My Followers

Monday 29 October 2012

प्रतित्यसमुत्पादाच्या बारा कड्यांचे विवरण...!


प्रतित्यसमुत्पादाच्या बारा कड्यांचे विवरण...!


१) अविद्या

      प्रतित्यसमुत्पादाची पहिली कडी म्हणजे अविद्या.

            अविद्या म्हणजे चार आर्यसत्याचे अज्ञान. या चार आर्यसत्याचे यथार्थ ज्ञान नसणे. अशा अविद्य लोकांना त्यांच्या मनाविषयी व शरीराविषयी तीन प्रकाराचे भ्रम निर्माण होत असतात.

      आपले शरीर आणि मन म्हणजे मी, माझे व माझा आत्मा’ हे भ्रम वाढत गेल्यावर हव्यास निर्माण होतो. हा हव्यास वाढल्यानंतर वर्तमानातील आणि भविष्यातील जीवनक्रम घडविणारी कृत्ये घडत असतात.

२) संस्कार

      प्रतित्यसमुत्पादाची दुसरी कडी म्हणजे संस्कार. अविद्येमुळे संस्कार उत्पन्न होतात.

      ज्यांना चार आर्यसत्याचे यथार्थ ज्ञान झाले त्यांची प्रज्ञा विकसित होत असते. ते जग जसे आहेत तसे पाहतात. अज्ञान नष्ट होते. अविद्या नष्ट होऊन त्यांचे संस्कारही नष्ट होतात. ते असंस्कारीत होतात. त्यांना निर्वाण प्राप्‍त होते.

      संस्कार म्हणजे कृत्य करणे, योजना करणे, काम करण्यासाठी हालचाल करणे की ज्यामुळे त्या  कृत्याचा, योजनेचा कामाचा परिणाम नैतिक दृष्ट्या चांगला किंवा वाईट, कुशल किंवा अकुशल, पुण्यमय किंवा पापमय होत असतो. चांगल्या अथवा वाईट कृत्याचा झालेला परिणाम म्हणजेच संस्कार. संस्कार आपल्या वर्तमान आणि भविष्यातला शारीरिक, वाचिक आणि मानसिक सर्व कृत्याचा जीवनक्रम ठरवीत असतात.

      अविद्येचा निरोध केला असता संस्काराचा निरोध होतो..

३) विज्ञान

      प्रतित्यसमुत्पादाची तिसरी कडी म्हणजे विज्ञान. संस्कारामुळे विज्ञान उत्पन्न होतात.   

       विज्ञान म्हणजे जाणणे, निरनिराळ्या प्रकारे अनुभूती घेणे. आपण आपल्या पांच ईंद्रियाद्वारे आणि मनाद्वारे निरनिराळ्या प्रकारची अनुभूती घेत असतो. जसे आपण आपल्या डोळ्याद्वारे बाह्य वस्तूमात्र जाणत असतो. कानाद्वारे आवाज जाणत असतो. नाकाद्वारे वास जाणत असतो. जिभेद्वारे चव जाणत असतो. त्वचेद्वारे स्पर्श जाणत असतो. आणि मनाद्वारे कल्पन्ना आणि विचार जाणत असतो. अशा तर्‍हेने विज्ञान सहा प्रकारचे आहेत. चक्षू विज्ञान, कर्ण विज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान, स्पर्श विज्ञान आणि मनो विज्ञान. तसेच ज्याचा परिणाम कुशल कर्मात होतो व ज्याचा परिणाम अकुशल कर्मात होतो अशा प्रकारचे दोन विज्ञान आहेत. दृश्य आकृती आणि रंग, आवाज इत्यादी इंद्रिय विषय असले आणि त्याचा संबंध अनुक्रमे डोळे, कान इत्यादी इंद्रियांशी आला तरच विज्ञान जागृत होते, इतर वेळी नाही. त्याचप्रमाने कल्पना आणि विचार हे इंद्रिय विषय मनात आले तरच मनिंद्रिय विज्ञान जागृत होते, ह्यावरुन असे स्पष्ट होते की इंद्रिय आणि विषयाचा एकमेकांशी संबंध आलाच तर विज्ञान जागृत होते. जसे आपण पुस्तक वाचत असतांना आपले मन जर दुसरीकडे गुंतले असेल तर उघड्या डोळ्यांनी आपण केवळ पुस्तकाकडे पाहत असतो. परंतु त्यात काय लिहिले आहे ते आपल्या लक्षात येत नाही. कारण त्यावेळी आपले च्क्षुंद्रियविषय विज्ञान जागृत नसते. म्हणून इंद्रिय आणि त्या त्या इंद्रियाच्या विषयाचा एकमेकांशी संबंध असतो. ते एकमेकावर अवलंबून असतात. म्हणूनच विज्ञान सुध्दा शाश्वत नाही तर ते क्षणाक्षणाला बदलत असतात.

      संस्काराचा निरोध केला असता विज्ञानाचा निरोध होतो.  

४) नाम-रुप

      प्रतित्यसमुत्पादाची चवथी कडी म्हणजे नामरुप. विज्ञानामुळे नामरुप उत्पन्न होतात.         

      नाम म्हणजे मन व रुप म्हणजे शरीर. नाम (मन)  हे चार खंडाचे बनलेले आहे. ते म्हणजे १) विज्ञान (CONSCIOUSNESS जाणीव), २) संज्ञा (PERCEPTION आकलन), ३) वेदना (SENSATION संवेदना, अनुभूती) व ४) संस्कार (REACTION प्रतिक्रिया).

      मनाच्या माध्यमातून एखाद्यी प्रक्रिया कशी घडत असते याचे उदाहरण म्हणजे- समजा रस्त्यात एखादी वस्तु दिसली तर ते पाहण्याची क्रिया डोळ्यांनी करताच काहितरी आहे याची  याची जाणिव (विज्ञान) होते. त्यापाठोपाठ लगेच दुसरी क्रिया घडते ती म्हणजे  नक्किच भयावह साप आहे याचे आकलन (संज्ञा) होते. ते पाहून भितीदायक संवेदना (वेदना) निर्माण होते. लगेच प्रतिक्रिया (संस्कार) उत्पन्न होते की आपण तेथून दुर जायला पाहिजे अन्यथा तो साप जर चावला तर आपला मृत्यू ओढवेल.

            रुप (शरीर) हे पांच ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने क्रियाशील राहत असून त्यांच्यामुळेच बाह्य जगाशी संबंध प्रस्थापित होत असते. ते पांच इंद्रिय म्हणजे १) डोळा, २) नाक, ३) कान, ४) जीभ, व ५) त्वचा ही होत. या पांच इंद्रियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पांच बाबीचे ज्ञान मानवास होते. डोळ्याद्वारे बाह्य वस्तूमात्र जाणणे, नाकाद्वारे गंध जाणणे, कानाद्वारे आवाज जाणणे, जिभेद्वारे चव जाणणे, व त्वचेद्वारे स्पर्श जाणणे.

       तसेच रुप (शरीर) हे १) पृथ्वी, २) पाणी, ३) अग्नी आणि ४) वायू या चार घटकांचे बनलेले आहेत  आणि हे चार घटक सृष्टीमध्ये निसर्गत:च विद्यमान असतात.

       भगवान बुध्दांनी रुप आणी नाम या घटकांवर लक्ष केंद्रित करुन चिंतन केले आणि सत्याचा शोध घेतला. त्यांनी या नामरुपाच्या जडण-घडणीची सूक्ष्म पातळीवर अंतर्मुख होऊन चिकित्सा केली. वरकरणी जड घटकांचे बनलेले हे शरीर (रुप) भरीव भासत असले आणि त्या आधारावर क्रिया करणारे हे मन (नाम) वरवर स्थूल भासत असले तरी ते शरीर अगदी सूक्ष्म सुक्ष्म परमाणूचे बनलेले आहे. याचा शोध सर्वप्रथम भगवान बुध्दांनी लावला. एवढेच नव्हे तर हे सारे मन आणी शरीर क्षणाक्षणाला अतिसूक्ष्म प्रमाणात अत्यंत शिघ्रगतीने सतत बदलत आहे; उत्पन्न होत आहे; नष्ट होत आहे. हे भगवान बुध्दांना दिसले. यालाच त्यांनी अनित्य म्हटले आहे.

      आधुनिक शास्त्रज्ञांनी हे अंतिम सत्य मान्य केले आहे. एवढेच नव्हे तर इसवी सन सहाव्या शतकापूर्वी भगवान बुध्दांनी मांडलेले बरेच सिध्दांत आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे असे मत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात मांडले आहे.

            या नामरुप प्रवृती मानवामध्ये दु:निर्मितीसाठी सहाय्यभूत ठरत असतात.  आपल्या मनावर बालपणापासून निसर्गात आणि आजुबाजूला घडणार्‍या अनंत घटनाच्या संग्रहाचा स्तर चढलेला असतो.  बाह्य जगात  घडणारी घटना आपले मन त्यामध्ये संग्रहीत जुन्या संस्काराशी  ताडुन पाहत  असते व त्यानूसार प्रतिक्रिया व्यक्‍त करीत असते. या मनात अनेक प्रकारचे विकार संग्रहीत झालेले असतात. अर्थात प्रत्येकाचे मन अशुध्द व मळलेले असतात. जोपर्यंत कोणत्याही व्यक्‍तीला स्वत:च्या मनातील मळ व अशुध्दता दिसणार नाही,  तो पर्यंत तो ते मळ व अशुध्दता शुध्द करण्याच्या फंदात पडणार नाही. जेव्हा मन नितांत निर्मळ  होइल,  परिशुध्द होईल तेव्हाच त्या मनावर नविन संस्कार रुजल्या जातील.

      विज्ञान हे  परिवर्तनशील आहे. त्या परिवर्तनशीलतेच्या तत्वामुळेच नामरुप  हे नेहमी बदलणारे तत्व ठरते. 

      विज्ञानाचा निरोध केला असता नामरुपाचा निरोध होतो.  

५)  षडायतन

            प्रतित्यसमुत्पादाची पांचवी कडी म्हणजे षडायतन. नामरुपामुळे षडायतन उत्पन्न होतात.

      षडायतन म्हणजे सहा आयतने. ते म्हणजे डोळा, कान, नाक, जिभ,  त्वचा आणि मन.

      येथे डोळ्याचे आयतन म्हणजे पाहण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता.  कानाचे आयतन म्हणजे ऎकण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता.  नाकाचे आयतन म्हणजे वास घेण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता.  जिभेचे आयतन म्हणजे चव घेण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता.  त्वचेचे आयतन म्हणजे स्पर्श जाणण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता.  मनाचे आयतन म्हणजे कल्पना, विचार जाणण्याची क्षमता असलेल्या इंद्रियाची संवेदनशीलता. 

      नामरुपाचा निरोध केला असता षडायतनचा निरोध होतो.  

६) स्पर्श

      प्रतित्यसमुत्पादाची सहावी कडी म्हणजे स्पर्श. षडायतनामुळे स्पर्श उत्पन्न होतात.

      जेव्हा चक्षूरुप आणि चक्षूविज्ञान यांचा संबंध येतो तेव्हा त्या संबंधाला

स्पर्श असे म्हणतात. स्पर्श म्हणजे ज्ञानेंद्रिय, ज्ञानेंद्रिय विषय आणि ज्ञानेंद्रिय  विज्ञान यांचा समन्वय होणे.

      पांच इंद्रियांच्या क्रियेला मनाने दिलेले आदेश यांच्या परस्पर संबंधातून आपण बाह्यजगाशी संपर्क प्रस्थापित करीत असतो. जसे आपण जर पुस्तकातील अक्षरांकडे पाहिले तर नेत्रस्पर्श, कानाला  कुणाचा आवाज ऎकू आला तर कर्णस्पर्श,  नाकाला कसलातरी गंध आला तर घ्राणस्पर्श, काही खात असतांना  जिभेला चव कळली तर जिव्हास्पर्श,  त्वचेला कसलातरी संपर्क आला तर त्वचास्पर्श असे या पांचही इंद्रियाला त्या त्या विषयाचा स्पर्ष होत असतो.  या सर्व क्रियावर मनाचे अधिराज्य असते. मन जर नसेल तर कोणताही स्पर्श जाणवणार नाही.

      षडायतनचा निरोध केला असता स्पर्शाचा निरोध होतो.  

७) वेदना

      प्रतित्यसमुत्पादाची सांतवी कडी म्हणजे वेदना. स्पर्शामुळे वेदना उत्पन्न होतात.

       वेदना म्हणजे इंद्रियांचा इंद्रिय विषयांशी  संपर्क आला असता जाणवणारी अनुभूती. एखाद्या बाह्यस्थितीचा आपल्या ज्ञानेंद्रियाला स्पर्श होताच जे तरंग शरीरात निर्माण होतात ते म्हणजेच वेदना. वेदना कशी निर्माण होते ते मनाच्या अवस्थेवर अवलंबून आहे.

      वेदना तीन प्रकारच्या आहेत.  सुखमय वेदना, दु:खमय वेदना व  सुखमय व दु:खमय वेदना.

      एखादे रुप पाहिल्याने, आवाज ऎकल्याने, वास घेतल्याने, चव घेतल्याने, स्पर्श केल्याने व मनांत कल्पना किंवा विचार आल्याने संवेदना निर्माण होत असतात. त्या सहा प्रकारच्या  संवेदना डोळा, कान, नाक, जिभ,  त्वचा आणि मन अनुभवत असतो.  जेव्हा ज्ञानेंद्रिय, ज्ञानेंद्रिय विषय आणि ज्ञानेंद्रिय  विज्ञान यांचा समन्वय झाल्याने स्पर्श होतो,तेव्हाच संवेदना निर्माण होत असतात. म्हणून  स्पर्शामुळे वेदना निर्माण होत असतात.

      स्पर्शाचा निरोध केला असता वेदनेचा निरोध होतो.  

८) तृष्णा

      प्रतित्यसमुत्पादाची आठवी कडी म्हणजे तृष्णा . वेदनेमुळे तृष्णा उत्पन्न होते.

      रुप, काम, मैथून, शब्द, गंध,रस, स्पर्श इत्यादी लोभ, द्वेष आणि मोह या विकारांनी युक्‍त असलेली भावना म्हणजे . तृष्णा होय.  तृष्णेमुळे दु:खाची निर्मिती होत असते.  मोह किंवा अविद्येमुळे आपण कोणत्याही वेदनेवर लोभाची किवा द्वेशाची प्रतिक्रिया व्यक्‍त करित असतो. यालाच तृष्णा म्हणता येईल.

      एखादी न आवडणारी व्यक्‍ती, वस्तू किंवा स्थिती आपल्यासमोर आली तर ती नकोशी वाटून आपण त्याचा द्वेष करायला लागतो. मनातील संस्कार  नकाराची भावना व्यक्‍त करतात. याच भावनेने आपण दु:खी होत असतो.

      किंवा याच्या उलट एखादी आवडणारी व्यक्‍ती, वस्तू किंवा स्थिती आपल्यासमोर आली तर ती आपल्याला हवी-हवीशी वाटून आपण त्याचा लोभ करायला लागतो. मनातील संस्कार  आवडल्याची भावना व्यक्‍त करतात. याच लोभाच्या, आसक्‍तीच्या भावनेने क्षणीक सुख मिळते. परंतु ती दुर गेली की आपण दु:खी होत असतो. अशा तर्‍हेने एखादा तिरस्कार, घृणा किंवा आसक्‍ती यांच्या हव्यासामुळे दु:खाचे कारण बनते.  मोह म्हणजे अज्ञान किंवा अविद्या यमुळेच हे लोभ,द्वेशाचे चक्र सुरु राहते.

      वेदनेचा निरोध केला असता तृष्णेचा निरोध होतो.  

९) उपादान

      प्रतित्यसमुत्पादाची नववी कडी म्हणजे उपादान. तृष्णेमुळे उपादान उत्पन्न होते.

      उपादान म्हणजे घट्ट पकडून ठेवणे. जरी एखाद्या घट्ट पकडून ठेवलेल्या गोष्टीपासून त्रास, कष्ट, दु:ख होत असले तरी ती गोष्ट न सोडणे.

            तृष्णेचा हळूहळू आपल्या मनात संचय वाढत जातो. त्यामुळे त्याची मनावर घट्ट पकड बसते. तृष्णेच्या याच संचयाला उपादान म्हणतात. तृष्णेच्या संग्रहाने अर्तात उपादानाने प्रभावित होऊन मनुष्य पुढिल कर्म करीत असतो. उपादान चार प्रकाराचे आहेत.      पहिले कामउपादान म्हणजे सर्व प्रकारच्या आनंद देणार्‍या, सुख देणार्‍या, आवडणार्‍या आणि लैंगिक समाधान देणार्‍या गोष्टीसंबंधी अत्यंत पराकोटीचे आकर्षण असणारी विचारसरणी.

      दुसरे दृष्टीउपादन म्हणजे असा विश्वास की, ‘हे एकच बरोबर आहे व बाकीचे चुकीचे आहे’ असा एकांगीपणाची विचारसरणी.

      तिसरे उपादान म्हणजे कर्मकांडाने मनुष्य पवित्र होतो, त्याच्यावर कोणतेही संकट येणार नाहीत किंवा आलेल्या संकटाचे निवारण होईल, त्याला भौतिक लाभ होईल, त्याला सुख मिळेल अशा प्रकारची विचारसरणी.

      चवथे सत्कायदृष्टी उपादान म्हणजे ‘मी’, ‘माझे’, ‘माझा आत्मा’ अशी आत्मभावाचे दृष्टी व नेहमी बदलत  असणार्‍या जगाला न बदलणारे आहे, आत्मा कायम टिकणारा आहे अशी धारणा बाळगणारी विचारसरणी. 

      तृष्णेचा निरोध केला असता उपादानाचा निरोध होतो.

१०) भव

      प्रतित्यसमुत्पादाची दहावी कडी म्हणजे भव. उपादानमुळे भव उत्पन्न होते.

      भव म्हणजे अस्तित्वात येणे. तृष्णेच्या संग्रहाने अर्थात उपादानाने प्रभावित हॊवून मानव पुढील कर्म करीत असतात. त्या कर्माचा परिपाक म्हणजेच ‘भव’ होय. भव म्हणजे चित्ताचे असे कर्म की ज्यामुळे फळाची उत्पत्ती होते. अर्थात हे भव म्हणजे कर्म पुन्हा उत्पन्न होण्याची, जन्म घेण्याची ईच्छा निर्माण करते.

      कम्म आणि विपाक असे भवाचे दोन पैलू आहेत. कम्म म्हणजे कर्म जी मनुष्याकडून कायेने, वाचेने व मनाने कुशल-अकुशल, पापमय-पुण्यमय, अध्यात्मिक आणि वैचारिक कृत्ये केली जातात ती. अशी कृत्ये की, ज्यामुळे त्याचेवर संस्कार घडत असतात किंवा त्याचा भविष्यातील जीवनक्रम घ्डवीत असतात. विपाक म्हणजे त्या कर्माचा परिणाम.

      कम्माबाबत भगवान बुध्द म्हणतात की, ‘समाजामध्ये नैतिक व्यवस्था सांभाळण्याचे काम कम्म नियम करीत असतात. समजामध्ये नैतिक व्यवस्था चांगली आहे याचा अर्थ मनुष्य कुशल कर्म करीत आहे. जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर याचा अर्थ मनुष्य अकुशल कर्म करीत आहे. भगवान बुध्द कर्म सिध्दांतावर इतका जोर देत असत की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्म सिध्दांताच्या दृढ पालनाशिवाय नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे कम्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे. कम्म नियमात जसे दिवसामागून रात्र येते तसे कर्मामागून त्याचा परिणाम येत असतो. म्हणून ‘कराल तसे भराल’ असे सांगणारे भगवान बुध्द पहिलेच आहेत. 

      कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करण्याला मिळत असतो आणि अकुशल कर्माचा दुष्परिणाम कुणालाही टाळता येत नाही. म्हणून भगवान बुध्दाचा उपदेश असा की, ‘असे कुशल कर्म करा म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. कारण कुशल कर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कर्म करु नका. कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवता दु:खी होते.’ कर्माचा विपाक म्हणजे परिणाम कर्त्याला भोगावे लागतात. कधी कधी एकाच्या कर्माचा परिणाम दुसर्‍यालाही भोगावे लागतात. त्यामुळे नैतिक व्यवस्थेत बाधा निर्माण होते.

      आपल्या मनात ईच्छा निर्माण होणे हे मनाची एक वृती आहे. इच्छा निर्माण झाली की त्याच्या पूर्ततेसाठी मनूष्य मनाने, वाणीने व कायेने कर्म करीत असतो. बुध्द धम्मानूसार मनूष्याची इच्छा ही अगदी स्वतंत्र असून ती पूर्वी केलेल्या कर्मावर अवलंबून नसते. कर्म हे बीज आहे तर त्याचे फळ म्हणजे कर्मविपाक आहे. इच्छा ही कर्माप्रमाणे कुशल किंवा अकुशल असू शकते. इच्छा, त्यानंतर कर्म आणि कर्मानंतर कर्मविपाक असा कार्यकारणाचा खेळ अव्याहतपणे चालू असते. यालाच जीवन किंवा संसार म्हटले जाते.

      जरी आपल्या हातून अपघाताने, चूकीने, अज्ञानाने, गैरसमजुतीने किंवा अन्य कोणत्याही कारणाने अकुशल कर्मे घडली असेल तर ह्या क्षणापासून जागृत राहून कुशल कर्मे करण्यास सुरुवात करावी. राहिलेल्या आयुष्यात आपण जेवढे जास्त कुशल कर्मे करु तेवढ्‍यामुळे अकुशल कर्माचा जोर कमी अथवा अगदी नष्ट होण्याची शक्यता असते. म्हणून मागे केलेल्या अकुशल कर्मांनी हताश व निराश न होता मनूष्याने ध्येर्याने जास्तीत जास्त कुशल कर्मे करावीत म्हणजे त्याचे जीवन मंगलदायी होऊन समाजालाही फायदा होईल. मनूष्याने सतत जागृत राहून कुशल कर्मे करीत राहावीत अशी भगवान बुध्दांची शिकवण आहे.

      म्हणूनच भगवान बुध्दाच्या धम्मामध्ये अन्य धर्मात ईश्वराला जे  स्थान आहे ते नीतीला दिले आहे.

      उपादानाचा निरोध केला असता भवाचा निरोध होतो.

११) जाति

      प्रतित्यसमुत्पादाची अकरावी कडी म्हणजे जाति. भवामुळे जाति उत्पन्न होते.

      जातिचा अर्थ म्हणजे पंचस्कंधाचे प्रगट होणे. पंचस्कंध म्हणजे रुप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान यांचे प्रगटीकरण म्हणजेच जाति होय.

            भवाचा निरोध केला असता जातिचा निरोध होतो.

१२) जरा-मरण

      प्रतित्यसमुत्पादाची बारावी कडी म्हणजे जरा-मरण. जरा (म्हातारपण), व्याधी (आजारपण), मरण (मृत्यु), शोक (शोक व्यक्त करणे), परिदेव (रडणे, ओरडणे), दु:ख (शारिरीक दु:ख), दौर्मनस्य (मानसिक दु:ख), उपायास (हैराण होणे, परेशान होणे इत्यादी जातिमुळे म्हणजे जन्मामुळे उत्पन्न होते.

            मनूष्य जन्माला आल्यानंतर त्याला बालपणापासून ते म्हातारपणापर्यंत जीवन प्रवास करावा लागतो. आयूष्याच्या शेवटी-शेवटी त्याला म्हातारपणाच्या अवस्थेत जावेच लागते. उदय होणे आणि लय होणे ही प्रक्रिया शरीराच्या अणु-रेणूत अव्यातपणे चाललेला असतो. क्षणैक परिवर्तनामुळेच दिर्घकालीन परिवर्तन घडून येत असते. मनाचे परिवर्तन तर फार तिव्रतेने घडत जात असते. म्हणूनच भगवान बुध्द म्हणतात की, ‘ भिक्खुंनो मनाइतके बदलणारे, परिवर्तनशील दुसरी कोणतीच गोष्ट मला दिसत नाही. शरीरातील बदल आपल्याला दृश्य स्वरुपात दिसून येते.

      ‘जन्म, जरा, मरण हे जीवनातील सर्वात महत्वाचे घटक आहेत. ते जर नसते तर बुध्दांचा जन्मच झाला नसता. जन्म, जरा, मरण आहेत म्हणून बुध्दांचा जन्म झाला आहे,’ असे भगवान बुध्दांनी म्हटले आहे.

      ज्यांना जन्म, जरा, मरण माहिती नाही, त्यांना जरा, मरणाचा निरोध कसा करावा ते कळणार नाही.

      प्रतित्यसमुत्पादाच्या निरनिराळ्या हेतूचा, निदानांचा व प्रत्ययांचा मूळ उद्देश म्हणजे जन्म, जरा मरणाला जाणने, प्रज्ञेद्वारे त्याचा वेध घेणे, अविद्या असल्यामुळे कर्माची निर्मिती होत असते. जर अविद्या नष्ट झाली तर कर्माची निर्मिती होणार नाही. जर कर्म नसेल तर जन्माची निर्मिती होणार नाही. जर जन्म नसेल तर जरा-मरणाची निर्मिती होणार नाही. अशा प्रकारे प्रतित्यसमुत्पाद निर्वाणाच्या मार्गाने घेऊन जातो.

      जातिचा निरोध केला असता जरा-मरण, शोक, दु:खाचा निरोध होतो.

      अशा प्रकारे प्रतित्यसमुत्पादाचे यथार्थ ज्ञान झाल्यावर जग जसे आहे तसे पाहता येते. त्यामुळे चार आर्यसत्याचा अर्थ निट कळून येते.

      भगवान बुध्दांच्या प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतामुळे समाजाची होणारी अधोगती थांबली. त्यामुळे समाज हळूहळू सुसंस्कृत बनत चालला. भगवान बुध्दांच्या काळी मिथ्या दृष्टीमुळे नरबळी, पशुबळी, स्त्री हत्या, बालहत्या, सतीप्रथा असे चालत असलेले रानटी प्रकार बंद होत गेले. स्वत:च्या फायद्यासाठी दुसर्‍याची हत्या करणे, यज्ञामध्ये पशुंचा बळी घेणे, देवदासीप्रथेद्वारे स्त्रियांचे लैगिंक शोषण करणे, जातीभेद करणे, अमानूष अश्पृष्यता पाळणे      इत्यादी प्रकार मिथ्यादृष्टीमुळे, अज्ञानामुळे सर्रासपणे पाळल्या जात होते. त्यात वावगे काहीच नाही, कारण ते देव निर्मित-धर्म निर्मित आहे असे त्यांची मिथ्यादृष्टी होती. मात्र भगवान बुध्दांच्या शिकवणूकीमुळे नैतिकतेच्या शिकवणूकीचे महत्व लोकांना कळू लागले. चांगले कर्म केले तर त्याचे चांगले परिणाम होतात. वाईट कर्म केले तर त्याचे वाईट परिणाम होतात हे लोकांच्या लक्षांत आले. म्हणून भगवान बुध्दांनी ईश्वराऎवजी नैतिकतेला आपल्या शिकवणूकीत महत्वाचे स्थान दिले आहे.

      प्रतित्यसमुत्पादाची साखळी तिन काळांमध्ये विभाजीत केल्या जातात. अविद्या आणि संस्कार हे भूतकाळाशी संबंधीत आहे.  विज्ञान हे वर्तमान काळ आणि भूतकाळ यांना जोडते. नामरुप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान आणि भव हे वर्तमान काळाशी संबंधीत आहेत. जाती (जन्म), जरामरण (दु:ख समूह) हे भविष्य काळात उद्‍भवत असतात.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात दुसर्‍या प्रकारची प्रतित्यसमुत्पादाची प्रक्रिया सांगितली आहे. ते म्हणतात, ‘तृष्णेमुळे लोभाची ओढ लागते. लोभाची ओढ काम व लालसा उत्पन्न करते.. काम व लालसेमुळे दृढता निर्माण होते. दृढतेमुळे स्वामित्वाची निर्मिती होते. स्वामित्वामुळे लोभ आणि अधिक स्वामित्व निर्माण होते. स्वामित्वामुळे मालमत्तेवर पहारा ठेवणे, त्याची सुरक्षा करणे आवश्यक होते. मालमत्तेच्या रक्षण करण्याच्या वृतीमुळे अनेक वाईट व दुष्ट प्रसंग निर्माण होतात, जसे मारामारी, जखम, संघर्ष, भांडण, निंदा व असत्य.कथन ही प्रतित्यसमुत्पादाची अनुलोम साखळी होय.

      प्रतित्यसमुत्पादाची प्रतिलोम साखळीप्रमाणे जर तृष्णाच नसेल तर लोभाची ओढ लागणार नाही. लोभाची ओढ नसेल तर विकार निर्माण होणार नाही. विकार नसतील तर दृढता निर्माण होणार नाही. दृढता नसेल तर स्वामित्वाचा लोभ निर्माण होणार नाही. स्वामित्व नसेल तर अधिक स्वामित्वाची हाव निर्माण नाही. स्वामित्वाची भावना नसेल तर तेथे शांती निर्माण होईल. अशा तर्‍हेने संग्राहकवृतीचे दुष्परिणाम भगवान बुध्द स्थवीर आंनदाला समजावून सांगतात.

आर. के.जुमळे यांच्या ब्लॉगवरून साभार....!  

No comments:

Post a Comment