My Followers

Wednesday 22 August 2012

र.... रे राजकारणाचा....!!!

र....रे राजकारणाचा....!!! 

आजकाल कोणीही सोम्या-गोम्या उठतो आणि निषेध मोर्चा काढायला निघतो, महाराष्ट्र बंद करायला निघतो  आणि महाराष्ट्राचा कैवारी असल्याचे भासवतो. मोर्चाला  एक तर परवानगी मिळते किंवा नाही, मग परवानगी मिळाली कि तिथे बेडका सारखी  डरावव्व्व...डरावव्व्व...डरावव्व्व...एकाच टायीप ची शिळ्या काडीला उत आणल्या सारखी, शिवराळ भाषणे(?) करायची, आणि परवानगी नाही दिली तर अजूनच चांगल, ह्याच नाव घे, त्याच नाव घे, त्याला कशी दिली ? मलाच का नाही ? मी विना परवानगी काढणार, कोण काय करतंय बघून घेऊ, अरे बघून घ्यायचं झाल ना तर रात्री घरात घुसून  पोकळ बांबूचे फटके देत घेवून जातील पण काय, आता सगळ्यांना कळून चुकलंय, हे नुसतंच बोम्बल्तंय काही फरक पडत नाही. 

११ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनल्सवर (हे मोठा मराठी भाषा प्रेमाचा आव आणतात मात्र "सीएसटी " शिवाय कधी बोलत नाहीत. ) रझा अकादमीने काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले आणि  पोलिसांवर व प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर हल्ला करण्यात आला. अतिशय निंदनीय अशी घटना घडली, सर्वजन त्याचा निषेध करतच आहेत कि,  यामध्ये पोलिसांच्या बंदुका पळविण्यात आल्या तसेच महिला पोलिसांचा विनयभंग देखील करण्यात आला. सुमारे ४० ते ५० हजाराचा जमाव हिंसक झाला होता, परंतु मुंबई पोलिसांच्या योग्य निर्णयामुळे व सहनशिलतेमुळे अवघ्या ४० मिनिटात हा प्रकार कंट्रोल मध्ये आला.  सगळे शांत झाल्यावर राजकारण्यानी या प्रकरणावर पोळी भाजू नये असे शक्य आहे का ? मग राजीनाम्याची मागणी, बरे आता राजीनामे देत बसायचे का, त्यातील आरोपी शोधायचे ? 

      मुंबईत नुकत्याच झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी  "मनसे" प्रा. ली.कंपनीने आयोजित केलेल्या मंगळवारच्या आझाद मैदानातील सभेत "मनसे" प्रा. ली. कंपनीचा सर्वेसर्वा "कार्टुनिस्ट"  म्हणाला की “इंदू मील  मध्ये काय बंगला बांधायचा आहे का?”

    शिवसेनेचेच जात्यंध संस्कार घेऊन मातोश्रीत वाढलेले आणि म्हातार्‍या काकांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वत:चे नवीन राजकीय दुकान थाटलेले  "कार्टुनिस्ट" एखाद्या हुकुमशहालाही लाज वाटेल अश्या थाटात विधाने करत आहेत. आता नवीन हुकुमशहा लोकांना  "कार्टुनिस्ट" दिसत असले तरी मुळ  व्यवसायाने बिल्डर, त्यामुळे यांच्या स्वप्नातही यांना जमीनच दिसते, कुठे दिसले जमीन की, घ्या त्याला खोपच्यात आणि करा आपल्या नावावर, आणि बांधा बंगले बहुदा त्यामुळेच तर  "कार्टुनिस्ट"  च्या डोक्यात ही कल्पना आली नसावी कश्यावरून ?  कारण जमीनीचा उपयोग फक्त वरील कारणासाठीच होतो एवढेच माहित असेल.
पण "कार्टुनिस्ट" साहेबाना माहित न्हवते तर सचिवाला विचारायचे किंवा एखाद्या आमदाराला विचारायचे सध्या टी.व्ही.वर गोंधळ घालताना सारखे दिसतात. (आता  नेहमीच निलंबित असल्यावर दुसरे काम तरी काय ?) की, इंदू मील आहे की कोहिनूर मील, आणि कशासाठी हवी आहे ? तिथे बाबासाहेबांचे स्मारक बांधायचे आहे का ? बंगला,(याला बहुदा इंदू मील, इंदू मील केले की धडकी भरत असेल,  याची  कोहिनूर मिल तर मागत नाहीत ना ?)  

मागे याच्या काकाने विद्यापीठ नामांतराच्या वेळेस, नामांतरास विरोध दर्शवून,"घरात नाही पीठ, यांना कशाला हवे विद्यापीठ" अशी वल्गना केली होती, आता हा पुतण्या काकाच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे जात आहे, दादर रेल्वे स्टेशन चे नाव "चैत्यभूमी" करायचे म्हटले तर, दोघे काके पुतणे म्हणाले,"नाव देवून काय फरक पडणार आहे का ? तुमच्या रोजच्या जनजीवनात फरक पडणार आहे का ? मग आमच्या सारख्या सामान्य माणसाला काही प्रश्न भेडसावतात की, मग बॉम्बे चे मुंबई कशासाठी ? विक्टोरिया टर्मिनल्स चे छत्रपती शिवाजी टर्मिनल्स कशासाठी ?  तेव्हा  बहुतेक सामान्य लोकांच्या रोजच्या जगण्यात काही फरक पडत असेल कदाचित.  जेव्हा जेव्हा शिवरायांचे नाव येते तिथे आम्ही अभिमानाने पुढे सरसावतो, अरबी समुद्रामध्ये शिवरायांचे मोठे भव्य दिव्य स्मारक बांधायचे, आम्हाला आनंदच होतो, विमानतळाला शिवरायांचे नाव द्यायचे आम्ही आनंदाने कार्यक्रमाला उपस्थित, मग आमच्याच बाबतीत असे का? आमच्या बाबासाहेबांचे स्मारक म्हटले की हि मंडळी का नाके मुरडतात ? बाबासाहेब काय फक्त दलितांचे नेते आहेत का ?
एकूणच  हा "कार्टुनिस्ट" अत्यंत जात्यंध, असून  बहुजन द्वेष्टा असून खरा जेम्स लेन बाबा पुरंदरेचा चेला आहे.  आमच्या "बाबासाहेबांच्या स्मारकाला" बंगला म्हटल्या बद्दल मी "कार्टुनिस्ट" चा तमाम आंबेडकरी अनुयायांकडून  जाहीर निषेध करतो. 

इंदू मील ची जागा कश्यासाठी हवी आहे याचा उलगडा आपणच करून द्यायला हवा,  तर काय आहे "कार्टुनिस्ट" साहेब तिथे कुठला बंगला नाही, तर ज्या घटनेवर अख्खा भारत देश चालतोय ना, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जागतीक दर्जाचं स्मारक बांधायचेय, ते नुसतं सिमेंट विटांच नसून तिथे बाबासाहेबांच्या आठवणी, कार्य व इतिहास याचा उलगडा करणारएक विद्यापीठच असेलअसं स्मारक बांधायचं आहे, बंगला नाही, बहुदा आता  कळालेच असेल. 

"कार्टुनिस्ट" ची वटवट सहन करण्याएवढा आंबेडकरी समाज  नामर्द आहे का? याच्या काकाची  वटवट महाराष्ट्राने ४० वर्ष सहन केली. याच्या सारखी माणसे शिवरायांचे नाव घेऊन अखिल भारतीय स्तरावर मराठयांची बदनामी करत आहेत. देशपातळीवरील महाराष्ट्रातील माणूस म्हणजे तोडफोड करणारा, बाहेरच्यांना मारहाण करणारा अशी प्रतिमा झाली आहे. हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे नियोजित षडयंत्र न्हवे काय ? आणि ह्यांना फक्त गरीब बहुजन मागासलेला कष्टकरी, उत्तर भारतीयांचेच वावडे आहे. ह्यांना मोठ मोठे उत्तर भारतीय प्रशासन अधिकारी चालतात. जवळपास सगळे उच्च अधिकारी उत्तर भारतीय  सवर्ण आहेत, त्यांच्या विरोधात कधी तुम्ही बोलणार आहात कि नाही? मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत होता तेंव्हा तुम्ही कुठे होते? तिथला मराठी टक्का कमी होण्याचे कारण तुम्हाला माहित नाही काय? गिरण्या  कुणामुळे बंद पडल्या?  गिरणी कामगारांच्या  हक्काच्या जागा कुणी बळकावल्या हे माहित नाही काय ? त्या कोहिनूरमील मध्ये या गिरणी कामगारांसाठी घरे बांधून देता का ? आहे हिम्मत ? नाही ना, मग कशाला मराठी माणसाना आशेला लावता ? "मनसे" प्रा.ली. कंपनी सारखे पक्ष रोज तोडफोडीची भाषा करतात तरी त्यांच्यावर कारवाई का होत नाही? ह्यांची पोरं इंग्लिश मिडीयमला आणि आमची नगरपालिकेच्या शाळेत का ?  अरे मराठी मात्रभाषा ती  वाढली पाहिजे, टिकली पाहिजे पण त्यासोबत इतर भाषा पण शिकल्या पाहिजे.  आपलेच  महाराष्ट्रीयन  भाऊ  इतर राज्यातही राहतात. उद्या तिथल्या लोकांनी  महाराष्ट्रीयन  लोकांना हाकलून लावले तर त्यात दोष कुणाचा?


मित्रानो.... कालच्या सभेतील हे वाक्य मुद्दाम आंबेडकरी जनतेला डिवचण्यासाठी केलेले आहे,  याने आंबेडकरी जनता रस्त्यावर येईल आणि यांच्या पोरांवर गुन्हे दाखल होतील, ह्यांनी आपल्या मुलांना अशा वादात अडकवून  ठेवायचे हे नवीन नाही.  त्यामुळे माझ्या सर्व भिमसैनिकाना आवाहन आहे की शांतता राखा,  कोणताही  अनुचित प्रकार करू  नये, शांततेनी निषेध करा, इंदुमील वर बाबासाहेबांचे मोठे भव्य दिव्य स्मारक उभे राहणारच. शेवटी हे सर्व "र...रे राजकारणाचा", मधलं केवळ जातीच राजकारण आहे. 

सगळ्या भीमसैनिकांनी अश्या कोणत्याही देशविघातक जात्यंध शक्तीच्या  नादी न लागता आपली प्रगती साधावी. आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी स्पर्धा परीक्षा देवून "शासनकर्ती जमात व्हा...!!!" हे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करावे, बाबासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता ही त्यांच्या कोणत्याही  स्मारका पेक्ष्या खूप मोठी आहे....!!!   

अँड. राज जाधव...!!! 

1 comment:

  1. इंदू मिलच्या वक्तव्यावरून राज ठाकरे यांचा बाबासाहेब आंबेडकरांविषयीचा कडवा द्वेष प्रकट झाला आहे,उत्तरप्रदेशात तीन शहरांत बुद्ध मूर्तीची कुठेही विटंबना झाल्याची माहिती नाही. त्यामुळे राज ठाकरे कशाच्या आधारावर माहिती देतात ? कोणत्याही न्यूज चानेल वर अथवा वर्तमान पत्रामध्ये विटंबना झालेली बातमी नाही, फक्त फेसबुक वर फेक फोटो आहेत.

    ReplyDelete