतो असा अनुभव येतो. मग नक्षत्रे आणि मौसमी पाउस यांचा काही संबंध आहे का?
खरं तर हा भाग पूर्णपणे भूगोलाचा आहे. पृथ्वीचा आस हा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेशी पूर्णपणे काटकोनात नाही. तो २३.५ अंश कलता आहे. तो तसा नसता तर विषुववृत्तावर बारमाही उन्हाळाच राहिला असता. उत्तर गोलार्धात जेव्हा उन्हाळा असतो त्यावेळी दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. त्यामुळे ऋतू हा काळ व स्थळ या दोन्हीशी निगडित आहे. मृगनक्षत्र हे पावसाचे पहिले नक्षत्र म्हटले जाते. ७ जूनला मृगनक्षत्र हे पावसाचे पहिले नक्षत्र लागते याचा अर्थ असा कि सूर्य आकाशात असताना आकाशातील तारे दिसतील अशी कल्पना केली तर सूर्य हा त्या वेळी आकाशातल्या मृग नक्षत्राजवळ दिसेल. म्हणजे या ठिकाणी नक्षत्रांचा उल्लेख हा कालनिर्देशक आहे. ७ जूनला मृग नक्षत्रात प्रवेश सर्व पृथ्वीच्या संदर्भाने आहे. पण पावसाळा जून महिन्यात फक्त आपल्याकडे चालू होतो. सर्व जगभरात नाही. मे महिन्यात उन्हाळा असणे हा काही मे महिन्याचा गुणधर्म नव्हे. तसे मृगनक्षत्रात पाऊस पडणे हा काही मृगनक्षत्राचा गुणधर्म नव्हे. २१ मार्च, २२जून, २३ सप्टेंबर व २२ डिसेबर या पृथ्वीची स्थिती दर्शवणाऱ्या भूगोलातील आकृत्या पाहिल्या तर आपल्या ऋतूमान व कालनिर्देशन यांचा परस्पर संबंध लक्षात येईल. पूर्वीच्या काळी कालनिर्देशनासाठी पंचांगच वापरले जात. कुठल्या नक्षत्रावर काय धर्मकृत्ये करावीत या गोष्टी ज्योतिषाच्या संहिता या स्कंधाशी संबंधीत आहे. ही धर्मकृत्ये वा शेतीसंबंधीत कामे ही ऋतूमानाशी निगडित आहेत. ती पंचांगाचे आधारे सांगितली जात असत आणि पंचांग हे फलज्योतिषाशी संबंधीत असल्याने पावसाचा नक्षत्राशी संबंध ही बाब ज्योतिषाशी जोडली गेली.
११) तेरावी रास नवीन आल्यामुळे ज्योतिषातली सगळी गणित बदलली का?
समजा तुमचा ८०० स्केअर फूटचा तीन खोल्यांचा बंगला आहे. त्यातली एक भिंत तुम्ही पाडून सरकविली आणि एक भिंत टाकून चार खोल्या केल्या मुळे तुमच्या घराचे क्षेत्रफळ बदलले का? की तुमचा पोस्टल पत्ता बदलला? नाही ना! मग तेरावी रास हा असाच प्रकार आहे. लंडनच्या रॉयल ऎस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने ही तेरावी ऑफियूचस नावाची रास प्रसिद्ध केली आहे. वृश्चिकेचा तुकडा काढून या राशीला जागा दिली. ज्योतिषशास्त्राला याचा काहीही उपयोग झाला नाही. थोडी सनसनाटी बातमी झाली एवढीच. लोक आता तेरावी रास विसरले सुद्धा.
१२) जन्मवेळ चुकली तर भविष्य चुकते का?
समजा आम्ही उलट असा प्रश्न विचारला की, जन्मवेळ बरोबर असेल तर भविष्य बरोबर येईल याची खात्री ज्योतिषी देईल का ? काय उत्तर मिळेल ? मुळात, खरी जन्मवेळ कुठली मानावी या मुद्यावर ज्योतिषीलोकांतच वाद होते. तर्कदृष्टीनं विचार केला तर ज्या क्षणी गर्भधारणा होते ती खरी जन्मवेळ मानली पाहिजे. पण ती वेळ खुद्द आईबापांनासुद्धा माहीत नसते! बालक रडते म्हणजे पहिला श्वास घेते ती जन्मवेळ मानावी, असे आता मान्य केले आहे. पूर्वी बालकाचे डोके दिसणे, मूल पूर्णपणे बाहेर येणे, नाळ कापणे, अशा अनेक गोष्टीवरून जन्मवेळ ठरवीत असत. एक गोष्ट खरी की जन्मवेळ ही मिनिटांच्या हिशोबात अचूक सांगणे जवळजवळ अशक्य आहे. अचूक जन्मवेळेवर कुंडलीचा अचूकपणा अवलंबून असतो. अचूक कुंडलीवर भविष्यकथनाचा अचूकपणा अवलंबून असतो. त्यामुळे भाकीत खरे ठरले नाही तर जन्मवेळ चुकीची असेल हे निमित्त लगेच पुढे केले जाते व ते पटण्यासारखेही असते. आपण जेव्हा किती वाजले हा प्रश्न विचारतो तेव्हा "३ वाजून ५८ मिनिटे ५० सेकंद " असे काटेकोर उत्तर अपेक्षित नसते, तर "चार वाजले " असे उत्तर पुरेसे असते. डिजीटल घडयाळात ३.५९ नंतर ४.०० हा आकडा येतो. तिनाच्या ऐवजी चाराचा आकडा तिथे दिसू लागतो. प्रत्यक्षात एक मिनिटच उलटलेलं असतं पण तासाचा आकडा एकाने वाढतो. हे जसे घड्याळाच्या बाबतीत होते तसेच कुंडलीतही एखादे वेळी होते. अशा "बॉर्डर "वरची जन्मवेळ असेल तर ५-१० मिनिटांच्या अंतराने प्रथमस्थानातील राशीचा आकडा बदलू शकतो. पण ज्योतिषी लोक मात्र असा समज करून देतात की तेवढ्या थोडयाशा फरकामुळे कुंडलीत काहीतरी मोठी उलथापालथ होते. सामान्यत: भविष्यकथनासाठी ज्योतिषीलोक ठोकळा कुंडली वापरतात. दहा-पंधरा मिनिटांच्या फरकामुळे कुंडलीतला जो घटक बदलणार असतो तो घटक या ठोकळा कुंडलीत टिपलेला नसतोच. आणि जरी सूक्ष्म कुंडली वापरली तरी सर्वसाधारण भविष्यकथनासाठी ज्योतिषी तो घटक विचारात घेत नाहीतच. एकंदरीत काय तर जन्मवेळेच्या अचूकपणावर भविष्य फारसे अवलंबून नसते.
१३) जुळ्या मुलांच्या कुंडल्यात फरक का असतो ?
सर्वसाधारणपणे जुळ्या मुलांच्या जन्मवेळेमध्ये १५-२० मिनिटांचे अंतर असते. काही केसेस मध्ये ते काही तासांपर्यंत जाते. १५-२० मिनिटांच्या फरकामुळे ठोकळाकुंडलीतल्या ग्रहांची स्थाने व राशींचे आकडे यात सहसा काही फरक पडत नाही. वर सांगितल्या प्रमाणे बॉर्डर वेळेचा जन्म असेल तर उपरोक्त उदाहरणात जसे तीनचे चार झाले तसा प्रथम स्थानातल्या राशीच्या आकड्यात एका आकड्याचा फरक पडू शकतो, आणि त्याचबरोबर नक्षत्रही बदलू शकते. या बाबत प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व ज्योतिषसमर्थक कै. डॉ.भा.नि. पुरंदरे यांनी एक किस्सा पुण्यातील ज्योतिष संमेलनात सांगितला होता. तो असा:- त्यांच्या कडे प्रसूती साठी आलेल्या एका केसमध्ये पंधरावीस मिनिटांच्या अंतराने जुळ्या मुली जन्माला आल्या. त्या एकाच वारेवरच्या होत्या. परंतु एक काळसर होती व एक उजळ होती. त्यांनी जेव्हा मुलींच्या पत्रिका केल्या तेव्हा त्यांना असे आढळून आले की त्या पंधरावीस मिनीटांमध्ये एकीचे जन्म-नक्षत्र बदलले होते. त्या मुळे एक मुलगी सावळी व एक उजळ असा त्यांच्या वर्णात फरक पडला असे त्यांचे म्हणणे होते.
त्यांच्या विधानाचा अर्थ असा होतो की दोन्ही मुली या एकाच फलित गर्भपेशीचे विभाजन होउन झालेल्या जुळ्या मुली ( युनिओव्ह्यूलर ) होत्या कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या एका वारेवरच्या होत्या. परंतु, तरीही त्यांच्या वर्णात फरक पडला तो केवळ १५ मिनिटात एकीचे नक्षत्र बदलल्यामुळे पडला. आम्हाला त्यांच्या या विधानाच्या सत्यतेबद्दलच शंका वाटते. ती शंका अशी:- असा वर्णातला फरक फक्त माता-पित्यांच्या जनुकांच्या जोडणीत होणाऱ्या फरकामुळे पडू शकतो असे जनुक-शास्त्र सांगते. युनिओव्ह्यूलर केस मध्ये असा फरक पडणे शक्य नाही. कारण तशा केसमध्ये जनुकांच्या जोडणीत फरक पडलेला नसतो. पण जर डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे केवळ नक्षत्र-बदलामुळे हा फरक पडला असेल तर ती गोष्ट या शास्त्रात मूलभूत क्रांति घडवणारी ठरेल. ती केस वास्तविक एखाद्या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध होण्याच्या योग्यतेचीच ठरेल. ती काही एखाद्या ज्योतिष-संमेलनात सांगून सोडून देण्यासारखी किरकोळ गोष्ट नव्हे!
आता प्रश्न असा आहे की हे त्यांचे संशोधन एखाद्या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध होउन त्याला मान्यता मिळाली आहे का ? एवढया मोठया तज्ज्ञ डॉक्टराने सांगितले ते खरे असलेच पाहिजे असे सामान्य माणूस मानणारच. दुसऱ्या तज्ज्ञांची मते या बाबतीत काय आहेत हे पहाण्याच्या भानगडीत तो पडत नाही. यावरून एवढे मात्र दिसते की जेव्हा एखादा मोठा डॉक्टर स्वत:च ज्योतिषी बनतो तेव्हा तो त्या शास्त्राच्या समर्थनासाठी दिशाभूल करणारी विधाने करू शकतो. पुढे २४ व्या प्रश्नाच्या उत्तरात आम्ही हेच दाखवून दिले आहे.
या ठिकाणी हस्तरेषातज्ज्ञ पुढे येतात. ते म्हणतात, ''जुळया मुलांची कुंडली एकवेळ सारखी असेल पण हस्तरेषा मात्र वेगळया असतात. अहो, हा निसर्गाचा आरसा आहे! तुमची जन्मवेळ चुकू शकते. पण हा आरसा काही बदलत नाही. तुम्ही आमच्याकडे या.``हे नवीन वाचकांनी प्रथम वाचावे. आता भाग १ मधिल "काही सामान्य शंका "पुढील प्रकरण. फलज्योतिष हा विषय हा तसा अघळपघळ आहे. काही मुद्द्यांची पुनरावृत्ती आढळल्यास ती काही वाचकांची सोय आहे असे मी मानतो. विशेष करुन ज्यांना अनुक्रमे वा शिस्तबद्ध पद्धतीने वाचन करता येणे शक्य नाही त्यांच्या साठी. प्रश्न् विचारण्याची उस्फुर्तता मात्र दाबून ठेवु नये.
१४) साडेसाती काय प्रकार आहे?शनीने पिडलेली साडेसात वर्षे म्हणजे साडेसाती. ही साडेसात वर्षे तीन अडीचक्यांमध्ये विभागलेली असतात. आयुष्यातला बॅड पॅच या अर्थानेही साडेसाती शब्द वापरला जातो. कोणत्याही काळी बारा पैकी कोणत्या ना कोणत्या तरी तीन सलग राशींना एकाच वेळी साडेसाती चालू असतेच. याचा अर्थ, शंभरातल्या २५ जणांना साडेसाती चालूच असते. एकेका राशीत अडीच वर्षे राहात शनी ३० वर्षात बारा राशीतून प्रवास करतो. माणसाच्या जन्म-वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती त्याची रास मानतात. समजा एखाद्याची वृषभ रास असेल तर शनी जेव्हा त्या राशीच्या 'अलिकडे` म्हणजे मेष राशीत येतो तेव्हा त्याला साडेसातीची पहिली अडीचकी चालू होते. जेव्हा शनी प्रत्यक्ष 'त्या` म्हणजे वृषभ राशीत प्रवेश करतो तेव्हा मधली अडीचकी चालू होते व जेव्हा तो 'पलिकडे` म्हणजे मिथुन राशीत प्रवेश करतो तेव्हा शेवटची अडीचकी चालू होते. अशी ही साडेसाती.
साडेसातीच्या काळात माणसाच्या प्रयत्नांना यश येत नाही, त्याची व्यावहारिक गणितं चुकतात, त्याला दुर्बुद्धी सुचते, त्याच्यावर संकटं कोसळतात अशी समजूत आहे. खरंतर अशा गोष्टी आपल्या आयुष्यात इतर वेळीही होत असतात. पण साडेसातीच्या काळात घडल्या तर त्यांचा संबंध लगेच शनीशी जोडला जातो. या काळात शनीची अवकृपा होउ नये म्हणून शनिवारी, अमावस्येला शनीला तेल वहाणे, रूईची माळ वहाणे, शनीमहात्म्य वाचणे इ. गोष्टी पीडाशामक म्हणून ज्योतिषी सुचवतात अन् माणूस त्या गोष्टी करतो. समजा शनीने जाहीर केले की, बाबांनो मी काही तुम्हाला त्रास देणार नाही, तर मग कोण कशाला करील या गोष्टी ? म्हणजे या सर्व गोष्टी शनीच्या भीतीपोटी केल्या जातात, भक्तीपोटी नव्हे. साडेसाती बाबत विष्णुशास्त्री चिपळूणकर आपल्या १८७५ साली प्रसिध्द झालेल्या निबंधमालेतील 'लोकभ्रम` या निबंधात म्हणतात, '' येथे कोणाच्या राशीवर शनिमहाराजांची स्वारी वळली की, त्याच्या प्रीत्यर्थ लोहदान, तिलदान वगैरे हजारो धर्मकृत्ये केली तरी त्यांचा रोष कमी होत नाही; पण तीच स्वारी इंग्लंडातल्या वगैरे मनुष्यांच्या बिलकुल वाटेस न जाता खुशाल आपल्या वाटेने चालती होते. तेव्हा या त्यांच्या पंक्तीप्रपंचाचे काय बरे चीज असावे.? ज्या अत्युग्र ग्रहाने प्रत्यक्ष शंकरावरही दोन तीन घटिका प्रभाव गाजवला, ज्याची दृष्टि लंकापतीच्या सिंहासनावर सारखी लागली असता लवकरच चौदा चौकडयांचे राज्य फडशा होऊन गेलेे, त्याचेच सामर्थ्य य:कश्चित परदीपस्थ मनुष्यांवर चालू नये हे केवढे आश्चर्य! ``
ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे आपण उपाय करतोय् ना, मग आता आपल्याल त्रास होणार नाही, या स्वयंसूचनेनेच माणसाला बळ येते. त्याचा उपयोग संकटांशी सामना करण्यासाठी होतो. "आपल्या अपयशाला आपण जबाबदार नसून ग्रहस्थितीमुळे तसे घडतंय्, देवादिकांना सुद्धा जिथं साडेसाती चुकली नाही तिथं तुमची आमची काय कथा?" हा विचार माणसाला धीर देतो.

१५) कालसर्पयोग म्हणजे काय?
कुंडलीत राहू व केतू हे नेहमी समोरासमोर असतात व त्यांच्यामध्ये ६ घरांचे म्हणजेच ६ स्थानांचे अंतर असते. या ६ घरात बाकीचे सर्व ग्रह आलेले असले म्हणजे कालसर्पयोग होतो. पैसे मिळवण्यासाठी ज्योतिषी लोक ज्या अनेक युक्त्या करतात त्यापैकीच ही एक युक्ती आहे. तुमच्या कुटुंबावर कुणाचा तरी शाप आहे असे हा कालसर्पयोग सांगतो असे ज्योतिषी सांगतात व भीती निर्माण करतात. शुभग्रह कालसर्पऱ्योगाच्या विळख्यात सापडले की त्यांची शुभ फले द्यायची ताकद कमी होते त्यामुळे कुंडलीत गुरु, शुक्र बलवान असले तरी त्यांची शुभ फले मिळत नाहीत. या सापाने आपल्या विळख्यात माणसाला आवळून धरले आहे तो त्याला चावतही नाही व सोडतही नाही. असा योग जर कुंडलीत असला तर काही तरी अनिष्ट गोष्टी घडतात. वेड, अपमृत्यू, कर्जबाजारीपणा, अशांतता, भांडणे, वास्तुबाधा, पिशाच्चबाधा, संतती न होणे, झालीच तर त्यापासून मन:स्ताप होणे अशी ही लांबलचक यादी आहे. काही ज्योतिष्यांनी आपला धंदा तेजीत आणण्यासाठी केलेला हा लुच्चेगिरीचा प्रचार आहे.
या विषयी प्रसिद्ध ज्योतिषी व.दा. भट म्हणतात की हा योग इतका महत्वाचा असता तर त्याचा उल्लेख जुन्या ग्रंथात मिळाला असता. हा योग ५०-६० वर्षापूर्वी कुणासही ठाऊक नव्हता हे आता कुणास खरेही वाटणार नाही. ज्योतिष जगतात याचा उगम प्रसिद्ध ज्योतिषी अजन्ता जैन व इंदुमती पंडित यांच्या वृत्तपत्रीय लेखनात १९५४ मध्ये झाला. तेथे वाचकांना आकर्षित करण्यासाठी तंत्र वापरावे लागते. त्यांच्या लेखनाने असा योग असतो असा साक्षात्कार झालेले सामान्य ज्योतिषी गि-हाईकावर छाप पाडण्यासाठी याचा वापर करू लागले. शिवाय कालसर्प या भीतिदायक शब्दाचीही दहशत माणसाला वाटते. कितीतरी कर्तृत्ववान व्यक्तींच्या कुंडलीत हा योग आहे. पंडीत नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कुंडल्यांतही हा योग होता.

१६) नारायण नागबली विधी काय आहे? तो कशासाठी करतात?
आपण वर कालसर्पयोग हा काय आहे व त्याची फळे कशी घाबरवून टाकतात हे बघितलं? साहजिकच मग आता यावर परिहारक उपाय, तोडगा काय? असा प्रश्न असणारच. कालसर्प योगाचे निवारण करण्यासाठी नारायण नागबली विधी सांगितला जातो. सर्पशाप, नागपूजा वगैरे गोष्टींंचा कालसर्पयोगाशी बादरायण संबंध लावून परिहार म्हणून असे विधी सांगितले जातात. हिंदू धर्मात नाग, साप यांचा देवादिकांशी संबंध असल्याने त्यांना फार धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. हल्लीच्या काळात प्रत्येक क्षेत्रात जशा अनिष्ट प्रथा येतात तशा त्या ज्योतिषशास्त्रातही आलेल्या आहेत. ज्योतिषी व तीर्थक्षेत्रातले भिक्षुकवर्ग यांचेही लागेबांधे वाढले आहेत. त्यांची 'कट प्रॅक्टिस` चालू झाली आहे. परिस्थितीने गांजलेला माणूस मनाने हळवा बनतो. ज्योतिषी सांगतो म्हणून नारायण-नागबली विधीसाठी दोनचार हजार रूपये खर्च करायलाही तयार होतो. एवढं सगळ केलंय् तर हेही करुन बघू असा तो विचार करतो. हा विधी त्रिंबकेश्वरला घाउक प्रमाणावर केला जातो.

१७) ग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते ?
ग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र म्हणते. शनीमहाराजांच्या नजरेचा लोकांना केवढा धाक असतो. शनी 'वक्री` असतांना, म्हणजे मागेमागे उलटा चालत असतांना जर का त्याची नजर तुमच्या कुंडलीतल्या एखाद्या मोक्याच्या स्थानावर पडली तर मग काही खरे नाही! 'बुरी नजरवालेे तेरा मुॅंह काला` अशी दूषणं देण्याचीही सोय नाही कारण एक तर तो स्वत:च काळा आहे आणि दुसरं म्हणजे त्याची दहशत. या शनीला सात नजरा असतात, त्यातल्या तीन पूर्ण शक्तीच्या, दोन अर्ध्या शक्तीच्या आणि दोन पाव शक्तीच्या असतात म्हणे. इतक्या सगळ्या नजरांसाठी त्याला डोळे किती आहेत ते कुणालाच ठाऊक नाहीे, पण डोळे असल्याखेरीज का दृष्ट्या असणे शक्य आहे? खरी मौज तर पुढेच आहे:- राहू आणि केतू हे काही खरोखरीचे ग्रह नव्हेत. ते म्हणजे चंद्राच्या वर्तुळाकार रस्त्यावर रोवलेले दोन काल्पनिक खुंट आहेत. ग्रहणाच्या वेळी चंद्र यापैकी कोणत्या तरी एका खुंटापाशी आलेला असतो. या काल्पनिक खुंटांना सुद्धा डोळे आणि नजरा आहेत म्हणे. राहूला सर्वात जास्त म्हणजे आठ नजरा आहेत तर केतूला फक्त एकच नजर आहे! गुरु व मंगळ यांना प्रत्येकी सात नजरा, बुध शुक्र, चंद्र आणि सूर्य यांना प्रत्येकी एकेक नजर असते. बिचारा सूर्य! सगळ्या ग्रहांचा राजा, पण त्याला नजर फक्त एकच! आपल्या पूर्वजांनी लावलेले हे अजब 'शोध` आहेत. आणि विचित्र सत्य हे आहे की या अजब शोधांच्या पायावरच ग्रहांच्या दृष्टीचा सिद्धांत उभा आहे.

१८) ग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे?
दशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे प्रकरण आहे. कारण, फलज्योतिष हे ग्रहांशी संबंधित शास्त्र आहे असा ज्योतिष्यांचा दावा असतो पण या प्रकरणाचा आकाशातल्या सद्यस्थित ग्रहांशी काहीही संबंध नसतो ! ग्रहांची नावे फक्त या पद्धतीत वापरतात.
प्रत्येक ग्रह ( म्हणजे खरे तर त्याचे नाव ) काही ठराविक मुदतीत तुमच्या आयुष्यावर आपला प्रभाव गाजवतो. उदाहरणार्थ, माणसाचे आयुष्य १२० वर्षे आहे असे गृहीत धरून जी दशा पद्धती मानली आहे तिला विशोत्तरी दशापद्धती म्हणतात. त्यामध्ये शुक्राचा प्रभाव २० वर्षे असतो. त्याला शुक्राची दशा असे म्हणायचे. शुक्राप्रमाणे बाकीच्या सर्व ग्रहांच्यासुद्धा दशा असतात व त्यात पुन: अंतर्दशा असतात. या दशेचे एका विशिष्ट पद्धतीने ९ भाग पाडायचे. त्या भागांवर ९ ग्रहांचे आधिपत्य क्रमा-क्रमाने असते असे मानायचे. त्या भागांना त्या-त्या ग्रहाच्या अंतर्दशा असे नाव आहे. अष्टोत्तरी महादशेत १०८ वर्षे आयुष्य मानून याच प्रकारात दशा अंतर्दशा विभागल्या आहेत. यात केतूला वगळले आहे. कुठल्या ग्रहाला किती वर्षे याचे वाटप लॉटरी पद्धती सारखे आहे. जन्मत: कुठल्या ग्रहाची दशा आहे हे केवळ जन्मनक्षत्रावरुन ठरविले जाते. उदा. रोहिणी, हस्त वा श्रवण नक्षत्रावरचा जन्म असेल तर त्याला जन्मत: चंद्र महादशा चालू होते. आणखी जवळ जवळ ४० प्रकारच्या दशा फलज्योतिषात आहेत.
विशोत्तरी महादशा:- चंद्र १० वर्षे, मंगळ ७ वर्षे, राहू १८ वर्षे, गुरु १६ वर्षे, शनी १९ वर्षे, बुध १७ वर्षे, केतू ७ वर्षे, शुक्र २० वर्षे, रवि ६ वर्षे - एकूण १२० वर्षे
अष्टोत्तरी महादशा :- चंद्र १५ वर्षे, मंगळ ८ वर्षे, बुध १७ वर्षे, शनी १० वर्षे, गुरु १९ वर्षे, राहू १२ वर्षे, केतू - शुक्र २१ वर्षे, रवि ६ वर्षे - एकूण १०८ वर्षे

१९) ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो हे खरे आहे काय?
सूर्य व चंद्र हेही ग्रहच आहेत असे हे शास्त्र मानते. या दोन ग्रहांचे भौतिक परिणाम सर्व सृष्टीवर होतात. बाकीच्या ग्रहांचे भौतिक परिणाम होत असल्याचे आढळलेले नाही. राहू व केतू हे काल्पनिक बिंदू असल्याने त्यांचे भौतिक परिणाम अशक्य आहेत. भौतिक परिणाम हे सामूहिक स्वरूपाचे असतात.
ग्रहांचे ज्योतिषीय स्वरूपाचे परिणाम मानवी जीवनावर होतात असे निश्चितपणे दाखवणारा पुरावा आजवर तरी मिळालेला नाही. गॉकेलिनचा गाजलेला मार्स इफेक्ट वादग्रस्त पुरावा आहे. त्या पुराव्यात सिलेक्शन बायेस हा दोष आहे असे कार्ल कोप्पेनशार नावाच्या एका शास्त्रज्ञाने दाखवून दिले आहे. ( यूरो स्केप्टिक-९१ या नियतकालिकात त्याचा लेख आला आहे )
या संदर्भात एका मुद्याचे विवेचन करणे आवश्यक आहे. गेली पन्नास-साठ वर्षे ज्योतिषाचे विरोधक आणि समर्थक यांच्यात वादाची जी रणधुमाळी चालली होती तिचा केंद्रंबिंदू हा होता की माणसावर ग्रहताऱ्यांचे परिणाम होत असणे शक्य आहे की नाही. 'ग्रह व तारे पृथ्वीपासून प्रचंड अंतरावर असल्यामुळे त्यांचे परिणामकारक असे प्रभाव माणसावर पडणे शक्य नाही`, अशी भूमिका विरोधकांची होती, आणि 'तसे प्रभाव पडणे शक्य आहे- नव्हे ते पडतातच` , अशी भूमिका समर्थकांची होती. त्यांच्या भूमिकेच्या समर्थनासाठी विद्युत्चुंबकीय प्रारणे म्हणजे ऊर्जालहरी, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय आकर्षण, भरती-आहोटी, सजीव सृष्टीवर होणारे सूर्य-चंद्राचे परिणाम इत्यादि प्राकृतिक तत्वांचा उपयोग तर त्यांनी केलाच आणि वर 'भौतिक शास्त्रांना अद्याप न उलगडलेली अशी कितीतरी तत्वे या विश्वात आहेत,` असे टोमणेही विज्ञान-मागध् लोकांना उद्देशून मारले, -जणू काही तसली काही तत्वे फलज्योतिषाच्या पाठीशी खरोखरच उभी आहेत! डॉ. मिशेल गॉकेलिन यांनी प्रचंड संशोधन करून असे दाखवून दिले होते की अगदी सूक्ष्म प्रमाणात का होईना पण ग्रहांचा माणसावर परिणाम होतो. ते संशोधन त्यांच्या मृत्यूनंतर वादग्रस्त ठरले तो भाग वेगळा, पण कित्येक वर्षे त्या संशोधनाने शास्त्रीय जगतात धमाल उडवून दिली होती, आणि तिचा भरपूर फायदा ज्योतिष-समर्थकांना मिळाला यात शंका नाही. त्यांच्या काही युक्तिवादात थोडेफार तथ्यही होते त्यामुळे सर्वसामान्य माणसाला असे वाटू लागले की शास्त्रज्ञ मंडळींची टीका केवळ हटवादीपणाची असून ज्योतिष-समर्थकांची बाजूच बरोबर आहे.
ग्रह-नक्षत्रादिचे मानवी जीवनावर परिणाम होत असावे कि नाही हा बुद्धिमंतांना दीर्घकाळ पुरणारा विषय आहे.

२०) काही ज्योतिषी आयुष्यातील काही घटना अचूक सांगतात ते कसे?
तुम्हाला स्वत:ला असा काही अनुभव आला आहे का ? की ऐकीव गोष्टींवरून तुम्ही हा प्रश्न विचारीत आहात ?
ज्यांना असे मन:पूर्वक वाटते की या शास्त्रात काहीतरी तथ्य असलेच पाहिजे, त्यांनी पुढील चाचणी करून पहावीे :- तुमच्या आयुष्यात आजपर्यंत घडून गेलेल्या सर्व घटना तुमच्या जन्मवेळी भविष्य काळातल्या घटना होत्या हे तर खरे ना ? त्या वेळी तुमच्या जन्मकुंडलीवरून एखाद्या जाणकार ज्योतिषाला त्या अचूक वर्तवता आल्या असत्या अशी तुमची श्रद्धा आहे ना ? मग त्याच जन्मकुंडलीवरून त्या घटना आजही ओळखता आल्या पाहिजेत. जर कुणा जाणकार ज्योतिषाने त्या बरोबर ओळखून दाखवल्या तर हे शास्त्र खरे आहे हे तात्काळ सिद्ध होईल की नाही ? म्हणून असे करा की, तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेल्या ३-४ नि:संदिग्ध टळक घटना आठवून त्या घटना कोणत्या वर्षी घडल्या ते टिपून ठेवा. एखाद्या जाणकार ज्योतिषाला तुमची जन्मकुंडली द्या व त्याला फक्त त्या घटनांचे स्वरूप सांगा ( त्यायोगे त्याचे निम्मे काम सोपे होईल.) त्या घटना निदान कोणत्या वर्षी घडल्या हे तरी त्याला सांगता येते का पहा. किंवा असे करा की, त्याला घटनांची वर्षे सांगून त्यांवरून घटनांचे स्वरूप ओळखता येते का ते पहा. आमचा अनुभव असा आहे की भले-भले ज्योतिषी अशी चाचणी द्यायला तयार होत नाहीत. काही ज्योतिषी अशी प्रौढी मारतात की त्यांना मृत्यूचे भाकीत अचूक वर्तवता येते. अशा ज्योतिषाला गेल्या दोनतीन वर्षात दिवंगत झालेल्या एखाद्या व्यक्तीची कुंडली देऊन त्या व्यक्तीच्या मृत्यूचे वर्ष ओळखायला सांगा. अशी चाचणी द्यायला कुणीही ज्योतिषी तयार होणार नाही. यावरून, या शास्त्रात खरोखर काही तथ्य नाही हेच सिद्ध होत नाही का ?

२१) हिरोशिमा वा नागासाकी शहरात अणुबॉम्ब पडला त्या वेळी लाखो लोक मेले, विमान अपघात, रेल्वे दुर्घटना वा भूकंप या सारख्या घटनांमध्ये शेकडो लोक मरतात मग त्या सर्वांच्या कुंडल्यात काय एकाच वेळी मृत्यूयोग होता असे म्हणायचे का?
असा प्रश्न आपल्या मनात येणे हे शोधक वा चिकित्सक वृत्तीचे लक्षण आहे. पण ज्योतिषांना हा प्रश्न जेव्हा आपण विचारतो तेव्हा ते म्हणतात, ''अशा पन्नास कुंडल्या तरी आमच्या समोर आणा मग आम्ही त्यातले मृत्यूयोग दाखवू.`` हे प्रतिपादन वरकरणी रोखठोक वाटले तरी ते व्यवहार्य नाही हे कुणाही सूज्ञास समजेल. एकाच वेळी सर्वांच्या कुंडल्यात मृत्यूयोग असणे ही बाब कॉमनसेन्सला पटत नाही. मग ज्योतिषी 'सर्व प्रवाशांची जबाबदारी ही वैमानिकावर नसते का? त्याला जर काही झाले तर सर्वांचा जीव धोक्यात नाही का?` असला बालिश युक्तिवाद करतात. मग भूकंपाबाबत काय? तिथ मेदिनिय ज्योतिष उपयोगाला येते. मेदिनीय ज्योतिषात त्या प्रांताला पत्रिका असल्या मुळे व ती व्यक्तिंच्या पत्रिकेपेक्षा प्रभावी असणार. त्यात जर दुर्घटना असेल तर साहजिकच अनेकांना त्याचा फटका बसणार. काही ज्योतिषांच्या मते प्राक्तन हे जर आम्हाला सर्व कळालं असतं तर आम्ही ब्रम्हदेव झालो नसतो का? शेवटी प्राक्तन कुणाला टळलं आहे का? श्रद्धाळू माणसांना हे युक्तिवाद बिनतोड वाटतात. हजारो मरताना एखादा जगला तर ते प्राक्तन व हजारो जगताना एखादा मेला तर तेही प्राक्तनच. खरंतर वैज्ञानिक दृष्टिकोणात हीच बाब प्रोबॅबिलीटीच्या भाषेत सांगितली आहे. हजारो मरताना एखादा जगण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच हजारो जगताना एखादा मरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्योतिषाला आधुनिक विज्ञानाचा आधार शोधणारी माणसे सुद्धा अशा वेळी अध्यात्माचा आधार घेतात.

२२) ज्योतिषांवर दुटप्पी पणाचा आरोप केला जातो. ज्योतिषी लोक खरोखरीच दुटप्पी आहेत का?
हा दुटप्पीपणा खरं तर फलज्योतिष या विषयातील अंतर्विसंगतीतून तसेच त्याविषयीच्या अतिरेकी अभिमानातून निर्माण होतो. मुद्यांचा प्रतिवाद करताना आपल्याला अनुकूल असे संदर्भ वा मुद्दे ज्योतिषी घेतात आणि प्रत्यक्ष जनसंपर्कात मात्र वेगळेच युक्तिवाद वापरतात. या विषयाबाबत ज्योतिषांच्यात अनेक अंतर्गत मतप्रवाह आहेत. काही ज्योतिषी सतत दुटप्पी किंवा दुहेरी विधाने करीत असतात. खोटयाचे खरे व खऱ्याचे खोटे करणे यात त्यांचा स्वार्थ साधला जात असतो. त्यामुळे त्यांना पळवाट पण मिळते. उदाहरणे देउन हे स्पष्ट करतो :-
ग्रह व तारे हे माणसाच्या जीवनावर परिणाम करतात, म्हणजेच त्यांच्या अंगी कारकत्व असते असे ते एकीकडे सांगतात, तर दुसरीकडे सांगतात की ग्रह व तारे हे फक्त भविष्याची सूचना देतात, त्यांच्या अंगी कारकत्व नसते.
एकीकडे ते प्रौढीने सांगत असतात की ज्योतिष हे सर्वात जुने व परिपूर्ण शास्त्र आहे. तर दुसरीकडे सांगत असतात की हे शास्त्र अद्याप अपरिपूर्ण आहे, त्यात संशोघन करण्याची गरज आहे. पण काय करणार, आमच्याकडे साधनसंपत्तीची वाण आहे!
राशी-भविष्याशिवाय वृत्तपत्रांचे व मासिकांचे पानही हालत नाही. शेकडो ज्योतिष्यांचे ते एक निर्वाहाचे साधन असते. लोक त्यामुळे फलज्योतिषाकडे आकृष्ट होतात. हे चित्र एकीकडे दिसते तर दुसरीकडे ज्योतिष-प्रवक्ते राशी-भविष्ये ही ढोबळमानाने लिहिलेली असतात ते खरे फलज्योतिष नव्हेच असे आवर्जून सांंगतांना दिसतात.
एकीकडे ते सांगत असतात की कुंडली जिवंत व्यक्तीची आहे की मृत व्यक्तीची आहे, तसेच ती कुंडली स्त्रीची की पुरुषाची आहे ते आम्ही सांगू शकत नाही. दुसरीकडे प्रौढीने सांगत असतात की जातक स्त्री का पुरुष ते आम्ही अचूक ओळखू शकतो. मृत्यूचे भाकीतही आम्ही वर्तवू शकतो.
एकीकडे ते सांगत असतात की आम्ही फक्त भविष्यकाल अनुकूल आहे की प्रतिकूल आहे ते वर्तवू शकतो. अचूक भविष्य फक्त ब्रम्हदेवालाच माहीत असते. दुसरीकडे हेच ज्योतिषी आपली किती भाकिते अचूक लक्ष्यवेधी ठरली त्याची यादी देत असतात. ज्योतिषशास्त्र हे भौतिक शास्त्रापलीकडचे म्हणजेच विज्ञानापलीकडचे असे स्वतंत्र व निराळेच शास्त्र आहे असे एकीकडे सांगणारे ज्योतिषीच फलज्योतिषाने गृहीत धरलेल्या ग्रह-प्रभावांचे समर्थन करण्यासाठी अल्फा-बीटा-गॅमा किरण या तद्दन भौतिक शास्त्रीय संकल्पनांचीच चर्चा करतात.
एकीकडे प्रारब्ध अटळ आहे असे म्हणतात तर दुसरी कडे जपजाप्य, शांती, दान, खडा, मंत्रतंत्र, पूजा, उपासना इ. उपायांनी अनिष्ट भाग काही अंशी का होईना पण टाळता येतो असेही म्हणतात.

२३) ग्रहांना दैवी शक्तीची प्रतीके मानून त्यांना मानवी गुणधर्म माणसाने चिकटवले आहेत. डोळयांना न दिसणाऱ्या परमेश्वराचे प्रतीक हवे म्हणून माणूस मूर्तीची स्थापना करतो व तिची आराधना करतो. तसेच ग्रहांच्या बाबतीत केले तर काय बिघडले ?
आम्ही पण हेच म्हणतो. ग्रहांना मानवी गुणधर्म माणसाने चिकटवले आहेत पण वास्तविक ते त्यांच्या अंगी नाहीत. पण हे शास्त्र असे मानते की असे गुणधर्म ग्रहांच्या अंगी प्रत्यक्ष आहेत.या शास्त्राची श्रद्धा अशी आहे की ग्रहांना बुद्धी असते. हे कशावरून ते कळण्यासाठी या शास्त्रातली ग्रहांची वर्णने वाचावीत. ब्राम्हण-क्षत्रिय वगैरे वर्णभेद, स्त्री-पुरुष-नपुंसक हे लिंगभेद, स्वभावभेद, आवडीनावडी, आपसातील सख्य व वैमनस्य, असे सगळे मानवी गुण या ग्रहांना असतात असे या शास्त्रात सांगितले आहे. त्या स्वभावानुसार ते जातकांना फळ देतात. ग्रहांना बुद्धी असते ही श्रद्धाच इथे उघड दिसते. बहुसंख्य श्रद्धाळू लोक ग्रहांची शांती, ग्रहजप, ग्रहमख, या गोष्टी मनापासून करतात, शिंगणापूरच्या शनीचा चमत्कार चवीने सांगतात, शनीमहात्म्य भक्तिभावाने वाचतात, ते लोक अशा श्रद्धेशिवायच का या सर्व गोष्टी करतात ? म्हणजे ग्रहांना केवळ बुद्धी नाही तर ते भक्तवत्सल व करूणाघनही आहेत. जपामुळे, होमहवनामुळे ते शांत होतात. शनि आपल्या भक्तांना कमी त्रास देतो. होय! कमी त्रास देणे ही त्याची कृपाच आहे. पुराणातील ग्रहांच्या कथा तुम्ही ऐकल्यात तर एकसे बढकर एक अशा आहेत.
या संदर्भात एक ज्योतिषालंकार अशी मखलाशी करतात की, ग्रह हे पदार्थ आहेत आणि जसे निसर्गात प्रत्येक पदार्थाला गुणधर्म असतात तसेच ते ग्रहांनाही आहेत. पूर्वीचे लोक शास्त्रीय सत्ये लाक्षणिक किंवा अलंकारिक भाषेत सांगत असत, त्याला अनुसरून त्यांनी ग्रहांचे गुणधर्म अलंकारिक भाषेत ग्रंथात लिहून ठेवले आहेत, परंतु हे सर्व पूर्वीच्या थोर प्रज्ञावान लोकांचे पदार्थविज्ञानच आहे. वाहव्वा! राहू-केतू हे काल्पनिक बिंदू पदार्थच आहेत म्हणून त्यांनाही गुणधर्म आहेत, बुध-शनी हे पदार्र्थ असले तरी नपुंसक आहेत, चंद्र हा पदार्थ स्त्री आहे, मंगळ शनीला शत्रू मानतो पण शनी मंगळाला शत्रू मानत नाही, तरीपण दोघेही पदार्थ आहेत! काय हे पूर्वीच्या ज्योतिर्विदांचे अचाट पदार्थविज्ञान!

२४) ग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय?
फायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना बुद्धी असते ही गोष्ट मान्य करावी लागेल. कारण ती असल्याशिवाय त्यांची शांती कशी होणार ? ग्रहांना मानवी भाव-भावना, राग-लोभ वगैरे असतात अशा श्रद्धा पूर्वीपासूनच लोक बाळगत आलेले आहेत. ग्रहांना देवताच मानत असत. अनिष्ट ग्रह बिघडलेले ( म्हणजे रागावलेले ) असले तर त्यांना शांत करण्यासाठी ग्रह-जप, दानधर्म, शांति-कर्मे यांची योजना पूर्वीपासून हे लोक करत आले आहेत. ग्रहांना माणसाप्रमाणे मन व बुद्धी आहे हे गृहीत धरूनच हे उपाय करण्यात येतात की नाही? नेमाने शनीमहात्म्य वाचल्याने, शनिवारी तेल व रुईची फुले शनीला वाहिल्याने शनी त्याची पीडा सौम्य करतो अशी श्रद्धा हे लोक ठेवतातच ना ? शनीला मन व बुद्धी असल्याशिवाय त्यांनी ही श्रद्धा ठेवली असती का ? वेदकाळापासून गायत्री मंत्र लोक कशासाठी जपत आले आहेत ? सूर्याने त्यांच्या बुद्धीचे प्रचोदन करावे म्हणूनच ना? सूर्याला बुद्धीच नसेल तर तो माणसांच्या बुद्धीला कशी प्रेरणा देईल ? म्हणून, परंपराभिमानी लोक जर प्रामाणिक असतील तर ग्रहांना बुद्धी असते हे विधान त्यांनी मान्य करायलाच हवे. हे विधान तुमच्या बुद्धीला पटते का ते प्रथम विचारा. श्रद्धाळू लोकांना असे वाटते की फायदा झाला तर शांती उपासना केल्याने झाला. जर फायदा-नुकसान काहीच झाले नाही तर 'नुकसान झाले नाही हा फायदाच म्हणायचा नाही का?` अशी समजूत करून घेतात. नुकसान झाले तर आपली श्रद्धा वा उपासना कमी पडली किंवा आपला कर्मभोग असे समजतात. एकूण काय तर फायदा-तोटयाची परिमाणे लोकांच्या श्रद्धाळूपणातच दडलेली असतात.

२५) ग्रहांचे खडे वापरल्याने अनिष्ट प्रभाव कमी करता येतात का?
ग्रहांच्या खड्यांना रत्ने असा गोंडस शब्द वापरतात. एखाद्याच्या पत्रिकेत एखादा ग्रह बलहीन असेल तर त्याचे रत्न वापरून त्याचे बल वाढवणे हा एक प्रकार किंवा सर्वात बलवान ग्रहाचे रत्न वापरून त्याच्या गुणात अधिक भर घालणे हा दुसरा प्रकार. अशा प्रकारचे तर्क लढवून या रत्नांची शिफारस केली जाते. चुकीच्या शिफारसीमुळे फायदा होण्याऐवजी तोटा पण होतो ही अजून एक भीती निर्माण केली जाते. कॉस्मिक रेडिएशन, ग्रहांपासून निर्माण होणारी व्हायब्रेशन्स,कलर स्त्रोत असे वैज्ञानिक मुलामा असणारे शब्द वापरून त्याला एक प्रतिष्ठा दिली जाते. त्यामुळे रत्नातून जणु काही रेडिओ ऎक्टीव्ह किरणे बाहेर पडत असतात असं काहीतरी चित्र सामान्य माणसाच्या मनात तयार होतं.
खरं तर तो मानसोपचाराचा एक प्रकार आहे. खडे वापरल्यामुळे अनिष्ट प्रभाव कमी झाले की नाही हे ठरवायचे कसे ? खडा वापरला नसता तर काय झाले असते असा प्रयोग करून पहाणे अशक्य आहे. खड्यांच्या परिणामांना विज्ञानाचा दिखाऊ मुलामा जो दिला जातो तो गैर आहे. कसे ते पहा. ही गोष्ट सर्वांना ठाऊक आहे की राहू हा एक मानीव बिंदू आहे. त्याच्यापासून कसलेही किरण निघणे अशक्य आहे. मग राहूचे दुष्परिणाम टाळण्यासाठी लसण्या खडा वापरण्याने त्यातून कोणते किरण तुमच्यावर पडणार किंवा कोणते किरण त्यात अडवून धरले जाणार ? अमुक रंगाच्या खड्यातून अमुक किरण परावर्तित होतात हे म्हणणे एकवेळ समजण्यासारखे आहे. पण ते अनिष्ट किरण त्या खड्यात अडवून कसे धरले जातात हे समजत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे खडयावर ग्रहांचे जे काही किरण पडतात ते फक्त ग्रह डोक्यावरच्या आकाशात असतांनाच पडतात, ग्रह मावळून पृथ्वीच्या खाली गेल्यावर त्याचे किरण इथे कसे पोचणार ? मग तशा वेळी खड्याचा काय उपयोग ? बरे, ग्रह डोक्यावरच्या आकाशात असतांना त्याचे किरण थेट आपल्यावर पडत असतातच ना? मग त्या वेळी त्या चिमुकल्या खड्यावर पडणारे किरण आणखी काय जास्त परिणाम करणार ? एकूण काय तर वैज्ञानिक कारणे दाखवून खडे वापरणे हे वेडगळपणचे आहे. हौस म्हणून खुशाल वापरावेत. खडे प्रकाश-किरण आकर्षित करतात ही कल्पना साफ खोटी आहे. खडे एवढेच काम करतात की पडलेले प्रकाश-किरण परावर्तित करतात. त्यांना पाडलेल्या पैलूमुळे प्रकाशाचे परावर्तन खूप चांगले होते, त्यामुळे ते चमकतात. पूर्ण अंधारात हिरासुद्धा चमकणार नाही हे लक्षात घ्यावे. रत्ने हा पूर्णपणे दागदागिने, सौंदर्यप्रसाधने या प्रांताचा भाग आहे. आणखी एक अशीच वैज्ञानिक मुलामा असलेली पण लुच्चेगिरीची मांडणी म्हणजे ''ग्रहांपासून निर्माण होणारी रेडिएशन्स ही नेहमीच ऋण भाराची असतात व रत्नांची जी शक्ती असते ती नेहमीच धन भाराची असते त्यामुळे ग्रहांपासून निघणारी व्हायब्रेशन्स रत्नांपर्यंत पोहोचताच 'न्यूट्रलाईज` होतात.`` सगळया थापा!
तुम्हाला बडोद्याच्या पटवर्धनांचा बोलका पत्थरविषयी माहिती असेल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याविरूद्ध जोरदार मोहीम उघडली होती. वीस पैशाचा अॅगेटचा खडा ते 'बोलका पत्थर` म्हणून वीस रूपयांना विकत. त्यांचा दावे असे असतात :-
" बोलका पत्थर हे अॅस्टॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिटयूटचे अनमोल संशोधन आहे. खडयातून दैवी किरण बाहेर पडतात त्यामुळे माणूस तणावमुक्त होतो. हे एक संरक्षण कवच असून अनिष्ट ग्रहांपासून तुमचे रक्षण करते. हा जन्मराशीवर आधारित असल्याने आयुष्यभर वापरता येतो. खड्याचे गुण न आल्यास पैसे परत. " त्यामुळे येथे फसवणूक होत नाही असे लोकांना वाटते. आता यात गोम अशी आहे की, गुण न आल्यास पैसे परत मागायचे ते खडा घेतल्यापासून ३० ते ४५ दिवसाच्या आत. पण हे कसे शक्य आहे ? कोर्टकचेरीतले काम, जुनाट रोग, परिक्षेचा निकाल, संतती-प्राप्ती या गोष्टीं काही ४०-४५ दिवसाच्या आत होत नाहीत. बरे, पैसे परत मागायचेच झाल्यास बडोद्याच्या ऑफीसला व्हीपी पाठवून पैसे परत घेण्याचा खर्च व्हायचा सात रुपये. " आता खडा घेतलाच आहे वापरून बघू काही दिवस " असे माणसाला वाटते. अशा अनेक कारणामुळे सहसा कुणी पैसे परत मागत नाहीत. पण हा काही खडा लाभल्याचा पुरावा नव्हे. खडयांच्या वापराला काही ज्योतिषांचाही विरोध होता. त्यांच्या मते असंख्य माणसे एकाच राशीची असतात सगळयांच्या अडचणीवर एकच उतारा कसा असेल? त्यामुळे राशीवरून खडा कोणचा वापरावा ते ठरवणे ही चुकीची व अत्यंत ढोबळ पद्धत आहे असे ते म्हणत. या खडे व्यापाऱ्यांची महत्वाची अट अशी की रत्ने वापरणाऱ्याची त्यावर श्रद्धा असायला पाहिजे नाही तर रत्नांचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला रत्नामुळे फायदा झाला नाही तर तुमची श्रद्धा कमी पडली असे समजून स्वस्थ बसावे ! रत्नांचा खरा फायदा कुणाला होत असेल तर तो रत्ने विकणाऱ्यांना होतो !

२६) प्रयत्नाने भविष्य बदलता येते का?
प्रकाश घाटपांडेसमजा मी प्रयत्न केला नसता तर माझ्या भविष्यात मी अमूकअमूक होणार होतो पण मी प्रयत्न केला म्हणून मी तमूकतमुक झालो हे तपासणार कसे? भविष्यात असणाऱ्या घटनेविषयी ज्योतिषांचे विविध मतप्रवाह आहेत. जहाल पंथ असा म्हणतो की प्रारब्ध अटळ आहे. यदृच्छेशिवाय झाडाचे पानही हलू शकत नाही. म्हणजे तुमच्या हातात काही नाही. जे काही घडणार आहे ते ठरलेले आहे तुम्ही निमित्तमात्र असता. दुसऱ्या प्रकारचे लोक असे म्हणतात की, प्रयत्नांशिवाय यश नाही हे खरेच आहे. तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही प्रारब्ध बदलू शकता. पण ते स्वातंत्र्य तुम्हाला किती? एखाद्या गायीच्या वासराला दोरखंडाने खांबाला बांधलेले असते. त्याला जेवढी दोरी लांब तेवढे त्याचे स्वातंत्र्य. त्या दोरीने निर्माण केलेला परीघ ही त्याची प्रयत्नांनी केलेल्या वर्तुळाची सीमारेषा. तुमच्या पूर्वसंचित व प्रारब्ध यानुसारच तुमच्या आयुष्यातल्या घटना घडत असतात. ग्रहांचे काम एवढेच आगामी घटनांची सूचना देणे. म्हणजे ग्रह हे फक्त सूचक वा निर्देशक आहेत. ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर म्हणतात, ''ज्योतिष हे फक्त तुमचा एक पंचमांश भाग नियंत्रित करतं. बाकी चारपंचमांश हे इतर गोष्टी प्रभाव टाकत असतात.`` म्हणजे प्रयत्न ही बाब या चार पंचमांश मध्ये मोडते. आपल्याला जिचा शोध घ्यायचाय् त्या बैठकीविषयी एवढे भिन्न मतप्रवाह आहेत. धूर्त ज्योतिषांची डायलॉगबाजी बघा. ते म्हणतात, ''दैवगतीच्या रुळावरुन प्रयत्नांचे स्टेअरिंग ( ? )हातात घेऊन आपल्या आयुष्याची गाडी जेव्हा मार्गक्रमण करत असते त्यावेळी ज्योतिष हे मार्गदर्शक बोर्डाप्रमाणे काम करतं.`` काही ज्योतिषी म्हणतात, ''तुम्हाला प्रयत्न करण्याची बुद्धी झाल्याशिवाय तुमच्याकडून कसे प्रयत्न होणार. आणि प्रयत्न केल्याशिवाय यश तरी कसे मिळणार? यासाठी तर ज्योतिषाचं मार्गदर्शन घ्यायचं.`` आता बोला!

सर्वसामान्य माणसाला ज्योतिषाकडे जावंस वाटाव अशीच इथली सामाजिक परिस्थिती आहे. ती जेव्हा बदलेल त्या वेळी ज्योतिषाकडे जाणारा वर्ग आपोआप कमी होईल. हे पुस्तक चिकित्सकांनी सर्वसामान्य माणसांच्या चष्म्यातून वाचावे, सर्वसामान्य माणसांनी चिकित्सकांच्या चष्म्यातून वाचावे आणि ज्योतिषांनी अंतर्मुख होउन वाचावे असं अपेक्षित आहे..!!!
अँड. राज जाधव...!!! 
(संदर्भ - "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी..... प्रश्नोत्तरातून सुसंवाद...लेखक  - प्रकाश घाटपांडे)

No comments:

Post a Comment