My Followers

Monday 16 March 2015

गाडगे महाराज आणि बाबासाहेब....!

गाडगे महाराज आणि बाबासाहेब....!

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. याच महाराष्ट्राने देशाला घडविण्याचे काम केले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, संत तुकड२ोजी महाराज, संत गोरोबा, संत चोखोबा आदींसह पुरोगामी महापुरुषांच्या वैचारिकतेवर हा महाराष्ट्र आज टिकून आहे. देवधर्मांच्या नावाखाली सातत्याने कष्टकरी, तळागाळातला माणूस लुबाडला जातो. अशा दगडातील देवपणावर आणि ढोंगी धर्ममार्तंडांच्या दुकानदा-यांवर सातत्याने गाडगे महाराजांनी आपल्या प्रबोधनातून हल्लाबोल केला. आता हा वारसा पुढे नेण्याची प्रत्येक पुरोगाम्यांची, चळवळीची जबाबदारी आहे. 

संत गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगावात २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. दापुरे ता. मूर्तिजापूर जि. आकोला येथील मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी करायला त्यांना फार आवडे. त्यांचे वडील झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतानाच त्यांचे वडील दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. सन १८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारशाच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, डबूजी पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी गावक-यांना दिला होता. १ फेब्रुवारी १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडल्यास आपण होऊन त्याच्या मदतीसाठी धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे...हेच त्यांचे तत्व होते. ते ज्या गावात जात ते गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धानिर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले. 

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपली पूर्ण हयात घालविली. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा प्रामुख्याने व-हाडी बोलीचा उपयोग करत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी ते करत. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा उभारल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली. लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावतीजवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. 

गाडगेबाबा आणि बाबासाहेब...... 

१४ जुलै १९५१ ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. गाडगेबाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली, २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. 

कोणाकडून काही न घेणा-या गाडगेबाबांनी बाबासाहेबांकडून दोन घोंगड्या स्वीकारल्या, पण म्हणाले, ‘डॉक्टर तुम्ही कशाला आले? मी एक फकीर, तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे.

तेव्हा बाबासाहेब म्हणाले,‘बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे.’ यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते...कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही याची दोघांनाही जाणिव होती....!

संदर्भ - पुरोगामी विचारांचे एकमत   

No comments:

Post a Comment