My Followers

Saturday 2 June 2012

प्रा. हरी नरके यांच्या मते व्यंगचित्राचे केवळ राजकारण...!!!


प्रा. हरी नरके यांच्या मते व्यंगचित्राचे केवळ राजकारण...!!!

आंबेडकरी जनते च्या  मते एन सी ई आर टी ने बनवलेल्या पुस्तकातातील वादग्रस्त व्यंगचित्रात बाजूला शेकडो लोक उभे असल्याचे दाखवले आहे.  त्याचपद्धतीने गोगलगायीवर सात-आठ लोक बसल्याचे दाखवता आले असते. म्हणजे राज्यघटनेच्या निर्मितीला दिरंगाई होण्यास सगळी घटना समिती जबाबदार आहे, असे म्हटता आले असते. ती गोगलगाय म्हणजे   `घटना समिती'  अशी मखलाशी करण्याचा प्रयत्न काही विचारवंतांनी केला. पण बारकाईने पाहिले तर गोगलगायीवर constitution असे लिहिलेले दिसते. त्याठिकाणी   `घटना समिती'  असे लिहिलेले नाही. त्यामुळे घटना तयार करण्यास उशीर झाला तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जबाबदार आणि देशाला एक उत्तम घटना दिली की त्याचे श्रेय सगळ्या घटना समितीला द्यायचे, अशी लबाड मांडणी करणारा आणि तसा प्रचार करणारा मोठा वर्ग आजही देशात आहे. आपले हितसंबंध आणि जातीवर आधारित श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी धूर्तपणे युक्तिवाद करुन दिशाभूल करणाऱ्या या  वर्गाला आंबेडकरी जनतेचा विरोध आहे.

                                                           प्रा. हरी नरके यांच्या मते ....!!! 

My Photoएका व्यंगचित्रावरून गेले काही दिवस आपले समाजजिवन ढवळून निघाले आहे.एन.सी.ई.आर.टी.या केंन्द्रीय अभ्यासक्रमाची पुस्तके तयार करणा-या संस्थेने इयत्ता अकरावीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात छापलेल्या एका व्यंगचित्रावरुन गदारोळ माजला आहे.संसदेत खासदारांनी जोरदार हल्ला केल्यानंतर सरकारने हे व्यंगचित्र पुस्तकातुन काढून टाकल्याची प्रथम घोषणा केली आणि नंतर हे पुस्तकच अभ्यासक्रमातुन काढुन टाकले.त्याच्या निर्मितीची चौकशी करण्यासाठी आंबेडकरवादी डा.सुखदेव थोरात यांची समिती नेमण्यात आली आहे.या समितीचा अहवाल येईल तेव्हा ग्रंथाच्या निर्मितीमागील चित्तरकथा कळू शकेल.भारत सरकारच्या या पावलांचा निषेध नोंदविण्यासाठी ग्रंथसमितीचे डा.सुहास पळशीकर आणि डा.योगेंद्र यादव यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. त्यांच्यावर खटले भरावेत अशी मागणीही करण्यात आली आहे. जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार शंकर यांनी १९४९ साली ’शंकर्स विकली’त प्रकाशित केलेले हे व्यंगचित्र आहे. स्वता डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी ते पाहिलेले असणार.मात्र त्यांनी त्याला आक्षेप घेलल्याचे दिसत नाही.डा.बाबासाहेब हे अतिशय खिलाडूव्रुतीचे होते. इतरांनी केलेल्या टिकेवर  ते चिडत नसत. स्वागतच करीत. ते स्वताही अनेकांवर तुटून पडत.महात्मा गांधी,कांग्रेस,नेहरू,राम,क्रुष्ण,हिंदू धर्म यावर त्यांनी कडाडून टिका केलेली आहे.या व्यंगचित्राचे ३ अर्थ लावण्यात आलेले आहेत. भारतीय संविधान बनविण्याची प्रक्रिया सुमारे ३ वर्षे चालु होती.हया उशीर होण्याला डा. बाबासाहेब जबाबदार आहेत असे हे व्यंगचित्र सुचवते.संविधान निर्मितीची प्रक्रिया गोगलगायीच्या गतीने चालू असुन डा. बाबासाहेब आणि पंडित नेहरू हातातील आसुडाने तिला वेग देण्याचा प्रयत्न करीत असताना दिसत आहेत. {१}नेहरू हातातील चाबकाने कोणाला मारीत आहेत याबद्दल दुमत आहे. एका गटाला असे वाटते की नेहरुंनी बाबासाहेबांवर हा उगारलेला आसूड आहे.{२}दुसरा गट असे मानतो की नेहरू बाबासाहेबांच्या पाठीशी असून ते बाबासाहेबांप्रमाणेच गोगलगायीला मारीत आहेत.{३}संविधान निर्मितीत बाबासाहेबांचा वाटा सिंहाचा असून त्यातील जमेच्या सर्व गोष्टींचे श्रेय आणि विलंबाचे अपश्रेय हे दोन्ही बाबासाहेबांचेच आहे. चाबूक दोघांच्याही हातात आहे.नेहरू बाबासाहेबांकडे बघत नसून जमिनीकडे खाली पहात आहेत.ते गोगलगायीलाच मारीत आहेत,हे स्पष्ट आहे.आपण एकाकडे बघत दुस-याला मारीत नसतो.ज्याला मारायचे त्याच्याकडेच माणूस पहातो हे कुणीही सांगू शकतो.असे असताना ह्यावर एव्हढा गदारोळ का माजवला गेला?यामागे काय राजकारण आहे? याची शांतपणे उकल केली पाहिजे. हे पुस्तक गेली ६ वर्षे अभ्यासक्रमात शिकविले गेले आहे.मायावती सत्तेवर असताना ते उत्तरप्रदेशात शिकविले गेले.त्याला त्यांनी कधीही हरकत घेतली नाही.रामदास आठवले कांग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तेत असताना जेव्हा संसदेत या पुस्तकावर ५ वर्षांपुर्वी चर्चा झाली तेव्हा त्यांनी पुस्तकाला विरोध केला नाही.केंद्रीय मंत्री अर्जुनसिंग यांनी सरकारतर्फे तेव्हा हे पुस्तक मागे घेणार नाही असे सांगितले.आज मात्र त्याच पक्षाचे मंत्री कपिल सिब्बल यांनी ते लगेच मागे घेतले.द्रमुकचे लोकही तेव्हा गप्प होते.आज तेही विरोधात पुढे आहेत. 

राजकीय परिस्थिती बदलली की पुस्तकाकडे बघण्याचा द्रुष्टीकोण बदलतो काय? 

होय.संसदेत आज सरकार आरोपांच्या जाळ्यात अडकलेले आहे. मायावती,आठवले,द्रमुक हे सारेच अडचणीत आहेत. मायावती,आठवले आदींना लोकांचे लक्ष स्वता:कडे वेधून घेण्यासाठी आणि सरकार व द्रमुकला लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी मुद्दा हवाच होता.तो त्यांना मिळाला.सचिन खरात यांच्या संघटनेने डा.पळशीकर यांचे पुणे विद्यापिठातील डा.बाबासाहेबांच्या पुतळ्याशेजारील डा.आंबेडकर भवनातील कार्यालय तोडले.बाबासाहेबांना अपार प्रिय असलेल्या पुस्तकांची नासधुस केली.पळशीकरांना निळी शाई फासण्याचा त्यांचा प्रयत्न होता.विद्यापिठातील काही बौध्द प्राध्यापकांनी स्वताचे कडे करून पळशीकरांचे संरक्षण केले.खरातांचे कार्यकर्ते चेनलवाल्यांना सोबत घेवुनच गेले होते.बाबासाहेबांची मानहानी झाली असे कोणाचे मत असेल तर त्यांनी वैचारिक प्रतिवाद करायला हवा होता.बाबासाहेबांच्या संविधानाच्या मार्गाने जायला हवे होते.आंबेडकरी चळवळ आता प्रगल्भ झालेली आहे.आम्ही बाळ गांगल आणि अरुण शौरींनाही वैचारिक प्रत्युत्तर दिलेले होते.यापुढेही कोणाचाही प्रतिवाद करण्याची आमची क्षमता आहे.हिंसक हल्ले ही बुद्ध-फुले-आंबेडकरांच्या मार्गाने जाण्याची रित आहे काय? ह्या हल्ल्याचा मी तिव्र निषेध करतो.ह्या हल्ल्याने बाबासाहेबांचाच अवमान झालेला आहे. आम्ही वैचारिक लढाया करायला सक्षम नाही अशी कबुली यातुन दिली गेली आहे,जी मला मान्य नाही.हा मला आंबेडकरी चळवळींचाच अपमान वाटतो. हल्ल्याचा निषेध करायला सगळे आंबेडकरी  विचारवंत पुढे यायला हवे होते.पण तसे घडले नाही.प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे निषेध केला हे चांगले झाले.त्यांनी पळशीकर-यादवांचा राजीनामा स्विकारला जावू नये अशीही मागणी केली.बाकी बरेच जण मुग गिळून गप्प बसले किंवा अवमानावर बोलताना पळशीकर-यादवांना प्रतिगाम्यांचे हस्तक ठरवून मोकळे झाले.हे दोन वेगळे मुद्दे आहेत. मी त्यांची गल्लत करणार नाही.व्यंगचित्रावर बोलण्याचा माझा हक्क सुरक्षित ठेवुन मी काही प्रश्न उपस्थित करु ईच्छितो. पळशीकर-यादव हे आंबेडकरी चळवळीचे जवळचे मित्र आहेत. पुरस्कर्ते आहेत. त्यांच्यावर प्रतिगाम्यांचे हस्तक असा शिक्क्का मारणे अन्यायकारक आहे.त्यांच्याशी मतभेद होवू शकतात, नव्हे माझेही त्यांच्याशी अनेक मतभेद आहेत.राहतील. पण मी त्यांच्या हेतुंवर शंका घेणार नाही.उलट त्यांच्यासारखे प्रागतिक लोक अभ्यासक्रम ठरविण्यात होते म्हणुन पहिल्यांदाच संविधान निर्मितीचे योग्य श्रेय बाबासाहेबांना दिले गेले.त्यांना तेथुन हटविण्यासाठी उजव्या शक्ती देव पाण्यात घालून बसल्या होत्या.त्या जिंकल्या.एका व्यंगचित्राचा भावनिक "इश्यु" करुन आंबेडकरवाद्यांच्याच काठीने त्यांनी आंबेडकरवादी पुस्तक रद्द करविले.क्या बात है.याला म्हणतात,शांत डोक्याने सापळा लावा,चळवळीतील लोकांचा वापर करून घ्या आणि आंबेडकरवादाला खतपाणी घालणारा अभ्यासक्रम रद्द करवून घ्या.ते पुस्तक न वाचताच रद्द करा अशी मागणी पुढे आली, गदारोळ करण्यात आला,पुस्तक रद्द झालेही.अभ्यासक्रम तयार करण्याची यंत्रणा आजवर कायम,हिंदुत्ववादी,मार्क्सवादी किंवा गांधीवादी यांच्या हातात राहिलेली आहे.फुले-आंबेडकरवादी तिकडे फिरकुही शकणार नाहीत याचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे.म्हणुनच पळशीकर-यादव या चळवळीच्या मित्रांचे तिथे असणे गरजेचे होते.एन.सी.ई.आर.टी.चे माजी प्रमुख आणि प्रतिगामी विचारांचे हस्तक  जे.एस.रजपुत यांनी ’यादव-पळशीकर हटाव’ मोहीम हातात घेतली होती.ती मायावती,आठवले आणि महायुतीतील महानुभावांच्या मदतीने फत्ते झाली. हे व्यंगचित्र पाठ्यपुस्तकात आज वापरण्याची खरेच गरज होती काय?हे व्यंगचित्र बाबासाहेबांचा अवमान करते काय?हे व्यंगचित्र पळशीकर-यादवांनी बाबासाहेबांच्यावरिल आकसापोटी मुद्दाम काढुन घेवुन पुस्तकात छापले आहे काय? पुस्तकात हे एकच व्यंगचित्र आहे की सगळे पुस्तकच इतर अनेक मान्यवरांवरील व्यंगचित्रांनी भरलेले आहे?पाठ्यपुस्तकात व्यंगचित्रे वापरुन तो रंजक करावा काय?त्यामुळे मुलांची अभ्यासाची भिती घालवून त्यांच्या मनातील अभ्यासाबद्दलची अढी/दहशत नष्ट करणे योग्य आहे काय? चळवळीला व्यंगचित्रांचे वावडे असावे काय? आम्ही व्यंगचित्र हे व्यंगचित्र म्हणुन पाहुच शकत नाही काय? बाबासाहेबांनी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर अवघ्या साडेपाच महिण्यात पहिला मसुदा सादर केलेला असताना विलंबाला त्यांना जबाबदार ठरविणे योग्य ठरते काय?घटना समितीत ज्यांचे ८० टक्के बहुमत होते ते सत्ताधारी पक्षाचे लोक २ वर्षे चर्चेचे गु-हाळ लावून बसले हा दोष बाबासाहेबांचा कसा?{बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष झाले २९ आगस्ट १९४७ रोजी, आणि त्यांनी तयार केलेला घटनेचा पहिला मसुदा गेझेट आफ इंडियात प्रकाशित झाला २० फ़ेब्रुवारी १९४८ रोजी. त्यावर पुढे सुमारे २ वर्षे चर्चा होवुन घटना २६ जानेवारी १९५० ला अमलात आली.} असे अनेक प्रश्न आहेत.त्याच्या उत्तरांच्या शोधातुनच सत्त्याकडे जाता येईल.पळशीकर ब्राह्मण आणि यादव ओबीसी आहेत म्हणुन त्यांच्यावर हेत्वारोप/हल्ले होणार असतील आणि सारे आंबेडकरवादी त्यावर सोयिस्कर मौन धारण करणार असतील तर ते चळवळीचेच नुकसान करणारे ठरेल.यापुढे मित्रशक्ती बाबासाहेबांवर लिहिताना ताकही फुंकुन पितील. आजवर इतरांची कठोर चिकित्सा करणारे आणि दुस-यांवर टिकेचे जोरदार आसुड ओढणारेच जर आज हळवे बनुन आम्ही टिका खपवुन घेणार नाही असे म्हणणार असतील तर मग या महाराष्ट्रात यापुढे छत्रपती शिवरायांप्रमाणेच बाबासाहेबांचाही देव केला जाईल ही काळ्या दगडावरची रेघ होय.म्हातारी मेल्याचे दु:ख आहेच पण काळही सोकावतोय.विचारी माणसेही भावनिक सापळ्यात कशी अडकतात त्याचा हा पुरावाच नव्हे काय?अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जनक बाबासाहेब हेच मुस्कटदाबीसाठी वापरले जात असताना आम्ही काय करणार आहोत ?.......प्रा. हरी नरके....!!!

आंबेडकरी जनता...!!!

परंतु आंबेडकरी जनते च्या  मते एनसीईआरटीने बनवलेल्या पुस्तकातातील वादग्रस्त व्यंगचित्रात बाजूला शेकडो लोक उभे असल्याचे दाखवले आहे.  त्याचपद्धतीने गोगलगायीवर सात-आठ लोक बसल्याचे दाखवता आले असते. म्हणजे राज्यघटनेच्या निर्मितीला दिरंगाई होण्यास सगळी घटना समिती जबाबदार आहे, असे म्हटता आले असते. ती गोगलगाय म्हणजे   `घटना समिती'  अशी मखलाशी करण्याचा प्रयत्न काही विचारवंतांनी केला. पण बारकाईने पाहिले तर गोगलगायीवर constitution असे लिहिलेले दिसते. त्याठिकाणी   `घटना समिती'  असे लिहिलेले नाही. त्यामुळे घटना तयार करण्यास उशीर झाला तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जबाबदार आणि देशाला एक उत्तम घटना दिली की त्याचे श्रेय सगळ्या घटना समितीला द्यायचे, अशी लबाड मांडणी करणारा आणि तसा प्रचार करणारा मोठा वर्ग आजही देशात आहे. आपले हितसंबंध आणि जातीवर आधारित श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी धूर्तपणे युक्तिवाद करुन दिशाभूल करणाऱ्या या  वर्गाला आंबेडकरी जनतेचा विरोध आहे.

  भा रतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यंगचित्र नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (एनसीईआरटी) बनवलेल्या पुस्तकात छापले. यावरुन देशात आणि संसदेत मोठा गदारोळ झाला. अखेरीस हे पुस्तकच मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला. दरम्यानच्या काळात एनसीईआरटीच्या सल्लागारांच्या पुणे विद्यापीठातील कार्यालयात काही तरुणांनी तोडफोड करुन राग व्यक्त केला. कोणतीही तोडफोड, हिंसा कदापि मान्य होणारी नाही. या विधानात एक मेख आहे. कारण या विधानात दृश्य स्वरुपातील हिंसेबाबतच बोलले जाते. हिंसा ही बौद्धिक आणि मानसिक स्वरुपाची देखील असते. ती विविध समाजघटकांवर शांतपणे, क्लुप्त्या लढवत आणि धूर्तपणे केली जाते. एनसीईआरटीच्या पुस्तकातील व्यंगचित्र हे या प्रकारातील आहे.

शब्दांची उधळण आणि बौद्धिक हल्ले...

कथित खालच्या जातीत जन्मल्यामुळे आपल्या देशातील मोठ्या लोकसंख्येला हजारो वर्षे शारीरिक हिंसा आणि अपमान सहन करावा लागला. डॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर केलेल्या कार्यामुळे हा समाज या हिंसेच्या आणि अपमानाच्या विरोधात दंड थोपटून उभा राहिला. सडतोड प्रश्न विचारु लागला. तर्कसंगत उत्तरांची अपेक्षा धरु लागला. यामुळे कथित उच्चवर्णीयांना काहीशी माघार घ्यावी लागली. ही माघार प्रगल्भतेतून, पश्चात्तापातून किंवा लोकशाही, स्वातंत्र्य, समतेच्या भूमिकेतून घेतली गेली नव्हती. उलट हजारो वर्षे आपली गुलामगिरी मान्य करणारा समाज आता माणुसकीची, समतेची, हक्काची भाषा बोलू  लागला ही बाब जातीव्यवस्थेच्या आधाराने स्वतःचे पोट भरणाऱ्यांसाठी अपमानास्पद आणि धक्कादायक होती. त्यांच्या कथित धर्माने त्यांना बहाल केलेले श्रेष्ठत्व आणि अधिकार कुणीतरी ओरबडून घेतले, अशी त्यांची भावना  झाली. हा आपला अपमान असल्याचा समज त्यांनी करुन घेतला. ही खदखद आजही कायम आहे. व्यंगचित्र किंवा जेम्स लेन प्रकरणातून ती बाहेर पडत असते. शारीरिक  हल्ले आणि हिेंसेचा निषेध करताना आंबेडकरी जनतेच्या मानचिन्हांवरील मानसिक हल्ले कधी थांबवणार आहोत हा महत्वाचा प्रश्न आहे. शब्दांची फिरवाफिरव करणारे लेखन, भाषेचे अवडंबर, शब्दांची उधळण करत किंवा चित्रांमधून तुम्ही बौद्धिक हल्ले करत राहणार, मोक्याच्या ठिकाणी नियुक्त्या असल्यामुळे आपण निष्पाप आणि निरपेक्ष  असल्याचा आव आणत बौद्धिक गुलामगिरी निर्माण करणारी स्फोटके पेरत राहणार आणि मग दुसऱ्या बाजूने हिंसक प्रतिक्रिया आली की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढणार. हा दांभिकपणा आता लोकांना समजू लागला आहे.

आम्ही म्हणू तीच पूर्व?

लोकशाही, मतस्वातंत्र्य, कलाकारांचे, व्यंगचित्रकाराचे स्वातंत्र्य या गोष्टी वृत्तवाहिन्यांवर चर्चेसाठी ठीक आहेत. पण एखादी घटना, चित्र ही या दृष्टीकोनातूच बघितली पाहिजे, त्यातून असाच संदेश घेतला पाहिजे, अशी वैचारिक दडपशाही करणारे तुम्ही कोण? हजारो वर्षे शिक्षण, वेदविद्या, मंत्र-पुराणे अशा गोष्टी तुम्ही तुमच्या ताब्यात ठेवल्या. एकप्रकारे हजारो वर्षे स्वतःसाठी आरक्षणाची व्यवस्था करुन घेतली. मतस्वातंत्र्यच नव्हे तर विचार करण्याची कल्पनाही खालच्या जातींच्या मनात येणार नाही अशी भक्कम जातीव्यवस्था तयार केली. त्याचे समर्थन करत राहिलात. आज त्यांचेच वारसदार एखाद्या गोष्टीकडे कुठल्या चष्म्यातून बघायचे आणि तसे बघणे म्हणजेच  विचारस्वातंत्र्य अशी पळवाट शोधणारी मांडणी करु लागले आहेत. एम. एफ. हुसेन यांनी काढलेल्या चित्रांमुळे भावना दुखावतात, बदनामी होते. ती चित्रे कशी बघितली म्हणजे बदनामी होणार नाही, भावना दुखावणार नाहीत हे इथल्या विचारवंतांनी कधी सांगितले नाही. पण डॉ. आंबेडकरांवरील व्यंगचित्र कसे बघितले पाहिजे, त्यातून काय  संदेश घेतला पाहिजे याचे रतीब रोज घातले जात आहेत. हजारो वर्षे गुलामीत राहणाऱ्या समाजातील एक-दोन पिढ्यांचा आता शिक्षणाशी जवळून संबंध आला आहे. शिकलेल्या तरुणांना एखाद्या घटनेचे विश्लेषण कसे करायचे, त्यामागील मतितार्थ काय आहे, एखाद्या लिखाणाचा किंवा चित्राचा उद्देश काय आहे हे समजू लागले आहे. किंबहुना अनेक ठिकाणांहून माहिती घेऊन मत बनवण्याचे कौशल्य त्याला प्राप्त झाले आहे.  अशा स्थितीत एनसीईआरटीच्या पुस्तकातील व्यंगचित्रावरुन डॉ. आंबेडकरांचा अपमान होतच नाही असा ठेका धरुन रोज नाच करण्यात काय हशील आहे?

व्यंगचित्रातील गोम

संबंधित व्यंगचित्रात बाजूला शेकडो लोक उभे असल्याचे दाखवले आहे.  त्याचपद्धतीने गोगलगायीवर सात-आठ लोक बसल्याचे दाखवता आले असते. म्हणजे राज्यघटनेच्या निर्मितीला दिरंगाई होण्यास सगळी घटना समिती जबाबदार आहे, असे म्हटता आले असते. ती गोगलगाय म्हणजे `घटना समिती' अशी मखलाशी करण्याचा प्रयत्न काही विचारवंतांनी केला. पण बारकाईने पाहिले तर गोगलगायीवर constitution असे लिहिलेले दिसते. त्याठिकाणी   `घटना समिती'  असे लिहिलेले नाही. त्यामुळे घटना तयार करण्यास उशीर झाला तर डॉ. आंबेडकर जबाबदार आणि देशाला एक उत्तम घटना दिली की त्याचे श्रेय सगळ्या घटना समितीला द्यायचे, अशी लबाड मांडणी करणारा आणि तसा प्रचार करणारा मोठा वर्ग आजही देशात आहे. आपले हितसंबंध आणि जातीवर आधारित श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी धूर्तपणे युक्तिवाद करुन दिशाभूल करणाऱ्या या वर्गाला आंबेडकरी जनतेचा विरोध आहे.

त्यांचे देव तेवढे पवित्र...!!!

सगळे मुद्दे संपले की डॉ. आंबेडकरांना देव बनवू नका, असा कांगावा करुन आपण किती पुरोगामी विचारांचे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. डॉ. आंबेडकरांच्या अगोदर या देशात आंबेडकरी जनतेला सन्मानाचे स्थान नव्हते. उलट पदोपदी अपमान होईल, अशी व्यवस्था तयार करण्यात आली होती. या जनतेला कुठलाही स्फूर्तीदायक इतिहास नव्हता की प्रेरणास्थान नव्हते.  एकीकडे 33 कोटी देव असले तरी पुन्हा रस्त्यावर रोज नवे देव मांडण्याची गरज संगणकाच्या युगातही भासते आहे. डॉ. श्रीराम  लागू यांच्या सारख्या विचारवंतांनी देवाला रिटायर करण्याचा सल्ला दिला की, आपले जगण्याचे साधनच कुणीतरी हिसकावून घेत असल्याच्या त्वेषात त्यांच्यावर टीका केली जाते. माणसाला जगण्यासाठी देवाची गरज लागतेच असा युक्तिवाद केला जातो. असे असेल तर इथल्या कोट्यावधी जनतेला धर्ममार्तंडांनी देवापासून, मंदिरांपासून दूर का ठेवले? माणसाची सावली पडली तरी त्यांचा देव अपवित्र होत होता. त्या देवाला कवटाळण्याचा प्रयत्न नाशिकमधील काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेबांनी केला. पण पाषाणहृदयी धर्मवाद्यांना पाझर फुटला नाही. अशा स्थितीत ज्या महापुरुषाने आपली जातीच्या दास्यातून मुक्तता केली आणि माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा दिली, त्या डॉ. बाबासाहेबांना आपले प्रेरणास्थान, दैवत मानले तर लगेच कांगावा करण्याची काय गरज आहे? झोपडपट्टीत, खेड्यापाड्यात राहणाऱ्या तरुणांनी, आयाबहिणींनी डॉ. आंबेडकरांचे प्रत्येक पुस्तक वाचले असेल असे नाही. त्यांचे सगळे विचार त्यांना समजलेच असतील असेही नाही. त्यांना एवढेच माहित आहे की आपल्या पायात हजारो वर्षे असलेल्या दास्याच्या साखळदंडातून आपली मुक्तता कुणी केली तर ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवाने. त्यामुळेच आंबेडकरी जनतेचे डॉ. बाबासाहेब हे श्रद्धास्थान आहे, प्रेरणास्थान आहे.

                मग प्रश्न असा निर्माण होतो की, व्यंगचित्र हे नेहमी नकारात्मक सूर लावणारेच असते का? त्यावेळी उत्तम राज्यघटना दिली म्हणून डॉ. बाबासाहेबांचे अभिनंदन करणारे, कौतुक करणारे व्यंगचित्र काढावे असे कुणाला का सुचले नाही? पुन्हा राज्यघटनेच्या निमिर्तीचा इतिहास सांगण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे कुतुहल जागवण्यासाठी, विश्लेषणासाठी सल्लागारांना नेमके प्रेरणास्थानावर आघात करणारेच व्यंगचित्र कसे सापडले ? 

.........संदर्भ .......सुहास यादव ( डॉ. आंबेडकर आणि लबाडांचा कांगावा )

No comments:

Post a Comment